◾
*आन, बान आणि शान*
_एक मुद्दा, एक विचार!_
*6 मे 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*आन, बान आणि शान*
*तिन्ही सांजेची वेळ होती. हवेत छानसा गारवा होता. आई संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी चिरत बसली होती. बाहेर खेळायला गेलेला तिचा मुलगा घरी आला. घरावर फडकत असलेल्या झेंड्याकडे पाहून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. हातपाय धुवून झाल्यावर तो आईजवळ येऊन बसला आणि म्हणाला, "आई, आपल्या घरावर हा एवढा मोठा झेंडा का लावतो आपण?"*
*"अरे हा झेंडा तर आपली आन बान आणि शान आहे!" मुलगा काहीतरी विचार करत म्हणाला, "आणि तो माझा एक मित्र, त्यांच्या घरावर तर वेगळा झेंडा असतो? इतकाच मोठा. तोही त्यांची आन, बान आणि शान आहे का?" "असेल." "आणि त्या तिकडच्या गल्लीमध्ये तर मी वेगळ्याच रंगाचा आणखी एक झेंडा इतकाच मोठा पाहिला? त्यांचंही तसंच असेल का?" "असू शकतं." "आई, हे झेंड्याचे इतके सगळे प्रकार कशासाठी?" "कारण प्रत्येकाचा धर्म, जात, पंथ, भाषा, विचार वेगवेगळा आहे म्हणून. झेंडा आपली वेगळी ओळख निर्माण करतो." "म्हणजे वेगवेगळे झेंडे- वेगवेगळी माणसे. बरोबर?" "हो." "म्हणजे झेंडे माणसांना विभागण्याचं काम करतात का?" "गप्प बस. तुला त्यातलं काही कळत नाही." "म्हणून तर तुला विचारतोय ना?" "तुझ्या पप्पांना विचार." "ते म्हटले, झेंड्याबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही." "मग मला का विचारतोयस?" "कारण तू ऐकून घेतेस!"*
*दोन मिनिटं शांततेत गेली. मुलगा पुन्हा सुरू झाला, "आई, ऐक ना..." "बोल." "हा झेंडा लावल्यावर काय होतं?" "आपलं संरक्षण होतं. लोक आपल्याला वचकून राहतात. आपण कोण आहोत, आपल्या मागे कोण आहे, आणि आपण काय करू शकतो हे जगाला समजतं. मग लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत." "आई, झेंडा नसल्यावर लोक एकमेकांकडे वाकडया नजरेने बघतात का?" ”तसं नाही, पण कमजोर समजतात. झेंडा असला की आपल्याला ताकतवान समजतात." "मग गावातील प्रत्येक घरावर लोक झेंडा का लावत नाहीत?" "त्यांना तशी गरज वाटत नाही." "मग आपल्याला का वाटते?" "कारण आपल्याला आपल्या धर्माचा आणि झेंड्याचा अभिमान आहे." "म्हणजे जे झेंडा लावत नाहीत त्यांना तसा अभिमान नाही का?" "ते तू त्यांना जाऊन विचार."*
*"आई ज्यांच्या घरावर झेंडा नाही त्यांना जर धर्माचा अभिमान नसेल तर त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का?" "तसं नाही, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण झेंडा लावला की जगण्यात आणि वागण्यात जरा ऐट येते, जरब येते, रुबाब येतो." "आई मी शाळेत जाताना त्या झोपडपट्टीमध्ये एक मोठा झेंडा पाहिला, पण तिथली लोकं तर खूप गरीबीचं आणि हालाखीचं जीवन जगतात. ना ऐट, ना रुबाब. मग ते कसं?" "तो झेंडा तिथे आहे म्हणूनच ती लोक तिथे राहू शकतात; नाहीतर त्यांना आतापर्यंत लोकांनी तिथून हाकलून दिलं असतं! झेंडा समूहाचं रक्षण करतो." "आई, सगळ्यांचा मिळून एकच झेंडा राहू शकत नाही का गं? म्हणजे सगळ्यांचं एकदाच रक्षण होईल?" "राहू शकतो ना. पण तो नेमका कोणाचा आणि कोणता हे कोण ठरवणार? प्रत्येकाला वाटतं, आपलाच झेंडा श्रेष्ठ." "आई, पण तिरंगा तर आपल्या सगळ्यांचा झेंडा आहे ना? मग हे सगळे इतर झेंडे बंद करून तो एकच का नाही लावत ज्यांना झेंडा लावायचा आहे त्यांच्या घरावर?" "मूर्ख आहेस का रे तू? निघ! अभ्यासाला जाऊन बस! म्हणे सगळ्यांचे झेंडे बंद करून एकच लावा!"*
*मुलगा शांतपणे उठत म्हणाला, “म्हणजे तिरंगा फक्त शाळेतच सगळ्यांचा असतो तर!” भाजी चिरणारे आईचे हात आपोआप थांबले. त्याला उत्तर मात्र ती देऊ शकली नाही. तिच्याकडे ते नव्हतंच!*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.