Friday, May 8, 2020

कवितेचं गाणं करणारा कवी : अरुण इंगळे


📌

कवितेचं गाणं करणारा कवी : अरुण इंगळे


         गोड गळ्याचं दान सृष्टीनं ज्याला भरभरून दिलं असा एक कलंदर कवी म्हणजे कवी अरुण इंगळे सर. त्यांच्या हुंकार मातीचा या काव्यसंग्रहाचा नुकताच आस्वाद घेतला. वाचकाला स्वतःच्या शब्दांत गुंफून घेण्याची किमया अरुण यांना लीलया साधली आहे.

शब्द फुलावे मनात
जशी पालवी पानात
 हितगुज भावनांचे
 शब्द रुजावे कानात
किंवा

धुंद वाऱ्याच्या पायात
 कोणी बांधला भोवरा
ऋतू नवीन येताना
झाला कावराबावरा...
  अशी अलवार शब्दकळा घेऊन त्यांची कविता आपल्याला भेटते. निसर्गातील विविध बदल कवी अगदी सहज टिपतो.
आणि या ओळी तर पहा,

रानावनात गोंगाट
वारा खट्याळ घुमतो
वाऱ्याच्या या तालावर
 सारा शिवार डोलतो

      पावसाचं माणसाशी असलेलं नातं अधोरेखित करणाऱ्या अनेक रचना या संग्रहात आहेत. काही पावसासाठीच्या, काही त्याच्या नंतरच्या तर काही त्याच्या न येण्याच्या. कविवर्य विठ्ठल वाघांनी मांडलेल्या

' पाऊस टाळतो येणे
 कधी विसरतो जाणे'

 या अनुभवाची प्रचिती अरुण यांच्या विविध कवितांमधून येत राहते.

थेंब ढवळा नि निळा
कवटाळतो मातीला
सारं करून हिरवं
 रंग लावतो पाठीला

नभी दाटता गारवा
फुटे पाण्याची घागर
ओल्या डोंगरकुशीत
उरी सुखाचा पाझर

साऱ्या सृष्टीचा हुंदका
गेला आभाळाच्या कानी
सरसर बरसून
त्यानं केलं आबादानी

      या काव्यओळी याची साक्ष देतात. कालचक्र चालत राहतं, ऋतू बदलत राहतो. परंतु मातीत मळणाऱ्या गावगाड्यातल्या माणसांच्या आयुष्याची उलथापालथ करून जातो. त्यांचं सोसणं अरुण इंगळे यांची कविता प्रामाणिकपणे मांडत राहते .

हात राबता राबता
घट्टा हाताला निब्बर
घट्ट्यातून हिरवाई
डोळी झुलते अंबर

यातून राबणारे हात डोळ्यांसमोर उभे राहतात. मग पोराच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारा बाप

पैसा जोडून जोडून
तुझ्या बांधला गाठीला
 तूच व्हायचं आधार
माझ्या साठीच्या काठीला
     अशी अपेक्षा व्यक्त करतो, तर हतबल बापाचं दुर्दैव रेखाटताना मुलगा

गेलं मातीत विरून
 सारं सुगीचं सपान
स्वत: विझून एकटा
 गेला पेटवून रान

 या शब्दांचा आसरा घेतो. बापाला आलेल्या कटू अनुभवांना मांडताना

चामडी पायताणागत
तू झिजून झिजून वाकडा झालास कमरेत डोळ्यात अंधार साठवून,
घरभर फिरत होतास तू
भूतकाळाचा पसारा होऊन
तेव्हा हक्काच्या आधाराच्या काठ्या
 नेमक्या तुझ्या हाताशी लागल्या नाहीत
      अशी जग-रीत मांडतो. पण अरुण यांचा नायक धीर सोडणाऱ्यांपैकी नाही. उलट

कधी नाही रडायचं
सदा आपण हसायचं
दु:ख किती आले तरी
 त्याला नाही घाबरायचं...
अशी ठाम भूमिका घेतो.

उद्याचे तारे मोर पिसारे
उद्याची आम्हीच किरणे
क्षणा-क्षणाला जगणं सोडूनी
उगाच कशाला मरणे
मुक्त होऊनी पंखामध्ये
सारं आकाश भरायचं...
 असं म्हणत पुन्हा आकाश कवेत घेण्याची तयारी करतो!

मन ठेवूनी निर्मळ
भरू पंखामध्ये बळ
माणसाचा माणसाशी
देवू घालुनिया मेळ
कायमची मिटेल ती
दोन मनातली दरी...
किंवा
एक दिस भाकरीचा
चंद्र येईन दाराशी
चंद्रमौळी झोपडीत
 घालू रिंगण आकाशी

अशा आशावाद पेरणाऱ्या रचना रसिकाला खिळवून ठेवतात.

आईवडिलांबद्दल सांगताना कवीचे शब्द थकत नाहीत.

सारं विश्व पदरात
कसं मोजू मी आकाश
तुझ्या डोळ्यांत साचला
लाख सूर्याचा प्रकाश
किंवा

पावसाची सर । मायेचा पाझर ।
 सुखाची झालर । बाप माझा ।।
या त्यांच्या ओळी अंतरीचा ओलावा स्पष्ट करतात.

ज्या मायबाप या कार्यक्रमाने अरुण राज यांनी जनमानसावर गारुड केलं त्याच्या खालील मुखगीतपंक्ती वाचकाचं नातं आईवडिलांशी पुन्हा घट्ट करतात,

 माय बापाची विसरू नका कीर्ती
 तेच आपले आभाळ आपली धरती
 सांभाळती दौलत लेकरांची
 जाळूनी जिवांच्या ज्योती
मायबाप... मायबाप...

 माणुसकीचा खळखळता झरा असणाऱ्या सर्वगुणसंपन्न अरुण इंगळे सरांच्या पुढील काव्यप्रवासास आपण सर्वच रसिकमित्र शुभेच्छा देऊयात.

✒️
rajshelkesir@gmail.com

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...