Wednesday, March 26, 2025

बापाचे मालक होऊ नका

*बापाचे मालक नका होऊ*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 मार्च, बुधवार_

▪️
*बापाचे मालक नका होऊ*


 *प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटीने आगार सोडलं आणि कंडक्टरसाहेब "तिकीट! तिकीट!" करत मोहिमेवर निघाले. निम्मी बस लाडक्या बहिणींनी आणि उरलेली ज्येष्ठांनी भरलेली असल्यामुळे दर्दी कमी आणि हाफ तिकीटवाली गर्दीच जास्त होती. त्यामुळे उत्पन्न वाढीचा प्रश्न नव्हताच. उलट कंडक्टरना पैशाची खणखण कमी आणि वाद घालणाऱ्या प्रवाशांची भनभन जास्त ऐकावी लागणार होती. तेही तशी तयारी करूनच आले होते.*

    *अवाढव्य शरीरांच्या गर्दी आणि गोंगाटामधून आपला देह कसाबसा ओढून काढत कंडक्टर एकदाचे मागच्या प्रवाशांपर्यंत पोहोचले. एक गृहस्थ हातात पैसे धरून त्यांच्याकडेच पाहत होते. कंडक्टरची आणि त्यांची नजरानजर होताच त्यांनी पैसे त्यांच्या हातावर सोपवले आणि गावाचं नाव सांगितलं. अर्थातच हाफ तिकीट होतं. कंडक्टरनी पैसे मोजले तर भरले पंचावन्न रुपये. मधल्या काळात भाववाढ झालेली बाबांना माहीत नसावी म्हणून कंडक्टरनी त्यांना सांगितलं, "बाबा अजून पाच रुपये द्या." बाबा म्हणाले, "तिकीट पंचावन रुपये हाय ना?" कंडक्टर म्हणाले, "आहे नाही, होतं! आता पाच रुपये वाढले." बाबा म्हणाले, "कवा?" कंडक्टर म्हणाले, "कवा काय? मागच्याच हप्त्यात." बाबा म्हणाले, "पण माझं पोरगं तर म्हणलं पंचावनच रुपये लागतेत." "त्याला भाव वाढ झालेली माहीत नसेल. द्या पाच रुपये", कंडक्टर म्हणाले. बाबांचा चेहरा पडला. व्याकुळ नजरेने कंडक्टरकडे बघत म्हणाले, "त्यानी इतकेच दिलते." "काय? इतकेच पैसे देऊन तुम्हाला एसटीत बसवून दिलं??" "व्हय." "आणि परत यायला पैसे? रस्त्यात चहा पाण्याला लागले तर?" बाबांकडून उत्तर आलं नाही. पण त्यांचा हताश चेहरा बरंच काही सांगू पाहत होता. कंडक्टरसाहेबांचं डोकं गरगर करायला लागलं. डोळ्यासमोर त्यांच्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा उभा राहिला. समोरच्या बाबांच्या रूपाने त्यांचे वडील त्यांच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत होते. प्रश्न पाच रुपयांचा नव्हताच. त्यांनी बाबांना तिकीट दिलं पण त्यांच्या डोळ्यांत बघण्याची त्यांना हिंमत होईना. "इतकेच पैसे देऊन बापाला एसटीत बसवून दिलं??" प्रश्न वेताळाचं रूप घेऊन त्यांच्या मानगुटीवर बसला. प्रवास संपला. प्रवासी घरी गेले. प्रश्न कंडक्टरसोबत सहकुटुंब त्यांच्या घरी आला.*

   *प्रवासाला निघालेल्या बापाच्या हातावर फक्त जाण्यापुरते हाफ तिकिटाचे पंचावन्न रुपये टेकवताना त्याच्या तरुण कर्त्या मुलाला काहीच वाटलं नसेल का? की मुलाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून बापालाच अधिक पैसे मागण्याची हिंमत झाली नसावी? की बाप तेही पैसे पोराला न सांगता दुसऱ्याकडून उसने घेऊन आला होता? की वडिलांनी अशा वृद्धापकाळात प्रवासाची दगदग करू नये म्हणून त्याने त्यांच्या काळजीपोटी खोटी कडकी दाखवली, जेणेकरून ते जाणार नाहीत, घरीच राहतील? की खरोखर आजकालच्या कमावत्या मुलांनी आई-वडिलांवर अशी लाचारीची वेळ आणली आहे ज्याची त्यांना बिलकुल जाणीव नाही? प्रश्नांचं मोहळ उठलं.*

  *अस्वस्थ कंडक्टरनी दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर इतकंच लिहिलं, "हाती पैसे आले म्हणून मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी!"*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, March 19, 2025

चांगुलपण दे गा देवा!

**चांगुलपण दे गा देवा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 मार्च, बुधवार_

▪️
*चांगुलपण दे गा देवा!*

   *समाजात काही माणसं चांगल्या स्वभावाची असतात, काही धूर्त, धोरणी, लबाड. चांगल्या माणसांचे खायचे दात चांगले असतात, धूर्त माणसांचे दाखवायचे. चांगली माणसं चेहऱ्याने चांगली असतीलच असं नाही, मात्र धूर्त माणसांच्या पदरात कधीकधी 'लंगूर के हाथ अंगूर' या न्यायाने देखणेपणाचं दान पडलेलं असतं, त्याचाही ती योग्य वेळी बरोब्बर शस्त्र म्हणून उपयोग करतात.*

    *चांगल्या माणसांना धूर्तांचा कावा लक्षात येत नाही. मुळात ती माणसं धूर्त आहेत हेच त्यांना कळत नाही. कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. तोपर्यंत धूर्त माणसं चांगल्या माणसांशी त्यांना हवी तितकी जवळीक साधून त्यांना हवं ते काम त्यांच्याकडून काढून घेतात. चांगली माणसं असतात केवळ प्रेमाची भुकेली. दोन शब्द कोणी प्रेमाचे बोललं की ही माणसं भाळतात. धूर्त माणसांना हे चांगलंच ठाऊक असतं. त्यांना जितकं ओरबाडायचं असतं तेवढं ओरबाडून झालं की धूर्त माणसं शिताफीने हळूच अंग काढून घेतात. काम झालं की त्या माणसाला खड्यासारखं बाजूला करतात. नंतर ओळख द्यायलाही त्यांना वेळ नसतो. ना ते त्यांचा कॉल उचलतात, ना त्यांच्या मेसेजला उत्तर देतात. नंतर चांगल्या माणसांनी त्यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवायची. दुर्लक्षित होण्याची किंवा अपमानित होण्याची!*

    *चांगल्या माणसांना सुरुवातीला हे फार अवघड जातं. पण जेव्हा ती भानावर येतात, तेव्हा त्यांना अधिक स्पष्ट दिसू लागतं. मात्र ती त्यांचं चांगुलपण सोडत नाहीत. समुद्रातून एक लोटा पाणी कोणी घेऊन गेलं तर समुद्राला काही फरक थोडाच पडतो? तसंच चांगल्या माणसांच्या बाबतीत होतं. उलट त्यांना फसवणाऱ्या धूर्त माणसांची नंतर कधीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची व त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नाही. हा चांगुलपणाचा विजय असतो.*

    *याउलट फसवणूक झालेल्या काही चांगल्या माणसांना वाटू लागतं की ' माझ्या चांगुलपणामुळे माझ्यावर खूप अन्याय झाला आहे'. मग ही माणसं स्वतःच इतरांशी धूर्त लोकांसारखी वागू लागतात. कामापुरतं गोड गोड बोलतात, काम झालं की ओळख देत नाहीत. बिझी असल्याचं भासवतात. ब्लॉक करतात. मग इतर लोक या कधीकाळच्या चांगल्या माणसांनाही स्वार्थी, धूर्त, लबाड, खडूस समजू लागतात. त्यांच्या तोंडावर त्यांना हे स्पष्टपणे ऐकवतात. तीही मख्खपणे ऐकून घेतात. इथे समुद्राचं डबकं होतं. चांगल्या नावाला बट्टा लागतो आणि चांगुलपणाची मान शरमेने खाली जाते.*

   *म्हणून चांगल्या माणसांनी 'आपलं चांगुलपण आपण धूर्तांच्या दावणीला तर बांधत नाही आहोत ना?' हे वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे. शिवाय परिस्थितीने अडलेल्या चांगल्या माणसांना धूर्त समजण्याची गल्लतही नाही केली पाहिजे. कारण मनाचं चांगुलपण प्रत्येकालाच थोडं लाभतं? मोजक्याच लोकांना देवाने बहाल केलेला तो एक सुंदर दागिना आहे. त्याला जीवापाड जपलं पाहिजे.*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 12, 2025

माणसाचा वर्ग कोणता?

*माणसाचा वर्ग कोणता?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 मार्च, बुधवार_

▪️
*माणसाचा वर्ग कोणता?*

    *"मम्मी, पशु म्हणजे प्राणीच ना?" तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीने आईला विचारलं. मम्मी म्हटली, "हो तर!" "मग माणसाला पशु म्हटलं तर चालेल ना?" मुलीच्या या प्रश्नावर मात्र घास घशात अडकावा तसा उत्तराचा शब्द मम्मीच्या घशात अडकून बसला. काय उत्तर द्यावे तिला कळेना. स्वतःला सावरत ती इतकंच म्हणाली, "पप्पांना विचारून सांगते."*

    *माणसाला प्राण्यांच्या वर्गात टाकायचं की पशुंच्या? हा तर नवीनच बॉम्ब टाकला लेकीने! माणूस हा समाजशील प्राणी आहे असंच आपण लहानपणापासून वाचत, लिहीत, म्हणत आलो. माणूस हा पशु आहे असं कधीच म्हटलं नाही, किंवा ऐकलंही नाही. पशु-पक्षी यांच्याबद्दलही आपण लहानपणापासून माहिती गोळा करत आलो, मात्र प्राणी आणि पशु हे वेगवेगळे असतील असं कधी वाटलं नाही. लेकीला उत्तर देणं भाग होतं. मम्मीच्या विचारांची गाडी वेगात धावायला लागली. काही क्षणातच ती विचारांच्या कोणत्या जगात गेली हे तिलाही कळलं नाही. शब्दांची उकल करून बघता बघता शब्द स्वतःच तिच्यासमोर अर्थ ओंजळीत घेऊन उभे राहिले.*

    *ज्यांच्यात प्राण आहे ते प्राणी. हिंदीमध्ये त्यांना जानवर म्हणतात कारण त्यांच्यामध्ये 'जान' म्हणजे 'प्राण' असतो. 'वर' म्हणजे 'धारण करणारा'. मग 'पशु' कोण? पशु शब्द संस्कृतमधल्या 'पश' या धातूपासून आला. ज्यांना पाशात म्हणजे बंधनात ठेवणे आवश्यक असते ते प्राणी म्हणजे पशु. त्यांच्यावर बंधन ठेवले नाही तर त्यांच्या शक्तीचा ते क्रूर उपयोग करतात. इतरांना हानी पोहोचवतात. म्हणून मुक्त श्वापदांना शक्यतो पशु म्हटलं जातं, आणि जे माणसांसोबत राहु शकतात, शक्यतो कोणाला इजा करत नाहीत, त्यांना प्राणी!  गुंता हळूहळू सुटू लागला.*

    *क्षणात मम्मीच्या डोळ्यांसमोरून गेल्या पंधरा दिवसांच्या बातम्या येऊन गेल्या. बसमध्ये पाशवी बलात्कार. लोखंडी रॉडने मारहाण करत पाशवी हत्या. निर्घृण हत्या केलेल्या प्रेताची विटंबना. निराधार महिलेवर पाशवी अत्याचार! पाशवी म्हणजे? पशूंप्रमाणे?? हो हो, तसेच. माणुसकीला कलंकित करणारी ही माणसे, माणसे नव्हेतच! हे तर पशू!! प्राण्यांमध्ये असलेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता यांच्यात कुठे आहे? यांच्यात आहे फक्त क्रौर्य, स्वार्थ, वासना, ओरबाडण्याची राक्षसी वृत्ती आणि नीच हव्यास! म्हणजे प्राणी आणि पशु यांच्यात भावनांवरच्या नियंत्रणाचा फरक आहे तर?*

   *मम्मीचे डोळे भरून आले. पोरीजवळ गेली. तिला पोटाशी घट्ट धरलं, आणि इतकंच म्हणाली, "पशु म्हणजे प्राणी नाही हं बाळ! पशु म्हणजे फक्त पशु, आणि प्राणी म्हणजे फक्त प्राणी! आणि हो, माणूस हा प्राणीच आहे, पण त्याचा पशु व्हायला वेळ लागत नाही, म्हणून जरा सावध राहत जा."* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 5, 2025

माणूस जगला पाहिजे

**माणूस जगला पाहिजे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 मार्च, बुधवार_

▪️

*गिव मी सम सनशाईन*

  *पहाटे सगळं जग साखरझोपेत असताना एक जण रेल्वेरुळावर येऊन उभा राहिला. निस्तेज. निर्विकार. तिकडून गाडी आली. लोको पायलटने त्याला पाहिलं. खूप हॉर्न दिले. पण हॉर्न ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. तो स्वतःही नव्हता. रुळावर फक्त त्याचं शरीर उभं होतं. विचार शून्य झालेलं फक्त शरीर. गाडी थांबू शकली नाही, त्याचा प्रवास थांबला. लोकांनी म्हटलं गाडीने त्याला उडवलं म्हणून तो गेला, परंतु खरं तर तो दोन महिन्यापूर्वीच गेलेला होता, हे कोणालाच कळलं नाही. नंतर लोक त्याच्यावर अमुक दडपण होतं वगैरे चर्चा करत राहिले.*

    *भावनिक आणि स्वाभिमानी माणसं धाडसी असतात. त्यांच्या निर्णयांनी ती कधी इतरांच्या दहा पावले पुढे जातात आणि खूप प्रगती करतात, तर कधी दहा पावले मागे फेकली जातात, प्रचंड अपयशाची धनी होतात. जिंकली तर कौतुक; हारली तर ‘छी! थू!’ त्यांच्या वाट्याला येते. ही माणसं जगावेगळी असतात खरी, परंतु यांची एक अडचण असते. ती अपमान सहन करू शकत नाहीत. दडपण व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. पडीच्या काळात कोणाला सांगतही नाहीत. चार चौघात हसतात, आतल्या आत झुरत राहतात. लोक काय म्हणतील? आणि ते काय करतील? हे प्रश्न त्यांना छळू लागतात. बदनामीची त्यांना भीती वाटते. मग एखादया हळव्या क्षणाला त्यांचं मन खचू लागतं. मन खचलं की शेवटाकडे सुरुवात झालीच म्हणून समजा. मृत्यू हा त्यांना सगळ्या कटकटीतून सुटण्याचा सोपा मार्ग वाटतो. जे इतरांना जमत नाही, असं मरण्याचंही धाडस ते करतात. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना अडचण होते हे त्यांना जिवंतपणी आवडत नाही, पण आपण असे केल्यावर त्यांना आयुष्यभर अडचणी राहतील, हे त्यांना टोकाचा निर्णय घेताना समजत नाही ही खरी शोकांतिका आहे. अशा वेळी माणूस आपल्या हातून निसटू लागला आहे हे कोणालातरी कळणं फार महत्वाचं. खचू पाहणाऱ्या माणसानेही 'मी आता खचू लागलो आहे' हे कोणालातरी सांगणं महत्त्वाचं आहे. कारण प्रयत्नांचे शंभर दगड मारल्यावर एखादा तरी दगड लागतोच. प्रयत्न थांबता कामा नयेत.*

     *सरतेशेवटी जेव्हा कुठूनही मदत मिळणार नाही तेव्हा 'ध्यान, ज्ञान आणि गान' म्हणजे संगीत हे माणसाला कोणत्याही संकटातून शंभर टक्के वाचवू शकणारे मार्ग आहेत हे प्रत्येकाला कळावं. तीनपैकी एकाला अशा वेळी बिनशर्त शरण जावं. कारण माणूस वाचला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. सोबत माणुसकीही जगली पाहिजे. हे जग माणसांनी त्यांच्या प्रयत्नांनी सुंदर केलं आहे. माणसंच खचून हे जग सोडून जाऊ लागली, तर या जगाच्या इतक्या सुंदर असण्याचा फायदा तरी काय?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...