Wednesday, October 29, 2025

खुसखुशीत आणि सुरक्षित प्रवास

*खुसखुशीत आणि सुरक्षित प्रवास!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_29 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*खुसखुशीत आणि सुरक्षित प्रवास!* 

*पैसे मागतो पण भिकारी नाही! कागद फाडतो पण वेडा नाही! घंटी वाजवतो पण पुजारी नाही!! ओळखा पाहू कोण? लहानपणी बाईंनी शाळेत आम्हाला हे कोडं घातलं होतं. कोणालाच त्याचं उत्तर सांगता आलं नव्हतं! काय? आठवलं म्हणता? हो! बरोबर! तेच! आपला 'कंडक्टर'!*

   *नोकरी करणाऱ्या वर्गापैकी सर्वात जास्त वैतागणारा प्राणी जर कुणी असेल तर तो कंडक्टरच असावा! आणि तोच जर सिटीबसचा असला तर त्याला टक्कल पडलंच म्हणून समजा! सकाळच्या 'बोहणी'पासून शेवटच्या ट्रिपपर्यंत बिचाऱ्याची किती लोकांशी भांडणं होतात तोच जाणे! पण 'प्रवाशांच्या सेवेसाठी'तो सगळं सहन करतो. नाहीतर इतकी भांडणं पचवणं म्हणजे काही 'च्येष्टा' नव्हे; आणि भांडणात एक ‘लेडीजबाई’ असेल तर नव्हेच नव्हे! त्यातल्या त्यात कंडक्टर स्वतःच 'आग्गाव' असला की मग कहरच!!*

   *काही कंडक्टर म्हणजे एक प्रकारे झेडपीच्या शाळेवरचे शिस्तप्रिय गुरुजीच, आणि प्रवासी म्हणजे जणू काही त्याच शाळेतली तिसरीची वांड मुलं! अख्खी एस.टी. म्हणजे कंडक्टरचा वर्ग! गुरुजींप्रमाणे कंडक्टर बसमधल्यांना झापू शकतो. ऐ! पुढे सरक. ओ साहेब, तिकीट घेतलं का? ओ बाई! सरका तिकडे जरा! तिघांच्या सीटवर दोघीच बसलात खुशाल! बाळ, कितवीला आहेस तू? ह्या पोराचं तिकीट लागेल बरका! बाबा, तिकीट? अर्ध? बघू ओळखपत्र? वरील सर्व वाक्यांत आवाज पारंपरिक मोठा! एसटीतले प्रवाशीही बिचारे त्याचं निमूटपणे ऐकतात!*

 *गुरुजींच्या छडीकडे जसं सगळ्यांचं लक्ष असतं तसंच बसमधल्या प्रवाशांचं आपला स्टॉप जवळ आला, की कंडक्टरच्या बेलवर असतं! कधी कधी तर स्टॉप मागे गेला, आणि जर कंडक्टरऐवजी प्रवाशानेच बेल मारली, तर चाणाक्ष ड्रायव्हरला लगेच समजतं, कारण त्याच्याकडे ‘गायछाप’ नावाची बुद्धीवर्धक वल्ली असते म्हणे!*

   *बाकी भरदिवसा लोकांदेखत प्रत्येकाच्या खिशाला कायदेशीर हात फक्त कंडक्टरच घालू शकतो. फाटका 'तिकीट' नावाचा बोटभर कागद आपल्याला दिला की आपण खुश आणि आपल्या खिशातले किंवा पर्समधले पैसे त्याच्या खिशात आले की तोही खुश! सुट्या पैशांबाबतीत कंडक्टरचा घोळ कधीच होत नाही. याची टोपी त्याला घालून तीन-चार जणांना पाचच्या ठोकळ्यात किंवा दहाच्या नोटेत तो बरोब्बर 'ऍडजेस्ट' करतो, नाहीतर 'पुढच्या वेळेला घ्या' म्हणतो. पण आपल्याकडे एक-दोन रुपये कमी असतील तर सरळ "उतरून घ्या!" म्हणतो! त्याचवेळी एखादा प्रेमळ कंडक्टर सगळ्या प्रवाशांचं मनसुद्धा जिंकतो.*

 *आजकाल निम्मी बस फुकटवाल्यांची आणि हाफवाल्यांची असल्यामुळे कंडक्टरलाही वाईट वाटत असणार, पण लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचविण्याचं पुण्य मात्र त्याला आणि त्याच्या जोडीदाराला नक्की मिळतं.  म्हणूनच ‘लालपरी’वरचं आणि ‘डायवर-कंडक्टर’वरचं सामान्य जनतेचं प्रेम आजही टिकून आहे. एसटीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास आहे. उगाच लोक म्हणत नाहीत, 'वाट पाहीन, पण एस. टी. नेच जाईन!' एस. टी. प्रमाणेच आपल्या आयुष्याचा प्रवासही असाच सुरक्षित असला म्हणजे झालं!*
-

 राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Thursday, October 23, 2025

पूजा म्हणजे नेमकं काय?

*पूजा म्हणजे नेमकं काय?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_22 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*पूजा म्हणजे नेमकं काय?*🤔

*पूजा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा विधी आहे. सणावाराला पूजा हवीच! लक्ष्मीपूजनाशिवाय आपण दिवाळीची कल्पनाही करू शकत नाही. पण पूजा म्हणजे नेमकं काय? असं विचारलं तर तुम्ही म्हणाल, पूजा म्हणजे पूजा! दुसरं काय?*

 *एका सोप्या प्रश्नाच्या आधाराने जाऊया. खनिज (मिनरल) म्हणजे काय? तर ‘जे खाणीमधून मिळतं ते खनिज.’ यातला शेवटचा ‘ज’ म्हणजे जन्मलेला. ज्याचा जन्म किंवा उत्पत्ती खाणीत झाली ते खनिज. प्राण्यापासून उत्पन्न झालेली किंवा मिळालेली उत्पादनं म्हणजे प्राणिज. अगदी तसंच ‘पूर्णत्वामधून जन्मलेली कृती म्हणजे पूजा!’*

 *खरी पूजा तेव्हाच होते, किंवा केली जाते जेव्हा आपल्या आनंदात, सुखात, उत्साहात, संकल्पात, इच्छेत, कार्यात... कशातही 'पूर्णत्व' लाभल्याची भावना आपल्या मनात येते. त्याशिवाय केलेली पूजा म्हणजे केवळ दिखावा आहे; बाकी काही नाही! ‘मला हे मिळू दे, मला ते मिळू दे’ अशी ‘मागण्यासाठी’ केलेली पूजा देवाला तरी पोहचत असेल का? पूजेच्या दिवशी किंवा वेळीही इतरांवर ओरडणं, खेकसणं हे त्याला आवडत असेल का? ‘मन भरलेलं असणं’ म्हणजे पूर्णत्व! आणि देवाकडून काहीच नको असताना त्याची मांडलेली पूजा ही खरी पूजा!*    

*आता आणखी एक सोपा प्रश्न. आपण पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो?? तुम्ही म्हणाल सोपं आहे; देव्हारा सजवतो, आरास मांडतो, पंचामृत आणतो, मंत्र म्हणतो, नैवेद्य दाखवतो, आरती म्हणतो, प्रसाद वाटतो!*

 *प्रसिद्ध तत्त्ववेत्ते श्री श्री रविशंकर यांनी या प्रश्नाचे अतिशय छान उत्तर दिले आहे. ते म्हणतात, आपण पूजा करतो म्हणजे दुसरं तिसरं काही करत नाही तर चक्क नक्कल करतो! कुणाची? तर प्रत्यक्ष देवाची! निसर्गाची! तुम्ही म्हणाल, कशी? तर हे पहा- सूर्य-चंद्र घेऊन निसर्गदेव रोज आपली आरती करत असतो, आपण इतकासा दिवा घेऊन त्याला ओवाळतो! त्याने आपल्यासाठी मोठमोठे जलाशय दिले, नद्या वाहत्या केल्या, पाऊस दिला; आपण त्याला ‘जल समर्पयामिss!’ म्हणत लोटाभर पाणी दाखवतो. त्याने आपल्यासाठी ठायी-ठायी अन्न निर्माण केलं, आपण चार बोटांच्या चिपट्यावर बसेल इतका नैवेद्य त्याला दाखवतो. त्याने आपल्याला वाऱ्याचं, पानांचं, पावसाच्या थेंबांचं संगीत दिलं, आपण त्याच्यासमोर कॅसेट वाजवतो! त्याने निर्माण केलेल्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करून आपण बोलायला शिकलो; आणि आपण त्याच्यासमोर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात मंत्रजाप करतो! त्याने ओल्या मातीचा सुगंध दिला, आपण धूप-अगरबत्ती लावतो! आपण वेगळं काय करतो?देव खरंच जर आपला हा खटाटोप पाहत असेल तर गालातल्या गालात किती हसत असेल, नाही? म्हणून पूजेचा खरा अर्थ आहे, आहे त्या परिस्थितीत मन शांत ठेवणं, देवाप्रति, निसर्गाप्रति कृतज्ञता जपणं, ती व्यक्त करणं आणि त्याला धन्यवाद देणं! असं पूजन घरोघरी होवो या सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा!* 
    
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, October 15, 2025

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_15 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*

*“रविss कुठे आहेस तू? काय करतोयस?” “पप्पा अभ्यास करतोय, बेडरूममध्ये.” “इकडे ये, एक रफ वही आणि पेन घेऊन ये.” “कशासाठी?” “आण म्हटल्यावर घेऊन येत जा. पुढे शंभर चौकशा करत जाऊ नकोस.” मुलगा निमुट वही-पेन घेऊन आला. वडिलांनी त्याच्या हातातून वही घेतली, एक कोरं पान फाडलं आणि त्याच्या बारीक घड्या केल्या! ‘आता पप्पा कागदाची होडी, विमान किंवा एखादी जादू वगैरे करून दाखवतात की काय?’ मुलाला प्रश्न पडला.*

 *वडिलांनी जेवढ्या घड्या पडल्या होत्या तेवढे तुकडे केले, आणि म्हणाले, “आता या प्रत्येक चिठ्ठीवर एकेक नाव लिहायचं.” ‘अच्छा! म्हणजे आज 'राजा-राणी-चोर-शिपाई' खेळण्याचा मूड आहे तर!?’ असा विचार मुलाच्या डोक्यात येईपर्यंत वडिलांनी खिशातून कोऱ्या करकरीत नोटा बाहेर काढल्या. बायकोला हाक मारली. बायको किचनमधून हात पुसतच बाहेर आली, नोटा पाहिल्या व म्हणाली, “झाला वाटतं पगार?” नवऱ्याने मान हलवली. तीही कॉटवर येऊन बसली. सगळा लवाजामा कॉटवर स्थिरस्थावर झाल्यावर नवरा बायकोला म्हणाला, “सांग आता.”*

    *बायकोने सुरू केलं- "घरभाडे अमुक रुपये." वडिलांनी मुलाकडे पाहिलं व म्हणाले, “लिही एका चिठ्ठीवर -घरभाडे.” मुलाच्या लक्षात ‘त’ म्हणता तपेलं आलं. नवऱ्याने पगारामधले घरभाड्याचे पैसे मोजले, बायकोच्या हातात दिले, तिने एक-एक नोट सुट्टी करून बरोबर आहेत का पाहिलं. “हं!” म्हटलं. वडिलांनी नोटा घेतल्या, ‘घरभाडे’ लिहिलेली चिठ्ठी पैशांवर लावली आणि नोटांना रबरबँड लावून बाजूला ठेवली. मुलाला म्हटले, “लिही- किराणाची उधारी, दूधवाले काका, भाजीपाल्यावाली मावशी, लाईटबिल, गॅसची टाकी, मोटरसायकलचा हप्ता, पेट्रोलचे पैसे, दवाखान्याचा खर्च, रविची शाळेची फी, ट्युशनची फी, दीदीचा होस्टेलचा खर्च, मोबाईलचा रिचार्ज, किरकोळ खर्च, उरलेले पैसे...”*

     *वडिलांनी चिठ्ठ्यांप्रमाणे पैसे मोजून त्यांना रबरबँड लावले, पण शेवटची चिठ्ठी तशीच उरली. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. मुलाने म्हटलं, “पप्पा तुम्ही जॉबऐवजी एखादा बिझनेस वगैरे का नाही करत? बिझनेसवाल्या लोकांकडे खूप पैसे असतात."*

 *वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. प्रत्येक माणसाला असंच वाटतं. आपल्यापेक्षा दुसरे जास्त सुखात आहेत; पण तसं काही नसतं. दुरून डोंगर साजरे. जवळ गेलं की सब घोडे बारा टक्के! सगळ्यांच्या डोक्याला सारख्याच मुंग्या! त्यापेक्षा आहे त्याचं असं काही नियोजन करता आलं की जीव सुखात राहतो बघ."*

 *आज मुलाने पुस्तकात नसलेले दोन तीन नवे धडे एकाच अनुभवात शिकले. शिवाय वडिलांनी शेवटच्या चिठ्ठीचे पैसे मुद्दाम खिशातच ठेवले होते ते वेगळं!*
-
    
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, October 8, 2025

एकच स्वप्न

*एकच स्वप्न...!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_08 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*एकच स्वप्न*

     *आजकाल बहुतांश माणसांचं थोड्याफार फरकाने एकच स्वप्न असतं- ‘मला पैसेवाला व्हायचंय!’*

 *आसपासच्या दुनियेचा भपका पाहून त्याला कळलेलं असतं की पैसा हेच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. पैसा बोलता है! श्रीमंतीची नशाच वेगळी आहे. तसं नसतं तर सर्वस्वाचा त्याग केलेल्या काही आधुनिक साधू-संत-महात्म्यांचे कोटी-कोटींचे आश्रम झाले असते का?  केवळ समाजसेवा करण्यासाठी म्हणून टू व्हीलरवर राजकारणात आलेल्या सेवकांचे पाचच वर्षांत डोळे दिपवणारे आर्थिक साम्राज्य उभे राहिले असते का? मग सामान्य माणसांनी श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं तर बिघडलं कुठे?*

 *स्वप्न म्हणजे गती. एकाच दमात दहा पावलं पुढे नेणारी जादू म्हणजे स्वप्न. तसंही एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणतातच ना, की स्वप्नं ती नव्हेत, जी झोपल्यावर पडतात; खरी स्वप्नं तर ती, जी माणसाला झोपूच देत नाहीत! पण काही सामान्य माणसं अशी स्वप्नं पाहतात, की ती स्वतः तर झोपत नाहीतच; पण त्यांच्यामुळे घरातल्या इतरांनाही सुखाने झोपू देत नाहीत! आणि इथेच गडबड आहे!!*

  *स्वप्नाचे दोन तऱ्हेवाईक नातेवाईक आहेत; अट्टहास आणि हतबलता. दोघंही दोन टोकाचे. घरातले कोणीच आपल्या बाजूने उभे नसताना त्यांच्या विरोधाला समजून न घेता “नाही! मी हे करणारच! आणि करूनच दाखवणार!” अशा वेगवान घोड्यावर बसणं म्हणजे अट्टहास, तर “मला हा मोठा डाव खेळणं भाग आहे, नाहीतर मी संपून जाईन. अगोदर पडलेले लहान-सहान खड्डे भरून काढण्यासाठी हा एक मोठा डाव खेळल्याशिवाय मला पर्याय नाही. आता हा डाव हेच माझं स्वप्न.” अशा भरवशाच्या म्हशीवर बसणं म्हणजे हतबलता. दोघंही कधी दगा करतील सांगता येत नाही. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर मांड ठोकता आली तर यशाची देदीप्यमान पताका, आणि घोडा सैरभैर झाला तर अपयशाच्या खोल दरीत भिरकावले जाण्याची शक्यता. म्हैस गाभण राहिली तर दुधाने अंघोळीचं भाग्य, पण त्याच भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला तर “अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी!” म्हणत तिच्यामागं फरफटत जाण्याची, कर्जबाजारी होण्याची नामुष्की. स्वप्न पाहणाऱ्या बऱ्याच जणांची गळाभेट नेमकी या भावकीशी होते; खऱ्या स्वप्नांशी नाही!*
  
    *खऱ्या स्वप्नांना आपली खरी कुवत आणि झेप कुठवर हे माहीत असते. आनंदाने जगता जगता निश्चित दिशेने एकेक पाऊल टाकत गेलं, की ती आपोआप पूर्ण होतात! ती आपल्याला थकवत नाहीत. मानसिक त्रास देत नाहीत. आजारी पाडत नाहीत. आपल्यासोबत आपल्या गतीने चालत राहतात, आणि एखाद्या गोड दिवशी एखाद्या छान शिखरावर आपल्याला अलगद नेऊन पोहचवितात. नाहीतर आयुष्यातला आनंद हिरावून घेऊन आपल्या पदरात श्रीमंतीचं दान टाकणारी स्वप्नं तरी काय कामाची? 'मला आनंदी व्हायचंय!'  हे स्वप्न आपण कधी पाहणार? कारण सरतेशेवटी माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद मोजला जातो. थकवा नाही! म्हणून पैशाची स्वप्नं जरूर पहावीत; पण त्यांचा पाठलाग करताना धाप तर लागणार नाही ना? याचा विचार दोनदा नक्की करावा.*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, October 1, 2025

हे बगा सायब

*हे बगा सायब...!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_01 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*हे बगा सायब...*

*वल्ला दुष्काळ बगायला आलाव का? या! येवढे लोकं कशाला घिऊन आले सायेब? पंचनामा करनारा नि तुम्ही अशे दोगच आला असता तरी चाललं असतं की. आनी येवढे फोटूवाले? ते कशापायी? आमचा नका काडू. इथं पारावर काही न्हाई, चला तिकडं... बांधावर!*

*काय? कपडे खराब व्हतील म्हनता? होऊद्या वाईच. इकडं जिंदगी खराब झाली आमची. या तुमच्या गाड्या-घोड्या लावा तिकडं बाजूला. पायी चालायची तयारी असंल तर या सायेब, नाईतर जा दुसऱ्या गावाला. इथं उभारून तुम्हाला वल्ला दुष्काळ कळायचा न्हाई. घसरून पडन म्हणता? नाही पडू देत तुम्हाला, चला. गुडघाभर चिखलातून दोन मिनिटं चला आमच्याबर, म्हंजी पाऊस, चिखल, दुष्काळ सगळं कळतंय आपाप. आनी लोक इचारतील दोन-चार कळकळीचे प्रश्न. त्यांना नाराज करू नका सायेब. तुम्ही मदत करनार असं त्यांना वाटतंय, म्हनून इचारतेत.*

*हे बगा सायेब पानी. न्हाई, ह्यो नदीचा फुगवटा न्हाई. ही पावसाची कृपा. याच्याखाली आख्ख्या गावाची पिकं झोपलीत गाढ. पलीकडं ढिगारा दिसतोय का? तिथं उभारलेली घरं होती काल-परवापातूर. समदं पान्याखाली गेलं. माणसं जीव वाचवत पळाली कशीबशी म्हनून वाचली. काय म्हनता? नदी कुटं दिसत न्हाई? नदी बगायची का. नदीबी दावतो तुमाला. चला थोडं फुडं.*

 *आले का? हां, या अशे इकडून. त्यो बगा समुद्र. दिसला का? न्हाई, काल-परवापातूर तिथंबी नदीच व्हती. आमच्या बापजाद्यांच्या पिढ्या गेल्या तिच्या पान्यात मनसोक्त पवन्यात, हुंदडन्यात. कधी बिचारीनी तरास दिला न्हाई. यंदाच तिला काय झालं कायनु. आख्ख्या पिकाचा आन घरादाराचा घास घ्यायलाच उटली.*

*काय? इकडून वास येतो म्हनता? हा, पुरात काही जनावरं वाहून गेली, काही फुगून मेली बिचारी. तुम्ही नाकाला रुमाल नका लावू सायेब. आम्ही लावलाय का?*

 *आमच्या दगावलेल्या जनावरांचं गऱ्हानं तुम्हाला सांगाय लागलो तर तुम्हाला ऐकवणार न्हाई सायेब. तूर्तास जे जित्राब जिवंत राहिलेत त्यांच्यासाठी काय करता आलं तर बगा. वैरन देता येती का बगा. हितं समदंच पान्याखाली गेलंय. कुटून आनायचा जित्राबाला चारा. आमच्याकडं आशेनी बगनारे त्यांचे डोळे बगवत न्हाईत सायेब. जीव तीळ-तीळ तुटतो. तेवडं चाऱ्याचं बगाच बरं का. आनी ह्या उघड्यावरच्या संसाराचा इचार करून आज काय मदत देता आली तर बगा.* 

*काल तुमचे वरचे सायेब हेक्टरी अमुक-अमुक रुपये देतो म्हनले. सायेब, एक इचारू का? तुमची बी आसन ना शेती? हेक्टरी किती खर्च येतो तुम्हाला? जाऊद्या सायेब. मनाला नका लावून घिऊ. पुन्हा म्हणशिला की राजकारन करतूय! पन तेवडं वैरंनीचं बगाच बरं का!*

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...