Monday, October 31, 2022

कवी रवींद्र मालुंजकर : रसग्रहण



प्रश्न:
तुम्ही जर कवी असाल तर तुम्हाला तुमच्या सोडून इतर किती कवींच्या किती कविता पाठ आहेत?
- दहा, पंधरा, वीस, की पन्नास? की एकही नाही?

   विचार करून झाला असेल तर पुढे चला. पुढील वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की, एक असाही कवी, साहित्यिक अवलिया आहे की त्याच्या स्वतःच्या आणि महाराष्ट्रभरातील कित्येक कवींच्या कवितांच्या ओळी शेकडोंनी तोंडपाठ आहेत! तुम्हाला तुमचीच एखादी कविता ऐकवून तुम्हाला तो कधी क्लीन बोल्ड करेल सांगता येणार नाही! तुम्हाला त्याची कविता माहीत नसेल, पण त्याला मात्र तुमची कविता तोंडपाठ असू शकते. एवढेच नव्हे, तो स्वतःच एकटा कवी झाला नाही, तर त्याने तो ज्यांना ज्यांना भेटला त्या सगळ्यांना कवितेचं वेड लावलं. नाशिक जिल्ह्यातले निम्मे कवी हे या एकट्या माणसाने प्रकाशात आणलेले आहेत!! तो सर्वांचा लाडका तर आहेच, परंतु पायाला भिंगरी बांधून गेली 40 वर्ष कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तो अविरत झटतो आहे. खेडोपाड्यात कवितेची पाऊलवाट घेऊन जात असताना ऊन-वारा, थंडी-पाऊस याचा त्याने कधी विचार केला नाही.  कवितेपायी भर पावसात नदीच्या पाण्यातून एम 80 गाडी लोटत आणणारा हा काव्यवेडा पठ्ठ्या आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये त्याचा काव्य गोतावळा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकावर वर्तमानपत्रातून सातत्याने लिहितो आहे. आज मी त्याच्याच पुस्तकावर लिहिणार आहे. Big hands for the one and only THE GREAT RAVINDRA MUKUNDRAO MALUNJKAR!

  सूत्रसंचालनाचे विद्यापीठ म्हणून रवींद्र मालुंजकर हा एक स्वतंत्र अध्याय आहेत. मी आज फक्त त्यांच्या कवितेबद्दल बोलतो आहे. 

  तसं मालुंजकर चौफेर लिहितात, परंतु कविता ही थोडी अखीव, रेखीव,घोटीव असली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. कविता कोणाचीही असो ती ठेक्यात म्हणता आली की त्यांना आनंद होतो. म्हणून त्यांची कविताही तुम्ही सहज अष्टाक्षरी मध्ये किंवा कुठल्याही एका तालामध्ये बसवू शकता. लेकीसाठी लिहिलेल्या ह्या पुढील काही ओळी पहा,

लेक लाडकी सर्वांची
लेक साऊली घराची
तिच्या आगमने वाजे
रोज तुतारी सुखाची...

 सोपे शब्द मोठा आशय हे मालुंजकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. लाडकी लेक सासरी जाताना तिच्या आईवडिलांची होणारी अवस्था त्यांनी किती सुंदर पकडली आहे पहा, 

लेक चालली सासरी
कसे लपवावे आसू
किती वेळ दाखवावे
मुखावर खोटे हसू...

लेक चालली सासरी
झाल्या आठवणी गोळा
काळजात दाटलेला
भावभावनांचा मेळा...

 आपली लेक सुखात राहिली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा बापाची असते. तिला भेटून येतानाची त्याची मन:स्थिती कवीने खालील शब्दांमध्ये खूप सुंदर रेखाटली आहे.

सुख लेकीचे पाहून
झाला आनंद बापाला
तिच्या घरून निघता
मनोमन सुखावला...

 कालपर्यंत अंगणात बागडणारी आपली लेक सासरी कशी राहत असेल आठवणीने व्याकुळ बाप खालील ओळींमध्ये आपल्याला बघायला मिळतो.

आज कळतंय मला
'बापाचं बापपण'
लेकीच्या काळजीनं
झोपेचं सरपण
अधूनमधून जळल्यावर...!

  कवी लोकांना कविता सुचते कशी? हा एक भाबडा प्रश्न अनेक अकवींना नेहमी पडत असतो. मालुंजकर या प्रश्नाचे उत्तर शोधताना म्हणतात,

देहगाभारा भेदून
येते कविता आतून
मनातल्या भावनांना
घेते शब्दांत गुंफून...

दुःख जगाचे पाहून
मला सुचते कविता
तान्हुल्याच्या हसण्यात
माझी दिसते कविता...

 कविता लिहिणे म्हणजे केवळ 'वेळ जात नाही म्हणून काहीतरी खरडणे' असे नव्हे. कवितेची आणि पर्यायाने कवीची एक भूमिका असते. समाजासाठी कवी अप्रत्यक्षपणे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत असतो. आपल्या कविता लेखनाचं प्रयोजन काय आहे हे कवीने पुढील काही ओळींमध्ये खूप सुंदर सांगितलं आहे. कवी म्हणतो,

माझ्या कवितेने लाभो
दीनदुबळ्या उभारी
त्याच्या आकांक्षांनी घ्यावी
उंच गगनी भरारी...

माझ्या कवितेने द्यावा
घास चिमण पाखरा
येता पंखामध्ये बळ
व्हावा आभाळ आसरा...

  या ओळी वाचल्यानंतर कोणाही काव्यरसिकाला या कविचं शब्दचित्र सहज रेखाटता येण्यासारखं आहे. समाजाच्या भल्यासाठी माझी कविता कामी येवो या भावनेमागे माऊलींचं पसायदानच आहे. मालुंजकरांच्या निरनिराळ्या कविता वाचताना त्यांचा हा स्थायीभाव आपल्याला पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही. यंदाच्या पावसाने बळीराजाला हवालदिल करून सोडलं. त्यावर व्यक्त होताना कवी म्हणतो,

साऱ्या वावरात पाणी
आली घरालाही ओल
सारं सारं आवरता
जगायाचा गेला तोल...

दिसरात केले काम
नाही तुला आली दया
घास तोंडातला आता
तूच लागला ओढाया...

  साक्षात निसर्गाशी भांडण्याची आणि शेतकऱ्याची बाजू मांडण्याची भूमिका इथे कवी घेताना दिसतो, त्याचबरोबर त्याच्या सुखासाठी याचनाही करतो,

त्याच्या पिकल्या पिकाला
नित्य मिळो रास्त भाव
समाधानाच्या ओव्यांनी
आनंदात न्हावो गाव...

त्याच्या जखमेवर शब्दमलम लावताना धीर देतो,

सुख आणि दुःख
येती नियमित
जगण्याची रीत
शिकविण्या

शिवाय छोट्या छोट्या गोष्टीतलाही आनंद माणसाने घ्यायला शिकलं पाहिजे हे सांगताना  मालुंजकर म्हणतात,

अहो, जमेल तेवढं तुम्ही रुजून घ्या पाऊससरीत ओलंचिंब भिजून घ्या...

 'अन्नदाता सुखी राहावा ही मनोभूमिका हे उदात्त माणुसकीचे लक्षण आहे. आणि हे लक्षण रवींद्र मालुंजकरांच्या कवितेमध्ये ठिकठिकाणी जाणवते. असं म्हणतात की 'आपल्या शब्दांना कृतीची आणि कृतीला शब्दांची जोड असली पाहिजे. मालुंजकरांना या दोन्ही गोष्टी साधल्या आहेत. त्यांच्या घराचे दरवाजे अतिथीसाठी सदैव खुले असतात. त्यांच्या घरी गेलेला कोणीही अतिथी विना आदरातिथ्याचा परतत नाही असा  सर्वांचाच आजपर्यंतचा अनुभव आहे. कवीचा स्वभाव त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असतो. याचा सुंदर दाखला म्हणजे पुढील काही ओळी. ते म्हणतात,

हात बुडत्याला द्यावा
जपा मानवाचा धर्म
जगताना प्रामाणिक
ध्यानी ठेवा हेच वर्म...

कधी धरू नका इच्छा
मान-सन्मानाची मनी
व्हावे कार्यकर्तृत्वाने
जगी गौरवाचे धनी...

याचकाला देता काही
गाणे समृद्धीचे गावे
देता आधार कुणाला
मन आनंदून जावे...


हे औदार्य अंगी येण्यासाठी कवी एकटाच सुहृदयी असून चालत नाही, त्याची अर्धांगिनी ही त्याच्या सारखीच असेल तर त्याच्या वागण्या, बोलण्या, संसाराला खरी शोभा येते. त्यांनीच लिहून ठेवलेल्या या पुढील ओळी पहा. 

उद्या तिचा वाढदिवस.
म्हणालो तिला...
'काय आणू तुला गिफ्ट... ?'
खळखळून हसत ती उत्तरली...
'कशाला हवंय दुसरं गिफ्ट,
तुझ्याएवढं सर्वांगसुंदर गिफ्ट असताना!'
ती बोलली सहज
आणि मिळाली
बायको समजदार असल्याची खूण..!

  हे कुटुंब समजदार असण्याचं एक कारण म्हणजे ते पॅराशुटर्स नाहीयेत; ते ग्रासरूटर्स आहेत. ज्या परिस्थितीशी तोंड देऊन आई-वडिलांनी आपल्याला घडवलं, तिची त्यांना जाणीव आहे. ताई दादांच्या आठवणी मध्ये रमताना कवी म्हणतो,

आई आभाळ आभाळ
डोळा गच्च भरलेलं
सुखी ठेवण्या संसारा
सारं सारं रितं झालं...

आई माझी वा तुमची
नसे कधीही वेगळी
साऱ्या पोरांवर तिची
माया सारखी सगळी

   वडिलांचे आयुष्य वर्तमानाशी सांधताना कवी नॉस्टेल्जिक होतो. कवीचं व्याकुळ मन प्रकर्षाने लिहितं होतं,

हाडं गोठवणाऱ्या थंडीत
जगण्याची लढाई लढण्यासाठी
सायकलला पॅडल मारणारं
कोणी पाहिलं की
दादा...तुमची आठवण येते!

मी वही मागितल्यावर
तुम्ही मोठ्या कसरतीने
बनवून द्यायचात माझ्यासाठी
जुन्या पानांची वही.
आज मुलांसाठी नवी वही आणताना
कुणाचा व्याकूळ चेहरा दिसला की दादा...तुमची आठवण येते!

कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधली
ज्योत जागते रात्री
धगधगत्या स्वप्नांना असते
उजाडण्याची खात्री
 या कवी राजेश्वर शेळके यांच्या ओळींचा प्रत्यय मालुंजकरांच्या खालील ओळींमधून येतो,

कंदिलाच्या इवल्या प्रकाशात
जमेल तसा केला अभ्यास
उज्ज्वल भविष्यासाठी जपला
काळजामधला प्रत्येक श्वास...

 चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी शेवटी चांगला होतोच. मालुंजकरही तसेच झाले. स्वतः शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम करणारे रवींद्र मालुंजकर आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता खालील ओळींमध्ये व्यक्त करतात,

गुरुजी....
आपणच चेतवला आमच्यात
विश्वासाचा लख्ख दिवा
आपणास मिळो दीर्घायुष्य
अन् आनंदाचा अक्षय ठेवा.

 शेवटी, आयुष्य ज्याला म्हणतात ते तरी वेगळं काय आहे? कवी म्हणतो,

आयुष्य
म्हणजे
वाहते
पाणी....

सुख
दुःखाची
झुळझुळ
गाणी...!

आयुष्य
म्हणजे
हक्काचं
घर...

पाहुण्यांनी
जपावा
स्वतःचा
स्वर...!

आयुष्य
म्हणजे
प्रसन्न
फूल...

जपावं
सुंदर
आतलं
मूल...!

आयुष्य
म्हणजे
राबणारे
हात...

संकटांवर
द्यावी
हसत
मात...!

 अशा सहज सुंदर अक्षरप्रतिभेचा हा शब्दप्रभू त्याच्या आयुष्यामध्येही एक गोड आणि सर्वांना हवाहवासा मित्र आहे. नाशिकचा साहित्यिक आणि सांस्कृतिक कोश रवींद्र मालुंजकर या नावाशिवाय अपूर्ण आहे, राहील. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'आठवांचे लक्ष मोती' या काव्यसंग्रहाच्या संदर्भाने मी त्यांच्या कवितांचं हे माझ्या परीने केलेलं रसग्रहण आहे. तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं? नक्की कळवा. तुम्हाला त्यांच्या कविता वाचायच्या असतील, तर तुम्ही त्यांना त्यांच्या 9423090526 या क्रमांकावर कॉल करून संग्रह मागवू शकता. काही उणं अधिक लिहिलं गेलं असेल, टाईपो झाला असेल, व्याकरण चुकलं असेल,अशुद्धलेखन झालं असेल, तर ती माझी लेखन-उणीव आहे हे मान्य करतो.

 काव्यसंग्रह : आठवांचे लक्ष मोती
 कवी : रवींद्र मुकुंदराव मालुंजकर
 वैशाली प्रकाशन पुणे
 मुखपृष्ठ : अरविंद शेलार
 पाठ राखण : ( ब्लर्ब )विवेक उगलमुगले
 निर्मिती मूल्य:  ₹150 केवळ.

रसग्रहण :
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
चलभाष: 9423542224

Thursday, October 27, 2022

'सगळे काही...


'सगळे काही...

पोटामधली आगच असते सगळे काही
वेळ बनविते माणुस डाकू, देव, कसाई

प्रत्येकाला छळतो येथे जाळ वेगळा
पुजतो माणुस प्रसंग पाहून दगडालाही!

माणुसकीच्या केवळ गप्पा नावापुरत्या
स्वार्थ काजळी काळे करते गोऱ्यालाही

माय माउली, बाप दादला, भाऊ दादा
तुला सांगतो जगी कुणाचे कोणी नाही..

तू दुनियेच्या बाजारामधली कठपुतली
नाच नाच तू... त्यावर ठरते तुझी कमाई

इथे वांझ शब्दांची केवळ अफरातफरी
हळूच बोला... इथे बोलण्याचीच मनाई!

तलवारीला धार असू दे... ढाल नसू दे
भयाण अंधारातच होते घोर लढाई

डोळ्यामधले अत्तरपाणी खरे बोलते
( कुणास ठावे का त्यालाही इतकी घाई? )

तुझे स्वतःचे जगणे सावर, सोड झमेला
घेउन जाइल खोल तुला ही बेपर्वाई...

कळेल तुजला एखाद्या वळणावर नक्की
वेळेवरती तुझे स्वतःचे कुणीच नाही!

राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक
9423542224

Tuesday, October 25, 2022

कवी विलास पंचभाई : मनाची स्पंदणे

    नाशिकच्या साहित्य वर्तुळामध्ये स्वतःच्या मस्तीत आणि स्वतःच्या धुंदीने जगणारा एक धडपड्या कविमित्र आहे, विलास पंचभाई. विलासची जगण्याची, वागण्याची, बोलण्याची एक स्टाईल आहे. तशीच त्याच्या लिहिण्याची सुद्धा.
    स्वभावाने बेधडक परंतु दिलदार असलेल्या विलासच्या मनात माणुसकी बद्दलची कळकळ मात्र अखंड तेवत असते. 'मनाची स्पंदने' हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. याच संग्रहातील या  पुढील ओळी पहा.

मैला-मैलावर
रोवून ठेवलेत
त्यांनी दगड
अंतर कळावं म्हणून...
पण..
त्यांना कुठे कळतंय
माणसा-माणसातलं
अंतर वाढत चाललंय ते...
 एखादा तत्त्वचिंतकच असं सुंदरपैकी लिहू शकतो.

  विलास त्याचे सांसारिक आयुष्य अगदी मोकळेपणाने जगतो आणि त्यातल्या बारीक सारीक खाणाखुणा मोकळेपणाने लिहितो सुद्धा. 

तुझ्याशी माझं 
भांडण झाल्यावर
तुझ्या डोळ्यातून
अश्रू टपकताना
माझं हृदय हळहळतं
मग मीही विरघळतो तुझ्यात...

बायकोवर त्याचं नितांत प्रेम आहे. तो छान स्वयंपाकही करतो, आणि हे कवितेतही लिहितो.

मला छान जमतं
वडापाव मिसळ पावही
कधी कधी म्हणतो तिला
तुझ्या हाताला चव नाही!
( म्हणजे पुन्हा भांडायला तयार!)

    प्रेम मिळणं ही प्रत्येकाची एक स्वाभाविक भावना आहे, ती टिपताना कवी म्हणतो,

हवं असतं प्रत्येकाला प्रेम
प्रत्येकालाच मिळत नसतं
ज्याला मिळालं त्याने
पारीजातक जपायचं असतं...!

  कधी कधी  त्याच्या शब्दांना भावनेचा ओलावा दिसतो, तर कधी कधी त्याचे शब्द थेट षटकार लगावतात. 

तारुण्य म्हणजे
याच किस तिचं मिस असतं
लग्न करायचं
दोघांचही फिक्स असतं!

   हा म्हणजे विलासचा खास मंगेशकर तडका आहे. जीवनातल्या आयुष्याला दररोजच्या धकाधकीच्या अनुभवांमधून व्यक्त करताना विलास म्हणतो 

उकळलेल्या दुधपाण्यात
चहा पावडर टाकली जाते
गोडवा यावा म्हणून
साखरही विरघळते..
तसेच जीवनातही
गोडवा रहावा म्हणून
आनंदाचे क्षण
यावे लागतात अधूनमधून...

   दिवसभर कुटुंबासाठी धावपळ करून थकून घरी येणाऱ्या माणसाचे वर्णन बघा किती सुंदर प्रकारे त्याने व्यक्त केलं आहे 

दिवस भराचा तापलेला
सूर्य संध्याकाळी थंड होतो
घराकडे जाऊन पुन्हा
एक रात्र आराम करतो!

  आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. काही गोड तर काही कडू. आपल्या सभोवतालची माणसं ही वेळ प्रसंग पाहून कधी चांगली तर काही वाईट वागतात. प्रतीक्षिप्त क्रिया म्हणून आपलंही वागणं कधी कधी बदलू शकतं, परंतु कवी म्हणतो,

प्रत्येक दिवस सारखा नसेल
कधी उंच भरारी,
कधी खाली खेचेल
भीती असते पडण्याची
तरी भरारी घेणे कसे थांबेल?

 स्वतःवरील आत्मविश्वास अधोरेखित करताना कवी

माणसं येतील जातील
कोणी वार करतील
कोणी फुंकर घालतील
मी माझे ध्येयापर्यंत जाणे
थांबणार नाही

 अशी ग्वाही देतो. व्यक्त होताना केवळ कविताच नाही तर गजलेच्याही मार्गाने त्याचे शब्द येऊ लागतात. पुढील दोन ओळी पहा,

केल्या किती सरकारी जनगणना
तरीही अजून ही जात बाकी!

 तर दुःखाची कारणमीमांसा करताना तो म्हणतो,

राहिले असतील भोग काही
बिनदिक्कत सोसावे म्हणतो

 मुळात कवी कविता लिहितोच कशासाठी? याचे उत्तर शोधताना कवीला खालील शब्द सापडतात,

कविता ऐकून घेते
सुख दुःख सर्व काही
पचवतो मग
आंनद नि विरहही
कवितेला नसतो
कोणता रंग
नसतात कुठल्या
जातीच्या भिंती
कविता करते सर्व
एकत्र जातीपाती.....

  स्त्री-पुरुषांच्या समानतेबद्दल कवी एक महत्त्वपूर्ण भाष्य करतो 

बाई होते विधवा
तसा पुरूषही होतो विधूर,
(फक्त म्हणायला समानतेची वागणूक)
पुरुषाला केल जातं का
समाजापासून दूर ?

स्त्री सुधारलेली भासत असली तरी तिची वेदना चिरंतर आहे हे सांगताना कवी म्हणतो,

अजूनही संपल्या नाही वेदना
किंबहुना किंचित जास्तच
आज फरक एवढाच
ती तेव्हा शेतात राबवायची
आज नोकरी करते
बाई शिकली
दोन पैसे कमावू लागली
पण व्यवहार नवऱ्याकडेच सोपवून
ती तिचं अस्तित्व जपत राहते...

त्याच वेळेला स्वतःच्या आईचं वर्णन करताना कवीची लेखणी थकत नाही.

माझी आई
आरसा धरायची
आणि कपाळावर
मेन लावलं की
गरगरीत असं
कुंकू लावायची
अखंड सौभाग्य टिकावे म्हणून...

 प्रत्येक कवीच्या कवितेत आई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतेच.उगीचच कविला मातृहृदयी म्हणत नसावेत. सोबतच पुरुषाच्या राकटपणात असलेला हळवा कप्पा स्पष्ट करताना कवी सहज लिहून जातो,

नेहमीच
उंच रांगडा दणकट
पिळदार शरीरयष्टी
झुपकेदार मिशावर ताव देऊन...
कणखर आवाज
अशीच प्रतिमा तयार झाली पुरुषाची
पण त्याच्या मनाचा विचार
होत नाही कधी
तोही हळवा असू शकतो...

छानच.

  कवी विलास पंचभाई यांनी कामगारांचे जीवन जवळून अनुभवलेले आहे; अनुभवत आहेत. त्यांचा 'हंगामी' हा कथासंग्रहही याच विश्वाशी आधारित आहे. कामगारांचे आयुष्य शब्दात मांडताना ते म्हणतात, 

कामगारांचं जीवन म्हणजे
लोखंडाशी खेळणं
छन्नी हातोड्यासोबत
रोज घाम गाळणं!

   असा कष्टाचा घाम गाळता गाळता शब्द शारदेची आराधना करत साहित्याच्या क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या कवी, लेखक आणि साहित्यकणा फाउंडेशन, नाशिकचे सचिव श्री विलास पंचभाई यांचा 'मनाची स्पंदने' हा संग्रह नक्कीच वाचनीय असा झालेला आहे. आपणही तो 7774955892 या त्यांच्या  क्रमांकावर फोन करून मागवू शकता.
  एकूण 67 कवितांचा खजिना असलेला 96 पानांचा हा संग्रह नाशिक येथील ज्ञानसिंधू प्रकाशनाने आपल्या सर्वांसाठी केवळ 120 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दिवाळीतल्या पोटासाठीच्या फराळाबरोबरच हा मेंदूसाठी पाठवलेला फराळ कसा वाटला? ते अवश्य कळवा.

रसग्रहण
-श्री राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
दि. 25 ऑक्टोबर 2022.

Saturday, October 22, 2022

एक दिवाळी

एक दिवाळी

एक दिवाळी अंगण सजवुन सडा समार्जन करते आहे
एक दिवाळी अंधारातच हमसुन हमसुन रडते आहे

काय काय अन् कितीक घ्यावे यादी करते एक दिवाळी
अता करावे काय नेमके दुसरी चिंता करते आहे

पगार, बोनस, सेविंग्ज, हप्ते, घरभाड्याने गच्च एक अन् 
दुसरी आलेल्या पैशाने घर दुसऱ्याचे भरते आहे 

किती फायदा झाला यंदा मोजत आहे एक दिवाळी 
एक दिवाळी आस्मानीच्या सुलतानीशी लढते आहे 

गाडी, बंगला, कपडे लेवुन सजली आहे एक दिवाळी  
एक दिवाळी बिन कपड्याची वाट पित्याची बघते आहे 

गप्पा-टप्पा, फराळ-मैफल करते आहे एक दिवाळी 
एक दिवाळी शांत दिव्याच्या सोबत केवळ जळते आहे 

एक दिवाळी फराळ घेउन येते आहे दुसरीसाठी 
दीपलक्ष्मी डोळे मिटुनी स्वप्न एवढे बघते आहे!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

 

Thursday, October 20, 2022

नवकविता आणि नवकवी


   नुकतंच एका कविता लेखनाच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. स्पर्धा छान झाली. आयोजन भव्यदिव्य होते. कवितेच्या अंगाने काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.

▪️
दहा-वीस वर्षांपूर्वी काव्य लेखनाच्या स्पर्धा जेवढ्या उदंडपणे आणि उत्साहात व्हायच्या, तेवढ्या सध्या महाविद्यालय स्तरावर होत नसाव्यात. तरुण पिढीला काव्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी कमी मिळत असावी.
▪️
मोबाईल ने बऱ्याच कवींमधला कवी मारून टाकला आहे.
▪️
एखाद्या विषयावर कविता लिहायची म्हटल्यास चक्क गुगलवर सर्च करून ती कॉपी-पेस्ट करण्याचा व खाली आपले नाव टाकण्याचा जमाना आला आहे.
परंतु कविता लेखनाच्या स्पर्धेमध्ये जर आपण गुगलवर सर्च करून लिहिलं तर सहज पकडले जाऊ शकतो, कारण परीक्षकांकडेही मोबाईल फोन आहे, हे नवीन कवींच्या लक्षात येत नाहीये!
▪️
नव्या कवींचं वाचन कच्चं आणि कमकुवत आहे. तेच तेच शब्द घोळून पीठ पाडण्याचा प्रकार दिसतो आहे. विजेत्या कवींना किमान तीन काव्यसंग्रह पुरस्कार म्हणून दिले जावेत म्हणजे तरी त्यांचे वाचन वाढेल. स्वतः वाचक नसलेले लेखक बनून इतरांना वाचण्यासाठी भाग पाडत आहेत. वाचक वाचावेत म्हणून तरी लेखकांनी चौफेर वाचक बनणे आवश्यक आहे.
▪️
मुक्तछंदाच्या नावाखाली चक्क निबंध लिहिणारे कवी संख्येने वाढत आहेत. मुक्तछंदातही एक छंद असतो, एक लय आणि ताल असतो, हे ओरडून कोणीतरी सांगण्याची नितांत आवश्यकता आहे.
▪️
चारच कडव्यांची परंतु भारदस्त आणि आशय संपन्न कविता लिहिणे भल्याभल्यांना जमत नाहीये. कडव्यांची आगगाडी म्हणजे कविता नव्हे हे नव्या कवींना सांगणे आवश्यक आहे.
▪️
काही कवी खरोखर कवितेसाठी दिवाने पागल झालेले आहेत व शत प्रतिशत कवितेमध्ये रमत आहेत, त्यांचे भविष्य उज्वल आहे!
▪️
बक्षीसासाठी पेक्षा बक्षिसाआधी चांगली कविता लिहिता येणे हे कवीचे सदभाग्य आहे. ते बऱ्याच जणांना लाभते आहे.

आणि शेवटी,
ताजा कलम:
काही कवींचे हस्ताक्षरही' खराब आहे!!

-राजेश्वर पांडुरंग शेळके
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...