Thursday, January 29, 2026

थिंकोनी कमेंटावे!

*थिंकोनी कमेंटावे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*28 जानेवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*थिंकोनी कमेंटावे!*

   *स्टुपिड कमेंट्स केल्याशिवाय ज्यांचा डेटा ते स्वतः दोघांनाही गप्प बसवत नाही, असे काही लोक सोशल मीडियावर जन्माला आले आहेत. ‘दिवसभर विविध इ-भिंतींवर पोष्टी टाकणे आणि लाईक, कमेंट्सची वाट पाहणे, डकवल्या गेलेल्या पोष्टींवर लक्ष ठेवणे, त्या आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक नजरेखालून काढणे, त्यात थोडासा का होईना ‘त्रुटी’ नामक क:पदार्थ आढळतो का ते पाहणे, दिसल्यास तत्काळ त्यावर तुटून पडणे, सर्वशक्तीनिशी कमेंटवार करून समोरच्याला गारद करणे आणि मोहीम फत्ते करून विजयीमुद्रेने पुढील पोष्टमोहिमेवर निघणे!’ हा यांचा शिरस्ता. हे सगळं कशासाठी? तर आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी! शिवाय आपल्या संपूर्ण तार्किक, अनुभविक, नोस्टेल्जिक, टायपिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून डेटाबळ खर्चल्याचं समाधान मिळविण्यासाठी. कधी हे इतरांना हर्ट करतात, तर कधी स्वतःच तोंडघशी पडतात!*

   *हे कमेंटलेखक केवळ साध्या लोकांच्याच पोस्टवर तिरकं लिहीत नाहीत;  तर मोठ्मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेल्या अनोळखी पोस्टवरसुद्धा तावातावाने कमेंटतात. खूपच घाणेरडा शब्द असेल तर xx अशा फुल्या टाकतात; नाहीतर मग शब्दखेळ, अक्षरबदल करून का होईना आपल्या तिरकस भावना तिथपर्यंत पोहचवतातच! ‘आपली कमेंट एकदा तरी तो सेलिब्रेटी वाचेल’ असे त्यांना वाटते. राजकारणी लोकांनी विरोधी मतं पोस्ट करण्यासाठी चाळीस पैशाने माणसं नेमलेली असतात हेही यांच्या गावी नसते. हे त्यांच्या गर्दीत फुकटच सामील होतात!   ना प्रसंगाचे गांभीर्य, ना कोणत्या वेळी काय कमेंट करावी याचे भान! सगळाच सावळा गोंधळ!*

   *एका मोठ्या नटीला एका मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लोक तुमच्या फोटोवर अतिशय खालच्या शब्दात कमेंट्स करतात ते वाचून तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर तिने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली की ‘सोशल मिडियावरच्या कमेंट आम्ही वाचतो’ हे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढ्या कमेंट्स वाचण्याइतका वेळ तरी आहे का आमच्याकडे? पण तुम्हाला एक मात्र सांगेल. कमेंट्स करणाऱ्याच्या कमेंट्स प्रत्यक्ष तो सेलिब्रिटी जरी वाचत नसला, तरी टाईप करणाऱ्याचे मित्रमंडळ मात्र नक्की वाचत असते, आणि त्यातून कमेंट करणारा कोणत्या लायकीचा आहे हे त्या मित्रमंडळींना कळत असते. वरील सापळा न समजल्यामुळे समाजात सज्जन म्हणून परिचित असलेले अनेकजण इंटरनेटवर मात्र अतिशय खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असतात. एक प्रकारे अशा कमेंट करणारा माणूस खराब शब्द वापरून स्वतःचीच लायकी घालवून घेत असतो, पण त्याला भावनेच्या भरात ते समजत नाही!*

    *कमेंट जरूर करावी, पण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी. व्यक्त जरूर व्हावं, पण आपल्या कमेंटचं मूल्य ओळखून. प्रसंग काय आहे, आपण स्वतः कोण आहोत, आपलं समाजातलं स्थान काय आहे, आपलं लिहिलेलं वाचणारे कोण आहेत याचा विचार करून व्यक्त झालं तर व्यक्तही होतं येतं आणि देवाचं देवपणही टिकून राहतं, म्हणून-*

*'जैसा जगी मान, तैसेचि वर्तावे*
*आणि कमेंटावे, थिंकोनिया!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 21, 2026

अरे संसार संसार जसे कपबशीचे घर

*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
~~~

    *‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर!’ या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्त्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं, ‘अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार...!’ घ्या आता!*

   *कपबशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे. काही घरांमध्ये बशी बसलेली, कप हिंडतोय, काही घरांमध्ये कप बसलेला, बशी मरमर करतेय; तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडताहेत! काही असो, संध्याकाळी कप असो की बशी, घरी येणं भाग आहे. तसाही बशीविना कपाच्या आणि कपाविना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या बशीला नसेल आवडला कप, एखाद्या कपाला नसेल आवडली बशी. काही कपांना वाटतं ‘मीच लै हुशार’; तर काही बश्यांना वाटतं, ‘आमच्या कपाला अक्कलच नाही!’ तरी ‘तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना’ असा सगळा मामला! या अशा अतिशहाण्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा ‘चिवित्र’ जोड्या लावून मजा बघत असतो!*

   *‘जोड्या स्वर्गात बनतात’ असं लोक म्हणतात खरं, पण जे तिकडे चुकांडी देऊन, निसटून पृथ्वीवर येतील, त्यांना इथली जुनी जाणकार मंडळी गंडवतात! ‘काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच’ हा त्यांचा खाक्या. जोड झालाच पाहिजे, मग तो पुढे टिको, ना टिको. ‘आमच्या डोळ्यांदेखत होऊ दे’ च्या नावाखाली घाईघाईत कानतुटका कप किंवा तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळींच्या लक्षातच येत नाही. पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडखड ‘बा’ चा ‘बा’ ची चालू राहते. जिथे बशी शांत तिथे कप तडतड्या. जिथे कप शांत तिथे बशी बडबडी. मग बशीघरात दुसरं काय होणार? कधी कप एकाकी, तर कधी बशी!*

    *‘आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडून घेऊ द्या’ म्हणणाऱ्या आधुनिक कपबश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही. नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेच पाढे! काही कपांना त्यांच्याच बश्यांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही, त्यांचा अहंकार दुखावतो; तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बश्यांना आवडत नाही, त्यांना कप हातातून निसटायची भीती वाटते! पुढारलेल्या शहरातल्या कपबश्यांचं हे आतलं दुखणं आहे. आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का? त्यांच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुखात आहेत.*

   *कपबशीच्या भांडणात ‘माघार कोणी घ्यायची?’ हा फार कळीचा मुद्दा असतो. याचं साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे, ‘ज्याला आनंदी राहायचं आहे, त्याने!’ हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले, की दोघांचंही महत्व अबाधित राहतं. जगणं सोपं आणि सुंदर होतं. म्हणून,*

 _*तुम्हाला जर कधी भेटली अशी भांडकुदळ जोडी*_ 
 _*चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी!*_
_*विस्कटलेल्या संसाराची आणा रुळावर गाडी!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 14, 2026

चुकामुक

*चुकामुक*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*चुकामुक*

  *गावाकडच्या भाविकांचा एक ग्रुप काशी यात्रेला गेला. सगळ्या बाया बापड्यांना आणि धोतर टोपी बाबांना घेऊन जाणाऱ्या एजंटने सांगितलं की एका मोठ्या स्टेशनच्या अलीकडेच आपल्याला छोट्या स्टेशनवर उतरायचं आहे, म्हणजे गर्दी टाळता येईल. ठरल्याप्रमाणे मंडळी उतरली; पण एक आजीबाई गाडीतच बसून राहिल्या, आणि त्यांची चुकामुक झाली!*

 *थोड्या वेळाने उतरलेल्या माणसांपैकी कोणाच्यातरी लक्षात आलं की एक आजी गाडीतच राहिल्या, गाडी निघून गेली! पोक्त वयाची दोन माणसं लगोलग मागून आलेल्या दुसऱ्या गाडीने पुढे गेलेल्या गाडीत राहून गेलेल्या आजीबाईंना शोधण्यासाठी गेली. तिच्या घरच्यांना कळवलं. गावाकडून आजीचे नातेवाईक आजीला शोधायला दुसऱ्या गाडीने गेले. आजी कुठे गेली, कुठे उतरली, तिचं काय झालं, काही कळलं नाही. पुढील प्रत्येक स्टेशनवर उतरून शोध घेतला, पण आजीचा काही मागमूस लागला नाही. उत्तर भारतात, तीही हिंदी पट्ट्यात पहिल्यांदाच गेलेली ही गावाकडची अशिक्षित मराठी आजी कशी बरं सापडायची?*

 *मंडळी खूप थकली पण आजी सापडली नाहीच. सगळ्या यात्रेचा फियासको झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाया बापड्यांचे डोळे रडून रडून कोरडेठाक झाले. आजीचं अंतिम दर्शन कुणालाही झालं नाही. शेवटी आजीच्या घरच्यांनी जड अंतःकरणाने विचार करून निर्णय घेतला आणि पवित्र काशीच्या तीर्थक्षेत्रावर एका घाटावर आजीचा अंत्यविधी पिठाचा गोळा वगैरे ठेवून ब्राह्मणसाक्षीने आरंभ केला. अवघं वातावरण भावूक झालं.*

 *गंगेत स्नानासाठी डुबकी मारलेल्या एका महिलेने जलदान करण्यासाठी पाणी ओंजळीत घेतलं, आणि 'हर हर गंगेsss!' म्हणत अर्पण केलं आणि समोर बघते तर काय? जिचा अंत्यविधी करत होते ती आजी काही अंतरावर घाटावर जिवंतपणे आंघोळ करत होती! एकच गलका झाला. सगळे धावत धावत आजीजवळ गेले. तिचा मुलगा तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. "तू इकडे कशी पोहोचलीस?" विचारल्यावर ती म्हणाली, "गाडीतल्या काही मराठी माणसांशी मी बोलले. ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुमच्या गावाकडची मंडळी काशी यात्रेसाठी इथे काशीला नक्की येतील. आपण तिथे जाऊन थांबूया. म्हणून मी इकडे येऊन तुमची वाट पाहत बसले. तुम्ही का इतका उशीर केलात!?" सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. चुकामुक झालेली आजी शेवटी अशी सापडली! जिवंतपणी आजीचा होऊ घातलेला अंत्यविधी होता होता राहिला!!*

 *आयुष्य हे चुकामुकींचा खेळ आहे. इथे प्रत्येकाची कधी ना कधी, कशाशी तरी, कोणाशी तरी चुकामुक होते.माणसांशी झालेली चुकामुक एखाद्या वेळेला या आजीसारखी दुरुस्त होऊ शकते, परंतु नियतीशी, नशिबाशी, आयुष्याशी झालेली चुकामुक कशी दुरुस्त व्हावी? आयुष्यभर माणूस काहीतरी शोधत राहतो अधून मधून असं वाटतं की आपण जे शोधतो आहोत ते आपल्याला मिळत आहे परंतु खरं पाहिलं तर कोणाला काहीच मिळत नाही. लपाछपीच्या खेळात लपलेला गडी सापडावा आणि तेवढ्यात घरच्यांनी बोलावून घ्यावं तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि हाती काही मिळण्याच्या काळातच देवाजीचं बोलावणं येतं आणि मग कळतं आयुष्य म्हणजे निव्वळ चुकामुक! म्हणून एक वेळेस तिळगुळ दिले नाही तरी चालतील, परंतु गोड बोलायला काय हरकत आहे?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 7, 2026

शहरातली अंधश्रद्धा

*शहरातली अंधश्रद्धा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 जानेवारी, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*शहरातली अंधश्रद्धा*

*रविवारी शहरातली माणसं तशी आळसावलेली असतात. अंमळ उशिराच उठतात. अशाच एक मॅडम निवांत उठल्या, स्नान वगैरे उरकल्यावर व्हरांड्यात जाऊन सूर्याला नमस्कार करण्यासाठी दरवाजा उघडला. पाहतात तर काय? उंबऱ्याजवळ उजव्या बाजूला मुठभर तांदूळ ठेवलेले. त्यावर हळद, कुंकू टाकलेलं. थोडीशी राखही. एका पिठाच्या गोळ्यात दोन अगरबत्त्या खोचलेल्या. बाजूला एक लिंबू! मॅडमचा आळस कुठल्या कुठे पळाला. झोप खाडकन उडाली. तशाच उलट पावली माघारी गेल्या आणि नवऱ्याला झोपेतून उठवून बाहेर आणलं. नवरा अर्धवट झोपेतच होता, पण समजदार होता. त्याने घडला प्रकार पाहिला, तसाच पुन्हा घरात गेला, केर भरण्याची सुपली आणि झाडू घेऊन आला. सगळं सुपलीत भरलं. शंभर-दिडशे फुटांवरच्या एका झुडपात टाकून हसत हसत आला!*

 *बायको दारात उभी राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याने म्हटलं, "विसरून जा. जणू इथं काही नव्हतंच!" ती म्हणाली, "ते ठीक आहे, पण हे जादूटोणा वगैरे तर गावाकडे असतं ना? इथे शहरात सुद्धा??"*

 *तो म्हणाला, "शहर हे सुद्धा एक गावच असतं. अगडबंब पसरलेलं. शहरात कोण राहतं? गावाकडचीच माणसं शहरात येऊन राहतात ना? फरगेट." "अरे पण आपण कुठे कुणाचं घोडं मारलंय? चार महिनेही नाही झाले आपल्याला हे घर घेऊन. इकडचा भाग जरा सुशिक्षित वाटतो, जरा शांतता आहे म्हणून आपण इकडे राहायला आलो ना? आपण तर इथे कोणाला नीटसं ओळखतही नाही. मग हे काय? एवढ्या सुशिक्षित वाटणाऱ्या भागातही जादूटोणा? तरी मी तुला म्हणत होते की अगोदर सीसीटीव्हीची व्यवस्था करूया. तेव्हा तू म्हणालास आताच काही घाई नाही. कोणी केलं असेल हे? आणि आपल्याच दारावर का?"*

 *नवरा म्हणाला, "गावापेक्षा शहरात शिकलेले निर्बुद्ध आणि अतृप्त आत्मे जास्त असतात म्हणून!" बायको म्हणाली, "म्हणजे?" नवऱ्याने सुपली ठेवली आणि म्हणाला, "हे बघ, शहरात माणसं आली, की बरेच जण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, काहींचं पोट भरतं; पण मन भरत नाही. सुखदुःख श्रीमंतांनाही आहेत, आणि गरिबांनाही. माणूस सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. दुःखाशी संकटाशी स्वतः दोन हात करण्याची हिंमत नसलेली माणसं मग बाबा लोकांच्या नादी लागतात, आणि 'माझ्यावरचं दुःख, साडीसाती जाऊदे; भले ती दुसऱ्यांवर टाक, पण मला या दुःखातून बाहेर काढ' अशी बावळट मानसिकता ठेवतात. मग हे बाबा लोक सांगतात- तुमच्या आसपास जे सुखी दिसत असतील त्यांच्या दारावर एवढ्या वस्तू देऊन टाका, म्हणजे तुमच्या वाट्याचं दुःख, साडेसाती त्यांना आणि त्यांच्या वाट्याचं सुख तुम्हाला!!' आणि हे वैतागलेले मूर्ख लोक तसंच करत सुटतात.*

*"बापरे! म्हणजे आता आपल्या मागे लागणार की काय ही साडेसाती आणि दुःख?" बायको घाबरल्या सुरात म्हणाली. नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अशी सुखदुःखांची अदलाबदल करणं इतकं साधं, सरळ, सोपं आणि सहज असतं, तर एका रात्रीतून सगळी दुःखी माणसं आनंदी, आणि सगळी आनंदी माणसं दुःखीकष्टी झाली नसती का?? साडेसाती म्हणजे वाईट वेळ नक्की जाते, पण अशी दुसऱ्यांच्या दारात लिंबू मिरच्या टाकून नव्हे! विचार करण्यात आणि टेन्शन घेण्यात वाया चाललेला वेळ जर काम शोधण्यात आणि पैसे कमावण्यासाठी खर्च केला, की साडेसाती जाते म्हणजे जातेच! आणि हो, चांगली वेळ कधीच येत नसते; आपल्याला आपल्याकडे असलेल्या आजच्या वेळेलाच प्रयत्नांनी चांगलं बनवावं लागतं! "चल, चहा ठेव मस्तपैकी, आलं आणि गवती चहा टाकून! राहिलं सीसीटीव्हीचं, तर तो आज बसवून टाकू! मग तर झालं!?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...