Wednesday, April 1, 2026

ज्याच्या घरी गंगा...

*ज्याच्या घरी गंगा...*
_एक मुद्दा, एक विचार!_
*1 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*ज्याच्या घरी गंगा...*

*एक आई-पालक मुलाच्या शिकवणी वर्गातील सरांना भेटायला आल्या. त्यांचा मुलगा त्या सरांना खूप मानतो वगैरे त्यांनी त्या सरांना सांगितलं. सरांनी विनम्रपणे त्यांना नमस्कार केला.* 

*पुढे त्या बाई म्हणाल्या, “सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मुलाला प्लीज शिकवा की त्याने घरातल्यांचं काम ऐकलं पाहिजे. अजिबात ऐकत नाही. इकडची वस्तू तिकडे करायला नको. साधं ग्लासभर पाणी मागितलं प्यायला तर म्हणतो ‘उठून घे ना.’ मी म्हटलं- अरे वर्गात मी फक्त इतकं जरी म्हटलं की मला तहान लागलीय रे पोरांनो! की पुढच्या मिनिटाला सगळ्या वर्गाची माझ्यासमोर झुंबड उडते पाणी देण्यासाठी. प्रत्येकजण माझ्यासमोर पाण्याची बाटली धरतो आणि म्हणतो की बाई, माझ्या बॉटलमधलं पाणी प्या. आणि तू माझा मुलगा असून मला पाणी देत नाहीस...? तर म्हणतो- यात काय विशेष? मी पण स्कूलमध्ये आमच्या मॅडमना पाणी देतो! बघा आता!”* 

*सर इतकंच म्हणाले, “घरच्या गंगेचं महत्त्व नसतं मॅडम. ज्याच्या घरी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा!”*
 
     *मंडळी, गोष्ट फक्त त्या मुलापर्यंत थांबत नाही. समाजातही काही वेगळी परिस्थिती नाही. नशिबाने आपल्याला प्राप्त झालेल्या, आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांचं आपल्याला कौतुकच नसतं. आपण त्यांना हलक्यात घेतो. बऱ्याचदा तर त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जातं, आणि कधीकधी त्यांना मुद्दाम डावलून त्यांची खरोखर क्रूर चेष्टा केली जाते.*

 *घर असो, खेळ असो, कार्यालय असो, की संघटना; पळसाला पानं तीनच! सगळीकडे हीच परिस्थिती. पण लोकांना आपली किंमत नसली तरी ‘आपण कोण आहोत’ हे ज्यांना माहीत असतं, ती माणसं कधीही स्वतःची किंमत खाली पडू देत नाहीत. आपला आब राखून असतात. जिथे आपली किंमत नाही अशी जागा कितीही सुशोभित, चमचमीत आणि लोकांच्या लेखी उत्कृष्ट, चांगली असो, ही माणसं तिथे रमत नाहीत. अगदीच नाईलाजास्तव थांबावं लागलंच तर त्यांचं केवळ शरीर तिथे असतं, ती स्वतः नसतात. योग्य वेळी ती जागा रिक्त करतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं महत्त्व कळू लागतं. त्यांचं आपल्यातून जाणं वेदनादायी वाटू लागतं, पण उपयोग नसतो.*

 *म्हणून आपल्यासोबत असलेल्या अशा माणसांची कदर केली पाहिजे. वयाने, पदाने, शिक्षणाने, समजेने ती लहान असतील तरीही... कारण ही सगळी गंगेची रूपं आहेत. गंगा नेहमी हिमालयातूनच वाहते असं नाही… ती कधी आईच्या रूपात घरात असते, कधी मित्र-मैत्रिणीच्या रूपात आपल्याजवळ उभी असते, कधी वरिष्ठ बनून आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते, तर कधी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात आपल्याला आयुष्याचे धडे देत असते. पण आपणच तिचं पावित्र्य ओळखलं नाही, तिची कदर केली नाही, तर एक दिवस हीच गंगा आपल्या आयुष्यातून निघून जाते…आणि मग उरतो तो फक्त कोरडा काठ — आणि जिथे पाणी असताना आपण तहानलेलेच राहिलो होतो, याची खंत! म्हणून…*

*आपल्या आयुष्यातील ‘गंगा’ ओळखा, तिचा मान ठेवा, कारण घरची गंगा ओळखायला उशीर झाला, तर उरतात फक्त आठवणी… आणि डोळ्यात पाणी!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

पाडव्याचं कौतुक कशासाठी

*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*19 मार्च 2026, गुरूवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*

*आजकाल सणसुद्धा अंमळ धावपळीत असल्यासारखेच वागतात. आता गुढी पाडव्याचंच पहा ना. सकाळी धावतपळत आला, आणि हार-कड्याची गोडी वाढायला सुरू होण्याआधीच संपलादेखील!*

 *इतकी धावपळ आहे प्रत्येकामागे, इतकी कामं पडलीयेत प्रत्येकाला, की सण चवीने साजरा करायलाही वेळ नाही. स्टेट्सला फोटो मिळाला की झालं; नाहीतर एक पाडवा असायचा- गळ्यात हार-कडे घालून मिरवायचं आणि समोरच्याला म्हणायचं, “म्हण, गुढी पाडवा” आणि त्याने ‘गुढी पाडवा’ म्हटलं की आपण म्हणायचं, “नीट बोल गाढवाs!” आणि मग दोघांनीही हसायचं! काय निरागस काळ होता, नाही?*

  *आता खूप पुढे निघून आल्यावर जरासं समजू लागलं आहे, ‘गाढवा’त लायकी काढून का होईना, नीट बोलण्याची तंबी यामुळे दिली जात असायची कारण येत्या काळात माणसं नीट बोलणार नाहीत हे जुन्या लोकांना माहीत होतं!*

     *पाडव्याचं कौतुक कशासाठी? तर पाडवा, म्हणजे चैत्र नवी पालवी घेऊन येतो म्हणून! त्या आधीचा फाल्गुन म्हणजे कंटाळा, शक्तीहीनता... निसर्गाचा झोपी जाण्याचा काळ. पण माणसाला झोपून राहून कसं चालेल? म्हणून आली फाल्गुनातली महाशिवरात्र! हे सांगायला, की ‘झोपू नको, जागा आणि जागता रहा! तरीही आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन ढेपाळलेले आणि झोपाळलेलेच. म्हणून केला होळीचा भल्ला मोठ्ठा जाळ! लोकांना सांगितलं आता होळीत थंडी जळून गेली, आता घरात दडून बसू नका, स्वेटर फेका, बाहेर निघा. निघत नाही? कसा निघत नाही, खेचा याला बाहेर! म्हणत आली धुळवड आणि रंगपंचमी! रंग उधळा पण स्वतःमध्ये थोडी तरतरी शिल्लक ठेवा, कारण थोड्याच दिवसात नवी पालवी घेऊन वसंत येणार आहे! चैत्र उंबरठ्यावर उभाय! मग या सणांच्या बळावर निसर्ग आणि माणूस थोडी धुगधुगी कायम ठेवतो आणि अखेर दारावर येऊन उभा राहतो, नव्या वर्षाचा नवा शिलेदार गुढी पाडवा! नवं वर्ष, नवा हर्ष! नवी पालवी, नवी सळसळ, नवा उत्साह! निसर्गाला पुन्हा नवं हिरवेपण मिळू लागलं की माणूसही आतून हिरवा म्हणजे ताजा होऊ लागतो. नाविन्य म्हणजे काय? तर आनंद! मग आता हे सगळं इतकं सगळं नवीन म्हटल्यावर नव्याचा आनंद साजरा व्हायला पाहिजे की नको? म्हणून गुढी पाडवा महत्वाचा!*
 
    *सगळं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा स्वतःमध्ये नवी शक्ती, नवी उर्जा, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्नं भरण्यासाठी, नवी सुरुवात करण्यासाठी निसर्गाने पुढे केलेला विश्वासाचा हात म्हणजे गुढी पाडवा! सातत्याने येणारं अपयश, दु;ख, अपमान, अपघात, वियोग, मृत्यू म्हणजे जणू अमावस्या. चैत्रातली प्रतिपदा म्हणजे फाल्गुनातल्या अशा शेवटच्या अमावस्येनंतरचा पहिला नवा दिवस. ‘अमावस्या सरलीय, आता सगळं चांगलं होईल, मी नव्या उर्जेचा हात पुढे करतोय, तू फक्त लढायला तयार हो...’ म्हणणारा. अंग झटकून नवी उभारी देणारा... म्हणून पाडव्याचं कौतुक. कारण, या दिवशी निसर्ग आपल्याला म्हणत असतो,*

_*नवा सूर्य करतो तुझ्या मी हवाली, जगाला कळू दे नव्याने खुशाली!*_
_*दिशाभूल करतिल जरी लोक काही, तुझे स्वप्न राहो तुझ्या भोवताली!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...