Friday, July 31, 2026

लायकी नसलेल्यांची धावपळ


🔳
लायकी नसलेल्यांची धावपळ 
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके
नाशिक 

• एक मुद्दा एक विचार
• बुधवार दिनांक 29 जुलै 2026 

तुम्हाला आठवतंय? आपण भारताला महासत्ता बनवायला निघालो होतो? रस्त्याने समाज सुधारण्याच्या गप्पा करता-करता बरेच पुढे निघून आलो राव आपण! वीस लाख द्या, तुम्हाला NEET चा पेपर परीक्षेआधीच देतो. पंधरा लाख द्या, तुमचे इंजिनिअरिंगचे पर्सेंटाईल ९९ टक्के करून देतो. पाच लाख द्या, तुम्हाला TET चा पेपर देतो. तीन लाख द्या, तुम्हाला घरबसल्या बीकॉम च्या तिन्ही वर्षांचे सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेटसह देतो. आमच्या क्लासला प्रवेश घ्या, तुमच्या मुलाचा कॉलेजचा प्रवेशही करून देतो; शिवाय बारावीला जेवढे पाहिजेत, तेवढे मार्क्सही मिळवून देतो! अरे, काय चाललंय काय??

लायकी नसलेल्यांची लायकीत येण्यासाठी किती ही ना-लायकी धडपड म्हणायची! समाज सुधारतो आहे की बिघडतो आहे? बोगस धंदे करणाऱ्यांनी तर केव्हाच कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय, पण ‘झोल’ करून समाजात उथळ माथ्याने फिरणाऱ्या काळवंडलेल्या या बगळ्यांचं काय? एवढी लाज सोडून द्यावी? की लायकी नसलेल्या आपल्या मुलांना पैशाच्या बळावर, लायकी असलेल्यांच्याही पुढे, किंबहुना त्यांच्या जागी सेट करण्यासाठी धडपड करावी? रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांच्या प्रामाणिक प्रयत्नांचं काय? त्यांना डावलून एकवेळ यांना पुढे रेटालही; पण ज्या जागांसाठी हे करत आहात त्या यांना झेपणार आहेत का याचा काही विचार? कुठे चाललो आहोत आपण? कोण रोखणार यांना? आपल्या एक दिवट्या चिरंजीवाचं भलं होण्यासाठी, इतरांच्या प्रामाणिक स्वप्नांची राखरांगोळी करणारे मारेकरी आहेत हे! आणि यांची मुलं? पुढे ती काय म्हणतील? ‘माझ्या वडिलांनी हा पेपर असा फ्रॉड करून मिळवला आणि माझं ॲडमिशन झालं!’ हे सांगताना या मुलांची जीभ चाचरणार नाही? ‘चोरी करना तो खुद पापा ने सिखाया!’ चं बाळकडू प्यालेल्या या मुलांकडून पुढे तुम्ही काय अपेक्षा ठेवणार आहात? ‘होऊ देत आमचा मुलगा कसाही, तुम्ही नका मध्ये-मध्ये नाक खुपसू’ म्हणणाऱ्याना हे कधी समजणार, की हेच दिवटे नंतर समाज पोखरणारे किडे बनणार आहेत म्हणून? यांच्या ना-लायकपणाची शिक्षा इतर समाजाला का म्हणून? आणि ज्यांच्याकडे देण्यासाठी इतके पैसे नाहीत; आणि असतील तरी ज्याना द्यायचे नाहीत, त्यांच्या वाट्याला काय? क्षमता असूनही उपेक्षा? केवढा अन्याय आहे हा! तुकोबा तुकोबा, आणावी ती काठी, नाठाळांच्या माथी, हाणावया!!

‘शासनाने निर्माण केलेल्या चांगल्या संस्थांची दारे नेहमी अभ्यास करून पुढे येणाऱ्या हुशार, होतकरू, आणि बुद्धिमान उमेदवारांसाठी खुली असावीत. समाजातल्या सर्व चांगल्या गोष्टींची सूत्रे चांगल्या आणि लायक माणसांच्या हाती, योग्य माणसांच्या हाती असावीत, म्हणजे मग समाजाची वाटचाल योग्य दिशेने होते. हे साधे, सरळ, सोपे आणि सुटसुटीत सूत्र असताना, ना-लायकांच्या पदरात लायकीच्या जागा टाकून कोणता देदीप्यमान समाज आपण घडवू पाहत आहोत, देव जाणे!
-

राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक

Friday, July 24, 2026

अट्टहास, अहंकार आणि अटळता

अहंकार, अट्टहास आणि अटळता!
_एक मुद्दा, एक विचार!_
२४ जुलै २०२६, शुक्रवार
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
अहंकार, अट्टहास आणि अटळता!

सध्या दोन प्रधानांनी म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान यांनी एक छोटासा निर्णय वेळेवर न घेऊन देशावर जी वेळ आणली आहे त्यामुळे देश कोणत्या टोकाला येऊन उभा राहिला आहे याचा अंदाज येतोय. एका बाजूला हतबल सरकार तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेली लाखो लाखोंची गर्दी! अवघड आहे सगळं. सरकार हे सगळं आवरू शकेल?

  कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणे  पाहिलं तर हे सगळं टाळता येण्यासारखं होतं. इतके सगळे पेपर लीक झाल्यावर, आणि त्याचा धसका घेऊन दिवसाचे सोळा-सोळा तास अविरत अभ्यास करणाऱ्या आपल्याच देशातल्या कोवळ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकदार पाऊल उचलल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी म्हटलं द्या राजीनामा, तर थोडी संवेदना दाखवून देऊन टाकायचा! फेकायचा त्यांच्या तोंडावर आणि बाजूला व्हायचं! त्यात काय विशेष गोष्ट होती इतकी? नाव राहिलं असतं. खरंतर लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याचीही गरज नाही. अशावेळी स्वतःनेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा ही आपल्या देशाची परंपरा आहे. नसेल देत एखादा, तर सन्माननीय पंतप्रधानांनी त्याला सांगायचं- ठीक आहे बाबा, हो बाजूला काही दिवस. परत तुला घेतो वाटलं तर. दोन-तीन वर्षानंतर पुन्हा त्याला घेतला असता एखाद्या मंत्रिमंडळात. कोण लक्षात ठेवतो? गेला बाजार एक महिनाभर ती मुलं तिथे ऊन, पाऊस झेलत शांतपणे आंदोलन करत होती, आणि जागतिक कीर्तीचा एक माणूस त्यांच्यासाठी उपोषण करत होता, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपला एखादा माणूस दिला असता पाठवून! त्यांचं समाधान झालं असतं! मुलंच ती. गेली असती नाचत नाचत घरी!

 पण जेव्हा माणसाचा अहंकार त्याच्यापेक्षाही मोठा होऊ लागतो, तेव्हा त्याला छोटया-छोट्या गोष्टींमध्येही स्वतःचा अपमान, पराभव वाटू लागतो, आणि तो टाळण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार होतो.

   जिथे आम्ही मोठ्यांना फाट्यावर मारतो, तिथे ह्या झुरळांचं काय? फवारलं हिट की विषय फिट! इतका सरकारला हा विषय सोपा वाटला. सोनम वांगचूक यांना 'असं चादरीत गुंडाळून उचलून आणा' ही कल्पना मांडणाऱ्याला आता त्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल. त्यांना 'चायनाचा एजंट' म्हणणारांचे नेतेच त्यांना भेटायला आणि उपोषण सोडण्याची विनंती करायला दवाखान्यात गेले आहेत. असे म्हणणाऱ्यांनी मुलांच्या आंदोलनात त्यांची एन्ट्री होण्याच्या अगोदरच सरकारच्या कानात सांगायला पाहिजे होतं, की मुलांचं ऐका, आणि यांचा छोटासा प्रश्न मिटवून टाका; म्हणजे हा चायनाचा एजंट मध्ये येणार नाही, पण तसं शहाणपण त्यावेळी कुणालाही सुचलं नाही! आपल्या जवानांचं बर्फातलं टिकून राहणं सुसह्य व्हावं म्हणून त्यांना उबदार निवारा पुरविण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसालाच यांनी शिक्का लावून टाकला. देशभक्तीचा ठेका जणू फक्त आपल्याच नावावर केलेला आहे, आपण म्हणू तोच देशभक्त, बाकी सगळे देशद्रोही, असा स्वतःचा  गैरसमज करून घेऊन विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तर यांनी देशद्रोही ठरवलंच; परंतु लोकशाहीत विरोधी पक्ष आवश्यक असताना सगळ्याच यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांनाच दाबून टाकलं. ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या चिठ्ठ्या सापडल्या त्या सगळ्यांना सोयीने ईडीबीडीसीडीचा धाक दाखवून धाकात ठेवलं, स्वतःकडे खेचलं. पण भ्रष्टाचाराचा कलंक नसलेल्या या मुलांना अडवणार आणि अडकवणार कशात, कोण, आणि कसे? इथे माशी शिंकली!

 सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशांनी आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना झुरळ म्हणावं, आणि शिक्षणमंत्र्यांनी दहशतवादी म्हणून त्यांना हिणवावं हे आपल्या देशाचं दुर्दैव. पण त्यांनी हे केलं. त्यांच्या हांजीवाल्यांनीही त्यांची री ओढली. अगदी सीबीएसईच्या पेपर चेकिंगचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यालाही परकीय शक्तींचा हस्तक म्हणावं? पण म्हटलं गेलं. आपला प्रत्येक निर्णय योग्यच आहे असं म्हणणाऱ्यांची टोळी आपल्या पाठीशी असली की मग माणसाचं रूपांतर फार लवकर बेडकात होतं. राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या माध्यमांनी तर सडेतोड प्रश्न विचारण्याचं सोडून  केव्हाच नांगी टाकली. म्हणून जेव्हा ही मुलं जंतर-मंतरवर आली तेव्हा 'दहा-बारा दिवस बसतील. जेव्हा कोणत्याही राष्ट्रीय चॅनलवरून त्यांची कोणतीही बातमी देशाला कळणारच नाही, तेव्हा आपण दुर्लक्षुन मारलेले हे चेहरे गपगुमान आपला गाशा गुंडाळून गुपचूप निघून जातील', अशा भ्रमात हे राहिले. परंतु पाठीमागून कोणतं मोठं वादळ घोंगावत येत आहे, याची यापैकी कोणालाही सूतराम कल्पना आली नाही. 'मोठे-मोठे गार केले गंमतमधी' तिथे या झुरळांची काय बिशाद? या भ्रमात मंडळी राहिली आणि आजची ही अवस्था!

  मोबाईलच्या स्क्रीनचं शस्त्र करून रणात उतरलेली ही पोरं आता आवरतील असं वाटत नाही. काल मार खाऊन आज पुन्हा त्यांनाच गुलाबाचे फुल देणाऱ्या, पोलिसांच्या गाडीत पोरांना कोंबून नेत असताना शिवछत्रपतींचा गनिमी कावा करत पाठीमागून हळूच दरवाजा उघडून कोंडलेल्यांना मोकळं करून देणाऱ्या, तुमच्या खिशात ड्रगची पावडर टाकून, तुमच्यावर खोटी केस करून, तुम्हाला आयुष्यातून उठवू म्हणणाऱ्या पोलिसाचाच गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या, पोलिसांच्या गाडीला दोन्ही हातांनी समोरून रोखून धरत एकटं नडणाऱ्या, कपाळावर कफन बांधून फिरणाऱ्या, मोठ्या अभिमानाने गांधी आणि आंबेडकरांचा एकत्रित फोटो मिरवत, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचा नारा देत, पोलिसांच्या तोंडावर त्यांनाही पाठ नसलेली राज्यघटनेतील कलमे फेकून मारणाऱ्या, पोलीस मारायला आले की 'जनगणमन' सुरू करणाऱ्या, जोरदार पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला तर त्याच पाण्यात मनसोक्त नाचण्याचा आनंद घेणाऱ्या, आणि त्यांच्यावर फेकलेला अश्रू धुराचा गोळा उचलून पुन्हा त्यांच्यावरच भिरकावणाऱ्या जेन-झी ला आवरताना सरकारच्या नाके नऊ आलेत.

काठीला खिळे लावून त्यांना झोडपून काढल्यानंतर तर ही आग अधिकच भडकली आहे. आता त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही उतरलेत. आता त्यांना देशद्रोही म्हणा, किंवा आणखी कोणता कलंक लावा, पण हा वणवा आता थांबणार नाही बहुतेक. काहीतरी मोठा धमाका येत्या काळात आपल्याला बघायला मिळणार नक्की. एकतर शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचे, किमान आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्यांच्या आयुष्याचे मोल घेऊनच ही आग थांबणार, किंवा 'दिल्लीचेही तख्त उलटवतो महाराष्ट्र माझा!!' अशा गर्जना पुढच्या काळात सह्याद्रीच्या कडे-कपारीत पुन्हा एकदा घुमणार! यांच्या अगोदरच्या सरकारातील लोकांनी भ्रष्टाचाराचा जो कळस गाठला होता, त्यांना वैतागून लोकांनी यांना असंच आंदोलन करून अगदी विश्वासाने सत्तेवर आणलं, तर यांनी त्यांच्या पुढची पायरी गाठली. त्यांनाच आपल्यात सामावून घेतलं! न्यायदेवतेने जरी डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असली, तरी या देशातील जनता उघड्याठाक डोळ्यांनी हे सगळं बघत आहे, कोणत्याही निमित्ताने लोकांच्या संयमाचा कडेलोट होऊ शकतो, ही गोष्ट ही मंडळी साफ विसरली. आता निमित्ताला पेपरफुटी असली, तरीही त्याच्यामागे आमदारफुटी, खासदारफुटी, भ्रष्टाचाराची गुटी, आणि यांच्या आश्रयाला असलेल्या गुंडांच्या कटकटी या सगळ्यांना आंदोलकांनी एकाच फडक्यात गुंडाळले आहे! जिथं स्वतःला विद्वान म्हणवणारी शहाणी माणसे शेपूट घालून बसली आहेत, तिथं पंधरा-सोळा वर्षांची नुकतीच मिसरुडं फुटलेली मुलं मोबाईल समोर धरून अन्यायाविरोधात धाडधाड बोलू लागली आहेत.

  काय गंमत आहे बघा. लोकशाहीत जनता मालक असते आणि इतर सर्व अधिकारी आणि राजकारणी तिचे सेवक. आजकाल लोकांना सेवा करण्याची इतकी काय हौस आली आहे कुणास ठाऊक? लोक ओरडून सांगताहेत की आम्हाला तुमच्याकडून सेवा नको आहे, तरीसुद्धा 'मी तुमची सेवा करणारच!' अशा अट्टहासाला पेटलेल्या लोकांना काय म्हणावं? "मला तुमची सेवा करायला नको म्हणणारे तुम्ही कोण? भले तुमचे कंबरडे मोडो, तुमचा जीव जाओ, परंतु मी तुमची सेवा करणारच!" असं म्हटल्यावर आता मालकांनी यावर काय म्हणावं? "अरे बाबा आम्ही तुला आमची सेवा कर म्हटलं नव्हतंच. तूच तुझ्या मनाने उभा राहिलास आणि सेवक म्हणून स्वतःच्या माथ्यावर शिक्काही तूच मारून घेतलास! त्याच्यासाठी तू काय काय झोल केलेस ते तुलाही चांगलं माहीत आहे, आणि आम्हालाही! आता बस की खाली!" असं जनतेने सगळ्याच पक्षातील सगळ्याच अशा बळजबरीचा रामराम करणाऱ्या सेवकांना कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांचं ऐकतील तर ते सेवक कसले!? गोलमाल है भाई सब गोलमाल है!

 बाकी काही असो. जगाने अभिमानाने ज्याच्याकडे पहावं असा हा आपला सुंदर देश! आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचा आदर्श अवघ्या जगाने घ्यावा अशा! असे असताना जगहसू होणाऱ्या अशा काही अप्रिय गोष्टींमुळे  जगभरात डागाळू पाहणारी आपल्या प्रिय देशाची प्रतिमा एक जागरूक नागरिक म्हणून मनाला अस्वस्थ करते, कारण आंदोलनामध्ये अतिशय विदारकपणे मार पडणारी निरागस मुलं आपलीच आहेत. ज्यांच्यावर पलटवार होतो आहे ते पोलीस, सैनिक आपलेच आहेत. दोघांवरीलही हल्ले बघवत नाहीत. दोन्ही बाजूंनी नुकसान आपलंच आहे. कुणाच्यातरी वेड्या अट्टहासापायी अनागोंदीची अटळता समोर येऊ नये म्हणून हे कळकळीचं स्पष्ट बोलणं अगत्याचं आहे! याकडे कोणत्याही एकांगी चष्म्यातून पाहू नये, नाहीतर धूसर दिसण्याची शक्यताच अधिक! 
वंदे मातरम्!

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, July 15, 2026

मोडला 'आहे' कणा?

*मोडला ‘आहे’ कणा?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*१५ जुलै २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*मोडला ‘आहे’ कणा?*

   *मुलांचे शिक्षण भ्रष्टाचारमुक्त रहावे म्हणून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भारतातील महान शिक्षणतज्ञ आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कित्येक विद्यार्थ्यांसह अन्नत्याग सत्याग्रह करत अखेरच्या घटका मोजत आहेत. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या देशाच्या प्रधान सेवकाला या जागतिक कीर्ती असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू जात नाही. केवढं हे दुर्दैव!*

*शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची देशात, राज्यात प्रचंड केविलवाणी अवस्था झाली आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. परंतु देशाचे नागरिक म्हणून यावर बोलण्यासाठी आपण शिल्लक उरलो आहोत कुठे? आपण तर केव्हाच वाटले गेलो आहोत. ‘त्यांचं ते बघतील...’ म्हणत स्क्रीन स्क्रोल करत थंड बसलो आहोत. अण्णा आंदोलनात मेणबत्त्या आणि झेंडे घेऊन गावभर फिरणारे आता कुठे गेले कुणास ठाऊक? इतक्या लवकर आपल्या संवेदना बोथट झाल्या? की आपल्याला कशाची गुंगी आली आहे?*

   *आपण कालपर्यंत असे नव्हतो. आपला कणा ताठ होता. आता आपल्याला काय झालंय? आपण एवढे कसे कोरडे, कोडगे, लाचार आणि मुर्दाड झालो? 'चूक' ला 'चूक' म्हणण्याची हिंमत आपल्यात उरू नये? आपण खरं बोललो तर आपल्यावर कोणीतरी डोळे वटारेल, आपली  नोकरी घालवेल अशी भीती आपल्याला सतत वाटत रहावी? सध्या आपलं सगळं अलबेल चाललेलं आहे, ते या नसत्या उचापतींनी संकटात येईल याचं दडपण सतत आपल्या मागे रहावं? कोणीतरी आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, आणि आपण थोडी जरी तथाकथित चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर उद्या आपल्या सुखी संसारावर गंडांतर येईल, हा वेताळ आपल्या मानेवर कधीपासून आणि कसा बसला? आपण इतके नेभळट कधीच नव्हतो. आपण असे कधीपासून झालो? कोणत्या कड्यावर येऊन उभे राहिलो आहोत आपण? आपला कणा मोडत चालला आहे की काय?*

    *आपण अगोदर लोकांना निवडून द्यायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. तेही दबकून असत.  आता आपण त्यांना निवडून देत नाहीत; ते स्वतःच मनी आणि मसल पॉवरवर निवडून येतात. आता जर आपण त्यांना प्रश्न विचारायला जाऊ, तर ते आपला खात्मा करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, कारण निवडून येण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये लावले आहेत. पद सोडायचं म्हणजे त्यांचं तेवढ्या रुपयांचं नुकसान होणार. ते त्यांना कसं सहन होईल? त्यापेक्षा सामान्य जनतेतले काही लोक मेले तर त्यांना काय फरक पडतो?*

*आपल्यालाही आपल्यातले काही मेले तर काय फरक पडतो??*

    *फरक पडायला हवा! पुन्हा गुलामगिरीत खितपत पडायचे नसेल तर फरक पडायलाच हवा. आणि त्यासाठी आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आहे ना, हे वारंवार तपासून पाहिलं पाहिजे. सदसद्विवेक सांभाळला पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, आणि आपल्यासाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे; अगदी कणा मोडू न देता!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...