होता होईल तेवढं
मन थोडं मोठं करून
थोडं उदार व्हायचं
होता हाईल तेवढं आपण
स्वतःच समजदार व्हायचं..
भांड्याला भांडं लागून
घरात आवाज होतोच ना?
रांगतं मूल चालू लागल्यावर
त्याचाही तोल जातोच ना?
मोठ्यांचही तसंच असतं,
त्यांनाही सांभाळून घ्यायचं..
मोठ्यांमध्येही लपलेलं असतं
एक लहान मूल
तेही कधी पांघरून घेतं
खोडकरपणाची झूल
त्यालाही कधी मोकळेपणाने
मस्त रडू द्यायचं...
अधूनमधून येतच असतं
एखादं वादळ भेटायला
एखादा अश्रू पुरेसा असतो
माणसाचा धीर सुटायला
संयमाचं तीर्थ थोडं
हळूच मस्तकावर घ्यायचं...
कष्टाविनाच सगळं मिळावं
असं होतं का कधी?
मोगरासुद्धा ऊन सोसतो
फुलून येण्याआधी!
प्रयत्नांच्या रोपट्याला
ठरवून पाणी द्यायचं...
अहंकाराचा वारा लागून
बहकू शकतो माणूस
थोडा इकडे थोडा तिकडे
सरकू शकतो माणूस
येतच कधीतरी भान माणसाला
पुन्हा माणसांत यायचं...
होता होईल तेवढ आपण
स्वतःच समजदार व्हायचं...
राजेश्वर उर्फ राज शेळके,
नाशिक
9423542224
No comments:
Post a Comment