Wednesday, January 15, 2025

किमान बोला

*गोडगोड बोला!* 

    *आजकाल थोडं काही झालं की माणसं अबोला धरतात, दुरावतात. थांबलेलं बोलणं सुरू करायलाही 'मी का बोलू? त्याला गरज असेल तर बोलेल अगोदर!' असं हटून बसतात. या न बोलण्यापायी आजवर कितीतरी नाती गुदमरून गेली आहेत. माणसाला बोलताच आलं नसतं तर? माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक राहिला असता?*

     *काही माणसं छान बोलतात. त्यांच्या बोलण्याला रसवंती असते. त्यांच्या बोलण्याने माणसं जोडली जातात. अशी माणसं बोलू लागली, की ऐकणाऱ्याला ऐकतच राहावंसं वाटतं. काही माणसं नको तितकं बोलतात. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! त्यांच्या बोलण्यात ज्ञानाच्या गोष्टी कमी आणि निरर्थक गुऱ्हाळच जास्त. एकीकडे बसून ऐकायचं आणि दुसरीकडे जाऊन ते उगाळत बसायचं असा यांचा शिरस्ता असतो. त्यांच्या व्यर्थ बडबडीतून काही साध्य तर होत नाही, परंतु लोकांना त्यांच्या बडबडीचा कंटाळा मात्र नक्की येतो. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन तावातावाने भांडणारी माणसं पाहिलीत का कधी? ही माणसं एरवी लपवून ठेवलेल्या त्यांच्या अगाध शाब्दिक ज्ञानाची भांडताना मुक्त उधळणच करीत असतात!*

     *असं म्हणतात की माणसाला 'बोलणं' शिकायला जन्मल्यापासून एक वर्ष लागतं आणि 'गप्प बसणं' शिकायला बाकीचं सगळं आयुष्य कमी पडतं. तसं बघितलं तर माणूस बोलायला शिकला हजारो वर्षांपूर्वी; पण अद्यापही त्याला कुठे? किती? कसं बोलावं? किंवा बोलूच नये याचं म्हणावं तसं तारतम्य आलेलं नाही. कायम मूग गिळून बसलेली, बोलायचं असतानाही मुद्दाम बोलण्याचं टाळणारी, बोलायला हवं तेव्हा गप्प बसणारी आणि गप्प बसावं तिथे मध्येच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करणारी, फक्त टोमणे मारण्यापुरतंच बोलणारी, बोलण्यात कायम अहंकाराचा उग्र दर्प असलेली अशी तऱ्हेतऱ्हेची माणसं पाहिली की वडीलधाऱ्यांनी 'मौनम् सर्वार्थ साधनम्' का म्हटलं असावं याची प्रचिती येते. याउलट चारचौघात चार शब्दही धड बोलू न शकणारी माणसं पोटात उगाच हजारो शब्दांचं कोठार घेऊन फिरत असतील की काय अशी शंका येते. 'बोललो असतो पण जाऊ दे आता!' असं म्हणत कायम संशयाचं धुकं निर्माण करणारी माणसं काही कमी नव्हेत! याच्या उलट इतरांच्या लेखी अबोल असणारी माणसं त्यांच्या पठडीतला कुणी भेटला की अशी काही खुलतात की ज्याचं नाव ते!*

   *खरं तर इतरांच्या जखमांवर शब्दांची हळुवार फुंकर घालून त्यांना धीर देणाऱ्या, जगण्याचा आशावाद देणाऱ्या माणसांनी हे जग जिवंत ठेवलं आहे. थोडं सांगून आणि थोडं ऐकून माणसांमधली दरी सांधण्याची सुबुद्धी ज्या क्षणी माणसात येते तेव्हा त्याचं बोलणं किंवा शांत राहणंही एक सोहळा होऊन जातो. त्याच्या अंतर्मनातून शब्द उमटतात,*

_*बोललो नाही तरी संवाद झाला*_
_*राहिले सांगायचे काहीच नाही!*_

- प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
सुसंवाद - 9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...