◾
*चुकामुक*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*चुकामुक*
*गावाकडच्या भाविकांचा एक ग्रुप काशी यात्रेला गेला. सगळ्या बाया बापड्यांना आणि धोतर टोपी बाबांना घेऊन जाणाऱ्या एजंटने सांगितलं की एका मोठ्या स्टेशनच्या अलीकडेच आपल्याला छोट्या स्टेशनवर उतरायचं आहे, म्हणजे गर्दी टाळता येईल. ठरल्याप्रमाणे मंडळी उतरली; पण एक आजीबाई गाडीतच बसून राहिल्या, आणि त्यांची चुकामुक झाली!*
*थोड्या वेळाने उतरलेल्या माणसांपैकी कोणाच्यातरी लक्षात आलं की एक आजी गाडीतच राहिल्या, गाडी निघून गेली! पोक्त वयाची दोन माणसं लगोलग मागून आलेल्या दुसऱ्या गाडीने पुढे गेलेल्या गाडीत राहून गेलेल्या आजीबाईंना शोधण्यासाठी गेली. तिच्या घरच्यांना कळवलं. गावाकडून आजीचे नातेवाईक आजीला शोधायला दुसऱ्या गाडीने गेले. आजी कुठे गेली, कुठे उतरली, तिचं काय झालं, काही कळलं नाही. पुढील प्रत्येक स्टेशनवर उतरून शोध घेतला, पण आजीचा काही मागमूस लागला नाही. उत्तर भारतात, तीही हिंदी पट्ट्यात पहिल्यांदाच गेलेली ही गावाकडची अशिक्षित मराठी आजी कशी बरं सापडायची?*
*मंडळी खूप थकली पण आजी सापडली नाहीच. सगळ्या यात्रेचा फियासको झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाया बापड्यांचे डोळे रडून रडून कोरडेठाक झाले. आजीचं अंतिम दर्शन कुणालाही झालं नाही. शेवटी आजीच्या घरच्यांनी जड अंतःकरणाने विचार करून निर्णय घेतला आणि पवित्र काशीच्या तीर्थक्षेत्रावर एका घाटावर आजीचा अंत्यविधी पिठाचा गोळा वगैरे ठेवून ब्राह्मणसाक्षीने आरंभ केला. अवघं वातावरण भावूक झालं.*
*गंगेत स्नानासाठी डुबकी मारलेल्या एका महिलेने जलदान करण्यासाठी पाणी ओंजळीत घेतलं, आणि 'हर हर गंगेsss!' म्हणत अर्पण केलं आणि समोर बघते तर काय? जिचा अंत्यविधी करत होते ती आजी काही अंतरावर घाटावर जिवंतपणे आंघोळ करत होती! एकच गलका झाला. सगळे धावत धावत आजीजवळ गेले. तिचा मुलगा तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. "तू इकडे कशी पोहोचलीस?" विचारल्यावर ती म्हणाली, "गाडीतल्या काही मराठी माणसांशी मी बोलले. ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुमच्या गावाकडची मंडळी काशी यात्रेसाठी इथे काशीला नक्की येतील. आपण तिथे जाऊन थांबूया. म्हणून मी इकडे येऊन तुमची वाट पाहत बसले. तुम्ही का इतका उशीर केलात!?" सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. चुकामुक झालेली आजी शेवटी अशी सापडली! जिवंतपणी आजीचा होऊ घातलेला अंत्यविधी होता होता राहिला!!*
*आयुष्य हे चुकामुकींचा खेळ आहे. इथे प्रत्येकाची कधी ना कधी, कशाशी तरी, कोणाशी तरी चुकामुक होते.माणसांशी झालेली चुकामुक एखाद्या वेळेला या आजीसारखी दुरुस्त होऊ शकते, परंतु नियतीशी, नशिबाशी, आयुष्याशी झालेली चुकामुक कशी दुरुस्त व्हावी? आयुष्यभर माणूस काहीतरी शोधत राहतो अधून मधून असं वाटतं की आपण जे शोधतो आहोत ते आपल्याला मिळत आहे परंतु खरं पाहिलं तर कोणाला काहीच मिळत नाही. लपाछपीच्या खेळात लपलेला गडी सापडावा आणि तेवढ्यात घरच्यांनी बोलावून घ्यावं तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि हाती काही मिळण्याच्या काळातच देवाजीचं बोलावणं येतं आणि मग कळतं आयुष्य म्हणजे निव्वळ चुकामुक! म्हणून एक वेळेस तिळगुळ दिले नाही तरी चालतील, परंतु गोड बोलायला काय हरकत आहे?*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
No comments:
Post a Comment