◾
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*19 मार्च 2026, गुरूवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
*आजकाल सणसुद्धा अंमळ धावपळीत असल्यासारखेच वागतात. आता गुढी पाडव्याचंच पहा ना. सकाळी धावतपळत आला, आणि हार-कड्याची गोडी वाढायला सुरू होण्याआधीच संपलादेखील!*
*इतकी धावपळ आहे प्रत्येकामागे, इतकी कामं पडलीयेत प्रत्येकाला, की सण चवीने साजरा करायलाही वेळ नाही. स्टेट्सला फोटो मिळाला की झालं; नाहीतर एक पाडवा असायचा- गळ्यात हार-कडे घालून मिरवायचं आणि समोरच्याला म्हणायचं, “म्हण, गुढी पाडवा” आणि त्याने ‘गुढी पाडवा’ म्हटलं की आपण म्हणायचं, “नीट बोल गाढवाs!” आणि मग दोघांनीही हसायचं! काय निरागस काळ होता, नाही?*
*आता खूप पुढे निघून आल्यावर जरासं समजू लागलं आहे, ‘गाढवा’त लायकी काढून का होईना, नीट बोलण्याची तंबी यामुळे दिली जात असायची कारण येत्या काळात माणसं नीट बोलणार नाहीत हे जुन्या लोकांना माहीत होतं!*
*पाडव्याचं कौतुक कशासाठी? तर पाडवा, म्हणजे चैत्र नवी पालवी घेऊन येतो म्हणून! त्या आधीचा फाल्गुन म्हणजे कंटाळा, शक्तीहीनता... निसर्गाचा झोपी जाण्याचा काळ. पण माणसाला झोपून राहून कसं चालेल? म्हणून आली फाल्गुनातली महाशिवरात्र! हे सांगायला, की ‘झोपू नको, जागा आणि जागता रहा! तरीही आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन ढेपाळलेले आणि झोपाळलेलेच. म्हणून केला होळीचा भल्ला मोठ्ठा जाळ! लोकांना सांगितलं आता होळीत थंडी जळून गेली, आता घरात दडून बसू नका, स्वेटर फेका, बाहेर निघा. निघत नाही? कसा निघत नाही, खेचा याला बाहेर! म्हणत आली धुळवड आणि रंगपंचमी! रंग उधळा पण स्वतःमध्ये थोडी तरतरी शिल्लक ठेवा, कारण थोड्याच दिवसात नवी पालवी घेऊन वसंत येणार आहे! चैत्र उंबरठ्यावर उभाय! मग या सणांच्या बळावर निसर्ग आणि माणूस थोडी धुगधुगी कायम ठेवतो आणि अखेर दारावर येऊन उभा राहतो, नव्या वर्षाचा नवा शिलेदार गुढी पाडवा! नवं वर्ष, नवा हर्ष! नवी पालवी, नवी सळसळ, नवा उत्साह! निसर्गाला पुन्हा नवं हिरवेपण मिळू लागलं की माणूसही आतून हिरवा म्हणजे ताजा होऊ लागतो. नाविन्य म्हणजे काय? तर आनंद! मग आता हे सगळं इतकं सगळं नवीन म्हटल्यावर नव्याचा आनंद साजरा व्हायला पाहिजे की नको? म्हणून गुढी पाडवा महत्वाचा!*
*सगळं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा स्वतःमध्ये नवी शक्ती, नवी उर्जा, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्नं भरण्यासाठी, नवी सुरुवात करण्यासाठी निसर्गाने पुढे केलेला विश्वासाचा हात म्हणजे गुढी पाडवा! सातत्याने येणारं अपयश, दु;ख, अपमान, अपघात, वियोग, मृत्यू म्हणजे जणू अमावस्या. चैत्रातली प्रतिपदा म्हणजे फाल्गुनातल्या अशा शेवटच्या अमावस्येनंतरचा पहिला नवा दिवस. ‘अमावस्या सरलीय, आता सगळं चांगलं होईल, मी नव्या उर्जेचा हात पुढे करतोय, तू फक्त लढायला तयार हो...’ म्हणणारा. अंग झटकून नवी उभारी देणारा... म्हणून पाडव्याचं कौतुक. कारण, या दिवशी निसर्ग आपल्याला म्हणत असतो,*
_*नवा सूर्य करतो तुझ्या मी हवाली, जगाला कळू दे नव्याने खुशाली!*_
_*दिशाभूल करतिल जरी लोक काही, तुझे स्वप्न राहो तुझ्या भोवताली!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t
No comments:
Post a Comment