◾
*शहरातले, गावाकडचे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*22 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*शहरातले, गावाकडचे!*
*एका मोठ्या भावाच्या शहरातल्या घरी लहान भावाचा गावाकडचा पोरगा शिकायला आणला. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मोठ्या भावाची मुलं आणि हा धाकट्याचा मुलगा यांच्यात काही वादावादी झाली, की मोठ्या भावाचा जीव तीळतीळ तुटायचा. नेमकी बाजू कोणाची घ्यावी हे त्याला काही कळायचं नाही. भावाच्या पोराची बाजू घेतली, की बायको त्याच्यावर डाफरायची. स्वतःच्या पोरांची बाजू घेतली की भावाचा पोरगा फोनवर सांगायचा, “मला मारतात! माझ्यावर मुद्दाम चिडतात!”*
*मोठ्या भावाची कुचंबणा बिचाऱ्यालाच माहीत.*
*एके दिवशी असाच कशावरून तरी खटका उडाला, आणि संध्याकाळची वेळ पाहून पोरगा घरातून गायब झाला!*
*मोठा भाऊ कामाच्या वैतागातून घरी पोहोचलाच होता, की घरच्यांनी त्याच्या कानावर बातमी घातली. त्याचं डोकं बिथरलं. 'पोरांचं काहीतरी भांडण झालं होतं’ कळल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आपल्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि हातातली पिशवी टाकून स्वतः पोराला शोधायला निघाला. घरातली सगळी मंडळी कामाला लागली.*
*सात-आठ वर्षाचा पोरगा कुठे गेला असावा कोणाला कळेना. अंधार पडायला लागला तसा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. पोरगा सापडला नाही, तर घरच्यांना काय तोंड द्यायचं? तेवढ्यात एकजण म्हणाला की गावाच्या बाहेर त्याला हायवेवर चालताना मी मगाशी बघितला! म्हणजे? हा मुलगा पायी गावाच्या दिशेने चालत गेला की काय? आणि जर रस्त्याने एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन बसला, एखाद्या अनोळखी गाडीत बसून गेला, तर काय करायचं? पोराला शोधायला हायवेवर चार गाड्या गेल्या. दूरपर्यंत जाऊन त्यांनी फोन केला, “मुलगा इकडे कुठे दिसत नाही.” वातावरण गंभीर झालं. शोधून बिचारे थकून गेले.*
*इकडे घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या एका देवळात एक आजोबा संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि बाकड्यावर बसले. बाकड्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून खाली वाकून बघतात तर काय? खाली पोरगा बसलेला! त्यांनी त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित विचारपूस केली, आणि विश्वासात घेऊन त्याला मोठ्या भावाच्या घरी घेऊन आले. त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र गंभीर शांततेत सरली.*
*सकाळी धाकट्याच्या मुलाची आंघोळ वगैरे झाल्यावर मोठ्या भावाने त्याला चारचाकी गाडीत टाकलं आणि शंभर दीडशे किलोमीटरवर असलेल्या थेट आपल्या गावी गाडी घेऊन आला. पोराला गाडीतून उतरवलं, त्याच्या बापाच्या स्वाधीन केलं आणि म्हणाला, “सांभाळ रे बाबा! शहरात इकडे मला माझा जीव जड झालाय, तिथे तुझ्या पोराचे नखरे झेलायला मला कुठे वेळ आहे? शिवाय कपाळावर एखाद्या वेळी कलंक लागला तर आयुष्यभर मिटायचा नाही!”*
*म्हणून ज्यांची बाजू पडती आहे, त्यांनी पोरांना ‘तिकडच्या घरी कसं रहावं, कसं वागावं, आणि दुसऱ्याच्या पोटात शिरून त्याला कसं जिंकावं’ हे शिकवून ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या घरी दुसऱ्यांची मुलं शिकायला आहेत त्यांनी, त्यांच्या मुलांनी, या मुलांना समजून घेऊन त्यांना मायेचा आधार दिला पाहिजे, म्हणजे ते शिकून पुढे गेलेलं मूल मरेपर्यंत उपकार विसरत नाही!*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.