Thursday, May 7, 2020

नाशिकच्या कवितेला पडलेलं एक सुंदर स्वप्न : कविवर्य किशोर पाठक

📌

नाशिकच्या कवितेला पडलेलं एक सुंदर स्वप्न : कविवर्य किशोर पाठक



        किशोर पाठक सरांचं देहावसान झालं. परंतु आपल्या शब्दांच्या सुगंधाच्या रूपाने ते अवघ्या महाराष्ट्रातल्या काव्यक्षेत्रात अविरत दरवळत राहतील, असं त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाकडे पाहिल्यावर सहज लक्षात येईल.
         *8 काव्यसंग्रह, 2 ललित लेखसंग्रह, 2 कादंबऱ्या,  4 नाटके, 5 एकांकिका, 2 बालनाट्य, 2 कथासंग्रह, 2 समीक्षा आणि तब्बल 12 बालकविता संग्रह!* किशोरदा म्हणजे शब्दांच्या गुंजारवात अखंड बुडालेला भ्रमर जणू! म्हणूनच सध्याच्या *इयत्ता 4 थी आणि दहावीच्या पाठयपुस्तकात* किशोर सरांच्या कवितांना मानाचं पान मिळालेलं आहे.
        किशोरदांच्या *पालव, आभाळाचा अनुस्वार, निरूपण, मी मृगजळ पेरीत, संभवा, काळा तुकतुकीत उजेड, बेचकीत जन्मतो जीव*, वगैरे संग्रहातील कविता पाहिल्या तर त्या वाचकाला जागेवर स्तब्ध करून सोडतात! संभवा हा तर फक्त *स्त्री जाणिवांचा धांडोळा* घेणारा संग्रह! एकेक शब्द आभाळाएव्हढा आशय सांगणारा!
        तात्यासाहेब अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या  सावलीत किशोर सरांची कविता प्रगल्भ होत राहिली. *नाशिकच्या सर्वच  सन्माननीय कवी लेखकांचे जिवलग मित्र* असलेल्या किशोरदांना अवघ्या महाराष्ट्र्रभर आणि बाहेरही गोतावळा मिळाला. त्यांची
 *हत्ती पळतो तुरुतुरु,*
 *हरीण चाले हळूहळू*
ही कविता प्रसिद्ध कवी *रवींद्र मालुंजकर* यांनी सर्वदूर पोहचवली, तर प्रसिद्ध कवी *भूषण कटककर* यांनी त्यांना सार्थपणे *कवितेचा दीपस्तंभ* म्हटले!
       कविवर्य किशोर पाठक यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडिया ही बाब जेव्हा अस्तित्वात नव्हती, मोबाईल फोन आला नव्हता, तेव्हापासून तर आताच्या *हायटेक* मोबाईल युगात, दोन्ही काळात त्यांनी स्वतःला व त्यांच्या कवितांना खूप अनायासे *मॅच* करून घेतलं! ते कायम फ्रंटला राहिले. कवितेशी एकनिष्ठ राहिले. आपल्यापैकी कितीजण ब्लॉग लिहितात माहीत नाही, परंतु kishorpathak.blogspot वर गेलात तर तुम्हाला तिथे त्यांच्या कवितांचा खजिना सापडेल! म्हणजे *ऑनलाईनचा आधुनिक टच* सुद्धा त्यांनी सहज स्वीकारला. अर्थात त्यामागे त्यांच्या हरहुन्नरी चिरंजीवांचा म्हणजेच *मित्र प्रथमेश* चा मोठा वाटा आहे, परंतु बदलत्या काळानुसार टिकून,टिकवून आणि स्वतःला समायोजित करून असणं ही खूप मोठी व अवघड गोष्ट त्यांना साध्य झाली हे तितकंच खरं.
      किशोरदांबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे, परंतु विस्तारभयास्तव आज त्यांच्या फक्त *बालकवितांचा खजिना* मी तुमच्यासमोर रिता करू इच्छीतो. त्यातील या निवडक ओळी तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे!

*पाळण्यात ठेवला चंद्र त्याला दोन झोके दिले*
*चंद्रावरचे सगळे ससे हवेत उडून गेले*
( वाह!)

*आभाळ खाली पडत नाही चंद्र कधी उडत नाही*
 *खोल खोल समुद्रात सूर्य कधी बुडत नाही*
(ग्रेटच!)

*पान कधी बोलत नाही झाड कधी चालत नाही*
*फुलपाखरांच्या डोळ्यामध्ये काजळ कुणी घालत नाही*
( मस्त ना?)

*आजोबा जेव्हा घरात असतात*
*टीव्ही टेप गप्प बसतात!!*
(आजोबांचा धाक!)

*तुम्ही रोज ऐटीत फिरा*
*आम्ही मात्र अभ्यास करा!*
(इति सध्याची डांबरट मुलं!)

*हसली चिंगी झाली मुंगी*
*खाल्ली साखर दिला ढेकर!*
(सोपे शब्द मोठा आशय!)

*पाहुणे आले पाहुणे आले*
*चार कुंड्या फोडून गेले*
( _हत!_)
*म्हणून जेव्हा पाहुणे येतात*
*स्वागत म्हणून गुच्छ देतात!*
( षटकार!)

*सावलीला दिला पांढरा रंग*
*काळा रुसून बसला ..*
 *सूर्य गालात हसला*
( उत्तुंग!)

*राक्षस बिक्षस नसतो मुळी दाखवू नका भिती*
*झोपावा मी म्हणून तुम्ही खोटे बोलाल किती ?*
( क्लीन बोल्ड!!😄)

*पहिला पाऊस आला आणि गंमत काय झाली?*
*ओल्या ओल्या मातीला अत्तरफुले आली*
( Wow! अत्तरफुले!! )

*कावळेदादा कावळेदादा एवढे काळे कसे?*
*आंघोळ केली नाही म्हणून झालात का हो असे?*
(निरागस!)

*आई, सुट्टीच्याच दिवशी पाहुणे का गं येतात?*
*दिवसभराचा कार्यक्रम आमचा खराब करतात!*
(पाहुणे जाणाऱ्यांनी खबरदार!)

*थोडे पास थोडे नापास*
*दोघांनाही केवढा त्रास!*
( पास'वाल्यांना जास्त!!😢)

*समुद्राला पिळलं तेव्हा नदी झाली उलटी*
*पळत पळत सरळ गेली परत डोंगरावरती!*
(उत्तुंग काव्यप्रतिभा!)

*पांगळासुद्धा पळेल फार पायाला द्या चाके चार*
*आंधळ्याला दिसेल आकाश डोळ्यात घाला थोडा प्रकाश!*
( गोड आशावाद)

*सचिन तुझं चॉकलेट खाऊ ?*
*आपण दोघं भाऊ भाऊ!*
(😄 लब्बाssssड!)

*एक यंत्र गात होते*
*त्याला ऐकू येत नव्हते!*
( निरागस सत्य!)

*कावळा होता गेला उडून*
*मासा होता गेला बुडून!*
( छोटा पॅक!)

*ताई चष्मा लावत नाही*
*मेकअप पुसून जातो बाई!!*
(तायांनो, ऐका!😄)

*थोडा पडशील,थोडा झडशील*
 *तेव्हा गड्या थोडा घडशील...!*
( ग्रेट, ग्रेट!)

*एक होते टिंब, त्याने खाल्ला लिंब*
*कडवट केले तोंड, झाला उघडाबंब!*
( टिंबाच्या कविता वाचायलाच हव्यात!)

*वाघाला चावली गोगलगाय*
*म्हणते कशी सोडीन की काय?*
( वाघाचं काही खरं नाही आता!😻)

*धड धड धडाड आभाळ रे*
 *कड कड कडाड विजाळ रे!*
( आला पाऊस!)

*अगडम बगडम आहे तगडम*
 *गुरुजी म्हणती नुसता दगडम्!*
( गुर्जी, कट्टी!)

*घरात घबाड,*
*घबाडात गाठोडं*
*गाठोड्यात चंची*
*चंचीत पुडी*
*पुडीत सुपारी*
*सुपारीला कातर कर कर कर!!!*
( यांचं गाणं नाही होणार तर काय होणार?)

आणि गाण्याबद्दलही सांगायला ते विसरत नाहीत. जगण्याचं एक नितळ सत्य खालील ओळींतून मांडताना कविवर्य किशोर पाठक म्हणतात,

*गाणे एक फुलांचे आणि गाणे एक मुलांचे*
 *जो जो हसतो आनंदाने गाणे असते त्याचे!!*
(क्या बात! सॅल्युट!👌)

*प्रिय किशोरदा,*
*तुम्ही कायम स्मरणात रहाल!*
🌹


✒️
rajshelkesir@gmail.com

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...