◾
**शंभर पानी आयुष्य*
_एक मुद्दा, एक विचार!_
_23 जुलै, बुधवार_
▪️
*शंभर पानी आयुष्य*
*माणसाचं आयुष्य म्हणजे शंभर पानी पुस्तक. जन्म म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ; मृत्यू म्हणजे मलपृष्ठ! वर्षागणिक एकेक पान उलटत जातं, आपण पुढे पुढे जात राहतो.*
*या पुस्तकाची गंमत म्हणजे या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही. म्हणजे मधले धडे काय काय असणार आहेत हे लेखकाला माहित आहेत; पण त्याने ते मुद्दाम पुस्तकात घातलेले नाहीत. म्हणून तर हे पुस्तक वाचण्यात मजा आहे. आपले आईवडील म्हणजे या पुस्तकाची सुंदर प्रस्तावना, आणि वडीलधाऱ्या माणसाचं प्रेम म्हणजे पुस्तकाला भरभरून मिळालेल्या शुभेच्छा.*
*या पुस्तकातल्या पानावरची एक ओळ म्हणजे आपला एक दिवस. या ओळीमधला एक शब्द म्हणजे आपल्या वाटेला आलेले प्रहर. आणि अक्षरं म्हणजे ओंजळीतला आत्ताचा एक क्षण! स्वल्पविराम (,) म्हणजे आपण जोडलेली माणसं, अर्धविराम (;) म्हणजे आपल्यावर वाईट प्रसंग येण्याआधी नियतीने दिलेला हलकासा इशारा, तर वाक्यांच्या शेवटी येणारा पूर्णविराम (.) म्हणजे विचार करण्यासाठी आपल्याला मिळालेला निवांत वेळ! ‘येणे, जाणे, खाणे, पिणे...’ अशी क्रियापदं म्हणजे आपलं रोजचं जगणं. ‘छान, भारी, मूर्ख…’ अशी विशेषणं म्हणजे वाट्याला येणारी स्तुती आणि टोमणे! तर, ‘हळूच, अचानक, इथे, तिकडे...’ यासारखी क्रियाविशेषणं म्हणजे आपली काम करण्याची पद्धत आणि आवाका. दोन शब्दांना, वाक्यांना जोडणारी ‘आणि, किंवा, म्हणून...’ यासारखी उभयान्वयी अव्ययं म्हणजे आपल्याला काम पुढे नेण्यासाठी मिळालेली संधी. या वाक्यातलं ‘एकेरी अवतरण चिन्ह’ ('...') म्हणजे आपल्याला वेळोवेळी झालेली सदबुद्धी. तर “दुहेरी अवतरण चिन्ह” ("... ") म्हणजे आपल्याला आलेला आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव, मिळालेला गुरूपदेश! या पुस्तकाची दुमडलेली पानं म्हणजे आपला निरागस विसरभोळेपणा. अर्धवट फाटलेली पानं म्हणजे कधी ना कधी आपला झालेला अपमान, आणि आपण शरमेने खाली घातलेली मान. प्रश्नचिन्ह (?) म्हणजे आपल्यासमोर उभ्या असलेल्या महाकाय अडचणी, तर उद्गारचिन्ह (!) म्हणजे निर्मात्याने आपल्या अवघड प्रश्नाची चुटकीसरशी केलेली सोडवणूक! यातले परिच्छेद म्हणजे आपल्या आयुष्यातली छोटी-मोठी वळणं. यातील धडे म्हणजे सुख-दुःखाची, यश-अपयशाची चलाखीने केलेली सरमिसळ. त्याखालील प्रश्न म्हणजे आपली सद्सद्विवेकबुद्धी जी तटस्थपणे आपल्याला विचारते की तू या यशातून काय शिकलास? या अपयशाने तुला काय शिकवलं? हा आनंद कशाचा? हे दुःख कशामुळे?*
*पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच्या शेवटच्या ओळीनंतर दिलेला पूर्णविराम म्हणजे परमेश्वराने आपल्याला सांगणं की बाळा, आता तुझं काम संपलं; पुस्तक जमा कर. आणखी बऱ्याच जणांना हे पुस्तक द्यायचं बाकी आहे!*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc
No comments:
Post a Comment