◾
*नवी वाट!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_06 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*नवी वाट*
*प्रत्येक सकाळ ही एक अजब गोष्ट आहे. इतर काही होवो, ना होवो, सकाळ रोज होते. सूर्यदेव कोवळ्या सुवर्णकिरणांचा शिडकावा आपल्यावर करतात. त्यांच्याकडून दीड जीबी डेटा घेऊन आपण कामाला लागतो. दिवस त्याची दिनचर्या इमानेइतबारे पाळतो. आपण त्याच्यामागे गाड्याबरोबर नाळ्याची जत्रा साजरी करतो. काही तासांच्या फिराफिरीनंतर रात्र झाली की “डेटा संपला!” म्हणत आपण हळूच झोपेच्या कुशीत शिरतो; कारण उद्या उठायचं असतं! उद्या आपण असू की नाही माहित नाही; परंतु उद्या सकाळ होणार म्हणजे होणारच! उजाडणार म्हणजे उजाडणारच! तुम्ही म्हणाल, रात्र आहे म्हणजे उद्या दिवस उगवणारच की! त्यात काय एवढं?*
*मग सांगा, जितके आपण ‘आजच्या सरणाऱ्या काळ्या रात्रीबरोबर उद्याचा लख्ख दिवस उगवणारच आहे’ याबाबत शंभर टक्के ठाम असतो, तितकेच ‘आज वाट्याला आलेली वाईट परिस्थिती उद्या काहीही करून बदलणारच आहे’ याबाबतीत का नसतो?*
*रात्रभर दुःख उशाला घेऊन निजलेली अनेक माणसं सकाळ त्यांच्या स्वागताला आल्याबरोबर कालचं शिळं दुःख तिच्या तोंडावर फेकून मारतात. मग सकाळ तरी बिचारी त्यांच्यासाठी काय करू शकणार? उलटपक्षी, कालचा सगळा त्रास, अपमान, नुकसान, दुःख रात्रीच्या अंधाराला "समर्पयामि!" करून आशेचं, प्रयत्नांचं, यशाचं आणि आनंदाचं पसाभर दान तिला मनापासून मागितलं तर ती नाही म्हणणार नाही. तिला आपल्याकडून काय हवं असतं? थोडंसं स्मित, थोडीशी लढण्याची तयारी. बस. हे ज्यांना कळतं, त्यांच्या पदरात सकाळ भरभरून दान टाकते!*
*आणखी एक. कणा ताठ असणाऱ्यांची परिस्थिती बसून राहत नाही. कारण त्यांचा लढाऊ बाणा. ‘आज परिस्थिती कितीही हालाखीची असो, मी ती बदलवून दाखवीन, तोपर्यंत मी प्रयत्न थांबवणार नाही. आज जरी माझ्या पदरात अमावस्या पडलेली असली तरी पौर्णिमेचा चंद्र पदरात पाडून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही!' असा आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला असतो. दिवस बदलण्यासाठी आटोकाट संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाने तो स्वतःमध्ये भरून घ्यायला हवा. कारण गलितगात्र झालेल्या कालच्या देहाला लढण्यासाठी पुन्हा उभारी कोण देणार? तर तो आपल्या आत पेटलेला जाळ! मग अशा लढाऊ माणसासाठी सकाळ मोठी बहीण बनते, त्याच्या पाठीशी भक्कम उभी राहते. कालचं विसर म्हणते, अग्नीचा स्त्रोत असलेला आजचा नवा सूर्य त्याच्या हवाली करते. लढ म्हणते!*
*एक मात्र खरं आहे. हतबल झालेल्या कितीतरी जणांना कोणत्यातरी एका नवीन सकाळीच प्रकाशाची नवी वाट सापडली आहे. काय सांगावं? आजची सकाळ खास आपल्यासाठीच देवाने पाठवली असावी?*
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment