Wednesday, February 4, 2026

अंतिम ध्येय

*अंतिम ध्येय!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अंतिम ध्येय*

*एखाद्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर तो म्हणेल की मला अमुक एका गोष्टीत उत्तुंग यश प्राप्त करायचं आहे. शेकड्यातल्या जवळपास प्रत्येकाचं ‘गडगंज श्रीमंत होणं’ हे ध्येय आहे. पण हे खरं माणसाचं अंतिम ध्येय नसतंच मुळी. लोक लक्ष्यालाच ध्येय समजतात!*

 *ध्येयाच्या नावाखाली विद्यार्थ्याला शालांत परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवायचे आहेत. तरुणाला किमान २०-२५ लाखाचं पॅकेज असलेला जॉब मिळवायचा आहे. कुणाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे, कुणाला स्वत:चा बिझनेस सेट करायचा आहे. मनात स्वप्न पाहिलेली प्रॉपर्टी बनवायची आहे. वृद्धत्वाकडे झुकलेला असेल तर त्याला देवदर्शनाची आस आहे.*

 *मात्र या सगळ्या नद्या आहेत केवळ, अंतिम ध्येयाच्या समुद्राकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्या. त्या माणसाला खुणावत राहतात- ‘ये आमच्या प्रवाहात, आम्ही तुला तुझ्या खऱ्या ध्येयाचा पत्ता सांगतो; त्याचं घर दाखवतो.’ जुन्याजाणत्या लोकांमध्ये बसलं की कळतं की वरीलपैकी एकही नदी समुद्राला मिळताना निर्मळ राहत नाही. अपेक्षांचा आणि अपेक्षाभंगाचा, यश-अपयशाचा, दु:ख-वेदनेचा, लालसा आणि वासनेचा, विश्वासघाताचा, भ्रष्ट आचारविचारांचा, बिनडोक माणसांच्या अक्कलशून्य वागण्याचा इतका गाळ या नद्या वाहून आणतात की त्या जिथे पोहचू पाहतात, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर सगळी दलदल होऊन जाते. त्या दलदलीत पाय पडायचा अवकाश, की काळपुरुषाने एकाच झडपेत माणूस गिळलाच म्हणून समजा! जिथे नद्यांची ही अवस्था तिथे त्यांच्या पुराच्या पाण्यावर स्वार होऊ पाहणाऱ्या चिनपाट माणसाची काय कथा? कित्येक माणसांना तर या नद्याच अर्ध्यावर ‘या नाहीतर त्या’ काठाला भिरकावून देतात. माणसं तोंडघशी पडतात. तोंड सोलून निघतं. तरी पिंड जळाला तरी सुंभ तसाच राहतो. पुन्हा दुसरी नदी; पुन्हा दुसरी लहर. दिसलं पाणी की मार उडी! पुन्हा कोणी तळाशी, तर कुणी पल्याड भिरकावलेला! चाकाचा शोध लागल्यापासून हे अविरत सुरूच आहे; आणि अजून पुढची अनंत वर्षे थांबेल असं वाटत नाही.*
    
       *तुम्ही म्हणाल असा हा ध्येयाचा खरा समुद्र तरी कोणता आहे? या समुद्राचं नाव आहे, आनंदसागर!माणसाच्या आयुष्याचं खरं अंतिम ध्येय आहे आनंदी होणं! त्याची सगळी धडपड खरी त्याच्यासाठी आहे. पण त्याला हे समजत नाही की आपण मुळातच आनंदरूप होतो! पुन्हा त्याचा शोध घेण्याची गरज नव्हती! फक्त जगायची बात होती!! पण प्रत्येक वेळी नदीतल्या गाळामुळे गोष्ट बिघडते आणि आपल्या मूळ घरी म्हणजे आनंदाच्या डोही आपलं पोहचणं काही होत नाही!*

   *तूर्तास समुद्र जरी नाही मिळाला तरी आपल्यापुरता एखादा आनंदाचा छोटासा डोह आपल्या आसपासच कुठेतरी शोधायला काय हरकत आहे? उगाच तुकोबांनी म्हटलेलं नाही...*
*आनंदाचे डोही, आनंद तरंग*
*आनंद चि अंग आनंदाचे!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...