*घाबरू नकोस...*
अचकट विचकट चेहरा करून
संकट जेव्हा धावून येईल,
धास्तावलेला चेहरा तुझा
निस्तेज होईल, सुकून जाईल...
तारेवरची कसरत तुझ्या
जीवावरती बेतून जाईल
हातामधली आधारकाठी
अर्ध्यावरतीच तुटून जाईल...
रात्रंदिवस विचार करशील,
मन-मेंदू जड होईल...
मनगटाच्या बळालाही
अशक्ताची कड येईल...
सगळी ताकद लावशील,
तरीही हाती फक्त शून्य राहील
कुठे चुकलं कळणार नाही,
मस्तक एकदम सुन्न होईल...
अपमानाचे बोल सोसून
जिणे जेव्हा हराम होईल,
बेईमानीच्या हाताखाली
इमान तुझं गुलाम राहील...
परिस्थितीच्या रेट्यापुढे
डोळ्यात पाणी भरून येईल,
भांबावलेलं रानपाखरू
पाण्यासाठी झुरून जाईल...
लहानसहान गोष्टींमध्येही
अपयश तुला खेटून जाईल,
'सूड घेईन...' म्हणून जेव्हा
खवळेल मन, पेटून जाईल...
तेव्हा,
घाबरू नकोस,
शांत हो!
ती वेळही निघून जाईल...!!
अंधाराला दचकू नकोस,
काळ का हा असाच राहील?
आकाशातली वीज बन,
सूर्यही मग तुझाच होईल...!
पुन्हा नव्याने सुरुवात कर,
विसर गेलेला काळ...
पुन्हा पेटू दे काळजामधला
विझत चाललेला जाळ...
भेकडासारखं रडून कुठे
मोठं होता येतं का?
पंख आखडते घेऊन
आभाळ कवेत घेता येतं का?
विचारपूर्वक निर्णय घे,
मग मांड पटावर डाव
भविष्याच्या ताम्रपटावर
झळकव तुझेच नाव...!
कोणीतरी तुझ्या पाठीशी
भक्कम आहे, विश्वास ठेव
डोळे मिट, दिसेल तुला
तुझ्या देव्हाऱ्यातला देव...
एक कर पण...
एक कर पण, धीर धर
हास जरासा...बघ वर...
डोळ्यांमधल्या आसवांना जमण्याआधीच पुसून टाक,
परिस्थितीशी लढण्यासाठी
मर्दासारखा उभा ठाक!
*एवढं सगळं करतानाही*
*सांभाळून रहा...तोल जाईल!*
*घाबरू नकोस पण,शांत हो!!*
*अरे, ती वेळही निघून जाईल !!*
✒️
*प्रा. राजेश्वर (राज) शेळके, नाशिक*
*सुसंवाद:94235 42224*