Thursday, February 6, 2025

सामान्य माणसं!



सामान्य माणसं!

ग्रहण कोणतंही असो 
सुटणारच असतं आज ना उद्या...
दैन्य कुणाचंही असो,
फिटणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं
ऐरण झाल्यावर सोसवत नाही
हातोडा झाल्यावर मारवत नाही 
आणि आपल्याला मात्र हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार??.. 

अडून पडलेलं प्रत्येक काम 
होणारच असतं आज ना उद्या... 
कष्टाप्रमाणे फळसुद्धा
मिळणारच असतं आज ना उद्या...
पण आपण पडलो सामान्य माणसं 
वाट पाहणं जमत नाही 
जीव कामात रमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

कणभर असो की मनभर असो 
दुःख काय थांबणार असतं?
ते ही निघून जाणारच असतं आज ना उद्या...
जीवघेण्या वेदनेमधून, 
शरीर मुक्त होणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं 
दुःखाला झेलण्याची हिंमत नाही 
भेटल्या सुखाची किंमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

मनासारखंच घडणार असतं 
सगळं काही आज ना उद्या 
पदरात दानही पडणार असतं 
हवं तसंच आज ना उद्या
दारी तोरण सजणार असतं
अंगण गाणी म्हणणार असतं
पण आपण पडलो सामान्य माणसं 
मन ताब्यात राहत नाही 
स्वतःला आरशात पाहत नाही 
आणि तरीही आपल्याला हवं असतं 
सगळं काही मनासारखं !!

काय करणार!?
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Wednesday, January 29, 2025

ये 'इ-पब्लिक' है!

एक मुद्दा, एक विचार!
बुधवार - 29 जानेवारी 2025

▪️
*ये 'इ-पब्लिक' है!*

  _*शोले चित्रपटातील गब्बर सिंगच्या तोंडचं एक वाक्य फार गाजलं होतं, "कितने आदमी थे?" आज जर गब्बर सिंग पुन्हा परतून आला आणि पुन्हा गावात माणसं पाठवली तर तो प्रश्न विचारेल, "कितने मोबाईल थे?" आणि कालिया सांगेल, "सरदार, आदमी चार, मोबाईल आठ!"*_ 

    _*आज परिस्थिती अशी आहे की काही माणसं अक्षरशः मोबाईलवेडी झाली आहेत. काय तर म्हणे सोशल मीडियावर चमकायचं आहे. मंडळी इतकी नादावलीयत की पहाटेच उठून पहिली पोस्ट टाकण्यापासून रात्री लेटनाईटची पोस्ट टाकेपर्यंत सर्व पुण्यकर्म यांनाच करावं लागतं. त्यांच्या जेवणाच्या ताटात मोबाईल ठेवण्यासाठी एक खाचा बनवून घेण्याची वेळ आलेली आहे, कारण मोबाईलशिवाय यांना जेवण जाईनासं झालं आहे. मोबाईलने या लोकांवर काय काळी जादू केली आहे कोण जाणे! कधीकाळी रात्र झाली की भूताखेतांचा सुळसुळाट असे. हडळ, खवीस ही नावं ऐकली तरी घाम फुटे. भीतीने अंगावर शहारे येत. रात्री बेरात्री उठायला लोक घाबरत. मुलं गप झोपत. मोबाईल आल्यापासून गुडूप अंधारात तोंडावर स्पॉटलाईट पाडून रात्रभर हीच भूतं जागी असल्याने ओरीजनल भूतांचा धंदा बंद पडला आहे. मुळात मोबाईल हीच एक जादू आहे. ज्याला इंग्रजीमधलं 'क म्हणता ढ' कळत नाही, त्यालाही मोबाईलच्या स्क्रीनवरचं सगळं इंग्लिश समजतंय म्हणजे काय? जादूच नाही का? लिहिण्या वाचण्याचा जमाना केव्हाच गेला! आता फक्त ‘बघण्याचा’ जमाना आला आहे. आणि बघण्याला ना भाषेचा अडथळा, ना देशाचा, प्रायव्हसीच्या नावाखाली कंटेंटचाही! त्याच्या बदल्यात यांना मिळतं काय, तर डोळ्यांना त्रास, ओव्हरथिंकिंगचा फास, इमोशनल स्ट्रेस आणि अशाच अनेक गोष्टी. काहीतरी, कुठेतरी चुकतंय खरं. पण विचार कोण करणार?*_    

   _*तथाकथित मोठ्यांचं एवढं कर्तृत्व असेल तर लहानग्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? लहान मुलं ते शिकत नाहीत जे मोठी लोकं त्यांना शिकवतात. मुलं ते शिकतात, जे मोठी माणसं करतात! मोठ्यांचं पाहून लहान-लहान मुलंही मोबाईलसाठी आकांडतांडव करीत आहेत. पोरासोरांचं सोडा, आत्ता कुठे डोळे उघडू लागलेलं तान्हं बाळही मोबाईल पाहून हसू-रडू लागलं आहे. त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला तर पप्पांना लाथा मारू लागलं आहे! भलतंच अवघड झालं आहे हे प्रकरण. लहान वयात मुलांना चष्मे लागताहेत. ज्यांचे दुधाचे दातही अजून पडले नाहीत त्यांना चष्मे लागावेत? तोंडी फटाफट उत्तरं देणाऱ्या मुलांना चार शब्द शुद्ध लिहिता येऊ नयेत? काहीतरी, कुठेतरी चुकतंय मंडळी.*_

  _*मोबाईलचा केवळ गरजेपुरता वापर करणाऱ्या आणि उरलेला अधिकाधिक वेळ मोबाईल जाणीवपूर्वक बाजूला ठेऊन जिवंत माणसांसोबत घालवणाऱ्या समंजस लोकांना दंडवत घालावासा वाटतो, तो यामुळेच!*_

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Sunday, January 26, 2025

तिरंगा

हिमशिखरांच्या माथ्यावरती डौलाने फडकतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!

स्वातंत्र्याचे प्रतीक, आमच्या अभिमानाची भाषा
एकजुटीचे निशाण आमच्या जगण्याची अभिलाषा
भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

देशाच्या रक्षणास आहे तत्पर सदा तिरंगा
शत्रूच्या गोळीला देई उत्तर सदा तिरंगा
शूरवीरांच्या खांद्यावरती तेजाने तळपतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

जात धर्म पंथाहून आहे प्रत्येकाला प्यारा
भारत माता की जय म्हणता, अंगा येई शहारा
पुढारलेल्या देशांच्या पंक्तीत आता बैसतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

नव्या पिढीच्या स्वप्नांमागे भक्कम उभा तिरंगा
रोज नव्या क्षितिजांना गाठत असतो नवा तिरंगा
चिल्यापिल्यांच्या छातीवरही पहा कसा शोभतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
जयहिंद.

Wednesday, January 22, 2025

चालण्याची गोष्ट!


*चालण्याची गोष्ट!*

 *आपली वडीलधारी मंडळी नेहमीच पुढच्या पिढीला सल्ला देत आली आहे, "स्वतःच्या पायावर उभे रहा!" पण उभं राहून करायचं काय? हे काही या मंडळींनी सांगितलं नाही. मग माणसं मोठी बेरकी. त्यांनी स्वतःहूनच पुढे "...आणि अखंड चालत रहा!" हे वचन जोडून घेतलं आणि आजन्म चालत राहिली!*

     *कधीकाळी माणूस खाली मान घालुन गपगुमान चालायचा. मग त्याने वेगात चालण्यासाठी सायकल आणली. सायकलवर मन भागलं नाही, म्हणून अजून वेगात जाण्यासाठी मोटरसायकल आणली. मग फोर व्हिलर आणली. मग पोट सुटायला लागल्यावर पुन्हा रिव्हर्स प्रवास सुरू केला! आता शहरात माणसं सकाळी संध्याकाळी चालायला तर जातातच, शिवाय रिक्षाच्या पाठीवर 'वजन वाढवा /कमी करा नाहीतर पैसे परत मिळवा' अशा जाहिरातीही डकवतात! शिवाय चार पाच हजाराचे प्रोटीन्सचे डबे विकून पैसेही कमवतात!!*

    *माणसाला खायला लागतंच किती? दोन हातांची ओंजळ करा. तिच्याकडे पहा. या ओंजळीत जेवढं अन्न मावेल तेवढीच आपली एक वेळची अन्नाची गरज. बरं, आपण खातो किती? करा विचार! आधी पोटाला दोन घास मिळावेत म्हणून माणसं पायपीट करायची, आता गरज नसताना दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्लेले दोन घास जिरावेत म्हणून पायांचं पीठ पाडतात! काखुटीला संसार बांधून माणसं गावोगाव, मैलोन्मैल चालायची, आता जॉगिंग ट्रॅकला खड्डे पडेपर्यंत चकरा मारतात! अगोदर चालण्याच्या भरात आपण किती अंतर कापलं याचं माणसांना भान नसायचं. आता पेडोमीटर लावून 'आपण दहा हजारांपैकी किती पावलं चाललो?' ते चेक करतात, आणि स्वतःच सेलिब्रेट करतात!* 

  *'आपण चालायला गेलं पाहिजे' चा साक्षात्कार अगोदर घरातल्या एकाला म्हणजे नवरा किंवा बायकोला होतो. मग 'मीही जाते/ जातो' म्हणत संसाराचं दुसरं चाकही त्या गाड्याला सामील होतं. पण जे घरी तेच दारी. नवऱ्याची सुरू होते बडबड, बायकोला हवी असते शांतता. एकाचा स्पीड असतो जास्त तर दुसऱ्याचा कमी. नवरा म्हणतो 'तू जरा पटपट चल.' बायको म्हणते, 'तुम्ही जरा हळू चला, नाहीतर निघा पुढे.' हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. दोघेही आपापल्या परीने घामाघूम होऊन घरी येतात! ज्यांचे ट्युनिंग उत्तम जमते त्यांची वजनं कमी होतात, इतरांची तशीच राहतात!*

    *अनेक माणसं त्यांच्या अनेक तऱ्हा. मात्र या सर्वांमध्ये उठून दिसतात ते ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता नित्यनेमाने पहाटे किंवा आपल्या ठराविक वेळेला ग्राउंडवर, रस्त्याने किंवा ट्रॅकवर दिसणारे. हे बऱ्याचदा एकटेच असतात. वय इथे मॅटर करत नाही. चालणं हा त्यांच्या दररोजच्या आयुष्याचा भाग झालेला असतो. 'कॉन्स्टंट वॉकिंगमधल्या मेडिटेशन' चा अनुभव ते घेतात. आरोग्य तर राखलं जातंच; परंतु महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वतःशी अंतस्थ संवाद होतो, जो त्यांना चांगला माणूस बनवतो.*

  *तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे 'आपुलाची वाद आपल्यासी' चा अनुभव प्रत्येकाला घेता यायला हवा. स्वतःला तटस्थपणे चाचपून बघता यायला हवं. आत्मचिंतन व्हावं. आपल्या ध्येयपथावर आपण बरोबर चालतो आहोत की नाही? आपलं नेमकं कुठे चुकतंय? आपल्यामध्ये काही बदल करायचा असेल तर काय आणि कसा केला पाहिजे? व्हॉट नेक्स्ट? या सर्वांची झाडाझडती घेता यावी. या एकट्याने चालण्याच्या वेळेला ती घेता येते, आणि विशेष म्हणजे शोधणाऱ्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरंही सापडतात.*

 *बाय द वे, तुमचा स्वतःशी संवाद होण्यासाठी तुम्ही काय करता?*

-प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
_चलसंवाद : 9423542224_
 
https://www.youtube.com/c/ProfRajShelke

Wednesday, January 15, 2025

किमान बोला

*गोडगोड बोला!* 

    *आजकाल थोडं काही झालं की माणसं अबोला धरतात, दुरावतात. थांबलेलं बोलणं सुरू करायलाही 'मी का बोलू? त्याला गरज असेल तर बोलेल अगोदर!' असं हटून बसतात. या न बोलण्यापायी आजवर कितीतरी नाती गुदमरून गेली आहेत. माणसाला बोलताच आलं नसतं तर? माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक राहिला असता?*

     *काही माणसं छान बोलतात. त्यांच्या बोलण्याला रसवंती असते. त्यांच्या बोलण्याने माणसं जोडली जातात. अशी माणसं बोलू लागली, की ऐकणाऱ्याला ऐकतच राहावंसं वाटतं. काही माणसं नको तितकं बोलतात. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! त्यांच्या बोलण्यात ज्ञानाच्या गोष्टी कमी आणि निरर्थक गुऱ्हाळच जास्त. एकीकडे बसून ऐकायचं आणि दुसरीकडे जाऊन ते उगाळत बसायचं असा यांचा शिरस्ता असतो. त्यांच्या व्यर्थ बडबडीतून काही साध्य तर होत नाही, परंतु लोकांना त्यांच्या बडबडीचा कंटाळा मात्र नक्की येतो. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन तावातावाने भांडणारी माणसं पाहिलीत का कधी? ही माणसं एरवी लपवून ठेवलेल्या त्यांच्या अगाध शाब्दिक ज्ञानाची भांडताना मुक्त उधळणच करीत असतात!*

     *असं म्हणतात की माणसाला 'बोलणं' शिकायला जन्मल्यापासून एक वर्ष लागतं आणि 'गप्प बसणं' शिकायला बाकीचं सगळं आयुष्य कमी पडतं. तसं बघितलं तर माणूस बोलायला शिकला हजारो वर्षांपूर्वी; पण अद्यापही त्याला कुठे? किती? कसं बोलावं? किंवा बोलूच नये याचं म्हणावं तसं तारतम्य आलेलं नाही. कायम मूग गिळून बसलेली, बोलायचं असतानाही मुद्दाम बोलण्याचं टाळणारी, बोलायला हवं तेव्हा गप्प बसणारी आणि गप्प बसावं तिथे मध्येच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करणारी, फक्त टोमणे मारण्यापुरतंच बोलणारी, बोलण्यात कायम अहंकाराचा उग्र दर्प असलेली अशी तऱ्हेतऱ्हेची माणसं पाहिली की वडीलधाऱ्यांनी 'मौनम् सर्वार्थ साधनम्' का म्हटलं असावं याची प्रचिती येते. याउलट चारचौघात चार शब्दही धड बोलू न शकणारी माणसं पोटात उगाच हजारो शब्दांचं कोठार घेऊन फिरत असतील की काय अशी शंका येते. 'बोललो असतो पण जाऊ दे आता!' असं म्हणत कायम संशयाचं धुकं निर्माण करणारी माणसं काही कमी नव्हेत! याच्या उलट इतरांच्या लेखी अबोल असणारी माणसं त्यांच्या पठडीतला कुणी भेटला की अशी काही खुलतात की ज्याचं नाव ते!*

   *खरं तर इतरांच्या जखमांवर शब्दांची हळुवार फुंकर घालून त्यांना धीर देणाऱ्या, जगण्याचा आशावाद देणाऱ्या माणसांनी हे जग जिवंत ठेवलं आहे. थोडं सांगून आणि थोडं ऐकून माणसांमधली दरी सांधण्याची सुबुद्धी ज्या क्षणी माणसात येते तेव्हा त्याचं बोलणं किंवा शांत राहणंही एक सोहळा होऊन जातो. त्याच्या अंतर्मनातून शब्द उमटतात,*

_*बोललो नाही तरी संवाद झाला*_
_*राहिले सांगायचे काहीच नाही!*_

- प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
सुसंवाद - 9423542224

Wednesday, January 8, 2025

धरसोडपुराण



धरसोडपुराण!

नवीन वर्ष लागल्यापासून बऱ्याच जणांनी काहीबाही सोडण्याचा धडाका लावला आहे. कोणी म्हणे नवीन वर्षापासून चहा सोडलाय. कोणी बिडीपुडी सोडली आहे. कुणी सिगारेटला रामराम केलाय. कुणी बायकोमैत्रीणप्रेयसीच्या धाकाप्रेमाशब्दापोटी दारू सोडली आहे. कुणी काय सोडलं आहे तर कुणी काय. सोप्पंय. मी स्वतः आतापर्यंत शंभर वेळा चहा सोडलाय. पण चहाने मला कुठे सोडलंय? जेव्हा चहा मला सोडेल तेव्हा खरं! आता हा लेख लिहिताना मी चहाचा एक झुरका घेतला आहे ही बात अलहिदा!
  काहीतरी सोडण्याची, त्यागण्याची तयारी दाखवणं म्हणजे आपल्यातल्या चांगल्या माणसाचं जागृत होणं असतं. कुठल्यातरी मुहूर्तावर आपल्यातला हा चांगला माणूस जागा होतो, ही चांगली गोष्ट आहे. पण हा चांगला माणूस काही दिवसांतच पुन्हा का ढेपाळतो काही कळत नाही! म्हणून चहा सोडलेला इसम काही दिवसांनी पुन्हा चहा पिताना दिसला तर त्याला नावं ठेवू नका. फक्त स्माईल करा!
   खरोखरच जर एखाद्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर तो तिचा जाहीर प्रचार करत बसत नाही. लोकांना ते आपोआप कळतं. मुळात एखाद्या गोष्टीचा अगदी त्रास व्हावा इतकं अति करण्याची गरज काय?  अजाणतेपणाने, इतरांच्या दबावाला किंवा तात्कालीक मोहाला बळी पडून नको ते शुक्लकाष्ठ आपण पाठीमागे लावून घेतलेलं असतं, त्याच्यापासून दूर होण्याची सुबुद्धी अशा एखाद्या समुहूर्तावर व्हावी यापेक्षा दुसरा सुवर्णयोग तो कोणता! माणसाला कोणीतरी सदगृहस्थ, सखा, मार्गदर्शक ऐन कोलमडण्याच्या क्षणाला भेटतो, कान टोचतो, चुकणारं पाऊल सावरतो! मग माणूस म्हणतो, या या मुहूर्तापासून मी ही गोष्ट सोडणार! शहाणा, समजदार असेल तर पुन्हा चुकीच्या मार्गाला जात नाही. अशा वेळी या सोडण्यालाही अर्थ प्राप्त होतो. ज्यांना हे जमणे नाही त्यांच्या पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो भरणार थोडाच आहे?
   काही गोष्टींना सोडायलाच हवं असंही काही नसतं. त्यांना आपल्या आयुष्यात आनंदाची चिमूटभर समांतर जागा देऊनही आयुष्य सुखकरपणे पुढे नेता येऊ शकतं. परंतु हा समतोल फार कमी लोकांना साधता येतो.
   जे स्वतःहून विचारपूर्वक स्वीकारलं आहे, कष्टाने कमावलं आहे, जीवापाड जपलं आहे, ज्याच्यासाठी आयुष्याची काही वर्ष खर्च केली आहेत, अशा गोष्टीवरही कधीकधी जड अंत:करणाने पाणी सोडावं लागतं. अशा गोष्टी सोडताना माणसाचा नवा जन्म होत असतो. वरवर पाहता या गोष्टी सोडल्यासारख्या वाटतात, परंतु त्या सुटत नाहीत. आजन्म माणसाची सोबत करत राहतात. त्याच्या मनात राहतात.
   या धरण्यासोडण्याच्या घाईत ज्यांना गमवायला नको होतं अशी माणसं आपल्याकडून चुकूनही दुखावली, दुरावली जाऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी. कारण अशी माणसं आपल्याला दुखावत नाहीत, परंतु आपल्या आयुष्यातून इतक्या बेमालुमपणे निघून जातात, की ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नंतर केवळ पश्चाताप उरतो. आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,
बाद में प्यार के चाहे भेजो हजारो सलाम...
वो, फिर नहीं आते!
-
प्रा. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
भ्रमणसंवाद - 9423542224

Thursday, January 2, 2025

नवीन वर्ष

नवं वर्ष. पहिला दिवस. पहिला लेख. 
मशागत करायला घेतलीय. स्वतःच्याच मनाची.
यानिमित्ताने मला स्वतःची झाडाझडती घ्यायला मिळणार आहे. तुम्ही सर्वजण सोबत आहातच.
तुमच्या प्रतिक्रियेने बळ मिळणार आहे.
- राज 

नवी उभारी

 नव्या वर्षाचा पहिला दिवस. पहिली सकाळ. पहिली किरणं. मागच्या वर्षात जे काही भलंबुरं घडलं असेल ते सगळं पुसून टाकून आलेला ताज्या दमाचा नवा दिवस. कोलमडायला झालं असेल तर जिद्दीने पुन्हा उभं राहण्याचा धीर देणारा दिवस. ज्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो त्याला शरण जाऊन नव्या वर्षातल्या सुखासाठी आशीर्वाद मागण्यासाठीचा मंगलमय दिवस. 

जगी सर्वसुखी असा कोण आहे? कुणीच नाही. जगात ज्याला दुःखच नाही असा कोण आहे? कुणीच नाही. इतरांच्या मानाने कणभर असलेल्या आपल्या दुःखाला बाजूला सारून आपल्याकडे येऊ पाहणाऱ्या मनभर सुखाला दोन्ही बाहू उभारून आनंदाने आमंत्रण देण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. 

काही माणसं सरत्या वर्षात सोडून गेली. वाईट झालं. परंतु ती जिथे कुठे असतील तिथून मला पाहत असतील तर त्यांना माझ्या वागण्याचा, कर्तृत्वाचा आनंद होईल असं जगून दाखवीन अशी निष्ठापूर्वक शपथ घेण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. वेळ प्रत्येकावर येते तशीच ती प्रत्येकाचीही येते. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्यासाठीची सजगता आपल्यात यावी म्हणून सूर्यनारायणाकडे दोन्ही हातांची ओंजळ करून दान मागण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. 

 गेल्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील; काही निर्णय चुकले असतील, असूदेत. झालेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारून, नियतीने दिलेल्या शिक्षेचा स्वीकार करून, पुन्हा आपल्यामधलं माणूसपण सिद्ध करण्यासाठी निर्मात्याने आपल्या पदरात टाकलेलं सुंदरसं दान म्हणजे हे नवीन वर्ष. 

नव्या कोऱ्या पत्त्यांच्या कॅटमधून काढलेले पत्ते मनसोक्त पिसावेत आणि समोर बसलेल्या सवंगड्यांना दिलखुलासपणे वाटावेत तसं निर्मात्याने त्याच्याकडे असलेल्या अनंत दिवसांच्या कॅट मधून तीनशे पासष्ट पानं आपल्यासमोर फेकली आहेत. त्यातलं पहिलं पान म्हणजेच एक जानेवारी. आपल्या वाट्याला कोणतं पान आलं आहे हे पाहून अति आनंदीही व्हायचं नाही किंवा नाराजही व्हायचं नाही, कारण पानं बदलत राहणार आहेत! न जाणो कसा अचानक हुकमाचा एक्का आपल्या हाती येईल! तोपर्यंत आपण खेळात टिकून आहोत याचा आनंद आणि कृतज्ञभाव आपल्यासाठी महत्वाचा. कोसळूनही पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी 'बचेंगे तो और भी लडेंगे' ही वृत्ती महत्वाची.

  माणसांच्या कोलाहलात काही माणसं लक्षात राहतील. काहींवर लक्ष ठेवावं लागेल. काही आपल्याला लक्ष्य करतील त्यांचं लक्ष चुकवावं लागेल. मात्र आपल्या ध्येयावरचं आपलं लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. या सर्व गोष्टी मनावर गोंदवून घेत नव्या वर्षाला सामोरे जाऊया. आपल्या हसण्यामागील दुःख, रागावण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण न सांगता समजून घेणाऱ्या माणसांना जपूया आणि येत्या वर्षात यशाचा, आनंदाचा, आणि आरोग्याचा नवा अध्याय लिहूया. 
-
प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
भ्रमणसंवाद - 9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...