कविता, गझल, अनुभव, व्यक्तिविशेष, व्याख्याने, सुसंवाद, भाषानुवाद, इंग्लिश ट्रान्सलेशन आणि बरंच काही! Inspiring minds through words, wisdom, and stories.
Wednesday, January 29, 2025
ये 'इ-पब्लिक' है!
Sunday, January 26, 2025
तिरंगा
हिमशिखरांच्या माथ्यावरती डौलाने फडकतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!
स्वातंत्र्याचे प्रतीक, आमच्या अभिमानाची भाषा
एकजुटीचे निशाण आमच्या जगण्याची अभिलाषा
भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
देशाच्या रक्षणास आहे तत्पर सदा तिरंगा
शत्रूच्या गोळीला देई उत्तर सदा तिरंगा
शूरवीरांच्या खांद्यावरती तेजाने तळपतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
जात धर्म पंथाहून आहे प्रत्येकाला प्यारा
भारत माता की जय म्हणता, अंगा येई शहारा
पुढारलेल्या देशांच्या पंक्तीत आता बैसतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
नव्या पिढीच्या स्वप्नांमागे भक्कम उभा तिरंगा
रोज नव्या क्षितिजांना गाठत असतो नवा तिरंगा
चिल्यापिल्यांच्या छातीवरही पहा कसा शोभतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!!
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
जयहिंद.
Wednesday, January 22, 2025
चालण्याची गोष्ट!
Wednesday, January 15, 2025
किमान बोला
Wednesday, January 8, 2025
धरसोडपुराण
◾
धरसोडपुराण!
नवीन वर्ष लागल्यापासून बऱ्याच जणांनी काहीबाही सोडण्याचा धडाका लावला आहे. कोणी म्हणे नवीन वर्षापासून चहा सोडलाय. कोणी बिडीपुडी सोडली आहे. कुणी सिगारेटला रामराम केलाय. कुणी बायकोमैत्रीणप्रेयसीच्या धाकाप्रेमाशब्दापोटी दारू सोडली आहे. कुणी काय सोडलं आहे तर कुणी काय. सोप्पंय. मी स्वतः आतापर्यंत शंभर वेळा चहा सोडलाय. पण चहाने मला कुठे सोडलंय? जेव्हा चहा मला सोडेल तेव्हा खरं! आता हा लेख लिहिताना मी चहाचा एक झुरका घेतला आहे ही बात अलहिदा!
काहीतरी सोडण्याची, त्यागण्याची तयारी दाखवणं म्हणजे आपल्यातल्या चांगल्या माणसाचं जागृत होणं असतं. कुठल्यातरी मुहूर्तावर आपल्यातला हा चांगला माणूस जागा होतो, ही चांगली गोष्ट आहे. पण हा चांगला माणूस काही दिवसांतच पुन्हा का ढेपाळतो काही कळत नाही! म्हणून चहा सोडलेला इसम काही दिवसांनी पुन्हा चहा पिताना दिसला तर त्याला नावं ठेवू नका. फक्त स्माईल करा!
खरोखरच जर एखाद्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर तो तिचा जाहीर प्रचार करत बसत नाही. लोकांना ते आपोआप कळतं. मुळात एखाद्या गोष्टीचा अगदी त्रास व्हावा इतकं अति करण्याची गरज काय? अजाणतेपणाने, इतरांच्या दबावाला किंवा तात्कालीक मोहाला बळी पडून नको ते शुक्लकाष्ठ आपण पाठीमागे लावून घेतलेलं असतं, त्याच्यापासून दूर होण्याची सुबुद्धी अशा एखाद्या समुहूर्तावर व्हावी यापेक्षा दुसरा सुवर्णयोग तो कोणता! माणसाला कोणीतरी सदगृहस्थ, सखा, मार्गदर्शक ऐन कोलमडण्याच्या क्षणाला भेटतो, कान टोचतो, चुकणारं पाऊल सावरतो! मग माणूस म्हणतो, या या मुहूर्तापासून मी ही गोष्ट सोडणार! शहाणा, समजदार असेल तर पुन्हा चुकीच्या मार्गाला जात नाही. अशा वेळी या सोडण्यालाही अर्थ प्राप्त होतो. ज्यांना हे जमणे नाही त्यांच्या पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो भरणार थोडाच आहे?
काही गोष्टींना सोडायलाच हवं असंही काही नसतं. त्यांना आपल्या आयुष्यात आनंदाची चिमूटभर समांतर जागा देऊनही आयुष्य सुखकरपणे पुढे नेता येऊ शकतं. परंतु हा समतोल फार कमी लोकांना साधता येतो.
जे स्वतःहून विचारपूर्वक स्वीकारलं आहे, कष्टाने कमावलं आहे, जीवापाड जपलं आहे, ज्याच्यासाठी आयुष्याची काही वर्ष खर्च केली आहेत, अशा गोष्टीवरही कधीकधी जड अंत:करणाने पाणी सोडावं लागतं. अशा गोष्टी सोडताना माणसाचा नवा जन्म होत असतो. वरवर पाहता या गोष्टी सोडल्यासारख्या वाटतात, परंतु त्या सुटत नाहीत. आजन्म माणसाची सोबत करत राहतात. त्याच्या मनात राहतात.
या धरण्यासोडण्याच्या घाईत ज्यांना गमवायला नको होतं अशी माणसं आपल्याकडून चुकूनही दुखावली, दुरावली जाऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी. कारण अशी माणसं आपल्याला दुखावत नाहीत, परंतु आपल्या आयुष्यातून इतक्या बेमालुमपणे निघून जातात, की ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नंतर केवळ पश्चाताप उरतो. आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,
बाद में प्यार के चाहे भेजो हजारो सलाम...
वो, फिर नहीं आते!
-
प्रा. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
भ्रमणसंवाद - 9423542224
Thursday, January 2, 2025
नवीन वर्ष
Thursday, September 5, 2024
खरा शिक्षक कोण?
शिक्षक दिन
खरा शिक्षक कोण?
या अवघड प्रश्नाचे उत्तर अगोदरच देऊन टाकतो!
- शाळा सोडून गेल्यानंतरही आयुष्यभर जो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील, तो खरा शिक्षक. 'आमचे सर!' किंवा 'आमच्या मॅडम!' असे म्हटल्याबरोबर ज्यांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ते खरे शिक्षक!
5 सप्टेंबर शिक्षक दिन...सर्वांना शुभेच्छा!!
शिक्षक दिनाचा आज सकाळी सुरू झालेला धमाका ( वन डे पॅक!) रात्री 12 वाजेपर्यंत चालेल बहुधा!
या गदारोळात एक छोटी वाचनीय पोस्ट आली. त्यात मी काही माझं टाकलं, पोस्ट करावीशी वाटली, म्हणून हा उपद्व्याप.
कुणाला दुखावण्याचा, कुणाची बाजू घेण्याचा प्रयत्न नव्हे, पण फिरस्ती करत असताना या गोष्टी खरोखर दिसतात.
थोडं आत्मचिंतन!
जर तुम्ही थोडे सुद्धा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्ही ही पूर्ण पोस्ट नक्की वाचाल. वाचल्यानंतर तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी इच्छुक आहेच. 🙏
◾
भाग 01.
नुसत्या आप्पाचाच नाही, आजच्या शिक्षणाचा विषय पण हा र्डे !
आजचं शिक्षण, शिकवा, पण खबरदार मुलांना काही बोलाल तर! इथपासून मुलांना शाळेत पाठवा; पण ती सुरक्षित घरी येतीलच याबद्दल आम्ही ठामपणे सांगू शकणार नाही! या नाजूक वळणावर आलंय.
एखादी काही कुरकुर झाली की फक्त शिक्षक कसे चुकीचे होते? आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे? आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही! यावरच चर्चा रंगताहेत!
वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला आहे. लहान लहान पोरांचे शाळेबाहेरच्या भाई लोकांशी संबंध आहेत! एका शाळेत तर हा त्रास इतका आहे की मॅडमना शिकवूच देत नाहीत, त्यात हायपरऍक्टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडलेला आहे.
शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले आहे. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. जे अगोदर कुठे होते कुणास ठाऊक?
शिक्षण कायद्याच्या कचाट्यामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा; साधे रागावणे कठीण होऊन बसले आहे. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी? हा प्रश्न पडलाय. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात, म्हणतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात, की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला! आता तो शाळेत यायला नाही म्हणतोय!!
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले, तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे, त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोटच येते.
टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले, तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी... तू स्वतःहून बोलू नकोस. प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते. अशी कशी टीचर बोलत नाही पाहूच!
शिक्षक हे सुधारणांचे प्रवेशद्वार असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात. पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये, शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे; ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनही करणार नाहीत. पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो आहे आणि हे पालकांना स्वीकारावेच लागेल.
ज्या विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही, असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे, कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे! पण विद्यार्थ्यांची धारणा होते, की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. तसाच तो मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना, नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत.
आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येतच असतात. वर्गात नुसतं रागावलं तरी आजच्या इवल्याइवल्या मुलांचा अपमान होतो! त्यामुळे तेही आजकाल शिक्षकांनी बंद केले आहे, कारण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालकांकडून त्यांचा अपमान होण्याची शक्यता असते!
त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. आणि नंतर आई-वडील म्हणतात की याला अपमानच सहन होत नाही!
थोडे काही झाले, की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात, ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसाच शिक्षकांना प्रश्न विचारण्याचा सूर असतो. कारण शाळेने ही त्यांच्याकडून करकचून फीस वसूल केलेली असते! याचा उल्लेख घरी वारंवार होत असतो. या सर्व सु?!संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो, आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझे ममी 'पपा!
मुलांच्या प्रत्येक (चुकीच्यासुद्धा) निर्णयांमध्ये काही सो कॉल्ड ममी 'पपा सहभागी होतात. ते इतके involve होतात, की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास तेच स्वतः पूर्ण करतात. त्यामुळे काही मम्मी आणि पप्पांना चष्मेही लागले! परंतु यामुळे पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून रहावे असा चुकीचा धडा शिकतो आहे ही गोष्ट ते सोयीस्करपणे विसरतात. ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून त्यांना स्वतः काही करावे लागते हे शिकायलाच मिळाले नाही!
मानसशास्त्राचा नियम आहे. 'जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात' आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनात तरी शिक्षकांबद्दलचा आदर कसा राहील?
परंतु खमक्या शिक्षकांनी हे लक्षात ठेवावे की, Respect is always commanded not demanded!
◾
भाग 02
हा भाग फार महत्वाचा आहे.
काही भागांत विद्यार्थ्यांना शिकण्याची खूप उत्सुकता आहे परंतु शिक्षक स्वतःच कमी पडताहेत. म्हणून मुलं खऱ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
नवीन नवीन आयोग लागू झाल्यापासून, आणि शिक्षकांच्या बोकांडीवर नवीन नवीन योजनांचे भूत सरकारने बसवायला सुरुवात केल्यापासून, शिक्षकांमधलं 'गुरूतत्त्व' जरासं निस्तेज पडू लागलं आहे. काय स्वप्न घेऊन या क्षेत्रात आलो होतो आणि काय करावे लागत आहे, ही गोष्ट बऱ्याच शिक्षकांच्या मनाला बोचते आहे. आम्हाला फक्त शिकवू द्या हो! अशी ओरड अधून मधून ऐकायला येते. पण यावर गांभीर्याने विचार करायला सरकारलाही वेळ नाही, उठ सूट आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांनाही, आणि पालकांनाही!
दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांनी दणक्यात इनिंग खेळायला सुरुवात केलेली आहे. कधीकाळी वैचारिक चर्चा करणारे शिक्षक आता आणखी प्रगल्भ विचार करू लागले आहेत! भिशी किती तारखेची आहे? काय झालं मग त्या प्लॉटचं? मी फक्त दोन टक्क्यांनी देतो. माझा रो हाऊस घेता का? 'टाटा मोटर्स' मध्ये टाका तुम्ही! कालच अडीच लाख रुपये भरले क्लाससाठी! आपण माझ्या फोर व्हीलर मध्ये जाऊ! खूप बोर झालंय या मीटिंगमुळं. आज बसुया का? या अनएक्स्पेक्टेड डायलॉग्सची भर वाढली आहे!
माझ्या छोट्याशा कारकिर्दीत मला आढळलेले शिक्षकांचे सहा प्रकार पुढील प्रमाणे. आपण शिक्षक असाल तर यात कुठे बसता ते शोधा.
1. नवीन शिक्षक!
नवं रक्त असतं, उत्साह फार, पण नॉलेज कमी, सगळं कॉपी पेस्ट! घे गाईड,सांग समजून. मार रट्टा. शिवाय जुण्यांची कामं ऐका. शिंगरू ओझ्यानेच मरण्याची शक्यता जास्त. शिकवणं बोंबललं.
2. Model शिक्षक!
इतकं नटतील की त्याला माप नाही, सर मॅडम एक समान. मुली सरांवर फिदा, मुलं मॅडम वर फिदा!!
मग मुलांनी शिकायचं की मेकप बघायचा? की फ्लर्ट करायचं?
3. हास्य शिक्षक!
इतकं हासवतील की शिकवण्याचं राहूनच जाईल. मुलं डोक्यावर घेतील पण मुख्याध्यापक? आणि इतर शिक्षक? त्यांच्या नजरेतून उतरतील. कारण, परीक्षा डोक्यावर आली तरी पोर्शन अपूर्णच. त्याचं काय?
4. कठोर शिक्षक!
असं म्हटलं जातं की यांच्यामुळे शाळेची शिस्त टिकून आहे. पण, दिसला पोरगा की काढ ठोकून! ही मानसिकता. त्याची साधी चौकशी नाही, की समजून घेणं नाही. चुकीला माफी तर नाहीच. मग 'मारकुट्या' नाव नाही पडलं तर काय कमावलं?
5. अनुभवी शिक्षक!
पोक्त म्हणूया. बाकीच्यांचे वय तेवढी तर यांची कारकीर्द. मुलं सोडा, त्यांच्या बापांनाही यांनी शिकवलेलं! तसं ते बोलूनही दाखवतात. पण एक प्रकारची कामात शिथिलता. आपले काय? थोडे राहिले, ही मानसिकता. नवं तंत्रज्ञान शिकण्यातला पराकोटीचा आळस. फेक तिकडं! ही भूमिका. करत नाही म्हणून सांग त्याला! ही गुर्मी. मग कसं जुळवून घेणार नव्या पिढीशी? यांना मुलांची घेणं देणं नाही, मग मुलांनाही यांच्याशी घेणं देणं नसतं!
शिक्षकाने या पाचही गोष्टींचा गुलाम न होता त्यातील जमेच्या बाजू आपल्यात सामावून घेतल्या पाहिजेत. कामांचा बोजा तर काही कमी होईल असं वाटत नाही, (पण होवो तो). पण त्याच्या आडून
कर्तव्यापासून दूर राहणे नको.
बाकी काही असो. शिक्षणाचा महामेरू आजही सहाव्या प्रकारातल्या 'धडपडया शिक्षकांनी' पेलून धरलेला आहे. मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या, स्वतःचं आयुष्य उधळून देणाऱ्या, खिशाला चाप पडला तरी मागे न हटणाऱ्या आणि माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या शिक्षकांमुळेच शिक्षणक्षेत्राच्या कपाळावरचा पावित्र्याचा मंगल तिलक शोभून आहे. आणि जोपर्यंत ही धडपडी मंडळी शिक्षण क्षेत्रात येत राहतील तोपर्यंत शिक्षण हाच प्रत्येकाचा तिसरा डोळा राहील!
शेवटी इतकंच,
मुलं ते नाहीत शिकत जे शिक्षक शिकवतात,
मुलं ते शिकतात, जे शिक्षक वागतात!
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
- श्री. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक.
#rajshelke
9423542224.
वास्तांगुणाहूंया!
🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ▪️ *वास्तांगुणाहूंय...
-
◾ *फोनपुराण!* _एक मुद्दा, एक विचार!_ _24 डिसेंबर, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ ▪️ *फोनपुराण!* अर्थात...
-
◾ *मोडला ‘आहे’ कणा?* _एक मुद्दा, एक विचार!_ *१५ जुलै २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक. ▪️ *मोडला ‘आहे’...
-
◾ *अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर* _एक मुद्दा, एक विचार!_ _21 जानेवारी 2026, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ना...