Wednesday, June 25, 2025

सारथी

*सारथी*
_एक मुद्दा, एक विचार!_
_25 जून, बुधवार_

▪️ *सारथी*

*चारधाम यात्रा करून छत्तीसगडच्या मार्गे मंडळी महाराष्ट्रात येणार होती. गाडीचा ड्रायव्हर चुणचुणीत हुशार पोरगा होता. थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली, आणि ड्रायव्हरने सांगितलं की आपल्याला इथे मुक्काम करायला पाहिजे आणि सकाळी प्रवास केला पाहिजे, कारण पुढे घनदाट जंगलामधून रस्ता जातो. हा रस्ता चांगला नाही. गाडीमधले प्रवासी खास करून स्त्रिया अतिहुशार होत्या. त्यांनी गुगलवर चेक करून सांगितलं की थोडंसंच जंगल आहे. आपण ते क्रॉस करून नंतर जे शहर लागणार आहे तिथे मुक्काम करू.*

 *ड्रायव्हरचा नाईलाज झाला. नको नको म्हणत असताना त्यांनी त्याला गाडी पुढे घ्यायला लावलीच. गाडी थोडीशीच झाडांमधून पुढे गेली असेल नसेल, तेवढ्यात एक व्हॅन मागून वेगात येताना ड्रायव्हरला आरशात दिसली. त्याच्या लगेच लक्षात आलं. त्याने जोरात गाडी दामटली, परंतु लुटारू त्याच्यापेक्षा तरबेज आणि फास्ट होते. त्यांनी गाडी थेट आडवी लावली. काही कळायच्या आत ड्रायव्हरला खेचून बाहेर काढला. त्याच्या डोक्यावर बंदूक लावली. इतरांना सांगितले ज्याच्याकडे जे आहे ते सर्व काढून येथे ठेवा नाहीतर ड्रायव्हरचा जीव जाईल. आतले गर्भश्रीमंत अतिप्रतिष्ठित लोक थरथर कापू लागले. दहा मिनिटात गाडीच्या बोनेटवर नोटांचा ढीग लागला. त्यांनी सोनं काढून द्यायला सांगितलं. जीवापेक्षा सोनं जास्त प्रिय नव्हतंच. शिवाय ड्रायव्हरला काही झालं असतं, तर इतरांची पुढे त्यांनी काय अवस्था केली असती हे कल्पनेबाहेर होतं. चुपचाप सगळं सोनं बोनेटवर ठेवलं गेलं. चांगलं पंधरा-वीस तोळे होतं. पण जीवापेक्षा मोठं नव्हतं.*

*सगळ्यांचा सुपडा साफ झाल्यावर त्यांनी ड्रायव्हरला मोकळं सोडलं. एवढ्या अवस्थेतसुद्धा बिचारा ड्रायव्हर हात जोडत म्हणाला, "साब, बस डिझेल डालने जितना पैसा दे दो, हमे अभी एक हजार मील जाना है. दुसरा पैसा नही है हमारे पास." त्यांनी यांच्याच पैशामधली एक गड्डी त्याच्या तोंडावर फेकून मारली. बाकी सगळा ऐवज कपड्यात गुंडाळून दोन मिनिटात व्हॅन अंधारात गुडूप झाली. सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक पडले. ब्र शब्द बोलण्याची कुणाची हिंमत होईना. ड्रायव्हरने गुपचूप गाडी काढली. घरापर्यंत येईपर्यंत कोणी एक शब्दही कोणाशी बोललं नाही.*

 *घरी आल्यावर सगळे ड्रायव्हरच्या गळ्यात पडून रडायला लागले. सगळ्यांना सुरक्षित घरी आणलं म्हणून त्याचा मोठा सत्कार केला!*

*चारधामच्या चार यात्रा अगोदरच करून आलेल्या अनुभवी ड्रायव्हरचं अगोदरच ऐकलं असतं, तर एवढा अनर्थ घडला असता का? पण तोंड मोकळं असलेली वाचाळ माणसं स्वतःबरोबरच इतरांनाही अडचणीत आणतात ती अशी. ज्या यात्रेला लोक जातात, त्या देवाने तरी यांना थोडी सद्बुद्धी द्यावी म्हणजे प्रवास सुखाचा होईल.*

*आणखी एक. ड्रायव्हरला कधीही कमी लेखू नये. तो ड्रायव्हिंगच्या क्षेत्रातला राजा असतो. त्याला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. रस्त्यात मुद्दाम गाडी थांबवून त्याचा चहा पाणी त्याला विचारलं पाहिजे. तोंडावर पाणी मारू दिलं पाहिजे. त्याने जेवण केलं की नाही याची विचारपूस केली पाहिजे. शक्य असेल तर आपल्या सोबतच त्याच्याही जेवणाची व्यवस्था केली पाहिजे.*

 *आणि हो! आपल्याला सुरक्षित घेऊन जाणाऱ्या आणि पुन्हा सुरक्षित आपल्या घरी घेऊन येणाऱ्या या अतिमहत्त्वाच्या देवतुल्य माणसाला ड्रायव्हर म्हणून हिणवण्यापेक्षा सारथी म्हटलं तर?*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, June 18, 2025

शिक्षण की शहाणपण

*शिक्षण की शहाणपण?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_18 जून, बुधवार_

▪️
*शिक्षण की शहाणपण?*

*“पप्पा, कितवीपर्यंत शिकल्यावर आपण शहाणे होतो?” “तसं काही नाही!” “म्हणजे?” “म्हणजे शिक्षणाचा शहाणपणाशी काही संबंध नाही.” “हो का?  मग आजपासून शाळा बंद!” “जास्त शहाणपणा करू नकोस, आवर.” “अहो,  तुम्हीच म्हणालात ना शिक्षणाचा शहाणपणाशी संबंध नाही. मग शाळेत जाऊन उपयोग काय?” “अरे वेड्या शाळाच आपल्याला शहाणपणाकडे जाणारा रस्ता दाखवते.” “म्हणजे जे कोणी शाळेत गेले नाहीत ते शहाणे नाहीत का?” “आहेत ना! का नाहीत?” “पप्पा तुम्ही स्वतःच गोंधळलेले आहात असं नाही का वाटत तुम्हाला?” “आता तू मला शहाणपणा शिकवणार का?”*

*“अहो मलाच तर माहित नाही म्हणून तुम्हाला विचारतोय ना? पण तुम्ही किती गोल गोल फिरवताय? सरळ सांगा ना. जर अडाणी लोकही शहाणे आहेत, तर शाळेत जाऊन उपयोग काय? आणि शाळेत गेल्याने शहाणपण येते, तर अडाणी माणसं शहाणी कशी??”*

   *“हे बघ, शहाणपण म्हणजे विचार करून पाऊल उचलण्याची अक्कल. कुठे, कधी, किती, कोणासमोर, कसं बोलावं आणि कसं वागावं याची समज म्हणजे शहाणपण. दुःखाचा, संकटाचा, वाईट वेळेचा अंदाज घेण्याचं, आणि त्यांचा धीराने सामना करण्याचं कौशल्य म्हणजे शहाणपण. वाद होऊ न देता, समोरच्या माणसाचं मन न दुखावता, आपलं म्हणणं त्याला पटवून देता येण्याची हुशारी म्हणजे शहाणपण. शहाणपण अनुभवाने येतं, आणि चांगलावाईट अनुभव प्रत्येकाला येतो. शाळेत जाणाऱ्यालाही, आणि शाळेत न जाणाऱ्यालाही! म्हणून अडाणी माणसंही शहाणी असू शकतात. शाळेत गेले नाहीत म्हणून ते मूर्ख असं नाही. त्यांच्या आयुष्यात आलेल्या परिस्थितीने, वेळेने, माणसांनी, बऱ्यावाईट अनुभवांनी त्यांना शहाणं बनवलेलं असतं."*

*“आणि शिक्षण?” “आपल्यामध्ये जन्मापासूनच असलेल्या, पण आपल्यालाच माहीत नसलेल्या शक्तींची आपल्याला ओळख करून देतं ते शिक्षण. शिक्षण आपल्याला लिहायला, वाचायला, आकडेमोड करायला शिकवतं. जगातल्या स्पर्धेत आत्मविश्वासानं उभं रहायला, आपलं म्हणणं ठामपणे मांडायला शिकवतं.  शहाणं बनवतं. त्यासाठीच तर असते शाळा, आणि आपले पूजनीय शिक्षक. माळावरच्या ओबडधोबड दगडाचं देवाच्या सुंदर मूर्तीत रूपांतर करावं तसं आपल्या खडबडीत आयुष्याला शिक्षण सुंदर आकार देतं. गरीबाला श्रीमंत बनवतं. शिक्षण ही अशी ढाल आहे, की ती आयुष्यभर आपलं रक्षण करते.*
*“मग शाळेतलं शिक्षण आणि अनुभवातून आलेलं शिक्षण यात फरक काय?” “फरक इतकाच की शाळेत शिक्षक आधी शिकवतात, मग परीक्षा घेतात. अनुभव आधी जीवघेणी परीक्षा घेतो, आणि मग कानाखाली झापड मारून शिकवतो! अनुभवांनी शिकवलेली शाळा म्हणजे शहाणपण! कळलं?”*

*“हो पण मग महत्त्वाचं काय? शिक्षण की शहाणपण?” “शिकून येणारं शहाणपण! पण तू आज असं का विचारतोयस?" “ अहो, काल तुम्ही म्हणत नव्हते का, की तुमच्या कोणत्यातरी मित्राने तुम्हाला फसवलं म्हणून? मग आजी मला म्हणत होती की तुझा बाप इतका शिकला पण त्याला अजून शहाणपण आलं नाही!”*
*“निघ रे तू शाळेत! आला मोठा उंटावरचा शहाणा!!”*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, June 11, 2025

ज्ञान आणि प्रभुत्व

*ज्ञान अन् प्रभुत्व*
_एक मुद्दा, एक विचार!_
_11 जून, बुधवार_

▪️
*ज्ञान अन् प्रभुत्व*

*एकदा एका राजाला सहज फेरफटका मारताना लक्षात आलं की त्याचा एक सेवक दरबारात येणाऱ्या लोकांची आस्थेने विचारपूस करतो. राजाला वाटलं, याला अधिकारपदावर बसवलं तर हा प्रजेचीही अशीच काळजी घेईल, म्हणून राजाने त्याला नगराचा प्रमुख अधिकारी करून टाकलं. अधिकारी होताच त्याने पहिलं काम काय करावं? कधीकाळी त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या जुन्या सेवकावर लक्ष ठेवायला सांगितलं. आणि त्याची चूक झाली हे कळताच त्याला कामावरून काढून टाकलं! सगळे लोक अवाक् झाले.*

*दरबारातल्या एका नवख्या गड्याने घरी गेल्यावर आपल्या वयस्कर वडिलांना विचारलं, "हा सुद्धा अगोदर सेवकच होता ना? मग आपल्याच एका सहकाऱ्याला ही वागणूक? माणूस अचानक एवढा रंग कसा बदलू शकतो?" वडील म्हणाले, "त्यात काय एवढं? धन, सत्ता, अहंकार, आणि प्रभुत्व या चार गोष्टी अशा आहेत की एखाद्याकडे यापैकी एक जरी गोष्ट आली, तरी त्याच्या वागण्यात लगेच बदल होतो. आणि जर कधीही न मिळालेली एखादी गोष्ट अचानक मिळाली, त्यातल्या त्यात लायकीपेक्षा अधिक मिळाली, तर मग विचारायलाच नको. काही करून ती आपल्या हातून सुटू नये अशी त्याची धडपड असते. माणूस इतरांना जितका घाबरत नाही, तितका तो आपल्याच क्षेत्रात पारंगत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना घाबरतो. त्यांचा एकदा पत्ता कट झाला की मग तो बिनघोर असतो. म्हणून अशांना काढून टाकणे किंवा त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणे, त्यांच्या संदर्भात वरिष्ठांचे कान भरणे, त्यांच्या चुकांवर लक्ष ठेवून जाणीवपूर्वक त्या सर्वांसमोर आणणे, आणि त्यांचे खच्चीकरण करणे या गोष्टी अशी माणसं करतात, म्हणजे त्यांचा रस्ता मोकळा!"*

*मुलगा म्हणाला, "धन, सत्ता आणि अहंकारामुळे माणसाच्या वागण्यात झालेला बदल समजू शकतो, परंतु प्रभुत्व म्हणजे एखाद्या गोष्टीचं इतरांपेक्षा थोडं अधिक ज्ञानच ना? मग ज्ञानामुळे माणसाच्या वागण्यात बदल का होईल?" वडील म्हणाले, "इथेच तर खरी मेख आहे. 'मलाच सगळं येतं आणि इतरांना येत नाही' या भावनेतून माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा, मोठा, आणि ज्यांना ती गोष्ट येत नाही त्यांना तुच्छ समजू लागतो. इथे तो चुकतो. हा त्याच्यातील हावरट माणसाचा तात्पुरता विजय; परंतु त्याच्यातल्या चांगल्या माणसाचा दीर्घकालीन पराभव असतो."*

 *मुलाने विचारलं, "मग एखाद्या गोष्टीत प्रभुत्व मिळवून उपयोग काय?" वडील म्हणाले, "अधिक ज्ञान असणं वाईट नाही, तर त्या ज्ञानामुळे इतरांना तुच्छ लेखण्याची, त्यांचे खच्चीकरण करण्याची कुबुद्धी होणं हे वाईट आहे! खरं तर इतरांचा बळी देऊन स्वतःची पोळी भाजणं आजपर्यंत कुणालाही पचलेलं नाही. त्याची परतफेड इथेच करावी लागते. शेवटी चांगलं मन असलेला माणूस आणि त्याच्यात शिल्लक असलेली माणुसकी याशिवाय माणसाच्या यशाला, ज्ञानाला, मिळकतीला आणि या जगाला तरी काय किंमत आहे? हो की नाही?" मुलाने विचारलं, "हो, पण मग राजाला या माणसाचं खरं रूप कळणार केव्हा?" वडील म्हणाले, "जेव्हा एके दिवशी त्याच्यामुळे खुद्द राजालाच मान खाली घालायची वेळ येईल ना, तेव्हा!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, June 4, 2025

शुभ मंगल सावधान

*शुभ मंगल सावधान !*
_एक मुद्दा, एक विचार!_
_4 जून, बुधवार_

▪️
*शुभ मंगल सावधान !*

 *"कशी दिली मेथीची जुडी?" "वीस रुपयांना." 'बघू?' म्हणत अलकाताई मेथीची जुडी बघू लागल्या. दोन जुड्या इकडे तिकडे केल्या तर मेथीवाली म्हणाली, "ताई, खूप जास्त निरखून पारखून बघू नका. काडी काडी पारखून घ्यायला तुम्हाला फक्त जुडी घ्यायची आहे, नवरदेव नाही!" अलकाताईंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं, "अहो, नवरदेव तरी कुठे इतका पारखून घेतात लोक हल्ली? आजकाल लोकांना नुसता भपका पाहिजे. आणि नवरदेवांचं काय घेऊन बसलात? दाढी वाढवली की झाला नवरदेव!"*

    *अलका ताईंचं म्हणणंही काही अगदीच चुकीचं नव्हतं म्हणा. साधी मेथीची जुडी घेताना चार वेळा निरखून पारखून बघणारी बरीच माणसं नेमकं मुलांसाठी स्थळं निवडतानाच कशी फसतात कळत नाही. त्याचं एक कारण म्हणजे आजकाल माणसं नवरदेव नाही; त्याचा पैसा आणि पोजिशन बघतात. मुलीचे गुण नाही, तिचा गोरा मुखडा बघतात. लग्नाचा थाटमाट असा करतात, की भावकीने तोंडात बोटं घातली पाहिजेत. सोयरा अशा उंचीचा शोधतात, की त्याच्याकडे बघताना भावकीच्या टोप्या खाली पडल्या पाहिजेत. लग्नाची पद्धत म्हणाल तर, प्री-वेडिंगच्या नावाखाली मंडळी अगोदरच एक छोटं लग्न उरकून घेतात. 'होऊ दे खर्च!’ अगदी लग्नाच्या दिवशीही दोन-दोन लग्नं करतात. हे कुठलं? म्हणे वैदिक पद्धतीने आणि ते? ते सर्वांसाठी नेहमीच्या पद्धतीने,  आणि ते आणखी? ते रिसेप्शन. म्हणजे लग्नासारखंच! मोजा एकूण लग्नं झाली किती? आणि इतक्या वेळा लग्न करूनपण मुलगी सुखात आहे का? तीच जाणे! श्रीमंत असणं वाईट नाही, पण कधीकधी कोटीच्या लख्ख बंगल्यातही आपुलकीचा कोरडा दुष्काळ असू शकतो; तर मध्यमवर्गीय घरीही खळखळ वाहणारा मायेचा, सुखाचा झरा असू शकतो. केवळ खोट्या दिखाऊपणाला भूलून जावई/सुनबाई निवडणारे कित्येक आई-वडील आणि ज्याचं लग्न झालं तेही आज पश्चाताप करताहेत. कारण त्यांची निवड चुकलीय. चुकीच्या माणसासोबत आयुष्य काढणं सोपी गोष्ट नाही. म्हणून, जावई किंवा सुनबाई शोधताना त्यांचं घराणं किती श्रीमंत आहे त्यापेक्षा तो किंवा ती ‘आपल्या कुटुंबात नव्याने येणारी व्यक्ती’ म्हणून किती लायक आहे, गुणी आहे हे खूप काळजीने बघितलं पाहिजे. संसार घरादाराने नाही, तर त्यात राहणाऱ्या आनंदी माणसांनी चांगला होतो. ज्यांना सुदैवाने असे चांगले, गुणी जावई आणि सुना मिळाल्या आहेत, त्यांनी केवळ तितक्यासाठीच परमेश्वराचे रोज आभार मानले पाहिजेत. ज्यांना दुर्दैवाने नाही मिळाले, त्यांनी 'वाद सुरू होण्याचा क्षण' हुशारीने टाळला पाहिजे. सतत कुरकुर करणाऱ्या नवऱ्यांना देवाने थोडी सदबुद्धी, उधार का होईना, पण दिली पाहिजे, आणि जे स्थळं शोधताहेत, त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी मेथीची जुडी आहेच की!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 28, 2025

सध्या सुरू आहे उन्साळा

*सध्या सुरू आहे उन्साळा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_28 मे, बुधवार_

▪️
*सध्या सुरू आहे उन्साळा*

*"भय्या, पप्पांना म्हण की चिखलाचे पाय धुऊन मग या घरात. आत्ताच फरशी पुसलीय. आणि त्या चपलापण धुवा म्हणा तिकडे दगडावर. सगळ्या चिखलाच्या ढपल्या लावून आणल्या असतील चपलांना खालून." "भय्या, मम्मीला सांग, मला कळतं म्हणा. आणि हे पण सांग, घरात बसणाऱ्यांना कळणार नाही बाहेर रस्त्यावर किती चिखल आहे ते!" "पप्पा, सोडा हो! हे तुमचं दररोजचंच आहे. मला सांगा पावसाळा सुरू व्हायच्या आधीच एवढा पाऊस का पडतोय? उन्हाळा सुरू आहे की पावसाळा?"*

 *"बाळा, सध्या सुरू आहे उन्साळा!" "उन्साळा? हे काय नवीनच?" "अरे, तसा उन्हाळा आहे पण असा पावसाळा सुरू आहे! याला अवकाळी पाऊस म्हणतात. "पण हा पाऊस असा पावसाळ्याच्या आधीच का पडतोय?" "अरे, उन्हाळ्यात जेव्हा खूप उष्णता वाढते ना, तेव्हा जमीन तापते, जमिनीलगतची हलकी गरम हवा वर जाते, वर गेली की जड आणि थंड होते. तिचा ढग बनतो. या ढगाला पाणीयुक्त हवेचा भार पेलवला नाही, आणि वरतून अजून एखादा थर त्यावर येऊन साचू लागला, की आपण जसे केस झटकतो ना, तसाच ढगसुद्धा त्याच्या डोक्यावरचे पाणी झटकतो, त्यालाच आपण पाऊस पडला म्हणतो!" "अच्छा, म्हणजे पाऊस ढगाच्या वरतून पडतो, खालून नाही?" "करेक्ट!” “पण त्याने पावसाळ्यात पडायचं ना!”*

 *“अरे जुन्या काळात बरोब्बर पावसाळ्यातच पडायचा तो. उन्हाळ्यात जमीन तापली तरी ती उष्णता शोषून घ्यायची. आता सगळीकडे लोकांनी काँक्रीट करून ठेवलंय. मग ती गरम हवा जमिनीत शोषलीच जात नाही. सरळ वर जाते. शिवाय अगोदर झाडं खूप असायची. वातावरणात ओलावा टिकून असायचा. तो जमिनीला गरम होऊ द्यायचा नाही. आता झाडंच नाहीयेत. होती ती झाडं तोडून लोकांनी उंच इमारती बांधण्याचा तडाखा लावलाय. घ्या म्हणा मग आता बक्षीस म्हणून उन्हाळ्यात पाऊस!" "पप्पा, कालचा पाऊस काय भयानक होता ना?"*

 *"भय्या, ते सगळं सोड. पप्पांना विचार एवढ्या पावसात बाहेर जायची गरज होती का? घरात गोड लागत नाही का?" "अगं, मी काही फिरायला नव्हतो गेलो." "मग?" "काल रात्रीच्या पावसात शेजारच्या वावरातल्या हरिभाऊंचं पत्र्याचं घर सगळंच कोसळलं. सगळा संसार उघड्यावर आला. रात्रभर अंधारात बसून होते बिचारे सगळे. सकाळी गावात लोकांना कळलं. म्हणून आम्ही सगळेजण तिथे गेलो. घर पुन्हा उभारलं. कुटुंबाला धीर दिला. थोडे पैसेपण दिले." "बाई गं! अहो, पण जाताना सांगून गेले असते तर, त्यांच्या कुटुंबासाठी भाकरी नसत्या का बांधून दिल्या?" "अगं, गाव त्यांना उपाशी मरू देणार आहे का? चल, मला जेवायला वाढ बरं!"*

 -

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 21, 2025

पुन्हा उरते रे आई


*पुन्हा उरते रे आई**
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 मे, बुधवार_

▪️
*पुन्हा उरते रे आई*

  *सकाळी सकाळी ड्युटीवर जाणाऱ्यांची धावपळ बघण्यासारखी असते. घरचे लवकर आवरत नसतात. यांना लवकर निघायचं असतं. बाथरूम कुणीतरी अडवलेलं असतं. बाहेर आणीबाणी लागलेली असते. बायको टिफिन बनवण्याच्या युद्धावर असते. ज्यांनी नेमकं उठून बसायला नाही पाहिजे, ती म्हातारी माणसं सकाळीच उठून बसलेली असतात. पोरगं मध्येच "पप्पा मला चौकापर्यंत स्कुलबससाठी ड्रॉप करता का?" म्हणत असतं. बाप वैतागलेला+ असतो. कसंबसं तयार होऊन त्याला पुढे वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं असतं. अशावेळी घाईघाईत आवरून बुटाची लेस बांधत असताना मध्येच कोपऱ्यात बसलेली आई म्हणते, "दोन घास खाऊन जा!"*

   *"अगं आई, माझी कोणती घाई चालू आहे आणि तुझं काय मध्येच? कितीवेळा सांगितलंय की घाईत असताना असं बोलत जाऊ नको म्हणून? दुपारी खाणारच आहे ना, टिफिन घेऊन चाललोय ना?" "बरं. आजच्यापुरतं खाऊन जा. नाट लागलेली चांगली नसते." “आधी कोण बोललं? आधी बोलतेस आणि मग म्हणतेस नाट लागते, अन्नाचा अपमान होतो, हे होतं, ते होतं म्हणून. आधी बोलायचंच नाही ना.”  “बरं उद्यापासून नाही बोलणार. घे दोन घास खाऊन.” सकाळी सकाळी चिडचिड नको, वादावादी नको म्हणून मुलगा गपगुमान दोन चार घास तोंडात कोंबतो, पाणी ओततो, आणि निघतो.*

 *कर्मधर्मसंयोग असा, की त्याला कामाच्या गर्दीत खरंच दिवसभर जेवायला सोडा, पाणी प्यायलाही उसंत मिळत नाही. सकाळी आईने बळजबरी खायला लावलेले दोन घास त्याला आठवतात. मनातल्या मनात म्हणतो, “बरं झालं दोन घास खाऊन निघालो होतो; नाहीतर आज उपाशीच मेलो असतो!”*

  *घराकडे परतताना त्याचं मन त्याला सांगतं, “अरे, आई सकाळी सकाळी नाट लावत नसते; तर तिच्या अनुभवावरून तिला माहित असतं, की हा एकदा घराबाहेर पडला, की याच्यामागे इतकी कामं असतात, की याला जेवायलाही वेळ मिळणार नाही. पोटात दोन घास असले की हा कामं करायला मोकळा.” दुसरं मन म्हणतं, “पण तिनेही माझी घाई समजून घ्यायला नको का?”*
   
*माणसं दोन्ही ठिकाणची योग्यच. दोघांचाही हेतू सारखाच आणि चांगलाच; परंतु एखाद्यामागची घाई मोठ्यांनी ओळखून घ्यावी, आणि मोठ्या माणसांची भावनाही तरुण पिढीने समजून घ्यावी. नेमकं तसं होत नाही. चिडचीड होते. तरी मुलाच्या माघारी आई म्हणते, “खाल्ले बाई पोराने दोन घास! आणि आईच्या माघारी मुलगा म्हणतो, “किती जीव लावशील आई!” असं हे नातं. कुण्या कवीने उगीचच म्हणून ठेवलेलं नाही,*

*तिचा डोक्यावर हात* 
*तुझी लाखाची कमाई*
*सारं आयुष्य सरून* 
*पुन्हा उरते रे आई!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 14, 2025

नावात काय आहे

*नावात काय आहे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 मे, बुधवार_

▪️
*नावात काय आहे*

   *एका मुलीला राहुल नाव खूप आवडायचं. तिला लग्नासाठी एक स्थळ आलं. घरात मुलाची चर्चा सुरू झाली. मुलगा इतका शिकलेला आहे वगैरे वगैरे... मुलीने एकच प्रश्न विचारला, "त्याचं नावं काय आहे?" वडील म्हणाले, "राहुल!" मग काय? पोरगी मनातल्या मनात नाचायला लागली. 'आज मैं उपर...' वाली फिलिंग तिला यायला लागली. शून्य मिनिटात तिने लग्न आपल्या बाजूने फिक्स करून टाकलं. घरचे म्हणाले, "अगं अगोदर बघ तरी त्याला." ती म्हणाली, बाकीचं तुम्ही बघा आता! माझं काम झालं!" अर्थात मुलगा चांगलाच होता. घरच्यांनी व्यवस्थित पाहून मगच लग्नाचा बार उडवला.*

 *सर्वकाही उरकल्यावर नव्या नवरीचा पहिलाच संवाद नावाने सुरू झाला. "अहो, तुम्हाला एक सांगू?" "हं", "मला राहुल हे नाव फार आवडतं!" "मलाही!" "म्हणजे?" "मलाही राहुल नाव फार आवडतं. म्हणून मी माझं नाव राहुल ठेवुन घेतलं आहे." "म्हणजे??" "माझं खरं नाव राहुल नाहीच आहे!" "मग?" "परसराम आहे!" पोरीचा पार कडेलोट झाला. पोरगी ढसाढसा रडली. अचानक "अच्छा सिला दिया तुने.." वाली फिलिंग यायला लागली. तिचा आक्षेप परसराम नावाला नव्हता; ‘राहुल का नाही?’ याला होता. नावांच्या प्रेमात माणसं पडतात ती अशी!*

     *तुम्ही म्हणाल, नावात काय आहे? पण नावातच तर सगळं काही आहे! आजकालच्या पिढीला जुनी नावं चालत नाहीत. बंटी, बबली, जॉली, डॉली, रिया, सिया, शाल्वली यांच्या काळात कौशल्या, धृपदा, शशिकला, शकुंतला, चंद्रकला, कमल, वेणू कशा चालाव्यात? आणि इवान, विहान, किहान, शुआन यांच्या काळात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, किंवा महादेव, मच्छिंदर, जालिंदर, मारोती, हनुमान, भगवान, शांताराम यांचा टिकाव कसा लागावा? म्हणून 'नावं ठेवताना जरा आधुनिक ठेवा, नाहीतर आम्ही गॅझेट करून बदलून घेऊ!' असं म्हणणारी पिढी आता आहे. त्यात आता सिद्धार्थ सिड झाला आहे, पंढरीनाथ पॅडी, समाधान सॅम, तर निखील निक झाला आहे. स्टायलिश मुलांची स्टायलिश नावं! याचा अतिरेक म्हणजे काहींनी मुलांची नावं अशी ठेवली आहेत, की त्यांचा अर्थ त्या मुलांना सोडा, त्यांच्या मम्मी-पप्पांनाही माहित नाही आणि आजी आजोबांना ती म्हणताही येत नाहीत! मग फक्त मॉडर्न वाटतं म्हणून, किंवा सिरीयल मध्ये, चित्रपटात गाजत आहे म्हणून ते नाव ठेवायचं हे कितपत शहाणपणाचं लक्षण आहे?*

     *प्रत्येक नावामागे काहीतरी अर्थ असतो. तो माहित असला पाहिजे. मुलांना सांगितला पाहिजे. नावाप्रमाणे वागता आलं पाहिजे, आणि तेही नाही जमलं, तर किमान आपल्या, आणि आपल्या आईवडिलांच्या नावाला जागता तरी आलंच पाहिजे! राहिला प्रश्न राहुलचा, तर ती जोडी आनंदात आहे!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...