Wednesday, April 1, 2026

ज्याच्या घरी गंगा...

*ज्याच्या घरी गंगा...*
_एक मुद्दा, एक विचार!_
*1 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*ज्याच्या घरी गंगा...*

*एक आई-पालक मुलाच्या शिकवणी वर्गातील सरांना भेटायला आल्या. त्यांचा मुलगा त्या सरांना खूप मानतो वगैरे त्यांनी त्या सरांना सांगितलं. सरांनी विनम्रपणे त्यांना नमस्कार केला.* 

*पुढे त्या बाई म्हणाल्या, “सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मुलाला प्लीज शिकवा की त्याने घरातल्यांचं काम ऐकलं पाहिजे. अजिबात ऐकत नाही. इकडची वस्तू तिकडे करायला नको. साधं ग्लासभर पाणी मागितलं प्यायला तर म्हणतो ‘उठून घे ना.’ मी म्हटलं- अरे वर्गात मी फक्त इतकं जरी म्हटलं की मला तहान लागलीय रे पोरांनो! की पुढच्या मिनिटाला सगळ्या वर्गाची माझ्यासमोर झुंबड उडते पाणी देण्यासाठी. प्रत्येकजण माझ्यासमोर पाण्याची बाटली धरतो आणि म्हणतो की बाई, माझ्या बॉटलमधलं पाणी प्या. आणि तू माझा मुलगा असून मला पाणी देत नाहीस...? तर म्हणतो- यात काय विशेष? मी पण स्कूलमध्ये आमच्या मॅडमना पाणी देतो! बघा आता!”* 

*सर इतकंच म्हणाले, “घरच्या गंगेचं महत्त्व नसतं मॅडम. ज्याच्या घरी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा!”*
 
     *मंडळी, गोष्ट फक्त त्या मुलापर्यंत थांबत नाही. समाजातही काही वेगळी परिस्थिती नाही. नशिबाने आपल्याला प्राप्त झालेल्या, आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांचं आपल्याला कौतुकच नसतं. आपण त्यांना हलक्यात घेतो. बऱ्याचदा तर त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जातं, आणि कधीकधी त्यांना मुद्दाम डावलून त्यांची खरोखर क्रूर चेष्टा केली जाते.*

 *घर असो, खेळ असो, कार्यालय असो, की संघटना; पळसाला पानं तीनच! सगळीकडे हीच परिस्थिती. पण लोकांना आपली किंमत नसली तरी ‘आपण कोण आहोत’ हे ज्यांना माहीत असतं, ती माणसं कधीही स्वतःची किंमत खाली पडू देत नाहीत. आपला आब राखून असतात. जिथे आपली किंमत नाही अशी जागा कितीही सुशोभित, चमचमीत आणि लोकांच्या लेखी उत्कृष्ट, चांगली असो, ही माणसं तिथे रमत नाहीत. अगदीच नाईलाजास्तव थांबावं लागलंच तर त्यांचं केवळ शरीर तिथे असतं, ती स्वतः नसतात. योग्य वेळी ती जागा रिक्त करतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं महत्त्व कळू लागतं. त्यांचं आपल्यातून जाणं वेदनादायी वाटू लागतं, पण उपयोग नसतो.*

 *म्हणून आपल्यासोबत असलेल्या अशा माणसांची कदर केली पाहिजे. वयाने, पदाने, शिक्षणाने, समजेने ती लहान असतील तरीही... कारण ही सगळी गंगेची रूपं आहेत. गंगा नेहमी हिमालयातूनच वाहते असं नाही… ती कधी आईच्या रूपात घरात असते, कधी मित्र-मैत्रिणीच्या रूपात आपल्याजवळ उभी असते, कधी वरिष्ठ बनून आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते, तर कधी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात आपल्याला आयुष्याचे धडे देत असते. पण आपणच तिचं पावित्र्य ओळखलं नाही, तिची कदर केली नाही, तर एक दिवस हीच गंगा आपल्या आयुष्यातून निघून जाते…आणि मग उरतो तो फक्त कोरडा काठ — आणि जिथे पाणी असताना आपण तहानलेलेच राहिलो होतो, याची खंत! म्हणून…*

*आपल्या आयुष्यातील ‘गंगा’ ओळखा, तिचा मान ठेवा, कारण घरची गंगा ओळखायला उशीर झाला, तर उरतात फक्त आठवणी… आणि डोळ्यात पाणी!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

पाडव्याचं कौतुक कशासाठी

*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*19 मार्च 2026, गुरूवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*

*आजकाल सणसुद्धा अंमळ धावपळीत असल्यासारखेच वागतात. आता गुढी पाडव्याचंच पहा ना. सकाळी धावतपळत आला, आणि हार-कड्याची गोडी वाढायला सुरू होण्याआधीच संपलादेखील!*

 *इतकी धावपळ आहे प्रत्येकामागे, इतकी कामं पडलीयेत प्रत्येकाला, की सण चवीने साजरा करायलाही वेळ नाही. स्टेट्सला फोटो मिळाला की झालं; नाहीतर एक पाडवा असायचा- गळ्यात हार-कडे घालून मिरवायचं आणि समोरच्याला म्हणायचं, “म्हण, गुढी पाडवा” आणि त्याने ‘गुढी पाडवा’ म्हटलं की आपण म्हणायचं, “नीट बोल गाढवाs!” आणि मग दोघांनीही हसायचं! काय निरागस काळ होता, नाही?*

  *आता खूप पुढे निघून आल्यावर जरासं समजू लागलं आहे, ‘गाढवा’त लायकी काढून का होईना, नीट बोलण्याची तंबी यामुळे दिली जात असायची कारण येत्या काळात माणसं नीट बोलणार नाहीत हे जुन्या लोकांना माहीत होतं!*

     *पाडव्याचं कौतुक कशासाठी? तर पाडवा, म्हणजे चैत्र नवी पालवी घेऊन येतो म्हणून! त्या आधीचा फाल्गुन म्हणजे कंटाळा, शक्तीहीनता... निसर्गाचा झोपी जाण्याचा काळ. पण माणसाला झोपून राहून कसं चालेल? म्हणून आली फाल्गुनातली महाशिवरात्र! हे सांगायला, की ‘झोपू नको, जागा आणि जागता रहा! तरीही आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन ढेपाळलेले आणि झोपाळलेलेच. म्हणून केला होळीचा भल्ला मोठ्ठा जाळ! लोकांना सांगितलं आता होळीत थंडी जळून गेली, आता घरात दडून बसू नका, स्वेटर फेका, बाहेर निघा. निघत नाही? कसा निघत नाही, खेचा याला बाहेर! म्हणत आली धुळवड आणि रंगपंचमी! रंग उधळा पण स्वतःमध्ये थोडी तरतरी शिल्लक ठेवा, कारण थोड्याच दिवसात नवी पालवी घेऊन वसंत येणार आहे! चैत्र उंबरठ्यावर उभाय! मग या सणांच्या बळावर निसर्ग आणि माणूस थोडी धुगधुगी कायम ठेवतो आणि अखेर दारावर येऊन उभा राहतो, नव्या वर्षाचा नवा शिलेदार गुढी पाडवा! नवं वर्ष, नवा हर्ष! नवी पालवी, नवी सळसळ, नवा उत्साह! निसर्गाला पुन्हा नवं हिरवेपण मिळू लागलं की माणूसही आतून हिरवा म्हणजे ताजा होऊ लागतो. नाविन्य म्हणजे काय? तर आनंद! मग आता हे सगळं इतकं सगळं नवीन म्हटल्यावर नव्याचा आनंद साजरा व्हायला पाहिजे की नको? म्हणून गुढी पाडवा महत्वाचा!*
 
    *सगळं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा स्वतःमध्ये नवी शक्ती, नवी उर्जा, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्नं भरण्यासाठी, नवी सुरुवात करण्यासाठी निसर्गाने पुढे केलेला विश्वासाचा हात म्हणजे गुढी पाडवा! सातत्याने येणारं अपयश, दु;ख, अपमान, अपघात, वियोग, मृत्यू म्हणजे जणू अमावस्या. चैत्रातली प्रतिपदा म्हणजे फाल्गुनातल्या अशा शेवटच्या अमावस्येनंतरचा पहिला नवा दिवस. ‘अमावस्या सरलीय, आता सगळं चांगलं होईल, मी नव्या उर्जेचा हात पुढे करतोय, तू फक्त लढायला तयार हो...’ म्हणणारा. अंग झटकून नवी उभारी देणारा... म्हणून पाडव्याचं कौतुक. कारण, या दिवशी निसर्ग आपल्याला म्हणत असतो,*

_*नवा सूर्य करतो तुझ्या मी हवाली, जगाला कळू दे नव्याने खुशाली!*_
_*दिशाभूल करतिल जरी लोक काही, तुझे स्वप्न राहो तुझ्या भोवताली!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, March 11, 2026

एक वाटी वरण

*एक वाटी वरण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*11 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*एक वाटी वरण!*

       *संध्याकाळी नवऱ्याला चहा देता  देता बायकोने नवऱ्याच्या वाढत्या पोटाकडे पाहिलं आणि खूप दिवसांपासून तिच्या मनात शिजत असलेला विषय शेवटी काढलाच… “अहो, ऐका ना!” “बोल.” “तुम्ही डायट वगैरे का करत नाही?” “म्हणजे??” “अहो, जरा तुमच्या पोटाचा घेर कुठे चाललाय त्याचा काही विचार? आणि ती शर्टची बटनं पहा, तुटतात की सुटतात अशी सारखी भीती वाटते मला.” अचानक झालेला अण्वस्त्र हल्ला सावधतेने परतून लावत नवरा म्हणाला, “आता तुझ्यासारखी चांगलंचुंगलं करून खाऊ घालणारी बायको म्हटल्यावर ढेरी वाढणारच ना?”*

 *पण बायकोने विषय पुढे रेटलाच, “हो! ते झालं तुमचं म्हणणं, पण ते बरं दिसतं का? इतर बायकांचे नवरे बघा कसे सडसडीत बांध्याचे आणि तुमच्या पोटाची चाललीय पृथ्वीगोलाबरोबर स्पर्धा! कुठे घेऊन जाणार आहात म्हणते मी एवढा सगळा डोलारा!?”*   

 *“अगं, वाढलेली ढेरी म्हणजे सुखी माणसाचं लक्षण असतं. आता त्या वाळकुट्या माणसांचे पोट वाढत नाही त्याला आम्ही काय करणार? ढेरीवरून हात फिरवण्याचं समाधान आणि आत्मानंद आहे का त्यांच्या नशिबात? जळतात मेले आमच्यासारख्यांवर!”*

 *“ते बाकी मला काही माहीत नाही. उद्यापासून तुम्ही डायटवर! समजलं? सकाळी चहा-बिहा काही मिळणार नाही. बीट-काकडी-गाजराचा ज्यूस देते तुम्हाला. जेवण जरा कमी करत जा, आणि फिरायला जात जा सकाळ-संध्याकाळ दहा-पंधरा हजार पावलं! पंधरा दिवसात ढेरी कमी झाली पाहिजे. मी माझ्या मैत्रिणीशी पैज लावलीय- नवऱ्याची ढेरी कमी करून दाखवते म्हणून!”*

*नवरा जागेवर उडालाच. “ऑं? अगं काय हे? बावळट झाली का तू?” “नाही! त्यातसुद्धा स्वार्थच आहे माझा. जर या निमित्ताने माझा नवरा हिरोसारखा दिसायला लागला, तर नको आहे का आपल्याला, म्हणजे मला??” “अगं माणूस कर्माने हिरो बनतो, दिसण्याने नाही! आता तू बारीक किडकिडीत आहेस म्हणून मीही तसंच व्हावं यात कोणतं आलं लॉजिक आणि शहाणपण?” “अहो, लग्नाच्या वेळेस होतात का तुम्ही असे? तेव्हा तर काडीसारखे होतात अगदी. आता झालात बटाटा घातलेल्या वड्यासारखे! लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसायला पाहिजे की नको..?” “जा मग! शोध दुसरा बारीक आणि किडकिडीत काडीसारखा नवरा..!” “दुसरा कशाला? मी माझा जो आहे त्यालाच बारीक करून दाखवणार!” “अगं पण अधूनमधून थोडं-थोडं खाल्ल्याशिवाय राहवत नाही मला. भूक लागते!” “ही भूकच मारायची आहे मला. सदानकदा खायला मागता. बरणीत हात घालून शेंगदाणे घेऊन पळता. हद्द झाली बाई या खाण्याची!”*

 *“ऐक ना, आपण आज मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत करूयात, ओके?  मी घेऊन येतो हवं तर अर्धा किलो.’’ बायकोने थेट सिक्सरच मारला, “ओ चिकनवाले..., आता हे जिभेचे चोचले किमान पंधरा दिवस बंद!” “म्हणजे??” “म्हंजे वाघाचे पंजे! आजपासून संध्याकाळी तुम्हाला फक्त एक वाटीभर वरण देणार आहे मी प्यायला!” “देवा देवा! मेलो!! अगं कोणी घातलं तुझ्या डोक्यात हे भूत?” “त्या दिवशी ते तुमचे कोण मित्र आले नव्हते का आपल्या घरी जेवायला? तेच सांगून गेले जाताना. म्हणाले, ताई तुमच्या मिस्टरांची ढेरी कमी करायची असेल तर यांना संध्याकाळी फक्त एक वाटीभर वरण देत जा!” “अस्सं का...! नवरा निश्चयाच्या सुरात म्हणाला, “आता येऊ दे पुढच्या वेळी त्यांना. नाही चहाऐवजी वाटीभर मुगाचं वरण प्यायला दिलं तर नाव नाही सांगणार!!”* 
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, March 5, 2026

अनुभवाच्या पलीकडले

*अनुभवाच्या पलीकडले !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अनुभवाच्या पलीकडले*

*निसर्गाने माणसाला अभिव्यक्त होण्याची क्षमता दिली आहे. हे त्याने त्याच्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.*

 *मिळणाऱ्या उण्यापुऱ्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या जगण्यात माणूस इतकं पाहतो, सोसतो, अनुभवतो की ते इतरांसमोर मांडल्याशिवाय त्याला राहवत नाही. बोलकी माणसं भडभड बोलून, रागावून, प्रसंगी दोन शिव्या देऊन, दोन कानाखाली देऊन-घेऊन का होईना, पण ‘मोकळी’ होतात. पण सगळीच माणसं बोलकी थोडीच असतात? काही अबोल असतात, काही अबोल राहतात. स्वतःसोबत स्वतःचा हिमनग घेऊन फिरतात. एखाद्या कलेचं बोट धरून स्वतःचं अव्यक्त सांगणं सांगत राहतात, आणि लोक असे, की त्याकडे मनोरंजन म्हणून पाहतात!*

 *खरं तर जगात कला आणि कलाकार आहेत म्हणून माणसे जिवंत आहेत. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर मारलेला एक फटकारा ‘त्याने का मारला होता’ हे तो हे जग सोडून जातो तरीही लोकांना समजत नाही. एखाद्या गायकाने अचानक घेतलेली ताण ही खरे तर अगोदर त्याच्याच काळजातल्या वेदनेचा ठाव घेते, पण लोक त्यांच्या परीने याचा अर्थ लावतात, आणि ‘वाहवा!’ म्हणतात! एखादी स्त्री प्रख्यात लेखिका असेल, तिच्या लिखाणाचे लाखो चाहते असतील; परंतु तिने प्रत्यक्षात काय भोगले होते हे कदाचित तिच्या लिखाणात कधीही येणार नाही; ती ते येऊ देणार नाही. आले तरी लोकांना ते कळणार नाही, कारण लोक फक्त तिने गोलगोल फिरवलेल्या शब्दांची जादू पाहतील, तिच्या त्यावेळच्या मनस्थितीचा कयास लावू शकणार नाहीत. एखादा कवी हजारो कविता लिहील; परंतु ज्या एका दुःखामुळे तो प्रचंड कोलमडून पडला होता, ते दुःख त्याच्या कवितेत कदाचित कधीही येणार नाही. कदाचित म्हणूनच कलाकाराची कला आपण कैकदा पाहतो; पण त्यामागचा माणूस आपल्याला क्वचितच दिसतो!*

*शहाणी, समजदार माणसं दुनियेला जे हवं आहे ते ते पुढे ठेवत जातात. जे दुनियेला नको आहे, परंतु आपल्याकडे भरपूर आहे, ते जाणीवपूर्वक आपल्याकडेच ठेवत जातात. ही सुद्धा एक कलाच आहे. या अर्थाने जर प्रत्येक माणसाला आणि विशेष करून दुनियेतल्या समस्त कलाकारांना उकलून पाहिलं, तर आपल्या डोळ्यांना झेपवणार नाहीत असे दुःखाचे असंख्य निद्रिस्त झरे आपल्याला दिसतील. परंतु आपण तरी त्याचं काय करणार? आपल्या अश्रुंचे आणखी दोन थेंब त्यात टाकल्यामुळे ते प्रवाहीत थोडेच होणार आहेत? त्यामुळे ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे राहू द्यावं. आताच्या या घडीला तो माणूस ‘जसा आहे तसा’ त्याला स्वीकारावं. त्याने स्वतःहून काही सांगितलं तर गुमान ऐकावं, त्याला रिक्त होऊ द्यावं; विसरून जावं. त्याला सल्ले देऊ नयेत. शांत झालेलं पाणी पुन्हा ढवळून गढूळ करू नये. अशा वेळी त्याला मनातल्या मनात फक्त इतकंच म्हणावं,*

*_कुठून तू आणलास संयम, शिकव मला_*
*_तुझ्यापुढे मी उजाड पत्थर, घडव मला!_*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, February 26, 2026

सोपस्कार


*सोपस्कार !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*25 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*सोपस्कार*

 *मंडळी, आठवतंय? लहानपणी सकाळी आपली अंघोळ झाल्यावर आई कौतुकाने आपल्याला तिच्यासमोर बसवायची. तिच्याकडे गंधाची एक बोटभर लांबट अशी डबी असायची. आपली इवलीशी हनुवटी तिच्या डाव्या हातांच्या काही बोटांच्या चिमटीत ती अलगद पकडायची, त्या डबीतला लालभडक किंवा चॉकलेटी गंध झाकणालाच असलेल्या लांबट काडीने आपल्या कपाळी रेखायची. आपण त्यावेळी साक्षात बाळकृष्ण, बाळराधा, बाळहनुमान, बाळराम वगैरे दिसायचो.*

    *गालांवरून अगदी मोरपीस फिरवावं तसे आई दोन्ही हात फिरवायची, नि आपण तिच्याकडे नुसतंच निरागस नजरेने बघत असायचो. तिचं आपल्याकडे बघून झालं की ती म्हणायची, “जा आता खेळायला! तिने असं म्हटलं, की जणू जग जिंकायला निघालेल्या वीराप्रमाणे शक्तिमान होऊन आपण खेळायला निघायचो! आठवतंय? किती सुंदर काळ होता तो!*
   *आता जेव्हा कळतं की आईच्या कपाळीचं कुंकू असो, की तिने आपल्या कपाळी लावलेला गंध किंवा टिळा असो, या गोष्टी लावण्यामागे आपल्या शरीरातलं सर्वात प्रभावी जे आज्ञाचक्र त्याचं रक्षण व्हावं हा निर्मळ हेतू होता, तेव्हा आपल्या महान संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटू लागतो. पण हळूहळू आपण संस्कृतीपेक्षाही महान झालो! आधुनिकतेच्या लाटेत स्त्रियांनी कुंकवाचा आकार छोटा-छोटा करत एके दिवशी कुंकवालाच तिलांजली दिली आणि थेट टिकलीवर आल्या! तशा बाथरूमच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या! टिकल्यांचेही इतके आकार-प्रकार झाले, की साडी कोणत्या रंगाची घातलीय त्यावर टिकली केवढी आणि कोणत्या रंगाची लावायची हे ठरू लागलं.*

 *इकडे बाप्या माणूस कोणत्या देवाला किंवा गुरुजींना फॉलो करतो त्याच्यावर त्याची गंध लावायची पद्धत ठरू लागली. माणसं आधीही गंध लावायचीच, पण एकसारखा. आता ‘गंध एक बोटाचा लावायचा, की तीन बोटांचा? उभा लावायचा की आडवा? एक ठिपक्याचा की दोन!’ एक न अनेक प्रकार! आता मंगळसूत्राला लपायला जागा हवीय, आणि गंधाने मात्र प्रदर्शनार्थ उचल खाल्लीय!*

   *अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत गंध लावलेली मंडळी सात्विक, सुस्वभावी वगैरे वाटत असत. हल्ली काही ठिकाणी ते जरा जास्तच अंगावर येऊ लागलं आहे. समाजातील अपप्रवृत्तींच्या कपाळीही गंध हटकून दिसू लागलाय. समोरच्या माणसाला बघताक्षणीच भीती वाटावी किंवा त्याच्यावर दबाव पडावा असा आक्रमक, भडक गंध वा कुंकू मुद्दाम लावून मिरवणाऱ्या या माणसांच्या गावी ‘आज्ञाचक्र’ हा शब्द तरी असेल का?*

    *मंडळी, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला नक्की जपायच्या आहेत; मात्र त्यांचा विपर्यास होणार नाही याचं भान समाज म्हणून आपल्याला ठेवावंच लागेल, कारण गंध कपाळावर असतो; पण माणसात देव पाहण्याचे संस्कार मनात असतील तरच तो अर्थपूर्ण ठरतो, अन्यथा तो उरतो फक्त आणि फक्त सोपस्कार!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


Thursday, February 19, 2026

आड आणि पोहरा

*आड आणि पोहरा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*18 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आड आणि पोहरा*

*एका नवीनच रंग दिलेल्या घराला भेट देण्यासाठी दुसरं एक कुटुंब आलं. घर छान सजवलेलं होतं. सगळं काही एकदम फ्रेश! सगळेजण घराची स्तुती करत चहा, फराळ आणि गप्पांमध्ये गुंतले असताना पाहुण्याच्या आठ-दहा वर्षाच्या मुलाने हातातल्या गाडीच्या चावीने घरातल्या नव्या कोऱ्या भिंतीला खरवडून टाकलं, आणि महागामोलाचा पेंट लावलेली भिंत सगळी विद्रूप करून टाकली! घर ज्यांचं होतं त्यांनी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनात काय वादळ उठलं असेल बरं? करा विचार! तुमचं घर असतं तर तुम्ही काय केलं असतं? त्या मुलाच्या घरच्यांकडून तुम्ही काय अपेक्षा केली असती? त्यांनी मुलांना बाहेर जाण्याआधीच ‘तिकडे कसं वागावं’ हे जरा सांगायला पाहिजे होतं, नाही का?*

*आपण माणसांच्या समाजात राहतो. हा समाज हजारो वर्षांपासून इथपर्यंत सुरळीत चालत आला कारण माणसांनी स्वतःच्या आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांच्या जगण्याला काही फुटपट्ट्या लावून घेतल्या, काही नियम घालून घेतले आणि त्यांची मर्यादाही वारंवार सांभाळली. बाप नावाच्या माणसाचं वागणं कसं असावं, मुलांनी कसं वागावं, पाहुण्यांनी कसं वागावं वगैरे. माणसं या जगण्याच्या फुटपट्ट्या निरंतर जपत आली आहेत. एकमेकांचा आदरयुक्त धाक ठेवत आली आहेत. समाज आपल्याला काय समजतो, आणि आपण कसं वागलं पाहिजे याचं एक अनामिक बंधन लोकांनी घातलेलं अगदी कालपर्यंत तरी दिसत होतं, म्हणून सगळं सुरळीत होतं. जगण्यात एक अदब होती.*

 *आता काही लोक हळूहळू या फुटपट्ट्या सोडून द्यायला लागले आहेत. आता तुम्ही सगळ्याच दुकानदारांकडून चांगल्या मालाची अपेक्षा करू शकत नाही. डॉक्टरांकडून चांगल्या वैद्यक सेवेची अपेक्षा करू शकत नाही. सुतार तुमचं फर्निचर चांगलं बनवेलच याची आता खात्री राहिलेली नाही. सरकारी कर्मचारी लाच न घेता काम करेलच असं नाही. पोलीस चोराला पकडल्यावर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवेलच याची खात्री नाही. न्यायाधीश खराखुरा न्याय देतीलच असं नाही. ज्यांच्याकडून कधीही व्यसनाची अपेक्षा केली नव्हती, ते गटारात; तर जे इतरांना ज्ञानामृत पाजत होते ते अश्लीलतेच्या प्रकरणांमध्ये रंगेहात सापडत आहेत. दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे रात्री दारूच्या पार्ट्यांमध्ये झिंगून पडलेले दिसत आहेत. निवडून दिलेले सगळे राजकीय लोक हे तसे सामान्य माणसांचे सेवक; पण ते आता आपले मालक असल्यासारखे वागू लागले आहेत! समाजात अतिशय सात्विक चेहरा असलेल्या माणसांचा दुसरा चेहरा इतका भयावह आहे की भीतीने थरकाप व्हावा!*

 *हे सगळं असं आणि असंच आहे. मोठ्या माणसांनीच ताळतंत्र सोडलंय, मग यापुढे त्या भिंत खरवडणाऱ्या मुलाला तरी दोष देऊन उपयोग काय? शेवटी जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार! मंडळी, छत्रपती शिवरायांचं स्मरण करूया, त्यांच्यासारखं होऊया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यापुरता का होईना आड स्वच्छ ठेऊया!*
*जय जिजाऊ! जय शिवराय!*
🚩
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Tuesday, February 10, 2026

तीन सोनेरी शब्द

*तीन सोनेरी शब्द!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*10 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*तीन सोनेरी शब्द*

*एका शाळेत एक खेळ करून दाखवणारा आला. मुलं उत्सुकतेने त्याच्याभोवती जमली. त्याने पिशवीतून तीन चेंडू काढले, प्रत्येक चेंडूवर काहीतरी लिहिलेलं होतं. त्याने त्यातला एक चेंडू हवेत फेकला. तो खाली यायच्या आत अलगद दुसरा आणि तिसराही उचलला. आता एक चेंडू हवेत, दोन चेंडू हातात. आणि मग इतक्या सफाईदारपणे ते तीनही चेंडू त्याने हवेत गोलगोल फिरवले की मुलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या!*

 *एका चाणाक्ष मुलाने कळीचा प्रश्न विचारला, “तुम्हाला हे चेंडू कसेकाय फिरवता येतात? खेळवाला म्हणाला, “सोप्पंय. कोणतेही दोन चेंडू आपल्या दोन्ही हातांना गुंतवून ठेवतात. मात्र त्या दोन चेंडूंच्या बदल्यात हवेत उंचावलेल्या तिसऱ्या चेंडूचा आपल्याला आनंद घेता येतो.” एका मुलाने म्हटलं, “आम्ही पाहिलं, या चेंडूंवर तुम्ही काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ते वाचून मग तुम्ही चेंडू फिरवता ना? तो चेंडू हवेत फिरवण्याचा मंत्र आहे का?” खेळवाला म्हणाला, “चेंडूंवर काहीतरी लिहिलंय हे खरंय. पण जे लिहिलंय तो चेंडू फिरवण्याचा नाही, तर जीवन जगण्याचा मंत्र आहे!” “बघू! बघू!” म्हणत मुलं त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी एकमेकांवर तुटून पडली! जवळ जाऊन पाहिलं तर फक्त इंग्रजीतली तीन अक्षरं. प्रत्येक चेंडूवर एक अक्षर. टी, एम आणि के! मुलांना काही कळेना. हा कसला एकाक्षरी मंत्र? खेळवाला म्हणाला, “हा साधासुधा मंत्र नाही; गुरुमंत्र आहे! मुलांनी गलका केला, “प्लीज आम्हाला सांगा, प्लीज सांगा!”*

  *खेळवाला म्हणाला, “ही तीन अक्षरं म्हणजे आयुष्यातील तीन सोनेरी शब्द आहेत. लाल चेंडूवरचा टी म्हणजे टाईम; म्हणजे वेळ. हिरव्या चेंडूवरचा एम म्हणजे मनी; म्हणजे पैसा, आणि पिवळ्या चेंडूवरचा के म्हणजे नॉलेज; म्हणजे ज्ञान! वरील खेळाप्रमाणेच आयुष्यात या तीनपैकी कोणत्याही दोन गोष्टी जर गुंतवल्या, तर तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते, तिचा मनसोक्त आनंद घेता येतो!” मुलं म्हणाली, “म्हणजे?”*

*खेळवाल्याने समजावून सांगितलं, “बघा, वेळ, पैसा आणि ज्ञान यापैकी तुम्हाला जर ज्ञान हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल, सोबत पैसेही भरावे लागतील. कारण फुकट काही मिळत नाही! तुम्हाला जर पैसे हवे असतील, तर तुमचं ज्ञान, कला आणि तुमचा महत्वाचा वेळ लोकांना द्यावा लागेल, तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतील, आणि जर तुम्हाला स्वतः ला मोकळा वेळ हवा असेल, तर जे काम तुम्हाला करायचे आहे त्यासाठी त्या कामातील ज्ञानी माणूस नेमून तुम्ही मोकळे राहू शकता, मात्र तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागतील! म्हणजे दोन गोष्टी गुंतवल्या की तिसरीची प्राप्ती होते! हो की नाही?” मुलांनी “होsss” म्हणत जोरदार टाळ्या वाजवल्या! मुलांना आज एक नवीन गोष्ट समजली होती.*

 *मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यात या तीनपैकी कोणत्या दोन गोष्टी गुंतवत आहात, आणि त्यांच्या बदल्यात तुम्हाला कोणती तिसरी गोष्ट मिळतेय? करा विचार!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...