Friday, May 8, 2020

तीन प्रयोग




📌


तीन प्रयोग



प्रयोग १
एका कार्यक्रमात एका प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांशी बोलता बोलता खिशातून एक कोरा करकरीत कागद काढला. मुलांना विचारलं, " याला तुम्ही काय म्हणाल?" मुलांनी एका सुरात सांगितलं," कोरा कागद!" पाहुण्यांनी तो कागद एका क्षणात चुरगळून टाकला. मुलांच्या मनात धस्स झालं. पाहुण्यांनी विचारलं, " मी या कागदाचं काय केलं?" मुलं म्हणाली," चुरगळून टाकला!" पाहुणे म्हटले," आता याला पहिल्यासारखा करता येईल का?" मुलं म्हटली, " नाही!" बोलता बोलता पाहुण्यांनी त्या कागदाचा एक सुंदर मोर बनवून मुलांसमोर पेश केला! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला!! आता पाहुण्यांनी विचारलं," तुम्हाला काय जास्त आवडलं? चुरगळलेला कागद की मोर??" मुलांनी दंगा केला," मोssssssर!!" मग पाहुणे म्हणाले," मित्रांनो, आपलं आयुष्य हे या कोऱ्या कागदासारखं असतं! त्याला चुरगळून टाकायचं की त्याचा सुंदर मोर बनवायचा ते आपल्या हातात असतं! आपण चांगल्या सवयी लावल्या, चांगलं शिकलो, शिक्षकांना आदरसन्मान दिला तर, आपल्या आयुष्याचाही आपल्याला सुंदर मोर करता येईल!"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
       मित्रांनो, ते प्रमुख अतिथी होते, प्रसिद्ध साहित्यिक आणि आदर्श पिता, पितृतुल्य मित्र, आणि अनेक पुरस्कार मिळवूनही जमिनीवर पाय भक्कम असलेले प्रिय कमलाकर आबा देसले सर!!



प्रयोग २
आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे जागरूकपणे लक्ष देणाऱ्या एका पालकाच्या मनात एके दिवशी विचार आला, की मी माझ्या मुलांचा अभ्यास करवून घेतो आहे, त्यांची प्रगतीही होते आहे, परंतु अशी कित्येक मुलं असतील की त्यांचे आई बाबा या बाबतीत शैक्षणिक किंवा कौटुंबिक बाबतीत तितके सक्षम नसतील, त्यांचा अभ्यास मागे तर पडत नसेल ना?
  विचारांचं काहूर त्याला शाळेपर्यंत ओढत घेऊन गेलं. तो पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटला, सद्यस्थिती जाणून घेतली. जेव्हा त्याला कळलं की आणखी बरीच मुलं मागे पडताहेत, त्याच्या काळजात कालवाकालव झाली. आपण केवळ शाळेवर दोषारोप करत बसण्यापेक्षा आपल्या परीने काही करता येईल का? असा विचार त्याच्या मनात आला. त्याने मुख्याध्यापकांकडे विचारणा केली की जर आपली परवानगी असेल तर मी स्वेच्छेने या कच्च्या मुलांसाठी माझा थोडा वेळ दिला तर चालेल का? मुख्याध्यापकांनी वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना हिरवा कंदील दिला.
   आज त्या घटनेला तब्बल एक वर्ष झालं! तो पालक वर्षभर कच्च्या मुलांच्यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त त्याचा एक तास देतो आहे. मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली, त्याच्याही मुलांचा अभ्यास सुधारला!!एका भव्य कार्यक्रमात त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
  मित्रहो, ही दंतकथा नव्हे! त्या पालकांचं नाव मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, त्यांचं नाव आहे श्रीमान मनोज शिंपी साहेब!
सलाम!!


प्रयोग ३
तात्यासाहेबांची जयंती आणि मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने नाशकातील नामवंत साहित्यसंस्थांनी एका कविसंमेलनाचे आयोजन केले.अनेक महनीय कवींनी संमेलनाला हजेरी लावली.एक आई तिच्या चार पाच वर्षाच्या लेकीला घेऊन कार्यक्रमाला आली. मराठी भाषा आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज या विषयांना वाहिलेल्या अनेक कविता सादर झाल्या. एका पाठोपाठ एक कवी व्यासपीठावर येऊन आपली रचना सादर करत होते. एक नाव पुकारले गेलं आणि ही चिमुरडी व्यासपीठावर आली. तिच्याकडे पाहून तिला एक चॉकलेट किंवा जास्तीत जास्त गोड गोड पापा देण्याचा मोह कुणालाही सहज व्हावा! पण बालकन्या जेव्हा 'मला कविता म्हणायचीय' असं म्हटली तेव्हा उपस्थित कवींना नवल वाटलं. माईकचा ताबा घेत तिने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची एक दीर्घ रचना इतकी सुंदर अगदी हो अगदी मुखोदगत म्हटली!की टाळ्यांचा कडकडाट झाला!! कार्यक्रमाच्या शेवटी तीन क्रमांक काढले गेले. या चिमुरडीला चक्क पहिल्या क्रमांकाने गौरविलं गेलं.
या गोजिऱ्या मुलीचे नाव... ऋषिका पाटील!

मित्रहो!
मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे, कारण मराठी मनं अजून जिवंत आहेत!

-प्रा.राज शेळके, नाशिक.
   ९४२३५ ४२२२४

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...