Tuesday, October 25, 2022

कवी विलास पंचभाई : मनाची स्पंदणे

    नाशिकच्या साहित्य वर्तुळामध्ये स्वतःच्या मस्तीत आणि स्वतःच्या धुंदीने जगणारा एक धडपड्या कविमित्र आहे, विलास पंचभाई. विलासची जगण्याची, वागण्याची, बोलण्याची एक स्टाईल आहे. तशीच त्याच्या लिहिण्याची सुद्धा.
    स्वभावाने बेधडक परंतु दिलदार असलेल्या विलासच्या मनात माणुसकी बद्दलची कळकळ मात्र अखंड तेवत असते. 'मनाची स्पंदने' हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. याच संग्रहातील या  पुढील ओळी पहा.

मैला-मैलावर
रोवून ठेवलेत
त्यांनी दगड
अंतर कळावं म्हणून...
पण..
त्यांना कुठे कळतंय
माणसा-माणसातलं
अंतर वाढत चाललंय ते...
 एखादा तत्त्वचिंतकच असं सुंदरपैकी लिहू शकतो.

  विलास त्याचे सांसारिक आयुष्य अगदी मोकळेपणाने जगतो आणि त्यातल्या बारीक सारीक खाणाखुणा मोकळेपणाने लिहितो सुद्धा. 

तुझ्याशी माझं 
भांडण झाल्यावर
तुझ्या डोळ्यातून
अश्रू टपकताना
माझं हृदय हळहळतं
मग मीही विरघळतो तुझ्यात...

बायकोवर त्याचं नितांत प्रेम आहे. तो छान स्वयंपाकही करतो, आणि हे कवितेतही लिहितो.

मला छान जमतं
वडापाव मिसळ पावही
कधी कधी म्हणतो तिला
तुझ्या हाताला चव नाही!
( म्हणजे पुन्हा भांडायला तयार!)

    प्रेम मिळणं ही प्रत्येकाची एक स्वाभाविक भावना आहे, ती टिपताना कवी म्हणतो,

हवं असतं प्रत्येकाला प्रेम
प्रत्येकालाच मिळत नसतं
ज्याला मिळालं त्याने
पारीजातक जपायचं असतं...!

  कधी कधी  त्याच्या शब्दांना भावनेचा ओलावा दिसतो, तर कधी कधी त्याचे शब्द थेट षटकार लगावतात. 

तारुण्य म्हणजे
याच किस तिचं मिस असतं
लग्न करायचं
दोघांचही फिक्स असतं!

   हा म्हणजे विलासचा खास मंगेशकर तडका आहे. जीवनातल्या आयुष्याला दररोजच्या धकाधकीच्या अनुभवांमधून व्यक्त करताना विलास म्हणतो 

उकळलेल्या दुधपाण्यात
चहा पावडर टाकली जाते
गोडवा यावा म्हणून
साखरही विरघळते..
तसेच जीवनातही
गोडवा रहावा म्हणून
आनंदाचे क्षण
यावे लागतात अधूनमधून...

   दिवसभर कुटुंबासाठी धावपळ करून थकून घरी येणाऱ्या माणसाचे वर्णन बघा किती सुंदर प्रकारे त्याने व्यक्त केलं आहे 

दिवस भराचा तापलेला
सूर्य संध्याकाळी थंड होतो
घराकडे जाऊन पुन्हा
एक रात्र आराम करतो!

  आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. काही गोड तर काही कडू. आपल्या सभोवतालची माणसं ही वेळ प्रसंग पाहून कधी चांगली तर काही वाईट वागतात. प्रतीक्षिप्त क्रिया म्हणून आपलंही वागणं कधी कधी बदलू शकतं, परंतु कवी म्हणतो,

प्रत्येक दिवस सारखा नसेल
कधी उंच भरारी,
कधी खाली खेचेल
भीती असते पडण्याची
तरी भरारी घेणे कसे थांबेल?

 स्वतःवरील आत्मविश्वास अधोरेखित करताना कवी

माणसं येतील जातील
कोणी वार करतील
कोणी फुंकर घालतील
मी माझे ध्येयापर्यंत जाणे
थांबणार नाही

 अशी ग्वाही देतो. व्यक्त होताना केवळ कविताच नाही तर गजलेच्याही मार्गाने त्याचे शब्द येऊ लागतात. पुढील दोन ओळी पहा,

केल्या किती सरकारी जनगणना
तरीही अजून ही जात बाकी!

 तर दुःखाची कारणमीमांसा करताना तो म्हणतो,

राहिले असतील भोग काही
बिनदिक्कत सोसावे म्हणतो

 मुळात कवी कविता लिहितोच कशासाठी? याचे उत्तर शोधताना कवीला खालील शब्द सापडतात,

कविता ऐकून घेते
सुख दुःख सर्व काही
पचवतो मग
आंनद नि विरहही
कवितेला नसतो
कोणता रंग
नसतात कुठल्या
जातीच्या भिंती
कविता करते सर्व
एकत्र जातीपाती.....

  स्त्री-पुरुषांच्या समानतेबद्दल कवी एक महत्त्वपूर्ण भाष्य करतो 

बाई होते विधवा
तसा पुरूषही होतो विधूर,
(फक्त म्हणायला समानतेची वागणूक)
पुरुषाला केल जातं का
समाजापासून दूर ?

स्त्री सुधारलेली भासत असली तरी तिची वेदना चिरंतर आहे हे सांगताना कवी म्हणतो,

अजूनही संपल्या नाही वेदना
किंबहुना किंचित जास्तच
आज फरक एवढाच
ती तेव्हा शेतात राबवायची
आज नोकरी करते
बाई शिकली
दोन पैसे कमावू लागली
पण व्यवहार नवऱ्याकडेच सोपवून
ती तिचं अस्तित्व जपत राहते...

त्याच वेळेला स्वतःच्या आईचं वर्णन करताना कवीची लेखणी थकत नाही.

माझी आई
आरसा धरायची
आणि कपाळावर
मेन लावलं की
गरगरीत असं
कुंकू लावायची
अखंड सौभाग्य टिकावे म्हणून...

 प्रत्येक कवीच्या कवितेत आई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतेच.उगीचच कविला मातृहृदयी म्हणत नसावेत. सोबतच पुरुषाच्या राकटपणात असलेला हळवा कप्पा स्पष्ट करताना कवी सहज लिहून जातो,

नेहमीच
उंच रांगडा दणकट
पिळदार शरीरयष्टी
झुपकेदार मिशावर ताव देऊन...
कणखर आवाज
अशीच प्रतिमा तयार झाली पुरुषाची
पण त्याच्या मनाचा विचार
होत नाही कधी
तोही हळवा असू शकतो...

छानच.

  कवी विलास पंचभाई यांनी कामगारांचे जीवन जवळून अनुभवलेले आहे; अनुभवत आहेत. त्यांचा 'हंगामी' हा कथासंग्रहही याच विश्वाशी आधारित आहे. कामगारांचे आयुष्य शब्दात मांडताना ते म्हणतात, 

कामगारांचं जीवन म्हणजे
लोखंडाशी खेळणं
छन्नी हातोड्यासोबत
रोज घाम गाळणं!

   असा कष्टाचा घाम गाळता गाळता शब्द शारदेची आराधना करत साहित्याच्या क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या कवी, लेखक आणि साहित्यकणा फाउंडेशन, नाशिकचे सचिव श्री विलास पंचभाई यांचा 'मनाची स्पंदने' हा संग्रह नक्कीच वाचनीय असा झालेला आहे. आपणही तो 7774955892 या त्यांच्या  क्रमांकावर फोन करून मागवू शकता.
  एकूण 67 कवितांचा खजिना असलेला 96 पानांचा हा संग्रह नाशिक येथील ज्ञानसिंधू प्रकाशनाने आपल्या सर्वांसाठी केवळ 120 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दिवाळीतल्या पोटासाठीच्या फराळाबरोबरच हा मेंदूसाठी पाठवलेला फराळ कसा वाटला? ते अवश्य कळवा.

रसग्रहण
-श्री राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
दि. 25 ऑक्टोबर 2022.

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...