◾
*शहरातली अंधश्रद्धा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 जानेवारी, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*शहरातली अंधश्रद्धा*
*रविवारी शहरातली माणसं तशी आळसावलेली असतात. अंमळ उशिराच उठतात. अशाच एक मॅडम निवांत उठल्या, स्नान वगैरे उरकल्यावर व्हरांड्यात जाऊन सूर्याला नमस्कार करण्यासाठी दरवाजा उघडला. पाहतात तर काय? उंबऱ्याजवळ उजव्या बाजूला मुठभर तांदूळ ठेवलेले. त्यावर हळद, कुंकू टाकलेलं. थोडीशी राखही. एका पिठाच्या गोळ्यात दोन अगरबत्त्या खोचलेल्या. बाजूला एक लिंबू! मॅडमचा आळस कुठल्या कुठे पळाला. झोप खाडकन उडाली. तशाच उलट पावली माघारी गेल्या आणि नवऱ्याला झोपेतून उठवून बाहेर आणलं. नवरा अर्धवट झोपेतच होता, पण समजदार होता. त्याने घडला प्रकार पाहिला, तसाच पुन्हा घरात गेला, केर भरण्याची सुपली आणि झाडू घेऊन आला. सगळं सुपलीत भरलं. शंभर-दिडशे फुटांवरच्या एका झुडपात टाकून हसत हसत आला!*
*बायको दारात उभी राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याने म्हटलं, "विसरून जा. जणू इथं काही नव्हतंच!" ती म्हणाली, "ते ठीक आहे, पण हे जादूटोणा वगैरे तर गावाकडे असतं ना? इथे शहरात सुद्धा??"*
*तो म्हणाला, "शहर हे सुद्धा एक गावच असतं. अगडबंब पसरलेलं. शहरात कोण राहतं? गावाकडचीच माणसं शहरात येऊन राहतात ना? फरगेट." "अरे पण आपण कुठे कुणाचं घोडं मारलंय? चार महिनेही नाही झाले आपल्याला हे घर घेऊन. इकडचा भाग जरा सुशिक्षित वाटतो, जरा शांतता आहे म्हणून आपण इकडे राहायला आलो ना? आपण तर इथे कोणाला नीटसं ओळखतही नाही. मग हे काय? एवढ्या सुशिक्षित वाटणाऱ्या भागातही जादूटोणा? तरी मी तुला म्हणत होते की अगोदर सीसीटीव्हीची व्यवस्था करूया. तेव्हा तू म्हणालास आताच काही घाई नाही. कोणी केलं असेल हे? आणि आपल्याच दारावर का?"*
*नवरा म्हणाला, "गावापेक्षा शहरात शिकलेले निर्बुद्ध आणि अतृप्त आत्मे जास्त असतात म्हणून!" बायको म्हणाली, "म्हणजे?" नवऱ्याने सुपली ठेवली आणि म्हणाला, "हे बघ, शहरात माणसं आली, की बरेच जण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, काहींचं पोट भरतं; पण मन भरत नाही. सुखदुःख श्रीमंतांनाही आहेत, आणि गरिबांनाही. माणूस सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. दुःखाशी संकटाशी स्वतः दोन हात करण्याची हिंमत नसलेली माणसं मग बाबा लोकांच्या नादी लागतात, आणि 'माझ्यावरचं दुःख, साडीसाती जाऊदे; भले ती दुसऱ्यांवर टाक, पण मला या दुःखातून बाहेर काढ' अशी बावळट मानसिकता ठेवतात. मग हे बाबा लोक सांगतात- तुमच्या आसपास जे सुखी दिसत असतील त्यांच्या दारावर एवढ्या वस्तू देऊन टाका, म्हणजे तुमच्या वाट्याचं दुःख, साडेसाती त्यांना आणि त्यांच्या वाट्याचं सुख तुम्हाला!!' आणि हे वैतागलेले मूर्ख लोक तसंच करत सुटतात.*
*"बापरे! म्हणजे आता आपल्या मागे लागणार की काय ही साडेसाती आणि दुःख?" बायको घाबरल्या सुरात म्हणाली. नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अशी सुखदुःखांची अदलाबदल करणं इतकं साधं, सरळ, सोपं आणि सहज असतं, तर एका रात्रीतून सगळी दुःखी माणसं आनंदी, आणि सगळी आनंदी माणसं दुःखीकष्टी झाली नसती का?? साडेसाती म्हणजे वाईट वेळ नक्की जाते, पण अशी दुसऱ्यांच्या दारात लिंबू मिरच्या टाकून नव्हे! विचार करण्यात आणि टेन्शन घेण्यात वाया चाललेला वेळ जर काम शोधण्यात आणि पैसे कमावण्यासाठी खर्च केला, की साडेसाती जाते म्हणजे जातेच! आणि हो, चांगली वेळ कधीच येत नसते; आपल्याला आपल्याकडे असलेल्या आजच्या वेळेलाच प्रयत्नांनी चांगलं बनवावं लागतं! "चल, चहा ठेव मस्तपैकी, आलं आणि गवती चहा टाकून! राहिलं सीसीटीव्हीचं, तर तो आज बसवून टाकू! मग तर झालं!?*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t