◾
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
~~~
*‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर!’ या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्त्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं, ‘अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार...!’ घ्या आता!*
*कपबशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे. काही घरांमध्ये बशी बसलेली, कप हिंडतोय, काही घरांमध्ये कप बसलेला, बशी मरमर करतेय; तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडताहेत! काही असो, संध्याकाळी कप असो की बशी, घरी येणं भाग आहे. तसाही बशीविना कपाच्या आणि कपाविना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या बशीला नसेल आवडला कप, एखाद्या कपाला नसेल आवडली बशी. काही कपांना वाटतं ‘मीच लै हुशार’; तर काही बश्यांना वाटतं, ‘आमच्या कपाला अक्कलच नाही!’ तरी ‘तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना’ असा सगळा मामला! या अशा अतिशहाण्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा ‘चिवित्र’ जोड्या लावून मजा बघत असतो!*
*‘जोड्या स्वर्गात बनतात’ असं लोक म्हणतात खरं, पण जे तिकडे चुकांडी देऊन, निसटून पृथ्वीवर येतील, त्यांना इथली जुनी जाणकार मंडळी गंडवतात! ‘काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच’ हा त्यांचा खाक्या. जोड झालाच पाहिजे, मग तो पुढे टिको, ना टिको. ‘आमच्या डोळ्यांदेखत होऊ दे’ च्या नावाखाली घाईघाईत कानतुटका कप किंवा तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळींच्या लक्षातच येत नाही. पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडखड ‘बा’ चा ‘बा’ ची चालू राहते. जिथे बशी शांत तिथे कप तडतड्या. जिथे कप शांत तिथे बशी बडबडी. मग बशीघरात दुसरं काय होणार? कधी कप एकाकी, तर कधी बशी!*
*‘आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडून घेऊ द्या’ म्हणणाऱ्या आधुनिक कपबश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही. नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेच पाढे! काही कपांना त्यांच्याच बश्यांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही, त्यांचा अहंकार दुखावतो; तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बश्यांना आवडत नाही, त्यांना कप हातातून निसटायची भीती वाटते! पुढारलेल्या शहरातल्या कपबश्यांचं हे आतलं दुखणं आहे. आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का? त्यांच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुखात आहेत.*
*कपबशीच्या भांडणात ‘माघार कोणी घ्यायची?’ हा फार कळीचा मुद्दा असतो. याचं साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे, ‘ज्याला आनंदी राहायचं आहे, त्याने!’ हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले, की दोघांचंही महत्व अबाधित राहतं. जगणं सोपं आणि सुंदर होतं. म्हणून,*
_*तुम्हाला जर कधी भेटली अशी भांडकुदळ जोडी*_
_*चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी!*_
_*विस्कटलेल्या संसाराची आणा रुळावर गाडी!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.