Thursday, February 20, 2025

छोटा शून्य मोठा शून्य!

**छोटा शून्य मोठा शून्य!*
(अनंत काणेकरांच्या विचारांचा एक धागा)
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 फेब्रुवारी, बुधवार_

▪️
 *एका वर्गात एक गुरुजी गणित शिकवत होते. वजाबाकी चालू होती. गुरुजींनी विचारलं, "पाच वजा पाच बरोबर किती?" मुलांनी एका सुरात सांगितलं "शून्य!" मग गुरुजींनी मुलांची मजा घ्यायचं ठरवलं. आणि विचारलं, "पंचवीस हजार वजा पंचवीस हजार बरोबर किती?" एक पोरगा जोरात ओरडला, "मोठ्ठा शून्य!! "सगळा वर्ग हसला! गुरुजींनी त्याला उभं केलं आणि म्हणाले, "शून्य कधी लहान मोठा असतो का? शून्य केवळ शून्य असतो." मुलगा धिटाईने म्हणाला, "गुरुजी, पाच ही लहान संख्या आहे. पंचवीस हजार ही मोठी संख्या आहे. उत्तर मोठा शून्यच असलं पाहिजे." गुरुजी म्हणाले, "अरे पण मोठा शून्य नसतोच!" मुलगा म्हणाला, "का नसतो?" आता गुरुजी निरुत्तर झाले. म्हणाले, "बाबा रे माझ्या गुरुजींनी मला इतकंच शिकवलं होतं. पण तरीही हा प्रश्न तू तुझ्या हृदयाशी जपून ठेव. एखाद्या वळणावर आयुष्य तुला या प्रश्नाचे उत्तर देईल." मुलाला ते काही कळलं नाही. पण गुरुजींनी खाली बसायला सांगितलं म्हणून तो खाली बसला. प्रश्नही काही काळासाठी खाली बसला.*

   *बरीच वर्ष मधल्या काळात निघून गेली. मुलगा मोठा झाला. त्याचा माणूस झाला. एके दिवशी टीव्हीवरचा एक प्रोग्राम पाहताना तो जरा सावध झाला. प्रसंग त्याच्या प्रश्नाशी निगडित होता.*

   *हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावरच्या कुठल्याशा पठारावर एक साधू तपश्चर्या करत बसला होता. तिथे एक हेलिकॉप्टर उतरले. त्यातून वैमानिक खाली उतरला. ती एक स्त्री होती. ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी थोडा पायांचा आवाज केला. साधूंनी डोळे उघडले. तिने विचारलं, बाबा तुम्ही तप का करत आहात? त्यांनी सांगितलं, "मोक्षप्राप्तीसाठी." ती म्हणाली, "तुम्ही मला ओळखता का?" साधू म्हणाले, "नाही." ती म्हणाली, "मला सर्व जग माझ्या कार्यामुळे ओळखतं. मी जगातील सर्वश्रेष्ठ अंतराळवीर आणि वैमानिकांपैकी एक आहे." साधू म्हणाले, बाळ, आयुष्य क्षणभंगुर आहे. मनुष्य एके दिवशी देह सोडून जातो. मृत्यू हे प्रत्येकाबद्दल अंतिम सत्य आहे. तुलाही एका दिवशी मरायचंच आहे आणि मलाही. फक्त मी इथे मरणार आणि तू तिथे एवढंच! प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटी शून्यच होतो." अंतराळवीर म्हणाली, "परंतु तुमच्या आयुष्याचा छोटा शून्य होईल माझ्या आयुष्याचा मोठा शून्य!!"*

  *'छोटा शून्य मोठा शून्य' ऐकल्याबरोबर टीव्ही पाहणारा ताडकन उठून बसला!*

    *अंतराळवीर म्हणाली, "तुमचा श्वास थांबेल, तेव्हा किती लोकांना माहीत होईल?" साधू म्हणाले, "अर्थातच, कुणालाच नाही." ती म्हणाली, "जेव्हा मी मरेल तेव्हा सर्व जग माझ्यासाठी हळहळ व्यक्त करेल. माझ्या मृत्यूनंतरही लोक मला माझ्या कार्यासाठी स्मरणात ठेवतील. तुमचा प्रवास छोट्या शून्याकडे सुरू आहे. माझा प्रवास मोठ्या शून्याकडे!" अनेक वर्षानंतर मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.*

   *आता प्रश्न इतकाच. तुमचा प्रवास कोणत्या शून्याकडे सुरू आहे? छोट्या? की मोठ्या?*
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, February 12, 2025

आवडती माणसं नावडती माणसं

*आवडती माणसं नावडती माणसं!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 फेब्रुवारी, बुधवार_

▪️
   *एक मुलगा शाळेत जायचा कंटाळा करत होता. त्याची आई त्याला शाळेत जाण्यासाठी विनवण्या करत होती. पोरगं काही ऐकेना. "तुला शाळेत का जायचं नाही?" असं विचारता त्याचं उत्तर होतं, " कुणालाच मी आवडत नाही!" मग त्याला समजावणीच्या सुरात त्याची आई म्हणाली, " बाळा, असं म्हणून कसं चालेल? कुणाला तू आवडो, न आवडो तुला शाळेत जावंच लागेल. कारण तूच शाळेचा मुख्याध्यापक आहेस!? "*

    *गमतीचा भाग सोडला तर आपल्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांच्या आसपास अशी नावडती माणसं आहेत?आणि तरीही त्यांच्यासोबत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही? मुद्दा विचार करण्यासारखा आहे.*

   *काही माणसं सर्वांना आवडतात. काही कुणालाच आवडत नाहीत. काहींना त्याने काही फरक पडत नाही. ते अधिकारपदावर असतील तर बाकीच्यांच्या छाताडावर बसून त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांच्या माघारी त्यांना शिव्या घातल्या तरी " माघारी लोक राजालाही शिव्या घालतात!" असं म्हणत वेळ मारून नेतात. पदावर नसतील तरी ते तिसऱ्या वाक्याला वाकड्यात घुसतात. आपण इतरांपेक्षा किती जास्त पाण्यात आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून इतरांची लायकी काढतात. दोन शब्दांचं कौतुक तर सोडाच, पण चुका मात्र अगोदर काढतात. लोक अशा माणसांना दबकून राहतात, मात्र ते सोबत नसतील तर आनंदोत्सव साजरा करतात! अशी माणसं इतरांच्या बाबतीत 'साला फडतूस' या कॅटेगरीतली ठरतात.*

  *काही माणसं मनाने 'राजा माणूस' असतात. ती अधिकारपदावर असोत, नसोत, प्रिय असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्नता असते. बोलण्यात साधेपणा असतो. 'इतरांना आपण आवडावं' यासाठी ते वेगळं काहीही करत नाहीत, तरीही एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. आपली सुखदुःखं त्यांच्याशी शेअर करतात. ही माणसं अशावेळी फक्त 'डस्टबिन' बनतात. समोरच्या माणसाला रितं होऊ देतात. त्याचं ऐकून घेतात. समोरच्या माणसातला विश्वास जागा करतात. त्यांनी सहज सुचवलेल्या एखाद्या सल्ल्याने जर समोरच्या माणसाची एखादी कधीची न सुटलेली समस्या सुटली की आधीच आवडत्या असलेल्या माणसाच्या शिरपेचात प्रेमाचा आणखी एक तुरा खोवला गेलाच म्हणून समजा!*

  *मंदिरातला देव तरी दुसरं काय करतो? शांतपणे ऐकून घेतो. माणसाचं मन मोकळं झालं की माणूस पुन्हा नव्या उमेदीने काम करायला तयार होतो. करतो माणूसच; परंतु श्रेय ऐकून घेणाऱ्या देवाला जातं. देव सर्वांना आवडतो याचं एक कारण हेही असावं तर! कुण्या कवीने म्हणून ठेवलं आहे,*

_*याचसाठी देव आवडतो मला की...*_ 
_*दुःख माझे सर्व तो ऐकून घेतो!*_
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

निद्रादेवी सुप्रसन्न!

*निद्रादेवी सुप्रसन्न!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_बुधवार - 5 फेब्रुवारी 2025_

▪️
*हवेत जरा गारवा असला की माणसं सकाळी उठण्याचा जरा कंटाळाच करतात, नाही? अंथरुणातून बाहेर निघायला जीव नको नको म्हणतो. थोडं झोपतो म्हणून पुढचा अर्धा पाऊण तास आपण सहज झोपून काढतो. शिवाय 'अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच झोपसुद्धा माणसाची एक महत्वाची गरज असते' असंही ठासून सांगतो. पण झोप गरजेची असली म्हणून का कधीही, कितीही आणि कसंही झोपावं? झोपण्याच्या एकेकाच्या तऱ्हा पाहिल्या की कळतं की कोणालाच भारतात योगासनं शिकवण्याची गरज नाही! शिर्षासन सोडून सगळ्या आसनांत झोपणारे लोक आहेत आपल्याकडे. शिवाय कॉटवर झोपून जमिनीवर उठणारे, झोपेत गाणी म्हणणारे, जोरजोरात आज्ञा देणारे, झोपेत चालणारेही कमी नाहीत!*

  *मनुष्यप्राण्याला साधारणतः सहा-सात तासांची रात्रीची झोप ठीक आहे. पण रात्री झोपून पुन्हा दिवसाही झोपणं? हे जरा अतिच होत नाही का? झोपेवर नियंत्रण नसणारी माणसं पहा. अगदी मनमौजी असतात. त्यांना जगाची फिकीर नसते. 'मेरे मन को भाया, मैं बिन तकिये का सोया!' अशी त्यांची भुमिका असते. मनसोक्त झोपा काढल्यामुळे त्यांचं शरीरसुद्धा चांगलंच स्थूल झालेलं असतं. पण त्याला जुमानतील ते झोपाळू कसले? झोप येईल तेव्हा "मी आता झोपणार!" अशी राजेशाही घोषणा करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. सरळ ताणून देतात. पाहुण्यांची घरं, लग्न समारंभ वगैरे ठिकाणं त्यांना अडवू शकत नाहीत. थोडं पोटात काही ढकललं की निद्रादेवी स्वतःच त्यांना शोधत येते! शिवाय झोपेवर घोरणे बोनस. 'घोरणे ही अघोरी कला यार हो!' हे यांना कोण सांगणार?*
  
  *एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे झोप येत नाही म्हणून रात्री अडीच वाजेपर्यंत मोबाईल चाळणारी मंडळी. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी शरीर आपल्याला काम करू देत नाही. ते आपल्याकडून झोप वसूल करतं. म्हणून माणसं दिवसासुद्धा झोपतात. निसर्गाने आपल्याला छानपैकी पहाट साधनेसाठी, दिवस आपले कर्म करण्यासाठी आणि रात्र झोपण्यासाठी दिलेली आहे. हा क्रम आपल्यापैकी किती जण पाळतात?*

  *झोपेचं महत्त्व त्यांना विचारा ज्यांना रात्री झोपेची इच्छा असूनही झोपच येत नाही. झोप येणं ही त्यांच्यासाठी स्वर्गातलं फळ प्राप्तीची गोष्ट असते. लहान मुलांवर जसा देवाने झोपेचा वरदहस्त ठेवलेला असतो, तसा मोठ्यांवरही रहावा. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपण्याची इच्छा केली की झोपेने हळूच यावं, आपल्याला तिच्या अदृश्य हातांनी समेटून घ्यावं, आणि उठण्याच्या नियमित वेळी इतरांनी न उठवताच आपोआप डोळ्यांच्या पापण्यांनी अलगद विलग व्हावं...*

*ही कित्ती सुंदर गोष्ट आहे, नाही का ?*


-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Thursday, February 6, 2025

सामान्य माणसं!



सामान्य माणसं!

ग्रहण कोणतंही असो 
सुटणारच असतं आज ना उद्या...
दैन्य कुणाचंही असो,
फिटणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं
ऐरण झाल्यावर सोसवत नाही
हातोडा झाल्यावर मारवत नाही 
आणि आपल्याला मात्र हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार??.. 

अडून पडलेलं प्रत्येक काम 
होणारच असतं आज ना उद्या... 
कष्टाप्रमाणे फळसुद्धा
मिळणारच असतं आज ना उद्या...
पण आपण पडलो सामान्य माणसं 
वाट पाहणं जमत नाही 
जीव कामात रमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

कणभर असो की मनभर असो 
दुःख काय थांबणार असतं?
ते ही निघून जाणारच असतं आज ना उद्या...
जीवघेण्या वेदनेमधून, 
शरीर मुक्त होणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं 
दुःखाला झेलण्याची हिंमत नाही 
भेटल्या सुखाची किंमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

मनासारखंच घडणार असतं 
सगळं काही आज ना उद्या 
पदरात दानही पडणार असतं 
हवं तसंच आज ना उद्या
दारी तोरण सजणार असतं
अंगण गाणी म्हणणार असतं
पण आपण पडलो सामान्य माणसं 
मन ताब्यात राहत नाही 
स्वतःला आरशात पाहत नाही 
आणि तरीही आपल्याला हवं असतं 
सगळं काही मनासारखं !!

काय करणार!?
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Wednesday, January 29, 2025

ये 'इ-पब्लिक' है!

एक मुद्दा, एक विचार!
बुधवार - 29 जानेवारी 2025

▪️
*ये 'इ-पब्लिक' है!*

  _*शोले चित्रपटातील गब्बर सिंगच्या तोंडचं एक वाक्य फार गाजलं होतं, "कितने आदमी थे?" आज जर गब्बर सिंग पुन्हा परतून आला आणि पुन्हा गावात माणसं पाठवली तर तो प्रश्न विचारेल, "कितने मोबाईल थे?" आणि कालिया सांगेल, "सरदार, आदमी चार, मोबाईल आठ!"*_ 

    _*आज परिस्थिती अशी आहे की काही माणसं अक्षरशः मोबाईलवेडी झाली आहेत. काय तर म्हणे सोशल मीडियावर चमकायचं आहे. मंडळी इतकी नादावलीयत की पहाटेच उठून पहिली पोस्ट टाकण्यापासून रात्री लेटनाईटची पोस्ट टाकेपर्यंत सर्व पुण्यकर्म यांनाच करावं लागतं. त्यांच्या जेवणाच्या ताटात मोबाईल ठेवण्यासाठी एक खाचा बनवून घेण्याची वेळ आलेली आहे, कारण मोबाईलशिवाय यांना जेवण जाईनासं झालं आहे. मोबाईलने या लोकांवर काय काळी जादू केली आहे कोण जाणे! कधीकाळी रात्र झाली की भूताखेतांचा सुळसुळाट असे. हडळ, खवीस ही नावं ऐकली तरी घाम फुटे. भीतीने अंगावर शहारे येत. रात्री बेरात्री उठायला लोक घाबरत. मुलं गप झोपत. मोबाईल आल्यापासून गुडूप अंधारात तोंडावर स्पॉटलाईट पाडून रात्रभर हीच भूतं जागी असल्याने ओरीजनल भूतांचा धंदा बंद पडला आहे. मुळात मोबाईल हीच एक जादू आहे. ज्याला इंग्रजीमधलं 'क म्हणता ढ' कळत नाही, त्यालाही मोबाईलच्या स्क्रीनवरचं सगळं इंग्लिश समजतंय म्हणजे काय? जादूच नाही का? लिहिण्या वाचण्याचा जमाना केव्हाच गेला! आता फक्त ‘बघण्याचा’ जमाना आला आहे. आणि बघण्याला ना भाषेचा अडथळा, ना देशाचा, प्रायव्हसीच्या नावाखाली कंटेंटचाही! त्याच्या बदल्यात यांना मिळतं काय, तर डोळ्यांना त्रास, ओव्हरथिंकिंगचा फास, इमोशनल स्ट्रेस आणि अशाच अनेक गोष्टी. काहीतरी, कुठेतरी चुकतंय खरं. पण विचार कोण करणार?*_    

   _*तथाकथित मोठ्यांचं एवढं कर्तृत्व असेल तर लहानग्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? लहान मुलं ते शिकत नाहीत जे मोठी लोकं त्यांना शिकवतात. मुलं ते शिकतात, जे मोठी माणसं करतात! मोठ्यांचं पाहून लहान-लहान मुलंही मोबाईलसाठी आकांडतांडव करीत आहेत. पोरासोरांचं सोडा, आत्ता कुठे डोळे उघडू लागलेलं तान्हं बाळही मोबाईल पाहून हसू-रडू लागलं आहे. त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला तर पप्पांना लाथा मारू लागलं आहे! भलतंच अवघड झालं आहे हे प्रकरण. लहान वयात मुलांना चष्मे लागताहेत. ज्यांचे दुधाचे दातही अजून पडले नाहीत त्यांना चष्मे लागावेत? तोंडी फटाफट उत्तरं देणाऱ्या मुलांना चार शब्द शुद्ध लिहिता येऊ नयेत? काहीतरी, कुठेतरी चुकतंय मंडळी.*_

  _*मोबाईलचा केवळ गरजेपुरता वापर करणाऱ्या आणि उरलेला अधिकाधिक वेळ मोबाईल जाणीवपूर्वक बाजूला ठेऊन जिवंत माणसांसोबत घालवणाऱ्या समंजस लोकांना दंडवत घालावासा वाटतो, तो यामुळेच!*_

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Sunday, January 26, 2025

तिरंगा

हिमशिखरांच्या माथ्यावरती डौलाने फडकतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!

स्वातंत्र्याचे प्रतीक, आमच्या अभिमानाची भाषा
एकजुटीचे निशाण आमच्या जगण्याची अभिलाषा
भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

देशाच्या रक्षणास आहे तत्पर सदा तिरंगा
शत्रूच्या गोळीला देई उत्तर सदा तिरंगा
शूरवीरांच्या खांद्यावरती तेजाने तळपतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

जात धर्म पंथाहून आहे प्रत्येकाला प्यारा
भारत माता की जय म्हणता, अंगा येई शहारा
पुढारलेल्या देशांच्या पंक्तीत आता बैसतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो

नव्या पिढीच्या स्वप्नांमागे भक्कम उभा तिरंगा
रोज नव्या क्षितिजांना गाठत असतो नवा तिरंगा
चिल्यापिल्यांच्या छातीवरही पहा कसा शोभतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
जयहिंद.

Wednesday, January 22, 2025

चालण्याची गोष्ट!


*चालण्याची गोष्ट!*

 *आपली वडीलधारी मंडळी नेहमीच पुढच्या पिढीला सल्ला देत आली आहे, "स्वतःच्या पायावर उभे रहा!" पण उभं राहून करायचं काय? हे काही या मंडळींनी सांगितलं नाही. मग माणसं मोठी बेरकी. त्यांनी स्वतःहूनच पुढे "...आणि अखंड चालत रहा!" हे वचन जोडून घेतलं आणि आजन्म चालत राहिली!*

     *कधीकाळी माणूस खाली मान घालुन गपगुमान चालायचा. मग त्याने वेगात चालण्यासाठी सायकल आणली. सायकलवर मन भागलं नाही, म्हणून अजून वेगात जाण्यासाठी मोटरसायकल आणली. मग फोर व्हिलर आणली. मग पोट सुटायला लागल्यावर पुन्हा रिव्हर्स प्रवास सुरू केला! आता शहरात माणसं सकाळी संध्याकाळी चालायला तर जातातच, शिवाय रिक्षाच्या पाठीवर 'वजन वाढवा /कमी करा नाहीतर पैसे परत मिळवा' अशा जाहिरातीही डकवतात! शिवाय चार पाच हजाराचे प्रोटीन्सचे डबे विकून पैसेही कमवतात!!*

    *माणसाला खायला लागतंच किती? दोन हातांची ओंजळ करा. तिच्याकडे पहा. या ओंजळीत जेवढं अन्न मावेल तेवढीच आपली एक वेळची अन्नाची गरज. बरं, आपण खातो किती? करा विचार! आधी पोटाला दोन घास मिळावेत म्हणून माणसं पायपीट करायची, आता गरज नसताना दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्लेले दोन घास जिरावेत म्हणून पायांचं पीठ पाडतात! काखुटीला संसार बांधून माणसं गावोगाव, मैलोन्मैल चालायची, आता जॉगिंग ट्रॅकला खड्डे पडेपर्यंत चकरा मारतात! अगोदर चालण्याच्या भरात आपण किती अंतर कापलं याचं माणसांना भान नसायचं. आता पेडोमीटर लावून 'आपण दहा हजारांपैकी किती पावलं चाललो?' ते चेक करतात, आणि स्वतःच सेलिब्रेट करतात!* 

  *'आपण चालायला गेलं पाहिजे' चा साक्षात्कार अगोदर घरातल्या एकाला म्हणजे नवरा किंवा बायकोला होतो. मग 'मीही जाते/ जातो' म्हणत संसाराचं दुसरं चाकही त्या गाड्याला सामील होतं. पण जे घरी तेच दारी. नवऱ्याची सुरू होते बडबड, बायकोला हवी असते शांतता. एकाचा स्पीड असतो जास्त तर दुसऱ्याचा कमी. नवरा म्हणतो 'तू जरा पटपट चल.' बायको म्हणते, 'तुम्ही जरा हळू चला, नाहीतर निघा पुढे.' हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. दोघेही आपापल्या परीने घामाघूम होऊन घरी येतात! ज्यांचे ट्युनिंग उत्तम जमते त्यांची वजनं कमी होतात, इतरांची तशीच राहतात!*

    *अनेक माणसं त्यांच्या अनेक तऱ्हा. मात्र या सर्वांमध्ये उठून दिसतात ते ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता नित्यनेमाने पहाटे किंवा आपल्या ठराविक वेळेला ग्राउंडवर, रस्त्याने किंवा ट्रॅकवर दिसणारे. हे बऱ्याचदा एकटेच असतात. वय इथे मॅटर करत नाही. चालणं हा त्यांच्या दररोजच्या आयुष्याचा भाग झालेला असतो. 'कॉन्स्टंट वॉकिंगमधल्या मेडिटेशन' चा अनुभव ते घेतात. आरोग्य तर राखलं जातंच; परंतु महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वतःशी अंतस्थ संवाद होतो, जो त्यांना चांगला माणूस बनवतो.*

  *तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे 'आपुलाची वाद आपल्यासी' चा अनुभव प्रत्येकाला घेता यायला हवा. स्वतःला तटस्थपणे चाचपून बघता यायला हवं. आत्मचिंतन व्हावं. आपल्या ध्येयपथावर आपण बरोबर चालतो आहोत की नाही? आपलं नेमकं कुठे चुकतंय? आपल्यामध्ये काही बदल करायचा असेल तर काय आणि कसा केला पाहिजे? व्हॉट नेक्स्ट? या सर्वांची झाडाझडती घेता यावी. या एकट्याने चालण्याच्या वेळेला ती घेता येते, आणि विशेष म्हणजे शोधणाऱ्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरंही सापडतात.*

 *बाय द वे, तुमचा स्वतःशी संवाद होण्यासाठी तुम्ही काय करता?*

-प्रा. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
_चलसंवाद : 9423542224_
 
https://www.youtube.com/c/ProfRajShelke

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...