Thursday, February 26, 2026

सोपस्कार


*सोपस्कार !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*25 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*सोपस्कार*

 *मंडळी, आठवतंय? लहानपणी सकाळी आपली अंघोळ झाल्यावर आई कौतुकाने आपल्याला तिच्यासमोर बसवायची. तिच्याकडे गंधाची एक बोटभर लांबट अशी डबी असायची. आपली इवलीशी हनुवटी तिच्या डाव्या हातांच्या काही बोटांच्या चिमटीत ती अलगद पकडायची, त्या डबीतला लालभडक किंवा चॉकलेटी गंध झाकणालाच असलेल्या लांबट काडीने आपल्या कपाळी रेखायची. आपण त्यावेळी साक्षात बाळकृष्ण, बाळराधा, बाळहनुमान, बाळराम वगैरे दिसायचो.*

    *गालांवरून अगदी मोरपीस फिरवावं तसे आई दोन्ही हात फिरवायची, नि आपण तिच्याकडे नुसतंच निरागस नजरेने बघत असायचो. तिचं आपल्याकडे बघून झालं की ती म्हणायची, “जा आता खेळायला! तिने असं म्हटलं, की जणू जग जिंकायला निघालेल्या वीराप्रमाणे शक्तिमान होऊन आपण खेळायला निघायचो! आठवतंय? किती सुंदर काळ होता तो!*
   *आता जेव्हा कळतं की आईच्या कपाळीचं कुंकू असो, की तिने आपल्या कपाळी लावलेला गंध किंवा टिळा असो, या गोष्टी लावण्यामागे आपल्या शरीरातलं सर्वात प्रभावी जे आज्ञाचक्र त्याचं रक्षण व्हावं हा निर्मळ हेतू होता, तेव्हा आपल्या महान संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटू लागतो. पण हळूहळू आपण संस्कृतीपेक्षाही महान झालो! आधुनिकतेच्या लाटेत स्त्रियांनी कुंकवाचा आकार छोटा-छोटा करत एके दिवशी कुंकवालाच तिलांजली दिली आणि थेट टिकलीवर आल्या! तशा बाथरूमच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या! टिकल्यांचेही इतके आकार-प्रकार झाले, की साडी कोणत्या रंगाची घातलीय त्यावर टिकली केवढी आणि कोणत्या रंगाची लावायची हे ठरू लागलं.*

 *इकडे बाप्या माणूस कोणत्या देवाला किंवा गुरुजींना फॉलो करतो त्याच्यावर त्याची गंध लावायची पद्धत ठरू लागली. माणसं आधीही गंध लावायचीच, पण एकसारखा. आता ‘गंध एक बोटाचा लावायचा, की तीन बोटांचा? उभा लावायचा की आडवा? एक ठिपक्याचा की दोन!’ एक न अनेक प्रकार! आता मंगळसूत्राला लपायला जागा हवीय, आणि गंधाने मात्र प्रदर्शनार्थ उचल खाल्लीय!*

   *अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत गंध लावलेली मंडळी सात्विक, सुस्वभावी वगैरे वाटत असत. हल्ली काही ठिकाणी ते जरा जास्तच अंगावर येऊ लागलं आहे. समाजातील अपप्रवृत्तींच्या कपाळीही गंध हटकून दिसू लागलाय. समोरच्या माणसाला बघताक्षणीच भीती वाटावी किंवा त्याच्यावर दबाव पडावा असा आक्रमक, भडक गंध वा कुंकू मुद्दाम लावून मिरवणाऱ्या या माणसांच्या गावी ‘आज्ञाचक्र’ हा शब्द तरी असेल का?*

    *मंडळी, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला नक्की जपायच्या आहेत; मात्र त्यांचा विपर्यास होणार नाही याचं भान समाज म्हणून आपल्याला ठेवावंच लागेल, कारण गंध कपाळावर असतो; पण माणसात देव पाहण्याचे संस्कार मनात असतील तरच तो अर्थपूर्ण ठरतो, अन्यथा तो उरतो फक्त आणि फक्त सोपस्कार!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


Thursday, February 19, 2026

आड आणि पोहरा

*आड आणि पोहरा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*18 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आड आणि पोहरा*

*एका नवीनच रंग दिलेल्या घराला भेट देण्यासाठी दुसरं एक कुटुंब आलं. घर छान सजवलेलं होतं. सगळं काही एकदम फ्रेश! सगळेजण घराची स्तुती करत चहा, फराळ आणि गप्पांमध्ये गुंतले असताना पाहुण्याच्या आठ-दहा वर्षाच्या मुलाने हातातल्या गाडीच्या चावीने घरातल्या नव्या कोऱ्या भिंतीला खरवडून टाकलं, आणि महागामोलाचा पेंट लावलेली भिंत सगळी विद्रूप करून टाकली! घर ज्यांचं होतं त्यांनी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनात काय वादळ उठलं असेल बरं? करा विचार! तुमचं घर असतं तर तुम्ही काय केलं असतं? त्या मुलाच्या घरच्यांकडून तुम्ही काय अपेक्षा केली असती? त्यांनी मुलांना बाहेर जाण्याआधीच ‘तिकडे कसं वागावं’ हे जरा सांगायला पाहिजे होतं, नाही का?*

*आपण माणसांच्या समाजात राहतो. हा समाज हजारो वर्षांपासून इथपर्यंत सुरळीत चालत आला कारण माणसांनी स्वतःच्या आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांच्या जगण्याला काही फुटपट्ट्या लावून घेतल्या, काही नियम घालून घेतले आणि त्यांची मर्यादाही वारंवार सांभाळली. बाप नावाच्या माणसाचं वागणं कसं असावं, मुलांनी कसं वागावं, पाहुण्यांनी कसं वागावं वगैरे. माणसं या जगण्याच्या फुटपट्ट्या निरंतर जपत आली आहेत. एकमेकांचा आदरयुक्त धाक ठेवत आली आहेत. समाज आपल्याला काय समजतो, आणि आपण कसं वागलं पाहिजे याचं एक अनामिक बंधन लोकांनी घातलेलं अगदी कालपर्यंत तरी दिसत होतं, म्हणून सगळं सुरळीत होतं. जगण्यात एक अदब होती.*

 *आता काही लोक हळूहळू या फुटपट्ट्या सोडून द्यायला लागले आहेत. आता तुम्ही सगळ्याच दुकानदारांकडून चांगल्या मालाची अपेक्षा करू शकत नाही. डॉक्टरांकडून चांगल्या वैद्यक सेवेची अपेक्षा करू शकत नाही. सुतार तुमचं फर्निचर चांगलं बनवेलच याची आता खात्री राहिलेली नाही. सरकारी कर्मचारी लाच न घेता काम करेलच असं नाही. पोलीस चोराला पकडल्यावर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवेलच याची खात्री नाही. न्यायाधीश खराखुरा न्याय देतीलच असं नाही. ज्यांच्याकडून कधीही व्यसनाची अपेक्षा केली नव्हती, ते गटारात; तर जे इतरांना ज्ञानामृत पाजत होते ते अश्लीलतेच्या प्रकरणांमध्ये रंगेहात सापडत आहेत. दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे रात्री दारूच्या पार्ट्यांमध्ये झिंगून पडलेले दिसत आहेत. निवडून दिलेले सगळे राजकीय लोक हे तसे सामान्य माणसांचे सेवक; पण ते आता आपले मालक असल्यासारखे वागू लागले आहेत! समाजात अतिशय सात्विक चेहरा असलेल्या माणसांचा दुसरा चेहरा इतका भयावह आहे की भीतीने थरकाप व्हावा!*

 *हे सगळं असं आणि असंच आहे. मोठ्या माणसांनीच ताळतंत्र सोडलंय, मग यापुढे त्या भिंत खरवडणाऱ्या मुलाला तरी दोष देऊन उपयोग काय? शेवटी जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार! मंडळी, छत्रपती शिवरायांचं स्मरण करूया, त्यांच्यासारखं होऊया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यापुरता का होईना आड स्वच्छ ठेऊया!*
*जय जिजाऊ! जय शिवराय!*
🚩
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Tuesday, February 10, 2026

तीन सोनेरी शब्द

*तीन सोनेरी शब्द!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*10 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*तीन सोनेरी शब्द*

*एका शाळेत एक खेळ करून दाखवणारा आला. मुलं उत्सुकतेने त्याच्याभोवती जमली. त्याने पिशवीतून तीन चेंडू काढले, प्रत्येक चेंडूवर काहीतरी लिहिलेलं होतं. त्याने त्यातला एक चेंडू हवेत फेकला. तो खाली यायच्या आत अलगद दुसरा आणि तिसराही उचलला. आता एक चेंडू हवेत, दोन चेंडू हातात. आणि मग इतक्या सफाईदारपणे ते तीनही चेंडू त्याने हवेत गोलगोल फिरवले की मुलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या!*

 *एका चाणाक्ष मुलाने कळीचा प्रश्न विचारला, “तुम्हाला हे चेंडू कसेकाय फिरवता येतात? खेळवाला म्हणाला, “सोप्पंय. कोणतेही दोन चेंडू आपल्या दोन्ही हातांना गुंतवून ठेवतात. मात्र त्या दोन चेंडूंच्या बदल्यात हवेत उंचावलेल्या तिसऱ्या चेंडूचा आपल्याला आनंद घेता येतो.” एका मुलाने म्हटलं, “आम्ही पाहिलं, या चेंडूंवर तुम्ही काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ते वाचून मग तुम्ही चेंडू फिरवता ना? तो चेंडू हवेत फिरवण्याचा मंत्र आहे का?” खेळवाला म्हणाला, “चेंडूंवर काहीतरी लिहिलंय हे खरंय. पण जे लिहिलंय तो चेंडू फिरवण्याचा नाही, तर जीवन जगण्याचा मंत्र आहे!” “बघू! बघू!” म्हणत मुलं त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी एकमेकांवर तुटून पडली! जवळ जाऊन पाहिलं तर फक्त इंग्रजीतली तीन अक्षरं. प्रत्येक चेंडूवर एक अक्षर. टी, एम आणि के! मुलांना काही कळेना. हा कसला एकाक्षरी मंत्र? खेळवाला म्हणाला, “हा साधासुधा मंत्र नाही; गुरुमंत्र आहे! मुलांनी गलका केला, “प्लीज आम्हाला सांगा, प्लीज सांगा!”*

  *खेळवाला म्हणाला, “ही तीन अक्षरं म्हणजे आयुष्यातील तीन सोनेरी शब्द आहेत. लाल चेंडूवरचा टी म्हणजे टाईम; म्हणजे वेळ. हिरव्या चेंडूवरचा एम म्हणजे मनी; म्हणजे पैसा, आणि पिवळ्या चेंडूवरचा के म्हणजे नॉलेज; म्हणजे ज्ञान! वरील खेळाप्रमाणेच आयुष्यात या तीनपैकी कोणत्याही दोन गोष्टी जर गुंतवल्या, तर तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते, तिचा मनसोक्त आनंद घेता येतो!” मुलं म्हणाली, “म्हणजे?”*

*खेळवाल्याने समजावून सांगितलं, “बघा, वेळ, पैसा आणि ज्ञान यापैकी तुम्हाला जर ज्ञान हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल, सोबत पैसेही भरावे लागतील. कारण फुकट काही मिळत नाही! तुम्हाला जर पैसे हवे असतील, तर तुमचं ज्ञान, कला आणि तुमचा महत्वाचा वेळ लोकांना द्यावा लागेल, तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतील, आणि जर तुम्हाला स्वतः ला मोकळा वेळ हवा असेल, तर जे काम तुम्हाला करायचे आहे त्यासाठी त्या कामातील ज्ञानी माणूस नेमून तुम्ही मोकळे राहू शकता, मात्र तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागतील! म्हणजे दोन गोष्टी गुंतवल्या की तिसरीची प्राप्ती होते! हो की नाही?” मुलांनी “होsss” म्हणत जोरदार टाळ्या वाजवल्या! मुलांना आज एक नवीन गोष्ट समजली होती.*

 *मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यात या तीनपैकी कोणत्या दोन गोष्टी गुंतवत आहात, आणि त्यांच्या बदल्यात तुम्हाला कोणती तिसरी गोष्ट मिळतेय? करा विचार!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, February 4, 2026

अंतिम ध्येय

*अंतिम ध्येय!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अंतिम ध्येय*

*एखाद्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर तो म्हणेल की मला अमुक एका गोष्टीत उत्तुंग यश प्राप्त करायचं आहे. शेकड्यातल्या जवळपास प्रत्येकाचं ‘गडगंज श्रीमंत होणं’ हे ध्येय आहे. पण हे खरं माणसाचं अंतिम ध्येय नसतंच मुळी. लोक लक्ष्यालाच ध्येय समजतात!*

 *ध्येयाच्या नावाखाली विद्यार्थ्याला शालांत परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवायचे आहेत. तरुणाला किमान २०-२५ लाखाचं पॅकेज असलेला जॉब मिळवायचा आहे. कुणाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे, कुणाला स्वत:चा बिझनेस सेट करायचा आहे. मनात स्वप्न पाहिलेली प्रॉपर्टी बनवायची आहे. वृद्धत्वाकडे झुकलेला असेल तर त्याला देवदर्शनाची आस आहे.*

 *मात्र या सगळ्या नद्या आहेत केवळ, अंतिम ध्येयाच्या समुद्राकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्या. त्या माणसाला खुणावत राहतात- ‘ये आमच्या प्रवाहात, आम्ही तुला तुझ्या खऱ्या ध्येयाचा पत्ता सांगतो; त्याचं घर दाखवतो.’ जुन्याजाणत्या लोकांमध्ये बसलं की कळतं की वरीलपैकी एकही नदी समुद्राला मिळताना निर्मळ राहत नाही. अपेक्षांचा आणि अपेक्षाभंगाचा, यश-अपयशाचा, दु:ख-वेदनेचा, लालसा आणि वासनेचा, विश्वासघाताचा, भ्रष्ट आचारविचारांचा, बिनडोक माणसांच्या अक्कलशून्य वागण्याचा इतका गाळ या नद्या वाहून आणतात की त्या जिथे पोहचू पाहतात, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर सगळी दलदल होऊन जाते. त्या दलदलीत पाय पडायचा अवकाश, की काळपुरुषाने एकाच झडपेत माणूस गिळलाच म्हणून समजा! जिथे नद्यांची ही अवस्था तिथे त्यांच्या पुराच्या पाण्यावर स्वार होऊ पाहणाऱ्या चिनपाट माणसाची काय कथा? कित्येक माणसांना तर या नद्याच अर्ध्यावर ‘या नाहीतर त्या’ काठाला भिरकावून देतात. माणसं तोंडघशी पडतात. तोंड सोलून निघतं. तरी पिंड जळाला तरी सुंभ तसाच राहतो. पुन्हा दुसरी नदी; पुन्हा दुसरी लहर. दिसलं पाणी की मार उडी! पुन्हा कोणी तळाशी, तर कुणी पल्याड भिरकावलेला! चाकाचा शोध लागल्यापासून हे अविरत सुरूच आहे; आणि अजून पुढची अनंत वर्षे थांबेल असं वाटत नाही.*
    
       *तुम्ही म्हणाल असा हा ध्येयाचा खरा समुद्र तरी कोणता आहे? या समुद्राचं नाव आहे, आनंदसागर!माणसाच्या आयुष्याचं खरं अंतिम ध्येय आहे आनंदी होणं! त्याची सगळी धडपड खरी त्याच्यासाठी आहे. पण त्याला हे समजत नाही की आपण मुळातच आनंदरूप होतो! पुन्हा त्याचा शोध घेण्याची गरज नव्हती! फक्त जगायची बात होती!! पण प्रत्येक वेळी नदीतल्या गाळामुळे गोष्ट बिघडते आणि आपल्या मूळ घरी म्हणजे आनंदाच्या डोही आपलं पोहचणं काही होत नाही!*

   *तूर्तास समुद्र जरी नाही मिळाला तरी आपल्यापुरता एखादा आनंदाचा छोटासा डोह आपल्या आसपासच कुठेतरी शोधायला काय हरकत आहे? उगाच तुकोबांनी म्हटलेलं नाही...*
*आनंदाचे डोही, आनंद तरंग*
*आनंद चि अंग आनंदाचे!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, January 29, 2026

थिंकोनी कमेंटावे!

*थिंकोनी कमेंटावे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*28 जानेवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*थिंकोनी कमेंटावे!*

   *स्टुपिड कमेंट्स केल्याशिवाय ज्यांचा डेटा ते स्वतः दोघांनाही गप्प बसवत नाही, असे काही लोक सोशल मीडियावर जन्माला आले आहेत. ‘दिवसभर विविध इ-भिंतींवर पोष्टी टाकणे आणि लाईक, कमेंट्सची वाट पाहणे, डकवल्या गेलेल्या पोष्टींवर लक्ष ठेवणे, त्या आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक नजरेखालून काढणे, त्यात थोडासा का होईना ‘त्रुटी’ नामक क:पदार्थ आढळतो का ते पाहणे, दिसल्यास तत्काळ त्यावर तुटून पडणे, सर्वशक्तीनिशी कमेंटवार करून समोरच्याला गारद करणे आणि मोहीम फत्ते करून विजयीमुद्रेने पुढील पोष्टमोहिमेवर निघणे!’ हा यांचा शिरस्ता. हे सगळं कशासाठी? तर आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी! शिवाय आपल्या संपूर्ण तार्किक, अनुभविक, नोस्टेल्जिक, टायपिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून डेटाबळ खर्चल्याचं समाधान मिळविण्यासाठी. कधी हे इतरांना हर्ट करतात, तर कधी स्वतःच तोंडघशी पडतात!*

   *हे कमेंटलेखक केवळ साध्या लोकांच्याच पोस्टवर तिरकं लिहीत नाहीत;  तर मोठ्मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेल्या अनोळखी पोस्टवरसुद्धा तावातावाने कमेंटतात. खूपच घाणेरडा शब्द असेल तर xx अशा फुल्या टाकतात; नाहीतर मग शब्दखेळ, अक्षरबदल करून का होईना आपल्या तिरकस भावना तिथपर्यंत पोहचवतातच! ‘आपली कमेंट एकदा तरी तो सेलिब्रेटी वाचेल’ असे त्यांना वाटते. राजकारणी लोकांनी विरोधी मतं पोस्ट करण्यासाठी चाळीस पैशाने माणसं नेमलेली असतात हेही यांच्या गावी नसते. हे त्यांच्या गर्दीत फुकटच सामील होतात!   ना प्रसंगाचे गांभीर्य, ना कोणत्या वेळी काय कमेंट करावी याचे भान! सगळाच सावळा गोंधळ!*

   *एका मोठ्या नटीला एका मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लोक तुमच्या फोटोवर अतिशय खालच्या शब्दात कमेंट्स करतात ते वाचून तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर तिने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली की ‘सोशल मिडियावरच्या कमेंट आम्ही वाचतो’ हे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढ्या कमेंट्स वाचण्याइतका वेळ तरी आहे का आमच्याकडे? पण तुम्हाला एक मात्र सांगेल. कमेंट्स करणाऱ्याच्या कमेंट्स प्रत्यक्ष तो सेलिब्रिटी जरी वाचत नसला, तरी टाईप करणाऱ्याचे मित्रमंडळ मात्र नक्की वाचत असते, आणि त्यातून कमेंट करणारा कोणत्या लायकीचा आहे हे त्या मित्रमंडळींना कळत असते. वरील सापळा न समजल्यामुळे समाजात सज्जन म्हणून परिचित असलेले अनेकजण इंटरनेटवर मात्र अतिशय खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असतात. एक प्रकारे अशा कमेंट करणारा माणूस खराब शब्द वापरून स्वतःचीच लायकी घालवून घेत असतो, पण त्याला भावनेच्या भरात ते समजत नाही!*

    *कमेंट जरूर करावी, पण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी. व्यक्त जरूर व्हावं, पण आपल्या कमेंटचं मूल्य ओळखून. प्रसंग काय आहे, आपण स्वतः कोण आहोत, आपलं समाजातलं स्थान काय आहे, आपलं लिहिलेलं वाचणारे कोण आहेत याचा विचार करून व्यक्त झालं तर व्यक्तही होतं येतं आणि देवाचं देवपणही टिकून राहतं, म्हणून-*

*'जैसा जगी मान, तैसेचि वर्तावे*
*आणि कमेंटावे, थिंकोनिया!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 21, 2026

अरे संसार संसार जसे कपबशीचे घर

*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
~~~

    *‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर!’ या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्त्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं, ‘अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार...!’ घ्या आता!*

   *कपबशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे. काही घरांमध्ये बशी बसलेली, कप हिंडतोय, काही घरांमध्ये कप बसलेला, बशी मरमर करतेय; तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडताहेत! काही असो, संध्याकाळी कप असो की बशी, घरी येणं भाग आहे. तसाही बशीविना कपाच्या आणि कपाविना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या बशीला नसेल आवडला कप, एखाद्या कपाला नसेल आवडली बशी. काही कपांना वाटतं ‘मीच लै हुशार’; तर काही बश्यांना वाटतं, ‘आमच्या कपाला अक्कलच नाही!’ तरी ‘तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना’ असा सगळा मामला! या अशा अतिशहाण्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा ‘चिवित्र’ जोड्या लावून मजा बघत असतो!*

   *‘जोड्या स्वर्गात बनतात’ असं लोक म्हणतात खरं, पण जे तिकडे चुकांडी देऊन, निसटून पृथ्वीवर येतील, त्यांना इथली जुनी जाणकार मंडळी गंडवतात! ‘काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच’ हा त्यांचा खाक्या. जोड झालाच पाहिजे, मग तो पुढे टिको, ना टिको. ‘आमच्या डोळ्यांदेखत होऊ दे’ च्या नावाखाली घाईघाईत कानतुटका कप किंवा तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळींच्या लक्षातच येत नाही. पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडखड ‘बा’ चा ‘बा’ ची चालू राहते. जिथे बशी शांत तिथे कप तडतड्या. जिथे कप शांत तिथे बशी बडबडी. मग बशीघरात दुसरं काय होणार? कधी कप एकाकी, तर कधी बशी!*

    *‘आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडून घेऊ द्या’ म्हणणाऱ्या आधुनिक कपबश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही. नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेच पाढे! काही कपांना त्यांच्याच बश्यांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही, त्यांचा अहंकार दुखावतो; तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बश्यांना आवडत नाही, त्यांना कप हातातून निसटायची भीती वाटते! पुढारलेल्या शहरातल्या कपबश्यांचं हे आतलं दुखणं आहे. आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का? त्यांच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुखात आहेत.*

   *कपबशीच्या भांडणात ‘माघार कोणी घ्यायची?’ हा फार कळीचा मुद्दा असतो. याचं साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे, ‘ज्याला आनंदी राहायचं आहे, त्याने!’ हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले, की दोघांचंही महत्व अबाधित राहतं. जगणं सोपं आणि सुंदर होतं. म्हणून,*

 _*तुम्हाला जर कधी भेटली अशी भांडकुदळ जोडी*_ 
 _*चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी!*_
_*विस्कटलेल्या संसाराची आणा रुळावर गाडी!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 14, 2026

चुकामुक

*चुकामुक*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*चुकामुक*

  *गावाकडच्या भाविकांचा एक ग्रुप काशी यात्रेला गेला. सगळ्या बाया बापड्यांना आणि धोतर टोपी बाबांना घेऊन जाणाऱ्या एजंटने सांगितलं की एका मोठ्या स्टेशनच्या अलीकडेच आपल्याला छोट्या स्टेशनवर उतरायचं आहे, म्हणजे गर्दी टाळता येईल. ठरल्याप्रमाणे मंडळी उतरली; पण एक आजीबाई गाडीतच बसून राहिल्या, आणि त्यांची चुकामुक झाली!*

 *थोड्या वेळाने उतरलेल्या माणसांपैकी कोणाच्यातरी लक्षात आलं की एक आजी गाडीतच राहिल्या, गाडी निघून गेली! पोक्त वयाची दोन माणसं लगोलग मागून आलेल्या दुसऱ्या गाडीने पुढे गेलेल्या गाडीत राहून गेलेल्या आजीबाईंना शोधण्यासाठी गेली. तिच्या घरच्यांना कळवलं. गावाकडून आजीचे नातेवाईक आजीला शोधायला दुसऱ्या गाडीने गेले. आजी कुठे गेली, कुठे उतरली, तिचं काय झालं, काही कळलं नाही. पुढील प्रत्येक स्टेशनवर उतरून शोध घेतला, पण आजीचा काही मागमूस लागला नाही. उत्तर भारतात, तीही हिंदी पट्ट्यात पहिल्यांदाच गेलेली ही गावाकडची अशिक्षित मराठी आजी कशी बरं सापडायची?*

 *मंडळी खूप थकली पण आजी सापडली नाहीच. सगळ्या यात्रेचा फियासको झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाया बापड्यांचे डोळे रडून रडून कोरडेठाक झाले. आजीचं अंतिम दर्शन कुणालाही झालं नाही. शेवटी आजीच्या घरच्यांनी जड अंतःकरणाने विचार करून निर्णय घेतला आणि पवित्र काशीच्या तीर्थक्षेत्रावर एका घाटावर आजीचा अंत्यविधी पिठाचा गोळा वगैरे ठेवून ब्राह्मणसाक्षीने आरंभ केला. अवघं वातावरण भावूक झालं.*

 *गंगेत स्नानासाठी डुबकी मारलेल्या एका महिलेने जलदान करण्यासाठी पाणी ओंजळीत घेतलं, आणि 'हर हर गंगेsss!' म्हणत अर्पण केलं आणि समोर बघते तर काय? जिचा अंत्यविधी करत होते ती आजी काही अंतरावर घाटावर जिवंतपणे आंघोळ करत होती! एकच गलका झाला. सगळे धावत धावत आजीजवळ गेले. तिचा मुलगा तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. "तू इकडे कशी पोहोचलीस?" विचारल्यावर ती म्हणाली, "गाडीतल्या काही मराठी माणसांशी मी बोलले. ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुमच्या गावाकडची मंडळी काशी यात्रेसाठी इथे काशीला नक्की येतील. आपण तिथे जाऊन थांबूया. म्हणून मी इकडे येऊन तुमची वाट पाहत बसले. तुम्ही का इतका उशीर केलात!?" सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. चुकामुक झालेली आजी शेवटी अशी सापडली! जिवंतपणी आजीचा होऊ घातलेला अंत्यविधी होता होता राहिला!!*

 *आयुष्य हे चुकामुकींचा खेळ आहे. इथे प्रत्येकाची कधी ना कधी, कशाशी तरी, कोणाशी तरी चुकामुक होते.माणसांशी झालेली चुकामुक एखाद्या वेळेला या आजीसारखी दुरुस्त होऊ शकते, परंतु नियतीशी, नशिबाशी, आयुष्याशी झालेली चुकामुक कशी दुरुस्त व्हावी? आयुष्यभर माणूस काहीतरी शोधत राहतो अधून मधून असं वाटतं की आपण जे शोधतो आहोत ते आपल्याला मिळत आहे परंतु खरं पाहिलं तर कोणाला काहीच मिळत नाही. लपाछपीच्या खेळात लपलेला गडी सापडावा आणि तेवढ्यात घरच्यांनी बोलावून घ्यावं तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि हाती काही मिळण्याच्या काळातच देवाजीचं बोलावणं येतं आणि मग कळतं आयुष्य म्हणजे निव्वळ चुकामुक! म्हणून एक वेळेस तिळगुळ दिले नाही तरी चालतील, परंतु गोड बोलायला काय हरकत आहे?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...