Wednesday, April 30, 2025

सांगकामे आणि कामसांगे

*सांगकामे आणि कामसांगे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_30 एप्रिल, बुधवार_

▪️
*सांगकामे आणि कामसांगे*

       *संध्याकाळच्या वेळेला कामावरून  थकूनभागून वडील घरी आले. मुलगा कॉटवर मस्त मोबाईल चाळत बसला होता. वडील हातपाय धुवून बाथरूमच्या बाहेर येतच होते, की तेवढ्यात मुलाने ऑर्डर सोडली, "पप्पा एक ग्लास पाणी घेऊन या." वडील आधीच वैतागलेले होते. म्हणाले, "बापाला काम सांगतोस? लाज नाही वाटत? कानाखाली देईन!" मुलगा म्हणाला, "कानाखाली द्यायला याल तेव्हा पाणी घेऊन या ना प्लीज...!" सी द कॉन्फिडन्स!! या प्रजातीतूनच पुढे ‘कामसांगे’ लोक जन्माला आले.*

 *याच्या अगदी उलट काहीजण, काम असं करतील की समोरच्याने म्हटलं पाहिजे, “राहुदे, करतो मीच!” बिचाऱ्यांनी त्यांच्या मनाने थोडं काही करायचं म्हटलं, की लाखाचे बारा हजार झालेच म्हणून समजा! आहे ते काम बिघडून जातं. मग लोक म्हणतात, "ठोंब्या आहेस नुसता. सांगितलं तेवढं कर. जास्त डोकं लावू नकोस!" आणि मग यातून मनावर दगड ठेवून, इच्छा असूनही सांगितलं तेव्हाच, आणि तेवढंच करणारी, ’सांगकामे’ नावाची प्रजाती जन्माला आली.*

 *अशा प्रकारे कोणी झाले कामसांगे, कोणी झाले सांगकामे!*

   *कुणालातरी काहीतरी काम सांगितल्याशिवाय कामसांग्यांना स्वस्थ बसवत नाही. 'दिसला माणूस की सांग काम!' असा यांचा खाक्या असतो. आज्ञा, विनंती, सल्ला, उपदेश असे प्रकार बदलून का होईना पण इतरांना काही ना काही काम ते सांगतीलच. अगदी बसमध्ये प्रवास करत असतील तरी, 'खिडकी लावून घ्या ना प्लिज!' चं मधाचं बोट शेजारच्याला चाटवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या औषधाचा गुणही येतो!*
 
  *सांगकामे बिचारे कधीही इतरांना काम सांगत नाहीत, उलट इतरांनी सांगितलेलं काम करतात. पण त्याचं श्रेय मात्र त्यांना कधीही मिळत नाही; अपमानच होतो. परंतु मेंदूची काही बटणं त्यांनी अगोदरच बंद करून ठेवलेली असल्यामुळे अपमान, टोमणे, शिव्या या गोष्टींचा या स्थितप्रज्ञ जनांवर काहीही परिणाम होत नाही.*

  *मग इतकं राबुनसुद्धा यशाची माळ कायम कामसांग्या लोकांच्याच गळ्यात कशी? आणि सांगकाम्यांच्या नशिबी वनवास का? त्याचं कारण, कामसांग्यांमधले हुशार लोक. हे बुद्धीने तल्लख असतात. जिथे सांगकाम्या लोकांचा मेंदू बंद पडतो, तिथून यांचा सुरू होतो! वेळप्रसंगी ते संकटाला एकट्याने भिडतात, परिणामांना सामोरे जातात, आणि यश खेचून आणतात. ती हिंमत, जिद्द, आणि तयारी जी त्यांच्यात असते, ती सांगकाम्या लोकांमध्ये नसते! म्हणून अधिकाराची खुर्ची कामसांग्यांना मिळते; सांगकाम्यांना नाही. लोकांनाही काम सांगणारे लोकच आवडतात. फक्त अट एकच. कामसांग्या हुशार असावा; बिनडोक नको!*

   *बाय द वे, तुमच्या वाट्याला कोण आले आहेत? कामसांगे? की सांगकामे?*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, April 23, 2025

पैसा की माणसं?

*पैसा की माणसं?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_23 एप्रिल, बुधवार_

▪️
*पैसा की माणसं?*

*पहाटेच्या गोड गारव्यात शहरातील एक आजी-आजोबा जॉगिंग ट्रॅकवरच्या एका कट्ट्यावर बसून चक्क जोडीने मोबाईल पाहत होते. ‘अजून आलम दुनिया झोपेतच असताना ही जोडी मोबाईलमध्ये काय बरं पाहत असेल?’ या उत्सुकतेने एक जण त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, " बाबा, इतक्या पहाटे ट्रॅकवर आलात खरं; पण मस्तपैकी फेरफटका मारायचा सोडून हे मोबाईल मध्ये काय पाहत बसलात?" बाबांनी मोबाईलची स्क्रीन त्याच्याकडे केली आणि म्हणाले, "ही बघ, माझ्या मुलाने गाडी घेतली." मुलाने घेतलेली फोर व्हीलर आजोबा चक्क मोबाईलमध्ये पाहत होते. माणूस म्हणाला, "अरे व्वा, मस्त आहे गाडी." बाबा म्हणाले, "पण ती इथे नाहीये, अमेरिकेत आहे. तिथून तो आम्हाला दाखवतोय." माणूस म्हणाला," म्हणजे तुमचा मुलगा अमेरिकेत आहे तर! मग तुमच्यासोबत इकडे कोणकोण आहेत?” “कोणीच नाही, आम्ही दोघंच. आमचा बंगला आहे दोन सीआरचा. मागच्याच वर्षी मुलाने बांधून दिला.” “वॉव. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघेच राहता? भीती नाही वाटत?” “कशाची?” “चोरांची वगैरे?” “चोरांची नाही; पोरांची वाटते!”*

 *आता मात्र मात्र प्रश्न विचारणारा चपापला. बाबांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाले, “बाबा रे, आम्हाला हा दोन कोटीचा बंगला आणि हा दोन लाखाचा मोबाईल आमच्या प्रिय मुलाच्या मोबदल्यात मिळाला आहे. दर महिन्याला आमच्या अकाउंटला पैसेही टाकतो तो. पण आता म्हातारपणात या पैशाचं, बंगल्याचं करू काय आम्ही? ज्यांच्यासोबत वेळ घालवायचा तेच पक्ष्याप्रमाणे उडून गेले. झाड इथेच राहिलं. जाताना तो म्हणाला होता, मी लगेच येणार आहे दोन-तीन महिन्यात. म्हटलं काढून घेऊ दोन-तीन महिने. त्याला वर्ष लोटली. आता म्हणतो, मला ग्रीन की कुठलं कार्ड मिळालंय. आम्ही नवरा बायको इकडेच सेटल होणार आहोत. कधीकधी आम्हालाही तिकडे या म्हणतो, पण या मातीची ओढ जाऊ देत नाही. पैसा की माणसं? या द्वंद्वात तेव्हा माणसं निवडण्याच्याऐवजी पैसा निवडला. माणसं दूर लोटली. पण त्या माणसांमध्ये आमचाही क्रमांक लागणार हे तेव्हा कळलंच नाही. खरं तर जे पेरलं तेच उगवलंय. आम्ही आमच्या तरुणपणात नोकरीच्या निमित्ताने आमच्या आईवडीलांना सोडून शहरात आलो. इकडचेच झालो. इकडेच बंगला बांधला. आईवडील गावाकडेच राहिले. तेव्हा त्यांनीही आमची अशीच खूप वाट पाहिली असेल.”*

     *ऐकणाऱ्याने डोळ्यांच्या कडा पुसल्या. म्हणाला, “बरेच दिवस झाले, गावाकडे गेलो नाही. या शनिवार-रविवारी दोन दिवसांसाठी का होईना घरच्यांना भेटून येतो. काय सांगावं त्यांनाही भीती वाटत असेल – पोरगा कायमचा दुरावतो की काय याची!”*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, April 16, 2025

प्रकाशाची बेटं

*प्रकाशाची बेटं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_16 एप्रिल, बुधवार_

▪️
*प्रकाशाची बेटं*

*आपण जन्माला येतो मातेच्या उदरातून, खांद्यावर वडिलांच्या बसतो. मस्ती भावंडांसोबत करतो, खेळतो सवंगड्यांबरोबर. मोठे होतो मित्रांसोबत, जबाबदाऱ्या वाटून घेतो सहकाऱ्यांसोबत. ज्ञानाची देवाण-घेवाण करतो गुरूतुल्य व्यक्तिमत्त्वांसोबत, तर हितगुज करतो काळजातल्या लोकांसोबत. कोणाकडून शिकतो तर कोणाला शिकवतो. कोणाकडून घेतो तर कोणाला देतो. कुणाकुणाला आपण काहीच देत नाही. कुणाकुणाकडून आपण काहीच घेत नाही. फक्त त्यांच्यासोबत राहतो.*

 *आपल्या आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर ही माणसं आपल्याला भेटत राहतात. थोड्या काळासाठी आपल्या सोबत राहतात, नकळत आपल्या आयुष्यात सुखाचं चांदणं शिंपडतात, आणि कोणत्यातरी अवचित वळणावर अलगद आपला हात सोडून निघून जातात; नाहीतर आपला तरी हात त्यांच्या हातातून सुटतो.  आपल्याला जी माणसं मनापासून आवडतात, त्यांचाच सहवास नेमका कमी मिळतो. आपण तो अधाशासारखा टिपून घेतो. एक एक क्षण मनात गिरवत राहतो. अशी माणसं मुळत:च सुगंधी असतात. त्यांच्यासोबत राहिलं की आपल्याला सुगंधी वातावरणात राहिल्यासारखं वाटतं. त्यांनी दिला नाही तरीही सुगंध आपोआप आपल्यापर्यंत पोहोचतोच. त्यांनी स्वतःहून वाटला तर मग त्याची बातच न्यारी! असा सुखाचा, आनंदाचा एक क्षणही मग संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवण्यासाठी पुरेसा असतो.*

     *ही सगळी माणसं आपल्या आयुष्यातील प्रकाशाची बेटं आहेत. आपला अंधारू पाहणारा भोवताल ही माणसं थोड्या काळासाठी का होईना उजळून टाकतात. पण त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात हा गारवा निर्माण झाला आहे याची त्यांना सुतराम कल्पना नसते. तो कृतज्ञभाव जपणं ही आपली जबाबदारी असते. कारण हे सगळे आपल्या आयुष्यातले अल्पकाळाचे थांबे असतात. प्रवासी बदलत राहतात. प्रवास सुरू राहतो. बहुतांश जण विस्मृतीत जातात, एखादा आयुष्यभर लक्षात राहतो, आपली मूक सोबत करतो. त्याने सांगितलेल्या एखाद्या वाक्यावर आपलं उरलेलं अख्खं आयुष्य तग धरतं. मग अशा वेळी आपल्या हाती इतकंच. भेटणारा प्रत्येक माणूस आपल्याला अल्पकाळासाठी भेटणार आहे याची जाणीव कायम मनात ठेवणं. इतक्याशा काळात आपल्यातलं जास्तीत जास्त चांगुलपण त्याला देणं; त्याच्यातलं जास्तीत जास्त चांगुलपण आपल्याकडे घेणं. तेही दोन्ही देवांचं देवपण सांभाळून. एखाद्याने आपल्याला काही चांगलं देऊ केलं तर त्याचा हात ओढून घेऊ नये. आपण एखाद्याला देताना संपूर्णच वाहत जाऊ नये. परंतु उगीचच आखडूपणाचा आवही आणू नये. मोकळं रहावं. आपल्या केवळ सोबत असण्यानेही एखादी जागा सुंदर व्हावी यापेक्षा चांगली दुसरी गोष्ट कोणती!*
-


✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, April 9, 2025

संयमाची गोष्ट

*संयमाची गोष्ट*
_एक मुद्दा, एक विचार!_
_9 एप्रिल, बुधवार_

▪️
*संयमाची गोष्ट*

*"संयमाचा हात थोडा सोडता मी,*
*वादळे धावून आली स्वागताला*
*शब्द माझे ज्या ठिकाणी सैल झाले,*
*दोस्त हो, तेथेच माझा घात झाला!"*

      *प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव येतोच. आपली इच्छा नसतानाही आपला किंवा समोरच्याचा शब्द सुटतो, विषय भरकटतो, काम बिनसतं आणि नंतर 'असं व्हायला नको होतं' असं कित्येक दिवस वाटत राहतं.*

   *मोठ्या लोकांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्या काही पायऱ्या सांगितल्या आहेत त्यात संयम ही फार महत्त्वाची पायरी मानली आहे. पण आपला नारळ या पायरीवरच फुटतो! बहुतेक वेळा आपण बॅकफूटवर जातो, कारण आपला ढळलेला संयम. खास करून भावनिक माणसं मागे पडण्याचं हे खूप मोठं कारण आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेला डोलारा केवळ ऐनवेळी संयम सुटल्यामुळे कोसळतो आणि भरून न येणारं नुकसान होतं.*

   *संयम म्हणजे आपली वेळ येईपर्यंत स्वतःवर चांगल्या प्रकारे ठेवलेलं नियंत्रण. चांगली वेळ सुरू असेल तर तिचा भंग होऊ नये म्हणून दाखवलेलं समंजसपण. किंवा अंगावर धावून आलेली वाईट वेळ निस्तरेपर्यंतचं शांत राहून निर्णय घेण्याचं शहाणपण. आपण जिंकत असताना ठेवलेला संयम आपली गुणवत्ता वाढवतो; तर हरत असताना राखलेला संयम आपल्याला पुन्हा जिंकण्यासाठी उभे करतो. संयम म्हणजे तोंड फुगवून धरलेला अबोला नव्हे. चेहऱ्यावरचं स्मितहास्य ही संयमाची पहिली कसोटी आहे. पण आपण हे विसरतो. आपल्याला कसली घाई झालेली असते कुणास ठाऊक? सर्व काही मनासारखंच होणार असतं. गोष्टी मिळणारच असतात. पण त्या मिळेपर्यंतही आपल्याला दम निघत नाही. लगेच हवं असतं. मग जे मिळणार असतं तेही हातातून निसटून जातं. म्हणून संयम ढळायला लागला की अगोदर "यामुळे माझं काही नुकसान तर होणार नाही ना?" असा स्वार्थी चिमटा स्वतःला काढून पहावा. होणार असेल तर गप्प बसावं. नाहीतर 'दैव देतं अन् कर्म नेतं' अशातला प्रकार होतो. संयम न ठेवल्यामुळे आयुष्यात पडलेला एखादा खड्डा भरून निघण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाच्या पंधरा ते वीस वर्षांची आहुती द्यावी लागते. कधी कधी उरलेलं संपूर्ण आयुष्य त्यातच निघून जातं. मग आपण त्याला साडेसाती म्हणतो.*

    *खरं तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही अदृश्य टप्पे असतात. आपली व्यवस्था नियतीने कोणत्या टप्प्यावर केली आहे हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक टप्पा आपल्याला दिसायलाच हवा असंही काही नसतं. अशावेळी संयमाचं तीर्थ थोडं हळूच मस्तकावर घेता आलं तर किती बरं होईल! नाही का?*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, April 2, 2025

हप्त्यांवरचं जगणं

*हप्त्यांवरचं जगणं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_2 एप्रिल, बुधवार_

▪️
*हप्त्यांवरचं जगणं*

   *जेव्हापासून ईएमआय म्हणजे हप्त्यावर वस्तू मिळण्याची सोय झाली आहे, तेव्हापासून लोकांच्या खरेदीला अगदी भरतं आलं आहे. 'हप्ते पे देंगे तो दुनिया भी खरीद लेंगे!' इतका लोकांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. हसण्यावारी नेण्याच्या गोष्टी हप्त्यावारी मिळायला लागल्यापासून लोकांची गाडी सुसाट सुटली आहे. 'बचेंगे तो और भी भरेंगे!' या भरवशावर शोरूम्समध्ये आणि बिल्डरांकडे ग्राहकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. 'कितने ज्यादा भरेंगे?' हा विचार करायला कोणालाही वेळ नाही. सगळं जगणंच हप्त्यावर झालं आहे.*
 
*कधीकाळी लोक आपली पायरी ओळखून असत. 'उंटाच्या बुडाचा मुका घेऊ नये' अशा समजावणीच्या भाषेत सांगत. 'अंथरूण पाहून पाय पसरण्याचा' सल्लाही देत. पण आता, 'आहे तरुण तर घे मजा करून!' म्हणणाऱ्या नव श्रीमंतांचा  जमाना आहे. 'हप्ते भरू पण श्रीमंतच दिसू!' च्या व्हायरसने ज्याला त्याला पछाडलंय. अजून मिसरूडही न फुटलेल्या पोरांच्या बुडाखाली लाखांच्या गाड्या आल्या आहेत. ज्यांच्या बापांकडे स्क्रीन फुटलेला सॅमसंग आहे त्या पोरांकडे सिक्सटीन प्रो मॅक्सचा आयफोन आहे. ज्यांनी रोखीने मारुती आठशे घेतली नसती ते आठ दहा लाखाच्या पुढच्या गाड्या मिरवत आहेत. सगळी ईएमआयची आणि बापाची कृपा. मोबाईलने बँकच खिशात आणून ठेवल्याने फोन पे, गुगल पे पसरून "हप्त्यापुरते पैसे टाक ना!" म्हणणारे नवे जीव हप्त्यांवर खरेदी न करणाऱ्याला मात्र “तुमचा सिबिल स्कोर खराब आहे का?” असं विचारून धन्य करू लागले आहेत!*

     *खरंतर ज्यांना खोऱ्याने पैसा येतो आहे त्यांची कॉपी करण्याचा सामान्यांनी प्रयत्न करू नये. आहे त्यातही आनंदाने, समाधानाने जगता येतं. फारफार तर आपल्याला पेलवेल इतक्याच किंवा त्यापेक्षाही कमी हप्त्यावर, जिच्यामुळे आपली महत्वाची अडचण दूर होणार आहे अशीच गरजेची गोष्ट खरेदी केली तर समजण्यासारखं आहे. पण हाव आणि नातेवाईकांमध्ये खोटा दिखावा करण्याची हौस माणसाला स्वस्थ बसू देत नाही. 'करू ऍडजेस्ट' म्हणत आवाक्याबाहेरची खरेदी माणसं करतात. नंतर हप्ते भरताना नाकी नऊ येतात. हप्त्याची तारीख आली की चेहरे चिंताक्रांत आणि उदास होतात. सगळे हप्ते कट होऊन काहींच्या हाती केविलवाणी रक्कम उरते. आपल्या डोळ्यांदेखत आपली गाडी फायनान्सवाले घेऊन जातात आणि “उरलेली सगळी रक्कम भरा तरच तुम्हाला गाडी परत मिळेल” म्हणतात, किंवा घराला सील लावतात, तेव्हा जीवाला काय बरं वाटत असेल? पण सांगणार कुणाला? 'पळा पळा रे पुढे पळा!' च्या शर्यतीत कासव व्हायला कुणीही तयार नाही. सगळ्यांना न झोपणारा ससा व्हायचं आहे. मात्र गोष्ट कालही तशीच होती; आजही तशीच आहे. काल ससा हिरवळीवरचे गाजर खाऊन झोपला होता, आज ईएमआयचे गाजर खाऊन कायमचा झोपतो आहे इतकंच. म्हणून हप्त्यावर खरेदी करताना जिल्ह्यापेक्षा तालुका तर मोठा होत नाही ना? हे आधी पहावं, मग पाऊल उचलावं.*
*नाहीतर कुण्या कवीने लिहून ठेवलेलंच आहे,* 

*पायरी आहे कुठे, अन् चालली दुनिया कुठे*
*जग बुडवतिल एकदा, शेफारलेली माणसे!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 26, 2025

बापाचे मालक होऊ नका

*बापाचे मालक नका होऊ*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 मार्च, बुधवार_

▪️
*बापाचे मालक नका होऊ*


 *प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटीने आगार सोडलं आणि कंडक्टरसाहेब "तिकीट! तिकीट!" करत मोहिमेवर निघाले. निम्मी बस लाडक्या बहिणींनी आणि उरलेली ज्येष्ठांनी भरलेली असल्यामुळे दर्दी कमी आणि हाफ तिकीटवाली गर्दीच जास्त होती. त्यामुळे उत्पन्न वाढीचा प्रश्न नव्हताच. उलट कंडक्टरना पैशाची खणखण कमी आणि वाद घालणाऱ्या प्रवाशांची भनभन जास्त ऐकावी लागणार होती. तेही तशी तयारी करूनच आले होते.*

    *अवाढव्य शरीरांच्या गर्दी आणि गोंगाटामधून आपला देह कसाबसा ओढून काढत कंडक्टर एकदाचे मागच्या प्रवाशांपर्यंत पोहोचले. एक गृहस्थ हातात पैसे धरून त्यांच्याकडेच पाहत होते. कंडक्टरची आणि त्यांची नजरानजर होताच त्यांनी पैसे त्यांच्या हातावर सोपवले आणि गावाचं नाव सांगितलं. अर्थातच हाफ तिकीट होतं. कंडक्टरनी पैसे मोजले तर भरले पंचावन्न रुपये. मधल्या काळात भाववाढ झालेली बाबांना माहीत नसावी म्हणून कंडक्टरनी त्यांना सांगितलं, "बाबा अजून पाच रुपये द्या." बाबा म्हणाले, "तिकीट पंचावन रुपये हाय ना?" कंडक्टर म्हणाले, "आहे नाही, होतं! आता पाच रुपये वाढले." बाबा म्हणाले, "कवा?" कंडक्टर म्हणाले, "कवा काय? मागच्याच हप्त्यात." बाबा म्हणाले, "पण माझं पोरगं तर म्हणलं पंचावनच रुपये लागतेत." "त्याला भाव वाढ झालेली माहीत नसेल. द्या पाच रुपये", कंडक्टर म्हणाले. बाबांचा चेहरा पडला. व्याकुळ नजरेने कंडक्टरकडे बघत म्हणाले, "त्यानी इतकेच दिलते." "काय? इतकेच पैसे देऊन तुम्हाला एसटीत बसवून दिलं??" "व्हय." "आणि परत यायला पैसे? रस्त्यात चहा पाण्याला लागले तर?" बाबांकडून उत्तर आलं नाही. पण त्यांचा हताश चेहरा बरंच काही सांगू पाहत होता. कंडक्टरसाहेबांचं डोकं गरगर करायला लागलं. डोळ्यासमोर त्यांच्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा उभा राहिला. समोरच्या बाबांच्या रूपाने त्यांचे वडील त्यांच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत होते. प्रश्न पाच रुपयांचा नव्हताच. त्यांनी बाबांना तिकीट दिलं पण त्यांच्या डोळ्यांत बघण्याची त्यांना हिंमत होईना. "इतकेच पैसे देऊन बापाला एसटीत बसवून दिलं??" प्रश्न वेताळाचं रूप घेऊन त्यांच्या मानगुटीवर बसला. प्रवास संपला. प्रवासी घरी गेले. प्रश्न कंडक्टरसोबत सहकुटुंब त्यांच्या घरी आला.*

   *प्रवासाला निघालेल्या बापाच्या हातावर फक्त जाण्यापुरते हाफ तिकिटाचे पंचावन्न रुपये टेकवताना त्याच्या तरुण कर्त्या मुलाला काहीच वाटलं नसेल का? की मुलाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून बापालाच अधिक पैसे मागण्याची हिंमत झाली नसावी? की बाप तेही पैसे पोराला न सांगता दुसऱ्याकडून उसने घेऊन आला होता? की वडिलांनी अशा वृद्धापकाळात प्रवासाची दगदग करू नये म्हणून त्याने त्यांच्या काळजीपोटी खोटी कडकी दाखवली, जेणेकरून ते जाणार नाहीत, घरीच राहतील? की खरोखर आजकालच्या कमावत्या मुलांनी आई-वडिलांवर अशी लाचारीची वेळ आणली आहे ज्याची त्यांना बिलकुल जाणीव नाही? प्रश्नांचं मोहळ उठलं.*

  *अस्वस्थ कंडक्टरनी दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर इतकंच लिहिलं, "हाती पैसे आले म्हणून मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी!"*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, March 19, 2025

चांगुलपण दे गा देवा!

**चांगुलपण दे गा देवा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 मार्च, बुधवार_

▪️
*चांगुलपण दे गा देवा!*

   *समाजात काही माणसं चांगल्या स्वभावाची असतात, काही धूर्त, धोरणी, लबाड. चांगल्या माणसांचे खायचे दात चांगले असतात, धूर्त माणसांचे दाखवायचे. चांगली माणसं चेहऱ्याने चांगली असतीलच असं नाही, मात्र धूर्त माणसांच्या पदरात कधीकधी 'लंगूर के हाथ अंगूर' या न्यायाने देखणेपणाचं दान पडलेलं असतं, त्याचाही ती योग्य वेळी बरोब्बर शस्त्र म्हणून उपयोग करतात.*

    *चांगल्या माणसांना धूर्तांचा कावा लक्षात येत नाही. मुळात ती माणसं धूर्त आहेत हेच त्यांना कळत नाही. कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. तोपर्यंत धूर्त माणसं चांगल्या माणसांशी त्यांना हवी तितकी जवळीक साधून त्यांना हवं ते काम त्यांच्याकडून काढून घेतात. चांगली माणसं असतात केवळ प्रेमाची भुकेली. दोन शब्द कोणी प्रेमाचे बोललं की ही माणसं भाळतात. धूर्त माणसांना हे चांगलंच ठाऊक असतं. त्यांना जितकं ओरबाडायचं असतं तेवढं ओरबाडून झालं की धूर्त माणसं शिताफीने हळूच अंग काढून घेतात. काम झालं की त्या माणसाला खड्यासारखं बाजूला करतात. नंतर ओळख द्यायलाही त्यांना वेळ नसतो. ना ते त्यांचा कॉल उचलतात, ना त्यांच्या मेसेजला उत्तर देतात. नंतर चांगल्या माणसांनी त्यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवायची. दुर्लक्षित होण्याची किंवा अपमानित होण्याची!*

    *चांगल्या माणसांना सुरुवातीला हे फार अवघड जातं. पण जेव्हा ती भानावर येतात, तेव्हा त्यांना अधिक स्पष्ट दिसू लागतं. मात्र ती त्यांचं चांगुलपण सोडत नाहीत. समुद्रातून एक लोटा पाणी कोणी घेऊन गेलं तर समुद्राला काही फरक थोडाच पडतो? तसंच चांगल्या माणसांच्या बाबतीत होतं. उलट त्यांना फसवणाऱ्या धूर्त माणसांची नंतर कधीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची व त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नाही. हा चांगुलपणाचा विजय असतो.*

    *याउलट फसवणूक झालेल्या काही चांगल्या माणसांना वाटू लागतं की ' माझ्या चांगुलपणामुळे माझ्यावर खूप अन्याय झाला आहे'. मग ही माणसं स्वतःच इतरांशी धूर्त लोकांसारखी वागू लागतात. कामापुरतं गोड गोड बोलतात, काम झालं की ओळख देत नाहीत. बिझी असल्याचं भासवतात. ब्लॉक करतात. मग इतर लोक या कधीकाळच्या चांगल्या माणसांनाही स्वार्थी, धूर्त, लबाड, खडूस समजू लागतात. त्यांच्या तोंडावर त्यांना हे स्पष्टपणे ऐकवतात. तीही मख्खपणे ऐकून घेतात. इथे समुद्राचं डबकं होतं. चांगल्या नावाला बट्टा लागतो आणि चांगुलपणाची मान शरमेने खाली जाते.*

   *म्हणून चांगल्या माणसांनी 'आपलं चांगुलपण आपण धूर्तांच्या दावणीला तर बांधत नाही आहोत ना?' हे वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे. शिवाय परिस्थितीने अडलेल्या चांगल्या माणसांना धूर्त समजण्याची गल्लतही नाही केली पाहिजे. कारण मनाचं चांगुलपण प्रत्येकालाच थोडं लाभतं? मोजक्याच लोकांना देवाने बहाल केलेला तो एक सुंदर दागिना आहे. त्याला जीवापाड जपलं पाहिजे.*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...