Friday, August 7, 2026

वास्तांगुणाहूंया!

🔳
*वास्तांगुणाहूंया!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*५ ऑगस्ट २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, 

▪️
*वास्तांगुणाहूंया!*

*शहाण्यासुरत्या म्हणवल्या जाणाऱ्या माणसांचा जमाना असा इतक्या लवकर संपून जाईल असं वाटलं नव्हतं! कालपर्यंत नाक साफ करायची अक्कल नसलेल्या लहानसहान पोरांनी चार-सहा इंचाच्या मोबाईलचा ताबा घेतल्यापासून मोठ्यांना केव्हाच सामाजिक पटलावरून हद्दपार करून टाकलंय. जिकडे पहावं तिकडे नुसता वास्तांगुणाहूंया!*

*कधीकाळी लहान मुलं समाजासमोर अशी स्पष्टपणे अजिबात दिसायची नाहीत. घरातली मोठी माणसे बोलायची आणि लहान मुलं ऐकायची. आता लहान मुलं सांगतात, आणि मोठी माणसं ऐकतात! कधीकाळी आईबाप पोरांना रस्ता दाखवत असत, आता पोरं आईबापांना रस्ता दाखवत निघाली आहेत. आई बापांना फक्त "म्हणजे आम्ही येडे!!" एवढंच म्हणायचं काम त्यांनी शिल्लक ठेवलं आहे. पप्पांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या खुर्चीत बसण्यापर्यंतची या मुलांची लुडबुड समजण्यासारखी होती. पण यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांच्याच वस्त्राला हात घालावा? तोही अगदी बिनधास्तपणे? कहर झाला अगदी!*

*डोंगरांवरच्या मुक्त माकडांना आवरणं जसं कठीण असतं, तसंच इंटरनेटच्या या 'माकड्यांना आवरणं आता कठीण झालंय! अख्ख्या भारतभर पोरं पसरलेली.. कुणाकुणाला आवरणार? आणि कसं आवरणार? लहान पोरांवर केस करून त्यांना तुरुंगात डांबलं तर सरकारला स्वतःलाच घरी बसावं लागणार! नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय पोरांनी!! उंडारलेल्या पोरांच्या दोन कानाखाली लावून त्यांना शांत करण्यासारखी परिस्थितीच या पोरांनी ठेवलेली नाही. कारण मोठ्या माणसांच्या नाकाला झोंबणाऱ्या असल्या तरीही या पोरांनी दाखवलेल्या त्यांच्या चुका मात्र नाकारता येणाऱ्या नाहीत! आणि 'एवढंसं पोरगं माझी चूक दाखवतंय का??' म्हणून मोठ्या माणसांना त्या सहन होणाऱ्या नाहीत! सगळा सावळा गोंधळ झाला आहे!* 

*या रेटारेटीत एक गोष्ट मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही. रिल्स बनवून लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादात ह्यांच्यातल्या काही पोरांची भाषा कुठे चालली आहे? त्यांचे हावभाव कुठे चालले आहेत? जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होऊ लागलाय त्याचं काय? अभिव्यक्तीच्या नावाखाली 'वागण्या- बोलण्याची एक पद्धत असते' हेच ही पोरं विसरून चाललीयत की काय? इन्स्टाच्या रिल्सवर लाईक्स येण्यासाठी काहीही करणारी, जयंत्या पुण्यतिथ्यांना गाड्यांच्या टपांवर बिभत्स डान्स करणारी, आणि बघणाऱ्याला बघताना लाज वाटेल असे अश्लील हावभाव कॅमेऱ्यासमोर करणारी मुलं, त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले कोणते संस्कार दाखवू पाहत आहेत? की यांच्या आईवडिलांना याची कल्पनाच नाही? आपल्या मुलांनी काय रेकॉर्ड केलं आहे हे अगोदर त्यांच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर दिसण्याची सोय पाहिजे होती!*

*एका बाजूला नाशकातल्या 'के के वाघ’ सारख्या शिक्षणसंस्थेत गेल्या ४३ वर्षांपासून सलग आयोजित करण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये जिल्हाभरातली शेकडो मुलं त्यांच्या अमोघ आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असताना, शिक्षणाचं वारं नं लागलेल्या किंवा जरा जास्तच लागलेल्या या 'अतिमर्कट मुलांना जागेवर दोन फटके देऊन का होईना, पण आवर घालायलाच हवा! कारण भारताचे भविष्य असलेल्या या निरागस मुलांच्या तोंडी असली घाण भाषा आणि त्यांच्या सुकुमार देही असले अभद्र हातवारे अजूनतरी शोभून दिसत नाहीत. बाकी ‘अभ्यासोनि निडरपणे थेट प्रकटणाऱ्या’ जेन-झीचं करावं तितकं कौतुक थोडंच! क्या बोलती पब्लिक?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, July 31, 2026

लायकी नसलेल्यांची धावपळ


🔳
लायकी नसलेल्यांची धावपळ 
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके
नाशिक 

• एक मुद्दा एक विचार
• बुधवार दिनांक 29 जुलै 2026 

तुम्हाला आठवतंय? आपण भारताला महासत्ता बनवायला निघालो होतो? रस्त्याने समाज सुधारण्याच्या गप्पा करता-करता बरेच पुढे निघून आलो राव आपण! वीस लाख द्या, तुम्हाला NEET चा पेपर परीक्षेआधीच देतो. पंधरा लाख द्या, तुमचे इंजिनिअरिंगचे पर्सेंटाईल ९९ टक्के करून देतो. पाच लाख द्या, तुम्हाला TET चा पेपर देतो. तीन लाख द्या, तुम्हाला घरबसल्या बीकॉम च्या तिन्ही वर्षांचे सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेटसह देतो. आमच्या क्लासला प्रवेश घ्या, तुमच्या मुलाचा कॉलेजचा प्रवेशही करून देतो; शिवाय बारावीला जेवढे पाहिजेत, तेवढे मार्क्सही मिळवून देतो! अरे, काय चाललंय काय??

लायकी नसलेल्यांची लायकीत येण्यासाठी किती ही ना-लायकी धडपड म्हणायची! समाज सुधारतो आहे की बिघडतो आहे? बोगस धंदे करणाऱ्यांनी तर केव्हाच कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय, पण ‘झोल’ करून समाजात उथळ माथ्याने फिरणाऱ्या काळवंडलेल्या या बगळ्यांचं काय? एवढी लाज सोडून द्यावी? की लायकी नसलेल्या आपल्या मुलांना पैशाच्या बळावर, लायकी असलेल्यांच्याही पुढे, किंबहुना त्यांच्या जागी सेट करण्यासाठी धडपड करावी? रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांच्या प्रामाणिक प्रयत्नांचं काय? त्यांना डावलून एकवेळ यांना पुढे रेटालही; पण ज्या जागांसाठी हे करत आहात त्या यांना झेपणार आहेत का याचा काही विचार? कुठे चाललो आहोत आपण? कोण रोखणार यांना? आपल्या एक दिवट्या चिरंजीवाचं भलं होण्यासाठी, इतरांच्या प्रामाणिक स्वप्नांची राखरांगोळी करणारे मारेकरी आहेत हे! आणि यांची मुलं? पुढे ती काय म्हणतील? ‘माझ्या वडिलांनी हा पेपर असा फ्रॉड करून मिळवला आणि माझं ॲडमिशन झालं!’ हे सांगताना या मुलांची जीभ चाचरणार नाही? ‘चोरी करना तो खुद पापा ने सिखाया!’ चं बाळकडू प्यालेल्या या मुलांकडून पुढे तुम्ही काय अपेक्षा ठेवणार आहात? ‘होऊ देत आमचा मुलगा कसाही, तुम्ही नका मध्ये-मध्ये नाक खुपसू’ म्हणणाऱ्याना हे कधी समजणार, की हेच दिवटे नंतर समाज पोखरणारे किडे बनणार आहेत म्हणून? यांच्या ना-लायकपणाची शिक्षा इतर समाजाला का म्हणून? आणि ज्यांच्याकडे देण्यासाठी इतके पैसे नाहीत; आणि असतील तरी ज्याना द्यायचे नाहीत, त्यांच्या वाट्याला काय? क्षमता असूनही उपेक्षा? केवढा अन्याय आहे हा! तुकोबा तुकोबा, आणावी ती काठी, नाठाळांच्या माथी, हाणावया!!

‘शासनाने निर्माण केलेल्या चांगल्या संस्थांची दारे नेहमी अभ्यास करून पुढे येणाऱ्या हुशार, होतकरू, आणि बुद्धिमान उमेदवारांसाठी खुली असावीत. समाजातल्या सर्व चांगल्या गोष्टींची सूत्रे चांगल्या आणि लायक माणसांच्या हाती, योग्य माणसांच्या हाती असावीत, म्हणजे मग समाजाची वाटचाल योग्य दिशेने होते. हे साधे, सरळ, सोपे आणि सुटसुटीत सूत्र असताना, ना-लायकांच्या पदरात लायकीच्या जागा टाकून कोणता देदीप्यमान समाज आपण घडवू पाहत आहोत, देव जाणे!
-

राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक

Friday, July 24, 2026

अट्टहास, अहंकार आणि अटळता

अहंकार, अट्टहास आणि अटळता!
_एक मुद्दा, एक विचार!_
२४ जुलै २०२६, शुक्रवार
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
अहंकार, अट्टहास आणि अटळता!

सध्या दोन प्रधानांनी म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान यांनी एक छोटासा निर्णय वेळेवर न घेऊन देशावर जी वेळ आणली आहे त्यामुळे देश कोणत्या टोकाला येऊन उभा राहिला आहे याचा अंदाज येतोय. एका बाजूला हतबल सरकार तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेली लाखो लाखोंची गर्दी! अवघड आहे सगळं. सरकार हे सगळं आवरू शकेल?

  कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणे  पाहिलं तर हे सगळं टाळता येण्यासारखं होतं. इतके सगळे पेपर लीक झाल्यावर, आणि त्याचा धसका घेऊन दिवसाचे सोळा-सोळा तास अविरत अभ्यास करणाऱ्या आपल्याच देशातल्या कोवळ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकदार पाऊल उचलल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी म्हटलं द्या राजीनामा, तर थोडी संवेदना दाखवून देऊन टाकायचा! फेकायचा त्यांच्या तोंडावर आणि बाजूला व्हायचं! त्यात काय विशेष गोष्ट होती इतकी? नाव राहिलं असतं. खरंतर लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याचीही गरज नाही. अशावेळी स्वतःनेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा ही आपल्या देशाची परंपरा आहे. नसेल देत एखादा, तर सन्माननीय पंतप्रधानांनी त्याला सांगायचं- ठीक आहे बाबा, हो बाजूला काही दिवस. परत तुला घेतो वाटलं तर. दोन-तीन वर्षानंतर पुन्हा त्याला घेतला असता एखाद्या मंत्रिमंडळात. कोण लक्षात ठेवतो? गेला बाजार एक महिनाभर ती मुलं तिथे ऊन, पाऊस झेलत शांतपणे आंदोलन करत होती, आणि जागतिक कीर्तीचा एक माणूस त्यांच्यासाठी उपोषण करत होता, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपला एखादा माणूस दिला असता पाठवून! त्यांचं समाधान झालं असतं! मुलंच ती. गेली असती नाचत नाचत घरी!

 पण जेव्हा माणसाचा अहंकार त्याच्यापेक्षाही मोठा होऊ लागतो, तेव्हा त्याला छोटया-छोट्या गोष्टींमध्येही स्वतःचा अपमान, पराभव वाटू लागतो, आणि तो टाळण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार होतो.

   जिथे आम्ही मोठ्यांना फाट्यावर मारतो, तिथे ह्या झुरळांचं काय? फवारलं हिट की विषय फिट! इतका सरकारला हा विषय सोपा वाटला. सोनम वांगचूक यांना 'असं चादरीत गुंडाळून उचलून आणा' ही कल्पना मांडणाऱ्याला आता त्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल. त्यांना 'चायनाचा एजंट' म्हणणारांचे नेतेच त्यांना भेटायला आणि उपोषण सोडण्याची विनंती करायला दवाखान्यात गेले आहेत. असे म्हणणाऱ्यांनी मुलांच्या आंदोलनात त्यांची एन्ट्री होण्याच्या अगोदरच सरकारच्या कानात सांगायला पाहिजे होतं, की मुलांचं ऐका, आणि यांचा छोटासा प्रश्न मिटवून टाका; म्हणजे हा चायनाचा एजंट मध्ये येणार नाही, पण तसं शहाणपण त्यावेळी कुणालाही सुचलं नाही! आपल्या जवानांचं बर्फातलं टिकून राहणं सुसह्य व्हावं म्हणून त्यांना उबदार निवारा पुरविण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसालाच यांनी शिक्का लावून टाकला. देशभक्तीचा ठेका जणू फक्त आपल्याच नावावर केलेला आहे, आपण म्हणू तोच देशभक्त, बाकी सगळे देशद्रोही, असा स्वतःचा  गैरसमज करून घेऊन विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तर यांनी देशद्रोही ठरवलंच; परंतु लोकशाहीत विरोधी पक्ष आवश्यक असताना सगळ्याच यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांनाच दाबून टाकलं. ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या चिठ्ठ्या सापडल्या त्या सगळ्यांना सोयीने ईडीबीडीसीडीचा धाक दाखवून धाकात ठेवलं, स्वतःकडे खेचलं. पण भ्रष्टाचाराचा कलंक नसलेल्या या मुलांना अडवणार आणि अडकवणार कशात, कोण, आणि कसे? इथे माशी शिंकली!

 सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशांनी आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना झुरळ म्हणावं, आणि शिक्षणमंत्र्यांनी दहशतवादी म्हणून त्यांना हिणवावं हे आपल्या देशाचं दुर्दैव. पण त्यांनी हे केलं. त्यांच्या हांजीवाल्यांनीही त्यांची री ओढली. अगदी सीबीएसईच्या पेपर चेकिंगचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यालाही परकीय शक्तींचा हस्तक म्हणावं? पण म्हटलं गेलं. आपला प्रत्येक निर्णय योग्यच आहे असं म्हणणाऱ्यांची टोळी आपल्या पाठीशी असली की मग माणसाचं रूपांतर फार लवकर बेडकात होतं. राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या माध्यमांनी तर सडेतोड प्रश्न विचारण्याचं सोडून  केव्हाच नांगी टाकली. म्हणून जेव्हा ही मुलं जंतर-मंतरवर आली तेव्हा 'दहा-बारा दिवस बसतील. जेव्हा कोणत्याही राष्ट्रीय चॅनलवरून त्यांची कोणतीही बातमी देशाला कळणारच नाही, तेव्हा आपण दुर्लक्षुन मारलेले हे चेहरे गपगुमान आपला गाशा गुंडाळून गुपचूप निघून जातील', अशा भ्रमात हे राहिले. परंतु पाठीमागून कोणतं मोठं वादळ घोंगावत येत आहे, याची यापैकी कोणालाही सूतराम कल्पना आली नाही. 'मोठे-मोठे गार केले गंमतमधी' तिथे या झुरळांची काय बिशाद? या भ्रमात मंडळी राहिली आणि आजची ही अवस्था!

  मोबाईलच्या स्क्रीनचं शस्त्र करून रणात उतरलेली ही पोरं आता आवरतील असं वाटत नाही. काल मार खाऊन आज पुन्हा त्यांनाच गुलाबाचे फुल देणाऱ्या, पोलिसांच्या गाडीत पोरांना कोंबून नेत असताना शिवछत्रपतींचा गनिमी कावा करत पाठीमागून हळूच दरवाजा उघडून कोंडलेल्यांना मोकळं करून देणाऱ्या, तुमच्या खिशात ड्रगची पावडर टाकून, तुमच्यावर खोटी केस करून, तुम्हाला आयुष्यातून उठवू म्हणणाऱ्या पोलिसाचाच गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या, पोलिसांच्या गाडीला दोन्ही हातांनी समोरून रोखून धरत एकटं नडणाऱ्या, कपाळावर कफन बांधून फिरणाऱ्या, मोठ्या अभिमानाने गांधी आणि आंबेडकरांचा एकत्रित फोटो मिरवत, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचा नारा देत, पोलिसांच्या तोंडावर त्यांनाही पाठ नसलेली राज्यघटनेतील कलमे फेकून मारणाऱ्या, पोलीस मारायला आले की 'जनगणमन' सुरू करणाऱ्या, जोरदार पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला तर त्याच पाण्यात मनसोक्त नाचण्याचा आनंद घेणाऱ्या, आणि त्यांच्यावर फेकलेला अश्रू धुराचा गोळा उचलून पुन्हा त्यांच्यावरच भिरकावणाऱ्या जेन-झी ला आवरताना सरकारच्या नाके नऊ आलेत.

काठीला खिळे लावून त्यांना झोडपून काढल्यानंतर तर ही आग अधिकच भडकली आहे. आता त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही उतरलेत. आता त्यांना देशद्रोही म्हणा, किंवा आणखी कोणता कलंक लावा, पण हा वणवा आता थांबणार नाही बहुतेक. काहीतरी मोठा धमाका येत्या काळात आपल्याला बघायला मिळणार नक्की. एकतर शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचे, किमान आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्यांच्या आयुष्याचे मोल घेऊनच ही आग थांबणार, किंवा 'दिल्लीचेही तख्त उलटवतो महाराष्ट्र माझा!!' अशा गर्जना पुढच्या काळात सह्याद्रीच्या कडे-कपारीत पुन्हा एकदा घुमणार! यांच्या अगोदरच्या सरकारातील लोकांनी भ्रष्टाचाराचा जो कळस गाठला होता, त्यांना वैतागून लोकांनी यांना असंच आंदोलन करून अगदी विश्वासाने सत्तेवर आणलं, तर यांनी त्यांच्या पुढची पायरी गाठली. त्यांनाच आपल्यात सामावून घेतलं! न्यायदेवतेने जरी डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असली, तरी या देशातील जनता उघड्याठाक डोळ्यांनी हे सगळं बघत आहे, कोणत्याही निमित्ताने लोकांच्या संयमाचा कडेलोट होऊ शकतो, ही गोष्ट ही मंडळी साफ विसरली. आता निमित्ताला पेपरफुटी असली, तरीही त्याच्यामागे आमदारफुटी, खासदारफुटी, भ्रष्टाचाराची गुटी, आणि यांच्या आश्रयाला असलेल्या गुंडांच्या कटकटी या सगळ्यांना आंदोलकांनी एकाच फडक्यात गुंडाळले आहे! जिथं स्वतःला विद्वान म्हणवणारी शहाणी माणसे शेपूट घालून बसली आहेत, तिथं पंधरा-सोळा वर्षांची नुकतीच मिसरुडं फुटलेली मुलं मोबाईल समोर धरून अन्यायाविरोधात धाडधाड बोलू लागली आहेत.

  काय गंमत आहे बघा. लोकशाहीत जनता मालक असते आणि इतर सर्व अधिकारी आणि राजकारणी तिचे सेवक. आजकाल लोकांना सेवा करण्याची इतकी काय हौस आली आहे कुणास ठाऊक? लोक ओरडून सांगताहेत की आम्हाला तुमच्याकडून सेवा नको आहे, तरीसुद्धा 'मी तुमची सेवा करणारच!' अशा अट्टहासाला पेटलेल्या लोकांना काय म्हणावं? "मला तुमची सेवा करायला नको म्हणणारे तुम्ही कोण? भले तुमचे कंबरडे मोडो, तुमचा जीव जाओ, परंतु मी तुमची सेवा करणारच!" असं म्हटल्यावर आता मालकांनी यावर काय म्हणावं? "अरे बाबा आम्ही तुला आमची सेवा कर म्हटलं नव्हतंच. तूच तुझ्या मनाने उभा राहिलास आणि सेवक म्हणून स्वतःच्या माथ्यावर शिक्काही तूच मारून घेतलास! त्याच्यासाठी तू काय काय झोल केलेस ते तुलाही चांगलं माहीत आहे, आणि आम्हालाही! आता बस की खाली!" असं जनतेने सगळ्याच पक्षातील सगळ्याच अशा बळजबरीचा रामराम करणाऱ्या सेवकांना कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांचं ऐकतील तर ते सेवक कसले!? गोलमाल है भाई सब गोलमाल है!

 बाकी काही असो. जगाने अभिमानाने ज्याच्याकडे पहावं असा हा आपला सुंदर देश! आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचा आदर्श अवघ्या जगाने घ्यावा अशा! असे असताना जगहसू होणाऱ्या अशा काही अप्रिय गोष्टींमुळे  जगभरात डागाळू पाहणारी आपल्या प्रिय देशाची प्रतिमा एक जागरूक नागरिक म्हणून मनाला अस्वस्थ करते, कारण आंदोलनामध्ये अतिशय विदारकपणे मार पडणारी निरागस मुलं आपलीच आहेत. ज्यांच्यावर पलटवार होतो आहे ते पोलीस, सैनिक आपलेच आहेत. दोघांवरीलही हल्ले बघवत नाहीत. दोन्ही बाजूंनी नुकसान आपलंच आहे. कुणाच्यातरी वेड्या अट्टहासापायी अनागोंदीची अटळता समोर येऊ नये म्हणून हे कळकळीचं स्पष्ट बोलणं अगत्याचं आहे! याकडे कोणत्याही एकांगी चष्म्यातून पाहू नये, नाहीतर धूसर दिसण्याची शक्यताच अधिक! 
वंदे मातरम्!

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, July 15, 2026

मोडला 'आहे' कणा?

*मोडला ‘आहे’ कणा?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*१५ जुलै २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*मोडला ‘आहे’ कणा?*

   *मुलांचे शिक्षण भ्रष्टाचारमुक्त रहावे म्हणून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भारतातील महान शिक्षणतज्ञ आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कित्येक विद्यार्थ्यांसह अन्नत्याग सत्याग्रह करत अखेरच्या घटका मोजत आहेत. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या देशाच्या प्रधान सेवकाला या जागतिक कीर्ती असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू जात नाही. केवढं हे दुर्दैव!*

*शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची देशात, राज्यात प्रचंड केविलवाणी अवस्था झाली आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. परंतु देशाचे नागरिक म्हणून यावर बोलण्यासाठी आपण शिल्लक उरलो आहोत कुठे? आपण तर केव्हाच वाटले गेलो आहोत. ‘त्यांचं ते बघतील...’ म्हणत स्क्रीन स्क्रोल करत थंड बसलो आहोत. अण्णा आंदोलनात मेणबत्त्या आणि झेंडे घेऊन गावभर फिरणारे आता कुठे गेले कुणास ठाऊक? इतक्या लवकर आपल्या संवेदना बोथट झाल्या? की आपल्याला कशाची गुंगी आली आहे?*

   *आपण कालपर्यंत असे नव्हतो. आपला कणा ताठ होता. आता आपल्याला काय झालंय? आपण एवढे कसे कोरडे, कोडगे, लाचार आणि मुर्दाड झालो? 'चूक' ला 'चूक' म्हणण्याची हिंमत आपल्यात उरू नये? आपण खरं बोललो तर आपल्यावर कोणीतरी डोळे वटारेल, आपली  नोकरी घालवेल अशी भीती आपल्याला सतत वाटत रहावी? सध्या आपलं सगळं अलबेल चाललेलं आहे, ते या नसत्या उचापतींनी संकटात येईल याचं दडपण सतत आपल्या मागे रहावं? कोणीतरी आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, आणि आपण थोडी जरी तथाकथित चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर उद्या आपल्या सुखी संसारावर गंडांतर येईल, हा वेताळ आपल्या मानेवर कधीपासून आणि कसा बसला? आपण इतके नेभळट कधीच नव्हतो. आपण असे कधीपासून झालो? कोणत्या कड्यावर येऊन उभे राहिलो आहोत आपण? आपला कणा मोडत चालला आहे की काय?*

    *आपण अगोदर लोकांना निवडून द्यायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. तेही दबकून असत.  आता आपण त्यांना निवडून देत नाहीत; ते स्वतःच मनी आणि मसल पॉवरवर निवडून येतात. आता जर आपण त्यांना प्रश्न विचारायला जाऊ, तर ते आपला खात्मा करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, कारण निवडून येण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये लावले आहेत. पद सोडायचं म्हणजे त्यांचं तेवढ्या रुपयांचं नुकसान होणार. ते त्यांना कसं सहन होईल? त्यापेक्षा सामान्य जनतेतले काही लोक मेले तर त्यांना काय फरक पडतो?*

*आपल्यालाही आपल्यातले काही मेले तर काय फरक पडतो??*

    *फरक पडायला हवा! पुन्हा गुलामगिरीत खितपत पडायचे नसेल तर फरक पडायलाच हवा. आणि त्यासाठी आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आहे ना, हे वारंवार तपासून पाहिलं पाहिजे. सदसद्विवेक सांभाळला पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, आणि आपल्यासाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे; अगदी कणा मोडू न देता!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, May 8, 2026

आन, बान आणि शान

*आन, बान आणि शान*
_एक मुद्दा, एक विचार!_
*6 मे 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आन, बान आणि शान*

*तिन्ही सांजेची वेळ होती. हवेत छानसा गारवा होता. आई संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी चिरत बसली होती. बाहेर खेळायला गेलेला तिचा मुलगा घरी आला. घरावर फडकत असलेल्या झेंड्याकडे पाहून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. हातपाय धुवून झाल्यावर तो आईजवळ येऊन बसला आणि म्हणाला, "आई, आपल्या घरावर हा एवढा मोठा झेंडा का लावतो आपण?"*

 *"अरे हा झेंडा तर आपली आन बान आणि शान आहे!" मुलगा काहीतरी विचार करत म्हणाला, "आणि तो माझा एक मित्र, त्यांच्या घरावर तर वेगळा झेंडा असतो? इतकाच मोठा. तोही त्यांची आन, बान आणि शान आहे का?"  "असेल." "आणि त्या तिकडच्या गल्लीमध्ये तर मी वेगळ्याच रंगाचा आणखी एक झेंडा इतकाच मोठा पाहिला? त्यांचंही तसंच असेल का?" "असू शकतं." "आई, हे झेंड्याचे इतके सगळे प्रकार कशासाठी?" "कारण प्रत्येकाचा धर्म, जात, पंथ, भाषा, विचार वेगवेगळा आहे म्हणून. झेंडा आपली वेगळी ओळख निर्माण करतो." "म्हणजे वेगवेगळे झेंडे- वेगवेगळी माणसे. बरोबर?" "हो." "म्हणजे झेंडे माणसांना विभागण्याचं काम करतात का?" "गप्प बस. तुला त्यातलं काही कळत नाही." "म्हणून तर तुला विचारतोय ना?" "तुझ्या पप्पांना विचार." "ते म्हटले, झेंड्याबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही." "मग मला का विचारतोयस?" "कारण तू ऐकून घेतेस!"*

  *दोन मिनिटं शांततेत गेली. मुलगा पुन्हा सुरू झाला, "आई, ऐक ना..." "बोल." "हा झेंडा लावल्यावर काय होतं?" "आपलं संरक्षण होतं. लोक आपल्याला वचकून राहतात. आपण कोण आहोत, आपल्या मागे कोण आहे, आणि आपण काय करू शकतो हे जगाला समजतं. मग लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत." "आई, झेंडा नसल्यावर लोक एकमेकांकडे वाकडया नजरेने बघतात का?" ”तसं नाही, पण कमजोर समजतात. झेंडा असला की आपल्याला ताकतवान समजतात." "मग गावातील प्रत्येक घरावर लोक झेंडा का लावत नाहीत?" "त्यांना तशी गरज वाटत नाही." "मग आपल्याला का वाटते?" "कारण आपल्याला आपल्या धर्माचा आणि झेंड्याचा अभिमान आहे." "म्हणजे जे झेंडा लावत नाहीत त्यांना तसा अभिमान नाही का?" "ते तू त्यांना जाऊन विचार."*

 *"आई ज्यांच्या घरावर झेंडा नाही त्यांना जर धर्माचा अभिमान नसेल तर त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का?"  "तसं नाही, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण झेंडा लावला की जगण्यात आणि वागण्यात जरा ऐट येते, जरब येते, रुबाब येतो." "आई मी शाळेत जाताना त्या झोपडपट्टीमध्ये एक मोठा झेंडा पाहिला, पण तिथली लोकं तर खूप गरीबीचं आणि हालाखीचं जीवन जगतात. ना ऐट, ना रुबाब. मग ते कसं?" "तो झेंडा तिथे आहे म्हणूनच ती लोक तिथे राहू शकतात; नाहीतर त्यांना आतापर्यंत लोकांनी तिथून हाकलून दिलं असतं! झेंडा समूहाचं रक्षण करतो." "आई, सगळ्यांचा मिळून एकच झेंडा राहू शकत नाही का गं? म्हणजे सगळ्यांचं एकदाच रक्षण होईल?" "राहू शकतो ना. पण तो नेमका कोणाचा आणि कोणता हे कोण ठरवणार? प्रत्येकाला वाटतं, आपलाच झेंडा श्रेष्ठ." "आई, पण तिरंगा तर आपल्या सगळ्यांचा झेंडा आहे ना? मग हे सगळे इतर झेंडे बंद करून तो एकच का नाही लावत ज्यांना झेंडा लावायचा आहे त्यांच्या घरावर?" "मूर्ख आहेस का रे तू? निघ! अभ्यासाला जाऊन बस! म्हणे सगळ्यांचे झेंडे बंद करून एकच लावा!"*

 *मुलगा शांतपणे उठत म्हणाला, “म्हणजे तिरंगा फक्त शाळेतच सगळ्यांचा असतो तर!” भाजी चिरणारे आईचे हात आपोआप थांबले. त्याला उत्तर मात्र ती देऊ शकली नाही. तिच्याकडे ते नव्हतंच!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, May 1, 2026

यंदा लग्नाचं काही बघताय का

*यंदा लग्नाचं काही बघताय का?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*29 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*यंदा लग्नाचं काही बघताय का?*

*लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणे… आता स्वर्ग कुणी प्रत्यक्ष जाऊन पाहिलाय का? नाही; पण त्या गाठी बांधायला देवाने त्याची काही खास माणसं मात्र पृथ्वीवर पाठवलेली आहेत एवढं मात्र नक्की. त्यांच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सुपारीचं खांडही फुटत नाही! असं म्हणतात की नवरदेव येतो नवरीसाठी, वऱ्हाड येतं जेवण्यासाठी! पण पुढचं आपल्याला सांगितलंच जात नाही, ते म्हणजे 'काही खास माणसं' येतात पुढचा नवरदेव-नवरी शोधण्यासाठी!*

*कोणतंही लग्न घ्या, त्यात 'लग्नाला आलेल्या' मुला-मुलींची माहिती काढणारी एक तरी दिव्य विभूती असतेच! मग ती स्त्री असो की पुरुष. शिवाय वयानेही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली; त्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही त्यांचा चिमुटभर जास्तच. शहरातल्या ‘वधुवरसूचक मंडळातले चाणक्य’ यांच्या बुद्धीपुढे लोटांगण घालतील! त्यांच्या वागण्यात एक रुबाब असतो, बोलण्यात एक ढब असते. “ती आत्ता गेली ती लाल ड्रेसवाली कोण? कोणाची मुलगी? कितवी शिकलेली आहे? काय करते? यंदा लग्नाचं काही बघतायत का? आपल्याकडे तीन चार स्थळं आहेत चांगली.” झालं! पाच मिनिटात मुलींचा डेटा फोटोसकट जमा! तर, “तो उंचसा सोफ्यावर बसलेला कोण हो? काय करतो? लग्न झालंय का त्याचं? पगार किती आहे? परमनंट आहे का? भाऊ बहिणी किती आहेत त्याला? क्षेत्र वगैरे किती आहे? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?” झाला डेटा जमा! पण दोन माणसांच्या खऱ्या स्वभावाचा ‘डेटा’ मात्र यांच्यापैकी कुणाकडेच नसतो बरं का! इकडची माहिती तिकडे पोहोचवून, तिकडची माहिती इकडे आणून, मध्यस्थी करून मंडळी अशी काही जादूची कांडी फिरवतील, की गोष्ट लग्नाच्या लाईनला आलीच पाहिजे. गुळुमूळू स्वभावाचं कुटुंब असलं तर ही माणसं त्यांना अक्षरशः कच्चं खातात. असल्या-नसलेल्या कोणत्याही चार गोष्टी सांगून पार्टीला बाटलीत उतरवतीलच!*

*मंडळी, लग्न कोणीही जुळवो, संसार सुखाचा होईलच याची गॅरंटी नाही. कारण स्थळ पाच मिनिटांत जुळतं हो, पण नातं? पाच वर्षांत काय कधीकधी आयुष्यभरातही ते जुळेलच याची खात्री नाही. लग्न जुळवणारी माणसं नाती जोडतात, पण ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची? घरातल्यांची!*

*माणसं, मग ती कोणीही असो, तोंड सोडून बोलायला लागली, की संसाराला दृष्ट लागते. एकदा नात्यात फट पडायला लागली, की ती वाढतच जाते आणि तुटू नये, पण संसार तुटतो. अशावेळी शिव्याशापांचा पहिला धनी कोण होतो?“हे लग्न व्हावे ही ‘ज्यांची’ इच्छा!” होती तो किंवा ती! दोन्हीकडून बिचाऱ्यांना शिव्या खाव्या लागतात. म्हणजे कोळशाच्या दलालीत हात काळे करण्यासारखंच! तरी ही मंडळी त्यांचं काम थांबवत नाहीत. कारण, त्यांना अनुभवाने माहीत असतं, की जेव्हा एखादा हतबल बाप स्थळ शोधून थकतो, तेव्हा प्रत्येक घरात काळजीचा एकच प्रश्न कायम असतो- "बघा ना एखादं चांगलं स्थळ असेल तर!?"*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

शहरातले, गावाकडचे

*शहरातले, गावाकडचे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*22 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*शहरातले, गावाकडचे!*

*एका मोठ्या भावाच्या शहरातल्या घरी लहान भावाचा गावाकडचा पोरगा शिकायला आणला. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मोठ्या भावाची मुलं आणि हा धाकट्याचा मुलगा यांच्यात काही वादावादी झाली, की मोठ्या भावाचा जीव तीळतीळ तुटायचा. नेमकी बाजू कोणाची घ्यावी हे त्याला काही कळायचं नाही. भावाच्या पोराची बाजू घेतली, की बायको त्याच्यावर डाफरायची. स्वतःच्या पोरांची बाजू घेतली की भावाचा पोरगा फोनवर सांगायचा, “मला मारतात! माझ्यावर मुद्दाम चिडतात!”*

 *मोठ्या भावाची कुचंबणा बिचाऱ्यालाच माहीत.*

 *एके दिवशी असाच कशावरून तरी खटका उडाला, आणि संध्याकाळची वेळ पाहून पोरगा घरातून गायब झाला!*

    *मोठा भाऊ कामाच्या वैतागातून घरी पोहोचलाच होता, की घरच्यांनी त्याच्या कानावर बातमी घातली. त्याचं डोकं बिथरलं. 'पोरांचं काहीतरी भांडण झालं होतं’ कळल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आपल्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि हातातली पिशवी टाकून स्वतः पोराला शोधायला निघाला. घरातली सगळी मंडळी कामाला लागली.*

 *सात-आठ वर्षाचा पोरगा कुठे गेला असावा कोणाला कळेना. अंधार पडायला लागला तसा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. पोरगा सापडला नाही, तर घरच्यांना काय तोंड द्यायचं? तेवढ्यात एकजण म्हणाला की गावाच्या बाहेर त्याला हायवेवर चालताना मी मगाशी बघितला! म्हणजे? हा मुलगा पायी गावाच्या दिशेने चालत गेला की काय? आणि जर रस्त्याने एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन बसला, एखाद्या अनोळखी गाडीत बसून गेला, तर काय करायचं? पोराला शोधायला हायवेवर चार गाड्या गेल्या. दूरपर्यंत जाऊन त्यांनी फोन केला, “मुलगा इकडे कुठे दिसत नाही.” वातावरण गंभीर झालं. शोधून बिचारे थकून गेले.*

  *इकडे घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या एका देवळात एक आजोबा संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि बाकड्यावर बसले. बाकड्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून खाली वाकून बघतात तर काय? खाली पोरगा बसलेला! त्यांनी त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित विचारपूस केली, आणि विश्वासात घेऊन त्याला मोठ्या भावाच्या घरी घेऊन आले. त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र गंभीर शांततेत सरली.*

 *सकाळी धाकट्याच्या मुलाची आंघोळ वगैरे झाल्यावर मोठ्या भावाने त्याला चारचाकी गाडीत टाकलं आणि शंभर दीडशे किलोमीटरवर असलेल्या थेट आपल्या गावी गाडी घेऊन आला. पोराला गाडीतून उतरवलं, त्याच्या बापाच्या स्वाधीन केलं आणि म्हणाला, “सांभाळ रे बाबा! शहरात इकडे मला माझा जीव जड झालाय, तिथे तुझ्या पोराचे नखरे झेलायला मला कुठे वेळ आहे? शिवाय कपाळावर एखाद्या वेळी कलंक लागला तर आयुष्यभर मिटायचा नाही!”*

   *म्हणून ज्यांची बाजू पडती आहे, त्यांनी पोरांना ‘तिकडच्या घरी कसं रहावं, कसं वागावं, आणि दुसऱ्याच्या पोटात शिरून त्याला कसं जिंकावं’ हे शिकवून ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या घरी दुसऱ्यांची मुलं शिकायला आहेत त्यांनी, त्यांच्या मुलांनी, या मुलांना समजून घेऊन त्यांना मायेचा आधार दिला पाहिजे, म्हणजे ते शिकून पुढे गेलेलं मूल मरेपर्यंत उपकार विसरत नाही!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


भ्रमाचा भोपळा

*भ्रमाचा भोपळा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*8 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*भ्रमाचा भोपळा!*

  *माणसाची तीन बलस्थानं आहेत. माय, माती आणि मायबोली. ज्यांच्याकडे ह्या तीनही गोष्टी शाबूत आहेत ते नशिबवान! पण मायबाप आयुष्यभरासाठी थोडेच पुरतात? आपल्या आयुष्याचा गाडा योग्य वळणावर आणून सोडण्यापुरता त्यांचा प्रवास!*

  *माय म्हणजे नुसती माय नाही; तिच्यात बापही आला. ते दोघे एकच आहेत. बापाचं छत्र पोरांच्या डोक्यावरून लहानपणीच हरवलेलं असतानाही लेकरांच्या भल्यासाठी आयुष्यभर संकटाशी झुंजणारी माय म्हणजे धैर्याचा मर्द हिमालय! आणि बाप? बाप ही दुसरी मायच असते; शर्ट पॅन्ट घातलेली. मायच्या परोक्ष लेकरांची माय बनून त्यांचा सांभाळ करणारा बाप बघा. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, काळजी तीच; फक्त शरीर वेगळं. पण आजकाल मायला 'माय म्हटलेलं चालत नाही. बापाला 'बाप म्हटलं तर राग येतो. शहरात जन्माला झालेल्या नव्या पिढीला आईवडिलांना 'मम्मा 'डॅडा म्हटलं की जास्त 'कुल आणि 'क्लोज वाटतं असा गोड भ्रम आहे.*

   *आपण सर्वजण मातीचे पुतळे आहोत. मातीतूनच आपल्याला प्रत्येकाला उगवून यायचं आहे आणि शेवटी माती बनून या मातीतच मिसळून जायचं आहे. आपला आदी आणि अंत मातीच तर आहे!*

*कधीकाळी माती सगळ्यांसाठी होती. लोक मातीला धरून राहत. माती कपाळाला लावली की आयुष्यभराची निष्ठा वाहत. पण जसे माणसाला हावरटपणाचे डोहाळे लागले, तो दुसऱ्यांच्याही वाट्याची माती हडप करू लागला. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने काही माणसं मातीवान झाली. जे बळी नव्हते त्यांचा बळीराजा झाला, आणि मातीमोल झाला. आज शहरात मातीच्या कणाला कोटीची किंमत येऊ लागली आहे. मोक्याच्या जागेवरच्या मातीसाठी माणसं एकमेकांचे मुडदे पाडू लागली आहेत. 'शेती इकायची नसती, राखायची असती', हे शहरालगतच्या कानपाड्या शेतकऱ्यांना ऐकू येईनासे झाले आहे. हातची शेती विकून गाडी, बंगला, शॉपिंग आणि इलेक्शनमध्ये पैसा घालवणाऱ्यांना भपक्यात सुख असल्याचा गोड भ्रम आहे.*

    *आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आपली माय आपल्याशी ज्या बोलीत बोलायची ती मंजुळ वाणी म्हणजे मायबोली! ते अमृत पिऊनच आपला भाषिक जीव पोसला. तिचे शब्द आपले झाले. आपण शाळेत पहिलं पाऊल टाकलं, आणि आपलं बोट पुस्तकांच्या हातात दिलं. पुस्तकांनी आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याच्या नावाखाली हळूहळू आपली मायबोली कधी आपल्यापासून काढून घेतली हे आपल्याला कळलंही नाही. आता पुस्तकी भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो आणि मायबोलीला गावंढळ! काँक्रीटचा कॅनॉल कधी खळखळ वाहणारा झरा होईल का? 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा' पण आता झऱ्यालाच लोकं नाला म्हणून नावं ठेवू लागलीयत. इस्त्री आणि इन केलेल्या कपड्यांमध्ये मायबोली कोंबून इंग्रजी मिश्रित चमचमीत प्रमाणभाषा बोललं की आपला प्रभाव पडतो असा आजच्या नवभाषकांना भ्रम आहे! पण नारळाच्या पाण्याची सर मुन्शीपाल्टीच्या नळाच्या पाण्याला केव्हा यावी?*

 *मंडळी गोष्ट अशी आहे की हल्ली आपण स्पष्टयुगात नाही, तर भ्रष्टयुगात आणि भ्रमयुगात राहतो आहोत, म्हणून भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालो आहोत! झाडं तोडून विकासाच्या सावलीचं स्वप्न पाहत आहोत! हा निव्वळ भ्रमाचा भोपळा आहे. तो लवकर फुटो, माय, माती, मायबोली, आपली माणसं आणि आपल्याला पोसणारा निसर्ग यांना ओळखण्याची, जपण्याची सद्बुद्धी प्रत्येकाला लाभो इतकंच मागणं आहे!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, April 1, 2026

ज्याच्या घरी गंगा...

*ज्याच्या घरी गंगा...*
_एक मुद्दा, एक विचार!_
*1 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*ज्याच्या घरी गंगा...*

*एक आई-पालक मुलाच्या शिकवणी वर्गातील सरांना भेटायला आल्या. त्यांचा मुलगा त्या सरांना खूप मानतो वगैरे त्यांनी त्या सरांना सांगितलं. सरांनी विनम्रपणे त्यांना नमस्कार केला.* 

*पुढे त्या बाई म्हणाल्या, “सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मुलाला प्लीज शिकवा की त्याने घरातल्यांचं काम ऐकलं पाहिजे. अजिबात ऐकत नाही. इकडची वस्तू तिकडे करायला नको. साधं ग्लासभर पाणी मागितलं प्यायला तर म्हणतो ‘उठून घे ना.’ मी म्हटलं- अरे वर्गात मी फक्त इतकं जरी म्हटलं की मला तहान लागलीय रे पोरांनो! की पुढच्या मिनिटाला सगळ्या वर्गाची माझ्यासमोर झुंबड उडते पाणी देण्यासाठी. प्रत्येकजण माझ्यासमोर पाण्याची बाटली धरतो आणि म्हणतो की बाई, माझ्या बॉटलमधलं पाणी प्या. आणि तू माझा मुलगा असून मला पाणी देत नाहीस...? तर म्हणतो- यात काय विशेष? मी पण स्कूलमध्ये आमच्या मॅडमना पाणी देतो! बघा आता!”* 

*सर इतकंच म्हणाले, “घरच्या गंगेचं महत्त्व नसतं मॅडम. ज्याच्या घरी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा!”*
 
     *मंडळी, गोष्ट फक्त त्या मुलापर्यंत थांबत नाही. समाजातही काही वेगळी परिस्थिती नाही. नशिबाने आपल्याला प्राप्त झालेल्या, आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांचं आपल्याला कौतुकच नसतं. आपण त्यांना हलक्यात घेतो. बऱ्याचदा तर त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जातं, आणि कधीकधी त्यांना मुद्दाम डावलून त्यांची खरोखर क्रूर चेष्टा केली जाते.*

 *घर असो, खेळ असो, कार्यालय असो, की संघटना; पळसाला पानं तीनच! सगळीकडे हीच परिस्थिती. पण लोकांना आपली किंमत नसली तरी ‘आपण कोण आहोत’ हे ज्यांना माहीत असतं, ती माणसं कधीही स्वतःची किंमत खाली पडू देत नाहीत. आपला आब राखून असतात. जिथे आपली किंमत नाही अशी जागा कितीही सुशोभित, चमचमीत आणि लोकांच्या लेखी उत्कृष्ट, चांगली असो, ही माणसं तिथे रमत नाहीत. अगदीच नाईलाजास्तव थांबावं लागलंच तर त्यांचं केवळ शरीर तिथे असतं, ती स्वतः नसतात. योग्य वेळी ती जागा रिक्त करतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं महत्त्व कळू लागतं. त्यांचं आपल्यातून जाणं वेदनादायी वाटू लागतं, पण उपयोग नसतो.*

 *म्हणून आपल्यासोबत असलेल्या अशा माणसांची कदर केली पाहिजे. वयाने, पदाने, शिक्षणाने, समजेने ती लहान असतील तरीही... कारण ही सगळी गंगेची रूपं आहेत. गंगा नेहमी हिमालयातूनच वाहते असं नाही… ती कधी आईच्या रूपात घरात असते, कधी मित्र-मैत्रिणीच्या रूपात आपल्याजवळ उभी असते, कधी वरिष्ठ बनून आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते, तर कधी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात आपल्याला आयुष्याचे धडे देत असते. पण आपणच तिचं पावित्र्य ओळखलं नाही, तिची कदर केली नाही, तर एक दिवस हीच गंगा आपल्या आयुष्यातून निघून जाते…आणि मग उरतो तो फक्त कोरडा काठ — आणि जिथे पाणी असताना आपण तहानलेलेच राहिलो होतो, याची खंत! म्हणून…*

*आपल्या आयुष्यातील ‘गंगा’ ओळखा, तिचा मान ठेवा, कारण घरची गंगा ओळखायला उशीर झाला, तर उरतात फक्त आठवणी… आणि डोळ्यात पाणी!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

पाडव्याचं कौतुक कशासाठी

*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*19 मार्च 2026, गुरूवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*

*आजकाल सणसुद्धा अंमळ धावपळीत असल्यासारखेच वागतात. आता गुढी पाडव्याचंच पहा ना. सकाळी धावतपळत आला, आणि हार-कड्याची गोडी वाढायला सुरू होण्याआधीच संपलादेखील!*

 *इतकी धावपळ आहे प्रत्येकामागे, इतकी कामं पडलीयेत प्रत्येकाला, की सण चवीने साजरा करायलाही वेळ नाही. स्टेट्सला फोटो मिळाला की झालं; नाहीतर एक पाडवा असायचा- गळ्यात हार-कडे घालून मिरवायचं आणि समोरच्याला म्हणायचं, “म्हण, गुढी पाडवा” आणि त्याने ‘गुढी पाडवा’ म्हटलं की आपण म्हणायचं, “नीट बोल गाढवाs!” आणि मग दोघांनीही हसायचं! काय निरागस काळ होता, नाही?*

  *आता खूप पुढे निघून आल्यावर जरासं समजू लागलं आहे, ‘गाढवा’त लायकी काढून का होईना, नीट बोलण्याची तंबी यामुळे दिली जात असायची कारण येत्या काळात माणसं नीट बोलणार नाहीत हे जुन्या लोकांना माहीत होतं!*

     *पाडव्याचं कौतुक कशासाठी? तर पाडवा, म्हणजे चैत्र नवी पालवी घेऊन येतो म्हणून! त्या आधीचा फाल्गुन म्हणजे कंटाळा, शक्तीहीनता... निसर्गाचा झोपी जाण्याचा काळ. पण माणसाला झोपून राहून कसं चालेल? म्हणून आली फाल्गुनातली महाशिवरात्र! हे सांगायला, की ‘झोपू नको, जागा आणि जागता रहा! तरीही आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन ढेपाळलेले आणि झोपाळलेलेच. म्हणून केला होळीचा भल्ला मोठ्ठा जाळ! लोकांना सांगितलं आता होळीत थंडी जळून गेली, आता घरात दडून बसू नका, स्वेटर फेका, बाहेर निघा. निघत नाही? कसा निघत नाही, खेचा याला बाहेर! म्हणत आली धुळवड आणि रंगपंचमी! रंग उधळा पण स्वतःमध्ये थोडी तरतरी शिल्लक ठेवा, कारण थोड्याच दिवसात नवी पालवी घेऊन वसंत येणार आहे! चैत्र उंबरठ्यावर उभाय! मग या सणांच्या बळावर निसर्ग आणि माणूस थोडी धुगधुगी कायम ठेवतो आणि अखेर दारावर येऊन उभा राहतो, नव्या वर्षाचा नवा शिलेदार गुढी पाडवा! नवं वर्ष, नवा हर्ष! नवी पालवी, नवी सळसळ, नवा उत्साह! निसर्गाला पुन्हा नवं हिरवेपण मिळू लागलं की माणूसही आतून हिरवा म्हणजे ताजा होऊ लागतो. नाविन्य म्हणजे काय? तर आनंद! मग आता हे सगळं इतकं सगळं नवीन म्हटल्यावर नव्याचा आनंद साजरा व्हायला पाहिजे की नको? म्हणून गुढी पाडवा महत्वाचा!*
 
    *सगळं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा स्वतःमध्ये नवी शक्ती, नवी उर्जा, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्नं भरण्यासाठी, नवी सुरुवात करण्यासाठी निसर्गाने पुढे केलेला विश्वासाचा हात म्हणजे गुढी पाडवा! सातत्याने येणारं अपयश, दु;ख, अपमान, अपघात, वियोग, मृत्यू म्हणजे जणू अमावस्या. चैत्रातली प्रतिपदा म्हणजे फाल्गुनातल्या अशा शेवटच्या अमावस्येनंतरचा पहिला नवा दिवस. ‘अमावस्या सरलीय, आता सगळं चांगलं होईल, मी नव्या उर्जेचा हात पुढे करतोय, तू फक्त लढायला तयार हो...’ म्हणणारा. अंग झटकून नवी उभारी देणारा... म्हणून पाडव्याचं कौतुक. कारण, या दिवशी निसर्ग आपल्याला म्हणत असतो,*

_*नवा सूर्य करतो तुझ्या मी हवाली, जगाला कळू दे नव्याने खुशाली!*_
_*दिशाभूल करतिल जरी लोक काही, तुझे स्वप्न राहो तुझ्या भोवताली!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, March 11, 2026

एक वाटी वरण

*एक वाटी वरण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*11 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*एक वाटी वरण!*

       *संध्याकाळी नवऱ्याला चहा देता  देता बायकोने नवऱ्याच्या वाढत्या पोटाकडे पाहिलं आणि खूप दिवसांपासून तिच्या मनात शिजत असलेला विषय शेवटी काढलाच… “अहो, ऐका ना!” “बोल.” “तुम्ही डायट वगैरे का करत नाही?” “म्हणजे??” “अहो, जरा तुमच्या पोटाचा घेर कुठे चाललाय त्याचा काही विचार? आणि ती शर्टची बटनं पहा, तुटतात की सुटतात अशी सारखी भीती वाटते मला.” अचानक झालेला अण्वस्त्र हल्ला सावधतेने परतून लावत नवरा म्हणाला, “आता तुझ्यासारखी चांगलंचुंगलं करून खाऊ घालणारी बायको म्हटल्यावर ढेरी वाढणारच ना?”*

 *पण बायकोने विषय पुढे रेटलाच, “हो! ते झालं तुमचं म्हणणं, पण ते बरं दिसतं का? इतर बायकांचे नवरे बघा कसे सडसडीत बांध्याचे आणि तुमच्या पोटाची चाललीय पृथ्वीगोलाबरोबर स्पर्धा! कुठे घेऊन जाणार आहात म्हणते मी एवढा सगळा डोलारा!?”*   

 *“अगं, वाढलेली ढेरी म्हणजे सुखी माणसाचं लक्षण असतं. आता त्या वाळकुट्या माणसांचे पोट वाढत नाही त्याला आम्ही काय करणार? ढेरीवरून हात फिरवण्याचं समाधान आणि आत्मानंद आहे का त्यांच्या नशिबात? जळतात मेले आमच्यासारख्यांवर!”*

 *“ते बाकी मला काही माहीत नाही. उद्यापासून तुम्ही डायटवर! समजलं? सकाळी चहा-बिहा काही मिळणार नाही. बीट-काकडी-गाजराचा ज्यूस देते तुम्हाला. जेवण जरा कमी करत जा, आणि फिरायला जात जा सकाळ-संध्याकाळ दहा-पंधरा हजार पावलं! पंधरा दिवसात ढेरी कमी झाली पाहिजे. मी माझ्या मैत्रिणीशी पैज लावलीय- नवऱ्याची ढेरी कमी करून दाखवते म्हणून!”*

*नवरा जागेवर उडालाच. “ऑं? अगं काय हे? बावळट झाली का तू?” “नाही! त्यातसुद्धा स्वार्थच आहे माझा. जर या निमित्ताने माझा नवरा हिरोसारखा दिसायला लागला, तर नको आहे का आपल्याला, म्हणजे मला??” “अगं माणूस कर्माने हिरो बनतो, दिसण्याने नाही! आता तू बारीक किडकिडीत आहेस म्हणून मीही तसंच व्हावं यात कोणतं आलं लॉजिक आणि शहाणपण?” “अहो, लग्नाच्या वेळेस होतात का तुम्ही असे? तेव्हा तर काडीसारखे होतात अगदी. आता झालात बटाटा घातलेल्या वड्यासारखे! लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसायला पाहिजे की नको..?” “जा मग! शोध दुसरा बारीक आणि किडकिडीत काडीसारखा नवरा..!” “दुसरा कशाला? मी माझा जो आहे त्यालाच बारीक करून दाखवणार!” “अगं पण अधूनमधून थोडं-थोडं खाल्ल्याशिवाय राहवत नाही मला. भूक लागते!” “ही भूकच मारायची आहे मला. सदानकदा खायला मागता. बरणीत हात घालून शेंगदाणे घेऊन पळता. हद्द झाली बाई या खाण्याची!”*

 *“ऐक ना, आपण आज मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत करूयात, ओके?  मी घेऊन येतो हवं तर अर्धा किलो.’’ बायकोने थेट सिक्सरच मारला, “ओ चिकनवाले..., आता हे जिभेचे चोचले किमान पंधरा दिवस बंद!” “म्हणजे??” “म्हंजे वाघाचे पंजे! आजपासून संध्याकाळी तुम्हाला फक्त एक वाटीभर वरण देणार आहे मी प्यायला!” “देवा देवा! मेलो!! अगं कोणी घातलं तुझ्या डोक्यात हे भूत?” “त्या दिवशी ते तुमचे कोण मित्र आले नव्हते का आपल्या घरी जेवायला? तेच सांगून गेले जाताना. म्हणाले, ताई तुमच्या मिस्टरांची ढेरी कमी करायची असेल तर यांना संध्याकाळी फक्त एक वाटीभर वरण देत जा!” “अस्सं का...! नवरा निश्चयाच्या सुरात म्हणाला, “आता येऊ दे पुढच्या वेळी त्यांना. नाही चहाऐवजी वाटीभर मुगाचं वरण प्यायला दिलं तर नाव नाही सांगणार!!”* 
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, March 5, 2026

अनुभवाच्या पलीकडले

*अनुभवाच्या पलीकडले !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अनुभवाच्या पलीकडले*

*निसर्गाने माणसाला अभिव्यक्त होण्याची क्षमता दिली आहे. हे त्याने त्याच्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.*

 *मिळणाऱ्या उण्यापुऱ्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या जगण्यात माणूस इतकं पाहतो, सोसतो, अनुभवतो की ते इतरांसमोर मांडल्याशिवाय त्याला राहवत नाही. बोलकी माणसं भडभड बोलून, रागावून, प्रसंगी दोन शिव्या देऊन, दोन कानाखाली देऊन-घेऊन का होईना, पण ‘मोकळी’ होतात. पण सगळीच माणसं बोलकी थोडीच असतात? काही अबोल असतात, काही अबोल राहतात. स्वतःसोबत स्वतःचा हिमनग घेऊन फिरतात. एखाद्या कलेचं बोट धरून स्वतःचं अव्यक्त सांगणं सांगत राहतात, आणि लोक असे, की त्याकडे मनोरंजन म्हणून पाहतात!*

 *खरं तर जगात कला आणि कलाकार आहेत म्हणून माणसे जिवंत आहेत. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर मारलेला एक फटकारा ‘त्याने का मारला होता’ हे तो हे जग सोडून जातो तरीही लोकांना समजत नाही. एखाद्या गायकाने अचानक घेतलेली ताण ही खरे तर अगोदर त्याच्याच काळजातल्या वेदनेचा ठाव घेते, पण लोक त्यांच्या परीने याचा अर्थ लावतात, आणि ‘वाहवा!’ म्हणतात! एखादी स्त्री प्रख्यात लेखिका असेल, तिच्या लिखाणाचे लाखो चाहते असतील; परंतु तिने प्रत्यक्षात काय भोगले होते हे कदाचित तिच्या लिखाणात कधीही येणार नाही; ती ते येऊ देणार नाही. आले तरी लोकांना ते कळणार नाही, कारण लोक फक्त तिने गोलगोल फिरवलेल्या शब्दांची जादू पाहतील, तिच्या त्यावेळच्या मनस्थितीचा कयास लावू शकणार नाहीत. एखादा कवी हजारो कविता लिहील; परंतु ज्या एका दुःखामुळे तो प्रचंड कोलमडून पडला होता, ते दुःख त्याच्या कवितेत कदाचित कधीही येणार नाही. कदाचित म्हणूनच कलाकाराची कला आपण कैकदा पाहतो; पण त्यामागचा माणूस आपल्याला क्वचितच दिसतो!*

*शहाणी, समजदार माणसं दुनियेला जे हवं आहे ते ते पुढे ठेवत जातात. जे दुनियेला नको आहे, परंतु आपल्याकडे भरपूर आहे, ते जाणीवपूर्वक आपल्याकडेच ठेवत जातात. ही सुद्धा एक कलाच आहे. या अर्थाने जर प्रत्येक माणसाला आणि विशेष करून दुनियेतल्या समस्त कलाकारांना उकलून पाहिलं, तर आपल्या डोळ्यांना झेपवणार नाहीत असे दुःखाचे असंख्य निद्रिस्त झरे आपल्याला दिसतील. परंतु आपण तरी त्याचं काय करणार? आपल्या अश्रुंचे आणखी दोन थेंब त्यात टाकल्यामुळे ते प्रवाहीत थोडेच होणार आहेत? त्यामुळे ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे राहू द्यावं. आताच्या या घडीला तो माणूस ‘जसा आहे तसा’ त्याला स्वीकारावं. त्याने स्वतःहून काही सांगितलं तर गुमान ऐकावं, त्याला रिक्त होऊ द्यावं; विसरून जावं. त्याला सल्ले देऊ नयेत. शांत झालेलं पाणी पुन्हा ढवळून गढूळ करू नये. अशा वेळी त्याला मनातल्या मनात फक्त इतकंच म्हणावं,*

*_कुठून तू आणलास संयम, शिकव मला_*
*_तुझ्यापुढे मी उजाड पत्थर, घडव मला!_*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, February 26, 2026

सोपस्कार


*सोपस्कार !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*25 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*सोपस्कार*

 *मंडळी, आठवतंय? लहानपणी सकाळी आपली अंघोळ झाल्यावर आई कौतुकाने आपल्याला तिच्यासमोर बसवायची. तिच्याकडे गंधाची एक बोटभर लांबट अशी डबी असायची. आपली इवलीशी हनुवटी तिच्या डाव्या हातांच्या काही बोटांच्या चिमटीत ती अलगद पकडायची, त्या डबीतला लालभडक किंवा चॉकलेटी गंध झाकणालाच असलेल्या लांबट काडीने आपल्या कपाळी रेखायची. आपण त्यावेळी साक्षात बाळकृष्ण, बाळराधा, बाळहनुमान, बाळराम वगैरे दिसायचो.*

    *गालांवरून अगदी मोरपीस फिरवावं तसे आई दोन्ही हात फिरवायची, नि आपण तिच्याकडे नुसतंच निरागस नजरेने बघत असायचो. तिचं आपल्याकडे बघून झालं की ती म्हणायची, “जा आता खेळायला! तिने असं म्हटलं, की जणू जग जिंकायला निघालेल्या वीराप्रमाणे शक्तिमान होऊन आपण खेळायला निघायचो! आठवतंय? किती सुंदर काळ होता तो!*
   *आता जेव्हा कळतं की आईच्या कपाळीचं कुंकू असो, की तिने आपल्या कपाळी लावलेला गंध किंवा टिळा असो, या गोष्टी लावण्यामागे आपल्या शरीरातलं सर्वात प्रभावी जे आज्ञाचक्र त्याचं रक्षण व्हावं हा निर्मळ हेतू होता, तेव्हा आपल्या महान संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटू लागतो. पण हळूहळू आपण संस्कृतीपेक्षाही महान झालो! आधुनिकतेच्या लाटेत स्त्रियांनी कुंकवाचा आकार छोटा-छोटा करत एके दिवशी कुंकवालाच तिलांजली दिली आणि थेट टिकलीवर आल्या! तशा बाथरूमच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या! टिकल्यांचेही इतके आकार-प्रकार झाले, की साडी कोणत्या रंगाची घातलीय त्यावर टिकली केवढी आणि कोणत्या रंगाची लावायची हे ठरू लागलं.*

 *इकडे बाप्या माणूस कोणत्या देवाला किंवा गुरुजींना फॉलो करतो त्याच्यावर त्याची गंध लावायची पद्धत ठरू लागली. माणसं आधीही गंध लावायचीच, पण एकसारखा. आता ‘गंध एक बोटाचा लावायचा, की तीन बोटांचा? उभा लावायचा की आडवा? एक ठिपक्याचा की दोन!’ एक न अनेक प्रकार! आता मंगळसूत्राला लपायला जागा हवीय, आणि गंधाने मात्र प्रदर्शनार्थ उचल खाल्लीय!*

   *अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत गंध लावलेली मंडळी सात्विक, सुस्वभावी वगैरे वाटत असत. हल्ली काही ठिकाणी ते जरा जास्तच अंगावर येऊ लागलं आहे. समाजातील अपप्रवृत्तींच्या कपाळीही गंध हटकून दिसू लागलाय. समोरच्या माणसाला बघताक्षणीच भीती वाटावी किंवा त्याच्यावर दबाव पडावा असा आक्रमक, भडक गंध वा कुंकू मुद्दाम लावून मिरवणाऱ्या या माणसांच्या गावी ‘आज्ञाचक्र’ हा शब्द तरी असेल का?*

    *मंडळी, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला नक्की जपायच्या आहेत; मात्र त्यांचा विपर्यास होणार नाही याचं भान समाज म्हणून आपल्याला ठेवावंच लागेल, कारण गंध कपाळावर असतो; पण माणसात देव पाहण्याचे संस्कार मनात असतील तरच तो अर्थपूर्ण ठरतो, अन्यथा तो उरतो फक्त आणि फक्त सोपस्कार!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


Thursday, February 19, 2026

आड आणि पोहरा

*आड आणि पोहरा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*18 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आड आणि पोहरा*

*एका नवीनच रंग दिलेल्या घराला भेट देण्यासाठी दुसरं एक कुटुंब आलं. घर छान सजवलेलं होतं. सगळं काही एकदम फ्रेश! सगळेजण घराची स्तुती करत चहा, फराळ आणि गप्पांमध्ये गुंतले असताना पाहुण्याच्या आठ-दहा वर्षाच्या मुलाने हातातल्या गाडीच्या चावीने घरातल्या नव्या कोऱ्या भिंतीला खरवडून टाकलं, आणि महागामोलाचा पेंट लावलेली भिंत सगळी विद्रूप करून टाकली! घर ज्यांचं होतं त्यांनी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनात काय वादळ उठलं असेल बरं? करा विचार! तुमचं घर असतं तर तुम्ही काय केलं असतं? त्या मुलाच्या घरच्यांकडून तुम्ही काय अपेक्षा केली असती? त्यांनी मुलांना बाहेर जाण्याआधीच ‘तिकडे कसं वागावं’ हे जरा सांगायला पाहिजे होतं, नाही का?*

*आपण माणसांच्या समाजात राहतो. हा समाज हजारो वर्षांपासून इथपर्यंत सुरळीत चालत आला कारण माणसांनी स्वतःच्या आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांच्या जगण्याला काही फुटपट्ट्या लावून घेतल्या, काही नियम घालून घेतले आणि त्यांची मर्यादाही वारंवार सांभाळली. बाप नावाच्या माणसाचं वागणं कसं असावं, मुलांनी कसं वागावं, पाहुण्यांनी कसं वागावं वगैरे. माणसं या जगण्याच्या फुटपट्ट्या निरंतर जपत आली आहेत. एकमेकांचा आदरयुक्त धाक ठेवत आली आहेत. समाज आपल्याला काय समजतो, आणि आपण कसं वागलं पाहिजे याचं एक अनामिक बंधन लोकांनी घातलेलं अगदी कालपर्यंत तरी दिसत होतं, म्हणून सगळं सुरळीत होतं. जगण्यात एक अदब होती.*

 *आता काही लोक हळूहळू या फुटपट्ट्या सोडून द्यायला लागले आहेत. आता तुम्ही सगळ्याच दुकानदारांकडून चांगल्या मालाची अपेक्षा करू शकत नाही. डॉक्टरांकडून चांगल्या वैद्यक सेवेची अपेक्षा करू शकत नाही. सुतार तुमचं फर्निचर चांगलं बनवेलच याची आता खात्री राहिलेली नाही. सरकारी कर्मचारी लाच न घेता काम करेलच असं नाही. पोलीस चोराला पकडल्यावर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवेलच याची खात्री नाही. न्यायाधीश खराखुरा न्याय देतीलच असं नाही. ज्यांच्याकडून कधीही व्यसनाची अपेक्षा केली नव्हती, ते गटारात; तर जे इतरांना ज्ञानामृत पाजत होते ते अश्लीलतेच्या प्रकरणांमध्ये रंगेहात सापडत आहेत. दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे रात्री दारूच्या पार्ट्यांमध्ये झिंगून पडलेले दिसत आहेत. निवडून दिलेले सगळे राजकीय लोक हे तसे सामान्य माणसांचे सेवक; पण ते आता आपले मालक असल्यासारखे वागू लागले आहेत! समाजात अतिशय सात्विक चेहरा असलेल्या माणसांचा दुसरा चेहरा इतका भयावह आहे की भीतीने थरकाप व्हावा!*

 *हे सगळं असं आणि असंच आहे. मोठ्या माणसांनीच ताळतंत्र सोडलंय, मग यापुढे त्या भिंत खरवडणाऱ्या मुलाला तरी दोष देऊन उपयोग काय? शेवटी जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार! मंडळी, छत्रपती शिवरायांचं स्मरण करूया, त्यांच्यासारखं होऊया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यापुरता का होईना आड स्वच्छ ठेऊया!*
*जय जिजाऊ! जय शिवराय!*
🚩
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Tuesday, February 10, 2026

तीन सोनेरी शब्द

*तीन सोनेरी शब्द!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*10 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*तीन सोनेरी शब्द*

*एका शाळेत एक खेळ करून दाखवणारा आला. मुलं उत्सुकतेने त्याच्याभोवती जमली. त्याने पिशवीतून तीन चेंडू काढले, प्रत्येक चेंडूवर काहीतरी लिहिलेलं होतं. त्याने त्यातला एक चेंडू हवेत फेकला. तो खाली यायच्या आत अलगद दुसरा आणि तिसराही उचलला. आता एक चेंडू हवेत, दोन चेंडू हातात. आणि मग इतक्या सफाईदारपणे ते तीनही चेंडू त्याने हवेत गोलगोल फिरवले की मुलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या!*

 *एका चाणाक्ष मुलाने कळीचा प्रश्न विचारला, “तुम्हाला हे चेंडू कसेकाय फिरवता येतात? खेळवाला म्हणाला, “सोप्पंय. कोणतेही दोन चेंडू आपल्या दोन्ही हातांना गुंतवून ठेवतात. मात्र त्या दोन चेंडूंच्या बदल्यात हवेत उंचावलेल्या तिसऱ्या चेंडूचा आपल्याला आनंद घेता येतो.” एका मुलाने म्हटलं, “आम्ही पाहिलं, या चेंडूंवर तुम्ही काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ते वाचून मग तुम्ही चेंडू फिरवता ना? तो चेंडू हवेत फिरवण्याचा मंत्र आहे का?” खेळवाला म्हणाला, “चेंडूंवर काहीतरी लिहिलंय हे खरंय. पण जे लिहिलंय तो चेंडू फिरवण्याचा नाही, तर जीवन जगण्याचा मंत्र आहे!” “बघू! बघू!” म्हणत मुलं त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी एकमेकांवर तुटून पडली! जवळ जाऊन पाहिलं तर फक्त इंग्रजीतली तीन अक्षरं. प्रत्येक चेंडूवर एक अक्षर. टी, एम आणि के! मुलांना काही कळेना. हा कसला एकाक्षरी मंत्र? खेळवाला म्हणाला, “हा साधासुधा मंत्र नाही; गुरुमंत्र आहे! मुलांनी गलका केला, “प्लीज आम्हाला सांगा, प्लीज सांगा!”*

  *खेळवाला म्हणाला, “ही तीन अक्षरं म्हणजे आयुष्यातील तीन सोनेरी शब्द आहेत. लाल चेंडूवरचा टी म्हणजे टाईम; म्हणजे वेळ. हिरव्या चेंडूवरचा एम म्हणजे मनी; म्हणजे पैसा, आणि पिवळ्या चेंडूवरचा के म्हणजे नॉलेज; म्हणजे ज्ञान! वरील खेळाप्रमाणेच आयुष्यात या तीनपैकी कोणत्याही दोन गोष्टी जर गुंतवल्या, तर तिसरी गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते, तिचा मनसोक्त आनंद घेता येतो!” मुलं म्हणाली, “म्हणजे?”*

*खेळवाल्याने समजावून सांगितलं, “बघा, वेळ, पैसा आणि ज्ञान यापैकी तुम्हाला जर ज्ञान हवे असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल, सोबत पैसेही भरावे लागतील. कारण फुकट काही मिळत नाही! तुम्हाला जर पैसे हवे असतील, तर तुमचं ज्ञान, कला आणि तुमचा महत्वाचा वेळ लोकांना द्यावा लागेल, तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतील, आणि जर तुम्हाला स्वतः ला मोकळा वेळ हवा असेल, तर जे काम तुम्हाला करायचे आहे त्यासाठी त्या कामातील ज्ञानी माणूस नेमून तुम्ही मोकळे राहू शकता, मात्र तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागतील! म्हणजे दोन गोष्टी गुंतवल्या की तिसरीची प्राप्ती होते! हो की नाही?” मुलांनी “होsss” म्हणत जोरदार टाळ्या वाजवल्या! मुलांना आज एक नवीन गोष्ट समजली होती.*

 *मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यात या तीनपैकी कोणत्या दोन गोष्टी गुंतवत आहात, आणि त्यांच्या बदल्यात तुम्हाला कोणती तिसरी गोष्ट मिळतेय? करा विचार!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, February 4, 2026

अंतिम ध्येय

*अंतिम ध्येय!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अंतिम ध्येय*

*एखाद्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर तो म्हणेल की मला अमुक एका गोष्टीत उत्तुंग यश प्राप्त करायचं आहे. शेकड्यातल्या जवळपास प्रत्येकाचं ‘गडगंज श्रीमंत होणं’ हे ध्येय आहे. पण हे खरं माणसाचं अंतिम ध्येय नसतंच मुळी. लोक लक्ष्यालाच ध्येय समजतात!*

 *ध्येयाच्या नावाखाली विद्यार्थ्याला शालांत परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवायचे आहेत. तरुणाला किमान २०-२५ लाखाचं पॅकेज असलेला जॉब मिळवायचा आहे. कुणाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे, कुणाला स्वत:चा बिझनेस सेट करायचा आहे. मनात स्वप्न पाहिलेली प्रॉपर्टी बनवायची आहे. वृद्धत्वाकडे झुकलेला असेल तर त्याला देवदर्शनाची आस आहे.*

 *मात्र या सगळ्या नद्या आहेत केवळ, अंतिम ध्येयाच्या समुद्राकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्या. त्या माणसाला खुणावत राहतात- ‘ये आमच्या प्रवाहात, आम्ही तुला तुझ्या खऱ्या ध्येयाचा पत्ता सांगतो; त्याचं घर दाखवतो.’ जुन्याजाणत्या लोकांमध्ये बसलं की कळतं की वरीलपैकी एकही नदी समुद्राला मिळताना निर्मळ राहत नाही. अपेक्षांचा आणि अपेक्षाभंगाचा, यश-अपयशाचा, दु:ख-वेदनेचा, लालसा आणि वासनेचा, विश्वासघाताचा, भ्रष्ट आचारविचारांचा, बिनडोक माणसांच्या अक्कलशून्य वागण्याचा इतका गाळ या नद्या वाहून आणतात की त्या जिथे पोहचू पाहतात, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर सगळी दलदल होऊन जाते. त्या दलदलीत पाय पडायचा अवकाश, की काळपुरुषाने एकाच झडपेत माणूस गिळलाच म्हणून समजा! जिथे नद्यांची ही अवस्था तिथे त्यांच्या पुराच्या पाण्यावर स्वार होऊ पाहणाऱ्या चिनपाट माणसाची काय कथा? कित्येक माणसांना तर या नद्याच अर्ध्यावर ‘या नाहीतर त्या’ काठाला भिरकावून देतात. माणसं तोंडघशी पडतात. तोंड सोलून निघतं. तरी पिंड जळाला तरी सुंभ तसाच राहतो. पुन्हा दुसरी नदी; पुन्हा दुसरी लहर. दिसलं पाणी की मार उडी! पुन्हा कोणी तळाशी, तर कुणी पल्याड भिरकावलेला! चाकाचा शोध लागल्यापासून हे अविरत सुरूच आहे; आणि अजून पुढची अनंत वर्षे थांबेल असं वाटत नाही.*
    
       *तुम्ही म्हणाल असा हा ध्येयाचा खरा समुद्र तरी कोणता आहे? या समुद्राचं नाव आहे, आनंदसागर!माणसाच्या आयुष्याचं खरं अंतिम ध्येय आहे आनंदी होणं! त्याची सगळी धडपड खरी त्याच्यासाठी आहे. पण त्याला हे समजत नाही की आपण मुळातच आनंदरूप होतो! पुन्हा त्याचा शोध घेण्याची गरज नव्हती! फक्त जगायची बात होती!! पण प्रत्येक वेळी नदीतल्या गाळामुळे गोष्ट बिघडते आणि आपल्या मूळ घरी म्हणजे आनंदाच्या डोही आपलं पोहचणं काही होत नाही!*

   *तूर्तास समुद्र जरी नाही मिळाला तरी आपल्यापुरता एखादा आनंदाचा छोटासा डोह आपल्या आसपासच कुठेतरी शोधायला काय हरकत आहे? उगाच तुकोबांनी म्हटलेलं नाही...*
*आनंदाचे डोही, आनंद तरंग*
*आनंद चि अंग आनंदाचे!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, January 29, 2026

थिंकोनी कमेंटावे!

*थिंकोनी कमेंटावे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*28 जानेवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*थिंकोनी कमेंटावे!*

   *स्टुपिड कमेंट्स केल्याशिवाय ज्यांचा डेटा ते स्वतः दोघांनाही गप्प बसवत नाही, असे काही लोक सोशल मीडियावर जन्माला आले आहेत. ‘दिवसभर विविध इ-भिंतींवर पोष्टी टाकणे आणि लाईक, कमेंट्सची वाट पाहणे, डकवल्या गेलेल्या पोष्टींवर लक्ष ठेवणे, त्या आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक नजरेखालून काढणे, त्यात थोडासा का होईना ‘त्रुटी’ नामक क:पदार्थ आढळतो का ते पाहणे, दिसल्यास तत्काळ त्यावर तुटून पडणे, सर्वशक्तीनिशी कमेंटवार करून समोरच्याला गारद करणे आणि मोहीम फत्ते करून विजयीमुद्रेने पुढील पोष्टमोहिमेवर निघणे!’ हा यांचा शिरस्ता. हे सगळं कशासाठी? तर आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी! शिवाय आपल्या संपूर्ण तार्किक, अनुभविक, नोस्टेल्जिक, टायपिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून डेटाबळ खर्चल्याचं समाधान मिळविण्यासाठी. कधी हे इतरांना हर्ट करतात, तर कधी स्वतःच तोंडघशी पडतात!*

   *हे कमेंटलेखक केवळ साध्या लोकांच्याच पोस्टवर तिरकं लिहीत नाहीत;  तर मोठ्मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेल्या अनोळखी पोस्टवरसुद्धा तावातावाने कमेंटतात. खूपच घाणेरडा शब्द असेल तर xx अशा फुल्या टाकतात; नाहीतर मग शब्दखेळ, अक्षरबदल करून का होईना आपल्या तिरकस भावना तिथपर्यंत पोहचवतातच! ‘आपली कमेंट एकदा तरी तो सेलिब्रेटी वाचेल’ असे त्यांना वाटते. राजकारणी लोकांनी विरोधी मतं पोस्ट करण्यासाठी चाळीस पैशाने माणसं नेमलेली असतात हेही यांच्या गावी नसते. हे त्यांच्या गर्दीत फुकटच सामील होतात!   ना प्रसंगाचे गांभीर्य, ना कोणत्या वेळी काय कमेंट करावी याचे भान! सगळाच सावळा गोंधळ!*

   *एका मोठ्या नटीला एका मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लोक तुमच्या फोटोवर अतिशय खालच्या शब्दात कमेंट्स करतात ते वाचून तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर तिने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली की ‘सोशल मिडियावरच्या कमेंट आम्ही वाचतो’ हे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढ्या कमेंट्स वाचण्याइतका वेळ तरी आहे का आमच्याकडे? पण तुम्हाला एक मात्र सांगेल. कमेंट्स करणाऱ्याच्या कमेंट्स प्रत्यक्ष तो सेलिब्रिटी जरी वाचत नसला, तरी टाईप करणाऱ्याचे मित्रमंडळ मात्र नक्की वाचत असते, आणि त्यातून कमेंट करणारा कोणत्या लायकीचा आहे हे त्या मित्रमंडळींना कळत असते. वरील सापळा न समजल्यामुळे समाजात सज्जन म्हणून परिचित असलेले अनेकजण इंटरनेटवर मात्र अतिशय खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असतात. एक प्रकारे अशा कमेंट करणारा माणूस खराब शब्द वापरून स्वतःचीच लायकी घालवून घेत असतो, पण त्याला भावनेच्या भरात ते समजत नाही!*

    *कमेंट जरूर करावी, पण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी. व्यक्त जरूर व्हावं, पण आपल्या कमेंटचं मूल्य ओळखून. प्रसंग काय आहे, आपण स्वतः कोण आहोत, आपलं समाजातलं स्थान काय आहे, आपलं लिहिलेलं वाचणारे कोण आहेत याचा विचार करून व्यक्त झालं तर व्यक्तही होतं येतं आणि देवाचं देवपणही टिकून राहतं, म्हणून-*

*'जैसा जगी मान, तैसेचि वर्तावे*
*आणि कमेंटावे, थिंकोनिया!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 21, 2026

अरे संसार संसार जसे कपबशीचे घर

*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर*
~~~

    *‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके, तव्हा मिळते भाकर!’ या चार ओळींमध्ये बहिणाबाईंनी जगण्याचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. एका कष्टकरी नवऱ्याने मात्र हेच तत्त्वज्ञान वेगळ्या शब्दात मांडलं, ‘अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर, बशी बसे आरामशीर, कप हिंडे दारोदार...!’ घ्या आता!*

   *कपबशीचा हा संसार घरागणिक असा वेगळा आहे. काही घरांमध्ये बशी बसलेली, कप हिंडतोय, काही घरांमध्ये कप बसलेला, बशी मरमर करतेय; तर काही ठिकाणी पोरांचं आयुष्य सुखी व्हावं या नावाखाली त्यांनाच वेळ न देता कप आणि बशी दोघेही दिवसभर दारोदार हिंडताहेत! काही असो, संध्याकाळी कप असो की बशी, घरी येणं भाग आहे. तसाही बशीविना कपाच्या आणि कपाविना बशीच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? एखाद्या बशीला नसेल आवडला कप, एखाद्या कपाला नसेल आवडली बशी. काही कपांना वाटतं ‘मीच लै हुशार’; तर काही बश्यांना वाटतं, ‘आमच्या कपाला अक्कलच नाही!’ तरी ‘तुझं माझं जमेना; तुझ्याविना करमेना’ असा सगळा मामला! या अशा अतिशहाण्या कप आणि बश्यांच्या खोडी मोडण्यासाठीच बहुतेक देव त्यांच्या अशा ‘चिवित्र’ जोड्या लावून मजा बघत असतो!*

   *‘जोड्या स्वर्गात बनतात’ असं लोक म्हणतात खरं, पण जे तिकडे चुकांडी देऊन, निसटून पृथ्वीवर येतील, त्यांना इथली जुनी जाणकार मंडळी गंडवतात! ‘काहीही करून कपाला आणि बशीला वेगवेगळं राहू द्यायचं नाहीच’ हा त्यांचा खाक्या. जोड झालाच पाहिजे, मग तो पुढे टिको, ना टिको. ‘आमच्या डोळ्यांदेखत होऊ दे’ च्या नावाखाली घाईघाईत कानतुटका कप किंवा तडा गेलेली बशी आपण घेऊन आलो हे मंडळींच्या लक्षातच येत नाही. पुढे आयुष्यभर त्या कप आणि बशीची खडखड ‘बा’ चा ‘बा’ ची चालू राहते. जिथे बशी शांत तिथे कप तडतड्या. जिथे कप शांत तिथे बशी बडबडी. मग बशीघरात दुसरं काय होणार? कधी कप एकाकी, तर कधी बशी!*

    *‘आम्हाला आमच्या मनासारखा कप किंवा बशी निवडून घेऊ द्या’ म्हणणाऱ्या आधुनिक कपबश्याही खूप सुखात आहेत असं काही नाही. नव्याची नवलाई संपली की पुन्हा तिथेही तेच पाढे! काही कपांना त्यांच्याच बश्यांचं त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं बघवत नाही, त्यांचा अहंकार दुखावतो; तर आपल्या कपाचं इतर बश्यांनी केलेलं अतिकौतुक काही बश्यांना आवडत नाही, त्यांना कप हातातून निसटायची भीती वाटते! पुढारलेल्या शहरातल्या कपबश्यांचं हे आतलं दुखणं आहे. आता जे व्हायचं आहे ते का थांबणार आहे का? त्यांच्यापेक्षा अडाणी कपबश्यांच्या जोड्या सुखात आहेत.*

   *कपबशीच्या भांडणात ‘माघार कोणी घ्यायची?’ हा फार कळीचा मुद्दा असतो. याचं साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत उत्तर आहे, ‘ज्याला आनंदी राहायचं आहे, त्याने!’ हळूहळू एकमेकांना समजून घेत अनुभवाचे चटके सोसले, की दोघांचंही महत्व अबाधित राहतं. जगणं सोपं आणि सुंदर होतं. म्हणून,*

 _*तुम्हाला जर कधी भेटली अशी भांडकुदळ जोडी*_ 
 _*चहात साखर वाढवा थोडी, पुन्हा वाढवा गोडी!*_
_*विस्कटलेल्या संसाराची आणा रुळावर गाडी!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 14, 2026

चुकामुक

*चुकामुक*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 जानेवारी 2026, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*चुकामुक*

  *गावाकडच्या भाविकांचा एक ग्रुप काशी यात्रेला गेला. सगळ्या बाया बापड्यांना आणि धोतर टोपी बाबांना घेऊन जाणाऱ्या एजंटने सांगितलं की एका मोठ्या स्टेशनच्या अलीकडेच आपल्याला छोट्या स्टेशनवर उतरायचं आहे, म्हणजे गर्दी टाळता येईल. ठरल्याप्रमाणे मंडळी उतरली; पण एक आजीबाई गाडीतच बसून राहिल्या, आणि त्यांची चुकामुक झाली!*

 *थोड्या वेळाने उतरलेल्या माणसांपैकी कोणाच्यातरी लक्षात आलं की एक आजी गाडीतच राहिल्या, गाडी निघून गेली! पोक्त वयाची दोन माणसं लगोलग मागून आलेल्या दुसऱ्या गाडीने पुढे गेलेल्या गाडीत राहून गेलेल्या आजीबाईंना शोधण्यासाठी गेली. तिच्या घरच्यांना कळवलं. गावाकडून आजीचे नातेवाईक आजीला शोधायला दुसऱ्या गाडीने गेले. आजी कुठे गेली, कुठे उतरली, तिचं काय झालं, काही कळलं नाही. पुढील प्रत्येक स्टेशनवर उतरून शोध घेतला, पण आजीचा काही मागमूस लागला नाही. उत्तर भारतात, तीही हिंदी पट्ट्यात पहिल्यांदाच गेलेली ही गावाकडची अशिक्षित मराठी आजी कशी बरं सापडायची?*

 *मंडळी खूप थकली पण आजी सापडली नाहीच. सगळ्या यात्रेचा फियासको झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. बाया बापड्यांचे डोळे रडून रडून कोरडेठाक झाले. आजीचं अंतिम दर्शन कुणालाही झालं नाही. शेवटी आजीच्या घरच्यांनी जड अंतःकरणाने विचार करून निर्णय घेतला आणि पवित्र काशीच्या तीर्थक्षेत्रावर एका घाटावर आजीचा अंत्यविधी पिठाचा गोळा वगैरे ठेवून ब्राह्मणसाक्षीने आरंभ केला. अवघं वातावरण भावूक झालं.*

 *गंगेत स्नानासाठी डुबकी मारलेल्या एका महिलेने जलदान करण्यासाठी पाणी ओंजळीत घेतलं, आणि 'हर हर गंगेsss!' म्हणत अर्पण केलं आणि समोर बघते तर काय? जिचा अंत्यविधी करत होते ती आजी काही अंतरावर घाटावर जिवंतपणे आंघोळ करत होती! एकच गलका झाला. सगळे धावत धावत आजीजवळ गेले. तिचा मुलगा तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागला. "तू इकडे कशी पोहोचलीस?" विचारल्यावर ती म्हणाली, "गाडीतल्या काही मराठी माणसांशी मी बोलले. ते म्हणाले की काही काळजी करू नका. तुमच्या गावाकडची मंडळी काशी यात्रेसाठी इथे काशीला नक्की येतील. आपण तिथे जाऊन थांबूया. म्हणून मी इकडे येऊन तुमची वाट पाहत बसले. तुम्ही का इतका उशीर केलात!?" सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. चुकामुक झालेली आजी शेवटी अशी सापडली! जिवंतपणी आजीचा होऊ घातलेला अंत्यविधी होता होता राहिला!!*

 *आयुष्य हे चुकामुकींचा खेळ आहे. इथे प्रत्येकाची कधी ना कधी, कशाशी तरी, कोणाशी तरी चुकामुक होते.माणसांशी झालेली चुकामुक एखाद्या वेळेला या आजीसारखी दुरुस्त होऊ शकते, परंतु नियतीशी, नशिबाशी, आयुष्याशी झालेली चुकामुक कशी दुरुस्त व्हावी? आयुष्यभर माणूस काहीतरी शोधत राहतो अधून मधून असं वाटतं की आपण जे शोधतो आहोत ते आपल्याला मिळत आहे परंतु खरं पाहिलं तर कोणाला काहीच मिळत नाही. लपाछपीच्या खेळात लपलेला गडी सापडावा आणि तेवढ्यात घरच्यांनी बोलावून घ्यावं तसं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि हाती काही मिळण्याच्या काळातच देवाजीचं बोलावणं येतं आणि मग कळतं आयुष्य म्हणजे निव्वळ चुकामुक! म्हणून एक वेळेस तिळगुळ दिले नाही तरी चालतील, परंतु गोड बोलायला काय हरकत आहे?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, January 7, 2026

शहरातली अंधश्रद्धा

*शहरातली अंधश्रद्धा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 जानेवारी, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*शहरातली अंधश्रद्धा*

*रविवारी शहरातली माणसं तशी आळसावलेली असतात. अंमळ उशिराच उठतात. अशाच एक मॅडम निवांत उठल्या, स्नान वगैरे उरकल्यावर व्हरांड्यात जाऊन सूर्याला नमस्कार करण्यासाठी दरवाजा उघडला. पाहतात तर काय? उंबऱ्याजवळ उजव्या बाजूला मुठभर तांदूळ ठेवलेले. त्यावर हळद, कुंकू टाकलेलं. थोडीशी राखही. एका पिठाच्या गोळ्यात दोन अगरबत्त्या खोचलेल्या. बाजूला एक लिंबू! मॅडमचा आळस कुठल्या कुठे पळाला. झोप खाडकन उडाली. तशाच उलट पावली माघारी गेल्या आणि नवऱ्याला झोपेतून उठवून बाहेर आणलं. नवरा अर्धवट झोपेतच होता, पण समजदार होता. त्याने घडला प्रकार पाहिला, तसाच पुन्हा घरात गेला, केर भरण्याची सुपली आणि झाडू घेऊन आला. सगळं सुपलीत भरलं. शंभर-दिडशे फुटांवरच्या एका झुडपात टाकून हसत हसत आला!*

 *बायको दारात उभी राहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याने म्हटलं, "विसरून जा. जणू इथं काही नव्हतंच!" ती म्हणाली, "ते ठीक आहे, पण हे जादूटोणा वगैरे तर गावाकडे असतं ना? इथे शहरात सुद्धा??"*

 *तो म्हणाला, "शहर हे सुद्धा एक गावच असतं. अगडबंब पसरलेलं. शहरात कोण राहतं? गावाकडचीच माणसं शहरात येऊन राहतात ना? फरगेट." "अरे पण आपण कुठे कुणाचं घोडं मारलंय? चार महिनेही नाही झाले आपल्याला हे घर घेऊन. इकडचा भाग जरा सुशिक्षित वाटतो, जरा शांतता आहे म्हणून आपण इकडे राहायला आलो ना? आपण तर इथे कोणाला नीटसं ओळखतही नाही. मग हे काय? एवढ्या सुशिक्षित वाटणाऱ्या भागातही जादूटोणा? तरी मी तुला म्हणत होते की अगोदर सीसीटीव्हीची व्यवस्था करूया. तेव्हा तू म्हणालास आताच काही घाई नाही. कोणी केलं असेल हे? आणि आपल्याच दारावर का?"*

 *नवरा म्हणाला, "गावापेक्षा शहरात शिकलेले निर्बुद्ध आणि अतृप्त आत्मे जास्त असतात म्हणून!" बायको म्हणाली, "म्हणजे?" नवऱ्याने सुपली ठेवली आणि म्हणाला, "हे बघ, शहरात माणसं आली, की बरेच जण झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, काहींचं पोट भरतं; पण मन भरत नाही. सुखदुःख श्रीमंतांनाही आहेत, आणि गरिबांनाही. माणूस सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. दुःखाशी संकटाशी स्वतः दोन हात करण्याची हिंमत नसलेली माणसं मग बाबा लोकांच्या नादी लागतात, आणि 'माझ्यावरचं दुःख, साडीसाती जाऊदे; भले ती दुसऱ्यांवर टाक, पण मला या दुःखातून बाहेर काढ' अशी बावळट मानसिकता ठेवतात. मग हे बाबा लोक सांगतात- तुमच्या आसपास जे सुखी दिसत असतील त्यांच्या दारावर एवढ्या वस्तू देऊन टाका, म्हणजे तुमच्या वाट्याचं दुःख, साडेसाती त्यांना आणि त्यांच्या वाट्याचं सुख तुम्हाला!!' आणि हे वैतागलेले मूर्ख लोक तसंच करत सुटतात.*

*"बापरे! म्हणजे आता आपल्या मागे लागणार की काय ही साडेसाती आणि दुःख?" बायको घाबरल्या सुरात म्हणाली. नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अशी सुखदुःखांची अदलाबदल करणं इतकं साधं, सरळ, सोपं आणि सहज असतं, तर एका रात्रीतून सगळी दुःखी माणसं आनंदी, आणि सगळी आनंदी माणसं दुःखीकष्टी झाली नसती का?? साडेसाती म्हणजे वाईट वेळ नक्की जाते, पण अशी दुसऱ्यांच्या दारात लिंबू मिरच्या टाकून नव्हे! विचार करण्यात आणि टेन्शन घेण्यात वाया चाललेला वेळ जर काम शोधण्यात आणि पैसे कमावण्यासाठी खर्च केला, की साडेसाती जाते म्हणजे जातेच! आणि हो, चांगली वेळ कधीच येत नसते; आपल्याला आपल्याकडे असलेल्या आजच्या वेळेलाच प्रयत्नांनी चांगलं बनवावं लागतं! "चल, चहा ठेव मस्तपैकी, आलं आणि गवती चहा टाकून! राहिलं सीसीटीव्हीचं, तर तो आज बसवून टाकू! मग तर झालं!?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...