Wednesday, March 12, 2025

माणसाचा वर्ग कोणता?

*माणसाचा वर्ग कोणता?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 मार्च, बुधवार_

▪️
*माणसाचा वर्ग कोणता?*

    *"मम्मी, पशु म्हणजे प्राणीच ना?" तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीने आईला विचारलं. मम्मी म्हटली, "हो तर!" "मग माणसाला पशु म्हटलं तर चालेल ना?" मुलीच्या या प्रश्नावर मात्र घास घशात अडकावा तसा उत्तराचा शब्द मम्मीच्या घशात अडकून बसला. काय उत्तर द्यावे तिला कळेना. स्वतःला सावरत ती इतकंच म्हणाली, "पप्पांना विचारून सांगते."*

    *माणसाला प्राण्यांच्या वर्गात टाकायचं की पशुंच्या? हा तर नवीनच बॉम्ब टाकला लेकीने! माणूस हा समाजशील प्राणी आहे असंच आपण लहानपणापासून वाचत, लिहीत, म्हणत आलो. माणूस हा पशु आहे असं कधीच म्हटलं नाही, किंवा ऐकलंही नाही. पशु-पक्षी यांच्याबद्दलही आपण लहानपणापासून माहिती गोळा करत आलो, मात्र प्राणी आणि पशु हे वेगवेगळे असतील असं कधी वाटलं नाही. लेकीला उत्तर देणं भाग होतं. मम्मीच्या विचारांची गाडी वेगात धावायला लागली. काही क्षणातच ती विचारांच्या कोणत्या जगात गेली हे तिलाही कळलं नाही. शब्दांची उकल करून बघता बघता शब्द स्वतःच तिच्यासमोर अर्थ ओंजळीत घेऊन उभे राहिले.*

    *ज्यांच्यात प्राण आहे ते प्राणी. हिंदीमध्ये त्यांना जानवर म्हणतात कारण त्यांच्यामध्ये 'जान' म्हणजे 'प्राण' असतो. 'वर' म्हणजे 'धारण करणारा'. मग 'पशु' कोण? पशु शब्द संस्कृतमधल्या 'पश' या धातूपासून आला. ज्यांना पाशात म्हणजे बंधनात ठेवणे आवश्यक असते ते प्राणी म्हणजे पशु. त्यांच्यावर बंधन ठेवले नाही तर त्यांच्या शक्तीचा ते क्रूर उपयोग करतात. इतरांना हानी पोहोचवतात. म्हणून मुक्त श्वापदांना शक्यतो पशु म्हटलं जातं, आणि जे माणसांसोबत राहु शकतात, शक्यतो कोणाला इजा करत नाहीत, त्यांना प्राणी!  गुंता हळूहळू सुटू लागला.*

    *क्षणात मम्मीच्या डोळ्यांसमोरून गेल्या पंधरा दिवसांच्या बातम्या येऊन गेल्या. बसमध्ये पाशवी बलात्कार. लोखंडी रॉडने मारहाण करत पाशवी हत्या. निर्घृण हत्या केलेल्या प्रेताची विटंबना. निराधार महिलेवर पाशवी अत्याचार! पाशवी म्हणजे? पशूंप्रमाणे?? हो हो, तसेच. माणुसकीला कलंकित करणारी ही माणसे, माणसे नव्हेतच! हे तर पशू!! प्राण्यांमध्ये असलेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता यांच्यात कुठे आहे? यांच्यात आहे फक्त क्रौर्य, स्वार्थ, वासना, ओरबाडण्याची राक्षसी वृत्ती आणि नीच हव्यास! म्हणजे प्राणी आणि पशु यांच्यात भावनांवरच्या नियंत्रणाचा फरक आहे तर?*

   *मम्मीचे डोळे भरून आले. पोरीजवळ गेली. तिला पोटाशी घट्ट धरलं, आणि इतकंच म्हणाली, "पशु म्हणजे प्राणी नाही हं बाळ! पशु म्हणजे फक्त पशु, आणि प्राणी म्हणजे फक्त प्राणी! आणि हो, माणूस हा प्राणीच आहे, पण त्याचा पशु व्हायला वेळ लागत नाही, म्हणून जरा सावध राहत जा."* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 5, 2025

माणूस जगला पाहिजे

**माणूस जगला पाहिजे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 मार्च, बुधवार_

▪️

*गिव मी सम सनशाईन*

  *पहाटे सगळं जग साखरझोपेत असताना एक जण रेल्वेरुळावर येऊन उभा राहिला. निस्तेज. निर्विकार. तिकडून गाडी आली. लोको पायलटने त्याला पाहिलं. खूप हॉर्न दिले. पण हॉर्न ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. तो स्वतःही नव्हता. रुळावर फक्त त्याचं शरीर उभं होतं. विचार शून्य झालेलं फक्त शरीर. गाडी थांबू शकली नाही, त्याचा प्रवास थांबला. लोकांनी म्हटलं गाडीने त्याला उडवलं म्हणून तो गेला, परंतु खरं तर तो दोन महिन्यापूर्वीच गेलेला होता, हे कोणालाच कळलं नाही. नंतर लोक त्याच्यावर अमुक दडपण होतं वगैरे चर्चा करत राहिले.*

    *भावनिक आणि स्वाभिमानी माणसं धाडसी असतात. त्यांच्या निर्णयांनी ती कधी इतरांच्या दहा पावले पुढे जातात आणि खूप प्रगती करतात, तर कधी दहा पावले मागे फेकली जातात, प्रचंड अपयशाची धनी होतात. जिंकली तर कौतुक; हारली तर ‘छी! थू!’ त्यांच्या वाट्याला येते. ही माणसं जगावेगळी असतात खरी, परंतु यांची एक अडचण असते. ती अपमान सहन करू शकत नाहीत. दडपण व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. पडीच्या काळात कोणाला सांगतही नाहीत. चार चौघात हसतात, आतल्या आत झुरत राहतात. लोक काय म्हणतील? आणि ते काय करतील? हे प्रश्न त्यांना छळू लागतात. बदनामीची त्यांना भीती वाटते. मग एखादया हळव्या क्षणाला त्यांचं मन खचू लागतं. मन खचलं की शेवटाकडे सुरुवात झालीच म्हणून समजा. मृत्यू हा त्यांना सगळ्या कटकटीतून सुटण्याचा सोपा मार्ग वाटतो. जे इतरांना जमत नाही, असं मरण्याचंही धाडस ते करतात. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना अडचण होते हे त्यांना जिवंतपणी आवडत नाही, पण आपण असे केल्यावर त्यांना आयुष्यभर अडचणी राहतील, हे त्यांना टोकाचा निर्णय घेताना समजत नाही ही खरी शोकांतिका आहे. अशा वेळी माणूस आपल्या हातून निसटू लागला आहे हे कोणालातरी कळणं फार महत्वाचं. खचू पाहणाऱ्या माणसानेही 'मी आता खचू लागलो आहे' हे कोणालातरी सांगणं महत्त्वाचं आहे. कारण प्रयत्नांचे शंभर दगड मारल्यावर एखादा तरी दगड लागतोच. प्रयत्न थांबता कामा नयेत.*

     *सरतेशेवटी जेव्हा कुठूनही मदत मिळणार नाही तेव्हा 'ध्यान, ज्ञान आणि गान' म्हणजे संगीत हे माणसाला कोणत्याही संकटातून शंभर टक्के वाचवू शकणारे मार्ग आहेत हे प्रत्येकाला कळावं. तीनपैकी एकाला अशा वेळी बिनशर्त शरण जावं. कारण माणूस वाचला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. सोबत माणुसकीही जगली पाहिजे. हे जग माणसांनी त्यांच्या प्रयत्नांनी सुंदर केलं आहे. माणसंच खचून हे जग सोडून जाऊ लागली, तर या जगाच्या इतक्या सुंदर असण्याचा फायदा तरी काय?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, February 26, 2025

खरा उपवास

*खरा उपवास!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 फेब्रुवारी 2025, बुधवार_

▪️

*‘उपवास धरणे’ ही आपल्या संस्कृतीमधील एक सुंदर गोष्ट आहे. आणि ‘धरलेला उपवास पुन्हा सोडणे’ ही त्याची त्याहून सुंदर उत्तरपूजा आहे. काहीजण उपवास धरतात, काही ठेवतात, काही करतात, काहींना तो घडतो, तर काहींना तो चक्क पावतो!*

      *सदा नि कदा चर चर चरणाऱ्या देहाला व त्याच्या यंत्रणेला थोडी सक्तीची विश्रांती मिळावी हा उपवासामागचा निर्मळ हेतू आहे. 'हाताची घडी तोंडावर बोट!' ही म्हण उपवासासाठीच जन्माला आलेली असावी, पण खादाड लोकांनी ती लहान मुलांवर चिटकवली! उपवासाला 'कमी खावं' किंवा 'खाऊच नये' इथपर्यंत ठीक आहे. मात्र “हेच खावं, ते खाऊ नये” हा फतवा कोणी काढला कुणास ठाऊक? शिवाय त्याचे पहारेकरी खूप. एखाद्याने चुकून चॉकलेटचा किंवा बिस्कीटचा एक तुकडा जरी तोंडात टाकला तरी त्याच्यावर तुटून पडायला हे पहारेकरी टपूनच असतात. “उपास सुटला! उपास सुटला!” असं ‘चोर! चोर!’ च्या पट्टीत जाहीर करतात. बिचाऱ्या उपासकऱ्याचा चेहरा पहिल्याच बॉलवर विकेट पडल्यासारखा होतो!*

     *आजकालचा आपला उपवास म्हणजे निव्वळ ‘खाण्यात बदल’ असा झालेला आहे. आठवडाभर न खाल्लेली, वाटीभर टाकली तर कढईभर होणारी, आणि नुसताच बिनकामाचा पोटाचा फुगा वाढवणारी साबुदाण्याची खिचडी किंवा भगर उपवासाला कशी चालते कळत नाही. शिवाय उपवासाला बाकी काही चालू न देणाऱ्या लोकांना तंबाखू वगैरे खाल्लेलं मात्र बरोबर चालतं. ती 'वल्ली' असल्याचं शेपूट तिथे माणसं शिताफीने जोडतात! मग चतकोर भाकरीनेच काय घोडं मारलं आहे? 'काहीही खा, पण अत्यल्प, अगदी थोडसंच खा.' अशी उपासाची नवी व्याख्या केली तर? इतर दिवशी जेवणाला दोन भाकरी खाणाऱ्या माणसाने उपवासाच्या दिवशी फक्त चतकोर भाकर खाल्ली, तरी त्याचा उपवास चालू रहायला काय हरकत आहे? पण मग माणसांना 'चेंज' कसा मिळणार!?*

      *सणाच्या दिवशी एका दिवसाचा उपवास करणं सोपं आहे. आयुष्यभर तो नित्यनेमाने निभावणं ही साधना आहे. प्रख्यात तत्त्वचिंतक श्री श्री रविशंकर यांनी उपवासाची खूप सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. परमेश्वराचीच रूपे असलेल्या चांगल्या गुणांच्या व्यक्ती,वस्तू, विचारांच्या सानिध्यात राहणे म्हणजे खरा उपवास. उपवासाच्या निमित्ताने खाण्यावर नियंत्रण तर येतंच; बोलण्यावरही ते यावं. थोडं चिंतन मनन व्हावं. ज्ञानार्जन व्हावं. शुभ, नेमकं आणि सकारात्मक बोलावं. छोटं का होईना एखादं चांगलं काम करावं. आणि महत्वाचं म्हणजे चिडचिड न होता चेहऱ्यावर मस्त स्मित असावं की उपवास पावलाच म्हणून समजा!*

    *असा उपवास आपल्यापैकी किती जण करतात?*
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Thursday, February 20, 2025

छोटा शून्य मोठा शून्य!

**छोटा शून्य मोठा शून्य!*
(अनंत काणेकरांच्या विचारांचा एक धागा)
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 फेब्रुवारी, बुधवार_

▪️
 *एका वर्गात एक गुरुजी गणित शिकवत होते. वजाबाकी चालू होती. गुरुजींनी विचारलं, "पाच वजा पाच बरोबर किती?" मुलांनी एका सुरात सांगितलं "शून्य!" मग गुरुजींनी मुलांची मजा घ्यायचं ठरवलं. आणि विचारलं, "पंचवीस हजार वजा पंचवीस हजार बरोबर किती?" एक पोरगा जोरात ओरडला, "मोठ्ठा शून्य!! "सगळा वर्ग हसला! गुरुजींनी त्याला उभं केलं आणि म्हणाले, "शून्य कधी लहान मोठा असतो का? शून्य केवळ शून्य असतो." मुलगा धिटाईने म्हणाला, "गुरुजी, पाच ही लहान संख्या आहे. पंचवीस हजार ही मोठी संख्या आहे. उत्तर मोठा शून्यच असलं पाहिजे." गुरुजी म्हणाले, "अरे पण मोठा शून्य नसतोच!" मुलगा म्हणाला, "का नसतो?" आता गुरुजी निरुत्तर झाले. म्हणाले, "बाबा रे माझ्या गुरुजींनी मला इतकंच शिकवलं होतं. पण तरीही हा प्रश्न तू तुझ्या हृदयाशी जपून ठेव. एखाद्या वळणावर आयुष्य तुला या प्रश्नाचे उत्तर देईल." मुलाला ते काही कळलं नाही. पण गुरुजींनी खाली बसायला सांगितलं म्हणून तो खाली बसला. प्रश्नही काही काळासाठी खाली बसला.*

   *बरीच वर्ष मधल्या काळात निघून गेली. मुलगा मोठा झाला. त्याचा माणूस झाला. एके दिवशी टीव्हीवरचा एक प्रोग्राम पाहताना तो जरा सावध झाला. प्रसंग त्याच्या प्रश्नाशी निगडित होता.*

   *हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावरच्या कुठल्याशा पठारावर एक साधू तपश्चर्या करत बसला होता. तिथे एक हेलिकॉप्टर उतरले. त्यातून वैमानिक खाली उतरला. ती एक स्त्री होती. ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी थोडा पायांचा आवाज केला. साधूंनी डोळे उघडले. तिने विचारलं, बाबा तुम्ही तप का करत आहात? त्यांनी सांगितलं, "मोक्षप्राप्तीसाठी." ती म्हणाली, "तुम्ही मला ओळखता का?" साधू म्हणाले, "नाही." ती म्हणाली, "मला सर्व जग माझ्या कार्यामुळे ओळखतं. मी जगातील सर्वश्रेष्ठ अंतराळवीर आणि वैमानिकांपैकी एक आहे." साधू म्हणाले, बाळ, आयुष्य क्षणभंगुर आहे. मनुष्य एके दिवशी देह सोडून जातो. मृत्यू हे प्रत्येकाबद्दल अंतिम सत्य आहे. तुलाही एका दिवशी मरायचंच आहे आणि मलाही. फक्त मी इथे मरणार आणि तू तिथे एवढंच! प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटी शून्यच होतो." अंतराळवीर म्हणाली, "परंतु तुमच्या आयुष्याचा छोटा शून्य होईल माझ्या आयुष्याचा मोठा शून्य!!"*

  *'छोटा शून्य मोठा शून्य' ऐकल्याबरोबर टीव्ही पाहणारा ताडकन उठून बसला!*

    *अंतराळवीर म्हणाली, "तुमचा श्वास थांबेल, तेव्हा किती लोकांना माहीत होईल?" साधू म्हणाले, "अर्थातच, कुणालाच नाही." ती म्हणाली, "जेव्हा मी मरेल तेव्हा सर्व जग माझ्यासाठी हळहळ व्यक्त करेल. माझ्या मृत्यूनंतरही लोक मला माझ्या कार्यासाठी स्मरणात ठेवतील. तुमचा प्रवास छोट्या शून्याकडे सुरू आहे. माझा प्रवास मोठ्या शून्याकडे!" अनेक वर्षानंतर मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.*

   *आता प्रश्न इतकाच. तुमचा प्रवास कोणत्या शून्याकडे सुरू आहे? छोट्या? की मोठ्या?*
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, February 12, 2025

आवडती माणसं नावडती माणसं

*आवडती माणसं नावडती माणसं!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 फेब्रुवारी, बुधवार_

▪️
   *एक मुलगा शाळेत जायचा कंटाळा करत होता. त्याची आई त्याला शाळेत जाण्यासाठी विनवण्या करत होती. पोरगं काही ऐकेना. "तुला शाळेत का जायचं नाही?" असं विचारता त्याचं उत्तर होतं, " कुणालाच मी आवडत नाही!" मग त्याला समजावणीच्या सुरात त्याची आई म्हणाली, " बाळा, असं म्हणून कसं चालेल? कुणाला तू आवडो, न आवडो तुला शाळेत जावंच लागेल. कारण तूच शाळेचा मुख्याध्यापक आहेस!? "*

    *गमतीचा भाग सोडला तर आपल्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांच्या आसपास अशी नावडती माणसं आहेत?आणि तरीही त्यांच्यासोबत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही? मुद्दा विचार करण्यासारखा आहे.*

   *काही माणसं सर्वांना आवडतात. काही कुणालाच आवडत नाहीत. काहींना त्याने काही फरक पडत नाही. ते अधिकारपदावर असतील तर बाकीच्यांच्या छाताडावर बसून त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांच्या माघारी त्यांना शिव्या घातल्या तरी " माघारी लोक राजालाही शिव्या घालतात!" असं म्हणत वेळ मारून नेतात. पदावर नसतील तरी ते तिसऱ्या वाक्याला वाकड्यात घुसतात. आपण इतरांपेक्षा किती जास्त पाण्यात आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून इतरांची लायकी काढतात. दोन शब्दांचं कौतुक तर सोडाच, पण चुका मात्र अगोदर काढतात. लोक अशा माणसांना दबकून राहतात, मात्र ते सोबत नसतील तर आनंदोत्सव साजरा करतात! अशी माणसं इतरांच्या बाबतीत 'साला फडतूस' या कॅटेगरीतली ठरतात.*

  *काही माणसं मनाने 'राजा माणूस' असतात. ती अधिकारपदावर असोत, नसोत, प्रिय असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्नता असते. बोलण्यात साधेपणा असतो. 'इतरांना आपण आवडावं' यासाठी ते वेगळं काहीही करत नाहीत, तरीही एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. आपली सुखदुःखं त्यांच्याशी शेअर करतात. ही माणसं अशावेळी फक्त 'डस्टबिन' बनतात. समोरच्या माणसाला रितं होऊ देतात. त्याचं ऐकून घेतात. समोरच्या माणसातला विश्वास जागा करतात. त्यांनी सहज सुचवलेल्या एखाद्या सल्ल्याने जर समोरच्या माणसाची एखादी कधीची न सुटलेली समस्या सुटली की आधीच आवडत्या असलेल्या माणसाच्या शिरपेचात प्रेमाचा आणखी एक तुरा खोवला गेलाच म्हणून समजा!*

  *मंदिरातला देव तरी दुसरं काय करतो? शांतपणे ऐकून घेतो. माणसाचं मन मोकळं झालं की माणूस पुन्हा नव्या उमेदीने काम करायला तयार होतो. करतो माणूसच; परंतु श्रेय ऐकून घेणाऱ्या देवाला जातं. देव सर्वांना आवडतो याचं एक कारण हेही असावं तर! कुण्या कवीने म्हणून ठेवलं आहे,*

_*याचसाठी देव आवडतो मला की...*_ 
_*दुःख माझे सर्व तो ऐकून घेतो!*_
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

निद्रादेवी सुप्रसन्न!

*निद्रादेवी सुप्रसन्न!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_बुधवार - 5 फेब्रुवारी 2025_

▪️
*हवेत जरा गारवा असला की माणसं सकाळी उठण्याचा जरा कंटाळाच करतात, नाही? अंथरुणातून बाहेर निघायला जीव नको नको म्हणतो. थोडं झोपतो म्हणून पुढचा अर्धा पाऊण तास आपण सहज झोपून काढतो. शिवाय 'अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच झोपसुद्धा माणसाची एक महत्वाची गरज असते' असंही ठासून सांगतो. पण झोप गरजेची असली म्हणून का कधीही, कितीही आणि कसंही झोपावं? झोपण्याच्या एकेकाच्या तऱ्हा पाहिल्या की कळतं की कोणालाच भारतात योगासनं शिकवण्याची गरज नाही! शिर्षासन सोडून सगळ्या आसनांत झोपणारे लोक आहेत आपल्याकडे. शिवाय कॉटवर झोपून जमिनीवर उठणारे, झोपेत गाणी म्हणणारे, जोरजोरात आज्ञा देणारे, झोपेत चालणारेही कमी नाहीत!*

  *मनुष्यप्राण्याला साधारणतः सहा-सात तासांची रात्रीची झोप ठीक आहे. पण रात्री झोपून पुन्हा दिवसाही झोपणं? हे जरा अतिच होत नाही का? झोपेवर नियंत्रण नसणारी माणसं पहा. अगदी मनमौजी असतात. त्यांना जगाची फिकीर नसते. 'मेरे मन को भाया, मैं बिन तकिये का सोया!' अशी त्यांची भुमिका असते. मनसोक्त झोपा काढल्यामुळे त्यांचं शरीरसुद्धा चांगलंच स्थूल झालेलं असतं. पण त्याला जुमानतील ते झोपाळू कसले? झोप येईल तेव्हा "मी आता झोपणार!" अशी राजेशाही घोषणा करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. सरळ ताणून देतात. पाहुण्यांची घरं, लग्न समारंभ वगैरे ठिकाणं त्यांना अडवू शकत नाहीत. थोडं पोटात काही ढकललं की निद्रादेवी स्वतःच त्यांना शोधत येते! शिवाय झोपेवर घोरणे बोनस. 'घोरणे ही अघोरी कला यार हो!' हे यांना कोण सांगणार?*
  
  *एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे झोप येत नाही म्हणून रात्री अडीच वाजेपर्यंत मोबाईल चाळणारी मंडळी. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी शरीर आपल्याला काम करू देत नाही. ते आपल्याकडून झोप वसूल करतं. म्हणून माणसं दिवसासुद्धा झोपतात. निसर्गाने आपल्याला छानपैकी पहाट साधनेसाठी, दिवस आपले कर्म करण्यासाठी आणि रात्र झोपण्यासाठी दिलेली आहे. हा क्रम आपल्यापैकी किती जण पाळतात?*

  *झोपेचं महत्त्व त्यांना विचारा ज्यांना रात्री झोपेची इच्छा असूनही झोपच येत नाही. झोप येणं ही त्यांच्यासाठी स्वर्गातलं फळ प्राप्तीची गोष्ट असते. लहान मुलांवर जसा देवाने झोपेचा वरदहस्त ठेवलेला असतो, तसा मोठ्यांवरही रहावा. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपण्याची इच्छा केली की झोपेने हळूच यावं, आपल्याला तिच्या अदृश्य हातांनी समेटून घ्यावं, आणि उठण्याच्या नियमित वेळी इतरांनी न उठवताच आपोआप डोळ्यांच्या पापण्यांनी अलगद विलग व्हावं...*

*ही कित्ती सुंदर गोष्ट आहे, नाही का ?*


-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Thursday, February 6, 2025

सामान्य माणसं!



सामान्य माणसं!

ग्रहण कोणतंही असो 
सुटणारच असतं आज ना उद्या...
दैन्य कुणाचंही असो,
फिटणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं
ऐरण झाल्यावर सोसवत नाही
हातोडा झाल्यावर मारवत नाही 
आणि आपल्याला मात्र हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार??.. 

अडून पडलेलं प्रत्येक काम 
होणारच असतं आज ना उद्या... 
कष्टाप्रमाणे फळसुद्धा
मिळणारच असतं आज ना उद्या...
पण आपण पडलो सामान्य माणसं 
वाट पाहणं जमत नाही 
जीव कामात रमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

कणभर असो की मनभर असो 
दुःख काय थांबणार असतं?
ते ही निघून जाणारच असतं आज ना उद्या...
जीवघेण्या वेदनेमधून, 
शरीर मुक्त होणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं 
दुःखाला झेलण्याची हिंमत नाही 
भेटल्या सुखाची किंमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

मनासारखंच घडणार असतं 
सगळं काही आज ना उद्या 
पदरात दानही पडणार असतं 
हवं तसंच आज ना उद्या
दारी तोरण सजणार असतं
अंगण गाणी म्हणणार असतं
पण आपण पडलो सामान्य माणसं 
मन ताब्यात राहत नाही 
स्वतःला आरशात पाहत नाही 
आणि तरीही आपल्याला हवं असतं 
सगळं काही मनासारखं !!

काय करणार!?
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...