Wednesday, April 9, 2025

संयमाची गोष्ट

*संयमाची गोष्ट*
_एक मुद्दा, एक विचार!_
_9 एप्रिल, बुधवार_

▪️
*संयमाची गोष्ट*

*"संयमाचा हात थोडा सोडता मी,*
*वादळे धावून आली स्वागताला*
*शब्द माझे ज्या ठिकाणी सैल झाले,*
*दोस्त हो, तेथेच माझा घात झाला!"*

      *प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव येतोच. आपली इच्छा नसतानाही आपला किंवा समोरच्याचा शब्द सुटतो, विषय भरकटतो, काम बिनसतं आणि नंतर 'असं व्हायला नको होतं' असं कित्येक दिवस वाटत राहतं.*

   *मोठ्या लोकांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्या काही पायऱ्या सांगितल्या आहेत त्यात संयम ही फार महत्त्वाची पायरी मानली आहे. पण आपला नारळ या पायरीवरच फुटतो! बहुतेक वेळा आपण बॅकफूटवर जातो, कारण आपला ढळलेला संयम. खास करून भावनिक माणसं मागे पडण्याचं हे खूप मोठं कारण आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेला डोलारा केवळ ऐनवेळी संयम सुटल्यामुळे कोसळतो आणि भरून न येणारं नुकसान होतं.*

   *संयम म्हणजे आपली वेळ येईपर्यंत स्वतःवर चांगल्या प्रकारे ठेवलेलं नियंत्रण. चांगली वेळ सुरू असेल तर तिचा भंग होऊ नये म्हणून दाखवलेलं समंजसपण. किंवा अंगावर धावून आलेली वाईट वेळ निस्तरेपर्यंतचं शांत राहून निर्णय घेण्याचं शहाणपण. आपण जिंकत असताना ठेवलेला संयम आपली गुणवत्ता वाढवतो; तर हरत असताना राखलेला संयम आपल्याला पुन्हा जिंकण्यासाठी उभे करतो. संयम म्हणजे तोंड फुगवून धरलेला अबोला नव्हे. चेहऱ्यावरचं स्मितहास्य ही संयमाची पहिली कसोटी आहे. पण आपण हे विसरतो. आपल्याला कसली घाई झालेली असते कुणास ठाऊक? सर्व काही मनासारखंच होणार असतं. गोष्टी मिळणारच असतात. पण त्या मिळेपर्यंतही आपल्याला दम निघत नाही. लगेच हवं असतं. मग जे मिळणार असतं तेही हातातून निसटून जातं. म्हणून संयम ढळायला लागला की अगोदर "यामुळे माझं काही नुकसान तर होणार नाही ना?" असा स्वार्थी चिमटा स्वतःला काढून पहावा. होणार असेल तर गप्प बसावं. नाहीतर 'दैव देतं अन् कर्म नेतं' अशातला प्रकार होतो. संयम न ठेवल्यामुळे आयुष्यात पडलेला एखादा खड्डा भरून निघण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाच्या पंधरा ते वीस वर्षांची आहुती द्यावी लागते. कधी कधी उरलेलं संपूर्ण आयुष्य त्यातच निघून जातं. मग आपण त्याला साडेसाती म्हणतो.*

    *खरं तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही अदृश्य टप्पे असतात. आपली व्यवस्था नियतीने कोणत्या टप्प्यावर केली आहे हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक टप्पा आपल्याला दिसायलाच हवा असंही काही नसतं. अशावेळी संयमाचं तीर्थ थोडं हळूच मस्तकावर घेता आलं तर किती बरं होईल! नाही का?*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

Wednesday, April 2, 2025

हप्त्यांवरचं जगणं

*हप्त्यांवरचं जगणं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_2 एप्रिल, बुधवार_

▪️
*हप्त्यांवरचं जगणं*

   *जेव्हापासून ईएमआय म्हणजे हप्त्यावर वस्तू मिळण्याची सोय झाली आहे, तेव्हापासून लोकांच्या खरेदीला अगदी भरतं आलं आहे. 'हप्ते पे देंगे तो दुनिया भी खरीद लेंगे!' इतका लोकांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. हसण्यावारी नेण्याच्या गोष्टी हप्त्यावारी मिळायला लागल्यापासून लोकांची गाडी सुसाट सुटली आहे. 'बचेंगे तो और भी भरेंगे!' या भरवशावर शोरूम्समध्ये आणि बिल्डरांकडे ग्राहकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. 'कितने ज्यादा भरेंगे?' हा विचार करायला कोणालाही वेळ नाही. सगळं जगणंच हप्त्यावर झालं आहे.*
 
*कधीकाळी लोक आपली पायरी ओळखून असत. 'उंटाच्या बुडाचा मुका घेऊ नये' अशा समजावणीच्या भाषेत सांगत. 'अंथरूण पाहून पाय पसरण्याचा' सल्लाही देत. पण आता, 'आहे तरुण तर घे मजा करून!' म्हणणाऱ्या नव श्रीमंतांचा  जमाना आहे. 'हप्ते भरू पण श्रीमंतच दिसू!' च्या व्हायरसने ज्याला त्याला पछाडलंय. अजून मिसरूडही न फुटलेल्या पोरांच्या बुडाखाली लाखांच्या गाड्या आल्या आहेत. ज्यांच्या बापांकडे स्क्रीन फुटलेला सॅमसंग आहे त्या पोरांकडे सिक्सटीन प्रो मॅक्सचा आयफोन आहे. ज्यांनी रोखीने मारुती आठशे घेतली नसती ते आठ दहा लाखाच्या पुढच्या गाड्या मिरवत आहेत. सगळी ईएमआयची आणि बापाची कृपा. मोबाईलने बँकच खिशात आणून ठेवल्याने फोन पे, गुगल पे पसरून "हप्त्यापुरते पैसे टाक ना!" म्हणणारे नवे जीव हप्त्यांवर खरेदी न करणाऱ्याला मात्र “तुमचा सिबिल स्कोर खराब आहे का?” असं विचारून धन्य करू लागले आहेत!*

     *खरंतर ज्यांना खोऱ्याने पैसा येतो आहे त्यांची कॉपी करण्याचा सामान्यांनी प्रयत्न करू नये. आहे त्यातही आनंदाने, समाधानाने जगता येतं. फारफार तर आपल्याला पेलवेल इतक्याच किंवा त्यापेक्षाही कमी हप्त्यावर, जिच्यामुळे आपली महत्वाची अडचण दूर होणार आहे अशीच गरजेची गोष्ट खरेदी केली तर समजण्यासारखं आहे. पण हाव आणि नातेवाईकांमध्ये खोटा दिखावा करण्याची हौस माणसाला स्वस्थ बसू देत नाही. 'करू ऍडजेस्ट' म्हणत आवाक्याबाहेरची खरेदी माणसं करतात. नंतर हप्ते भरताना नाकी नऊ येतात. हप्त्याची तारीख आली की चेहरे चिंताक्रांत आणि उदास होतात. सगळे हप्ते कट होऊन काहींच्या हाती केविलवाणी रक्कम उरते. आपल्या डोळ्यांदेखत आपली गाडी फायनान्सवाले घेऊन जातात आणि “उरलेली सगळी रक्कम भरा तरच तुम्हाला गाडी परत मिळेल” म्हणतात, किंवा घराला सील लावतात, तेव्हा जीवाला काय बरं वाटत असेल? पण सांगणार कुणाला? 'पळा पळा रे पुढे पळा!' च्या शर्यतीत कासव व्हायला कुणीही तयार नाही. सगळ्यांना न झोपणारा ससा व्हायचं आहे. मात्र गोष्ट कालही तशीच होती; आजही तशीच आहे. काल ससा हिरवळीवरचे गाजर खाऊन झोपला होता, आज ईएमआयचे गाजर खाऊन कायमचा झोपतो आहे इतकंच. म्हणून हप्त्यावर खरेदी करताना जिल्ह्यापेक्षा तालुका तर मोठा होत नाही ना? हे आधी पहावं, मग पाऊल उचलावं.*
*नाहीतर कुण्या कवीने लिहून ठेवलेलंच आहे,* 

*पायरी आहे कुठे, अन् चालली दुनिया कुठे*
*जग बुडवतिल एकदा, शेफारलेली माणसे!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 26, 2025

बापाचे मालक होऊ नका

*बापाचे मालक नका होऊ*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 मार्च, बुधवार_

▪️
*बापाचे मालक नका होऊ*


 *प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटीने आगार सोडलं आणि कंडक्टरसाहेब "तिकीट! तिकीट!" करत मोहिमेवर निघाले. निम्मी बस लाडक्या बहिणींनी आणि उरलेली ज्येष्ठांनी भरलेली असल्यामुळे दर्दी कमी आणि हाफ तिकीटवाली गर्दीच जास्त होती. त्यामुळे उत्पन्न वाढीचा प्रश्न नव्हताच. उलट कंडक्टरना पैशाची खणखण कमी आणि वाद घालणाऱ्या प्रवाशांची भनभन जास्त ऐकावी लागणार होती. तेही तशी तयारी करूनच आले होते.*

    *अवाढव्य शरीरांच्या गर्दी आणि गोंगाटामधून आपला देह कसाबसा ओढून काढत कंडक्टर एकदाचे मागच्या प्रवाशांपर्यंत पोहोचले. एक गृहस्थ हातात पैसे धरून त्यांच्याकडेच पाहत होते. कंडक्टरची आणि त्यांची नजरानजर होताच त्यांनी पैसे त्यांच्या हातावर सोपवले आणि गावाचं नाव सांगितलं. अर्थातच हाफ तिकीट होतं. कंडक्टरनी पैसे मोजले तर भरले पंचावन्न रुपये. मधल्या काळात भाववाढ झालेली बाबांना माहीत नसावी म्हणून कंडक्टरनी त्यांना सांगितलं, "बाबा अजून पाच रुपये द्या." बाबा म्हणाले, "तिकीट पंचावन रुपये हाय ना?" कंडक्टर म्हणाले, "आहे नाही, होतं! आता पाच रुपये वाढले." बाबा म्हणाले, "कवा?" कंडक्टर म्हणाले, "कवा काय? मागच्याच हप्त्यात." बाबा म्हणाले, "पण माझं पोरगं तर म्हणलं पंचावनच रुपये लागतेत." "त्याला भाव वाढ झालेली माहीत नसेल. द्या पाच रुपये", कंडक्टर म्हणाले. बाबांचा चेहरा पडला. व्याकुळ नजरेने कंडक्टरकडे बघत म्हणाले, "त्यानी इतकेच दिलते." "काय? इतकेच पैसे देऊन तुम्हाला एसटीत बसवून दिलं??" "व्हय." "आणि परत यायला पैसे? रस्त्यात चहा पाण्याला लागले तर?" बाबांकडून उत्तर आलं नाही. पण त्यांचा हताश चेहरा बरंच काही सांगू पाहत होता. कंडक्टरसाहेबांचं डोकं गरगर करायला लागलं. डोळ्यासमोर त्यांच्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा उभा राहिला. समोरच्या बाबांच्या रूपाने त्यांचे वडील त्यांच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत होते. प्रश्न पाच रुपयांचा नव्हताच. त्यांनी बाबांना तिकीट दिलं पण त्यांच्या डोळ्यांत बघण्याची त्यांना हिंमत होईना. "इतकेच पैसे देऊन बापाला एसटीत बसवून दिलं??" प्रश्न वेताळाचं रूप घेऊन त्यांच्या मानगुटीवर बसला. प्रवास संपला. प्रवासी घरी गेले. प्रश्न कंडक्टरसोबत सहकुटुंब त्यांच्या घरी आला.*

   *प्रवासाला निघालेल्या बापाच्या हातावर फक्त जाण्यापुरते हाफ तिकिटाचे पंचावन्न रुपये टेकवताना त्याच्या तरुण कर्त्या मुलाला काहीच वाटलं नसेल का? की मुलाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून बापालाच अधिक पैसे मागण्याची हिंमत झाली नसावी? की बाप तेही पैसे पोराला न सांगता दुसऱ्याकडून उसने घेऊन आला होता? की वडिलांनी अशा वृद्धापकाळात प्रवासाची दगदग करू नये म्हणून त्याने त्यांच्या काळजीपोटी खोटी कडकी दाखवली, जेणेकरून ते जाणार नाहीत, घरीच राहतील? की खरोखर आजकालच्या कमावत्या मुलांनी आई-वडिलांवर अशी लाचारीची वेळ आणली आहे ज्याची त्यांना बिलकुल जाणीव नाही? प्रश्नांचं मोहळ उठलं.*

  *अस्वस्थ कंडक्टरनी दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर इतकंच लिहिलं, "हाती पैसे आले म्हणून मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी!"*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224


Wednesday, March 19, 2025

चांगुलपण दे गा देवा!

**चांगुलपण दे गा देवा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 मार्च, बुधवार_

▪️
*चांगुलपण दे गा देवा!*

   *समाजात काही माणसं चांगल्या स्वभावाची असतात, काही धूर्त, धोरणी, लबाड. चांगल्या माणसांचे खायचे दात चांगले असतात, धूर्त माणसांचे दाखवायचे. चांगली माणसं चेहऱ्याने चांगली असतीलच असं नाही, मात्र धूर्त माणसांच्या पदरात कधीकधी 'लंगूर के हाथ अंगूर' या न्यायाने देखणेपणाचं दान पडलेलं असतं, त्याचाही ती योग्य वेळी बरोब्बर शस्त्र म्हणून उपयोग करतात.*

    *चांगल्या माणसांना धूर्तांचा कावा लक्षात येत नाही. मुळात ती माणसं धूर्त आहेत हेच त्यांना कळत नाही. कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. तोपर्यंत धूर्त माणसं चांगल्या माणसांशी त्यांना हवी तितकी जवळीक साधून त्यांना हवं ते काम त्यांच्याकडून काढून घेतात. चांगली माणसं असतात केवळ प्रेमाची भुकेली. दोन शब्द कोणी प्रेमाचे बोललं की ही माणसं भाळतात. धूर्त माणसांना हे चांगलंच ठाऊक असतं. त्यांना जितकं ओरबाडायचं असतं तेवढं ओरबाडून झालं की धूर्त माणसं शिताफीने हळूच अंग काढून घेतात. काम झालं की त्या माणसाला खड्यासारखं बाजूला करतात. नंतर ओळख द्यायलाही त्यांना वेळ नसतो. ना ते त्यांचा कॉल उचलतात, ना त्यांच्या मेसेजला उत्तर देतात. नंतर चांगल्या माणसांनी त्यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवायची. दुर्लक्षित होण्याची किंवा अपमानित होण्याची!*

    *चांगल्या माणसांना सुरुवातीला हे फार अवघड जातं. पण जेव्हा ती भानावर येतात, तेव्हा त्यांना अधिक स्पष्ट दिसू लागतं. मात्र ती त्यांचं चांगुलपण सोडत नाहीत. समुद्रातून एक लोटा पाणी कोणी घेऊन गेलं तर समुद्राला काही फरक थोडाच पडतो? तसंच चांगल्या माणसांच्या बाबतीत होतं. उलट त्यांना फसवणाऱ्या धूर्त माणसांची नंतर कधीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची व त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नाही. हा चांगुलपणाचा विजय असतो.*

    *याउलट फसवणूक झालेल्या काही चांगल्या माणसांना वाटू लागतं की ' माझ्या चांगुलपणामुळे माझ्यावर खूप अन्याय झाला आहे'. मग ही माणसं स्वतःच इतरांशी धूर्त लोकांसारखी वागू लागतात. कामापुरतं गोड गोड बोलतात, काम झालं की ओळख देत नाहीत. बिझी असल्याचं भासवतात. ब्लॉक करतात. मग इतर लोक या कधीकाळच्या चांगल्या माणसांनाही स्वार्थी, धूर्त, लबाड, खडूस समजू लागतात. त्यांच्या तोंडावर त्यांना हे स्पष्टपणे ऐकवतात. तीही मख्खपणे ऐकून घेतात. इथे समुद्राचं डबकं होतं. चांगल्या नावाला बट्टा लागतो आणि चांगुलपणाची मान शरमेने खाली जाते.*

   *म्हणून चांगल्या माणसांनी 'आपलं चांगुलपण आपण धूर्तांच्या दावणीला तर बांधत नाही आहोत ना?' हे वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे. शिवाय परिस्थितीने अडलेल्या चांगल्या माणसांना धूर्त समजण्याची गल्लतही नाही केली पाहिजे. कारण मनाचं चांगुलपण प्रत्येकालाच थोडं लाभतं? मोजक्याच लोकांना देवाने बहाल केलेला तो एक सुंदर दागिना आहे. त्याला जीवापाड जपलं पाहिजे.*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 12, 2025

माणसाचा वर्ग कोणता?

*माणसाचा वर्ग कोणता?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 मार्च, बुधवार_

▪️
*माणसाचा वर्ग कोणता?*

    *"मम्मी, पशु म्हणजे प्राणीच ना?" तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीने आईला विचारलं. मम्मी म्हटली, "हो तर!" "मग माणसाला पशु म्हटलं तर चालेल ना?" मुलीच्या या प्रश्नावर मात्र घास घशात अडकावा तसा उत्तराचा शब्द मम्मीच्या घशात अडकून बसला. काय उत्तर द्यावे तिला कळेना. स्वतःला सावरत ती इतकंच म्हणाली, "पप्पांना विचारून सांगते."*

    *माणसाला प्राण्यांच्या वर्गात टाकायचं की पशुंच्या? हा तर नवीनच बॉम्ब टाकला लेकीने! माणूस हा समाजशील प्राणी आहे असंच आपण लहानपणापासून वाचत, लिहीत, म्हणत आलो. माणूस हा पशु आहे असं कधीच म्हटलं नाही, किंवा ऐकलंही नाही. पशु-पक्षी यांच्याबद्दलही आपण लहानपणापासून माहिती गोळा करत आलो, मात्र प्राणी आणि पशु हे वेगवेगळे असतील असं कधी वाटलं नाही. लेकीला उत्तर देणं भाग होतं. मम्मीच्या विचारांची गाडी वेगात धावायला लागली. काही क्षणातच ती विचारांच्या कोणत्या जगात गेली हे तिलाही कळलं नाही. शब्दांची उकल करून बघता बघता शब्द स्वतःच तिच्यासमोर अर्थ ओंजळीत घेऊन उभे राहिले.*

    *ज्यांच्यात प्राण आहे ते प्राणी. हिंदीमध्ये त्यांना जानवर म्हणतात कारण त्यांच्यामध्ये 'जान' म्हणजे 'प्राण' असतो. 'वर' म्हणजे 'धारण करणारा'. मग 'पशु' कोण? पशु शब्द संस्कृतमधल्या 'पश' या धातूपासून आला. ज्यांना पाशात म्हणजे बंधनात ठेवणे आवश्यक असते ते प्राणी म्हणजे पशु. त्यांच्यावर बंधन ठेवले नाही तर त्यांच्या शक्तीचा ते क्रूर उपयोग करतात. इतरांना हानी पोहोचवतात. म्हणून मुक्त श्वापदांना शक्यतो पशु म्हटलं जातं, आणि जे माणसांसोबत राहु शकतात, शक्यतो कोणाला इजा करत नाहीत, त्यांना प्राणी!  गुंता हळूहळू सुटू लागला.*

    *क्षणात मम्मीच्या डोळ्यांसमोरून गेल्या पंधरा दिवसांच्या बातम्या येऊन गेल्या. बसमध्ये पाशवी बलात्कार. लोखंडी रॉडने मारहाण करत पाशवी हत्या. निर्घृण हत्या केलेल्या प्रेताची विटंबना. निराधार महिलेवर पाशवी अत्याचार! पाशवी म्हणजे? पशूंप्रमाणे?? हो हो, तसेच. माणुसकीला कलंकित करणारी ही माणसे, माणसे नव्हेतच! हे तर पशू!! प्राण्यांमध्ये असलेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता यांच्यात कुठे आहे? यांच्यात आहे फक्त क्रौर्य, स्वार्थ, वासना, ओरबाडण्याची राक्षसी वृत्ती आणि नीच हव्यास! म्हणजे प्राणी आणि पशु यांच्यात भावनांवरच्या नियंत्रणाचा फरक आहे तर?*

   *मम्मीचे डोळे भरून आले. पोरीजवळ गेली. तिला पोटाशी घट्ट धरलं, आणि इतकंच म्हणाली, "पशु म्हणजे प्राणी नाही हं बाळ! पशु म्हणजे फक्त पशु, आणि प्राणी म्हणजे फक्त प्राणी! आणि हो, माणूस हा प्राणीच आहे, पण त्याचा पशु व्हायला वेळ लागत नाही, म्हणून जरा सावध राहत जा."* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, March 5, 2025

माणूस जगला पाहिजे

**माणूस जगला पाहिजे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 मार्च, बुधवार_

▪️

*गिव मी सम सनशाईन*

  *पहाटे सगळं जग साखरझोपेत असताना एक जण रेल्वेरुळावर येऊन उभा राहिला. निस्तेज. निर्विकार. तिकडून गाडी आली. लोको पायलटने त्याला पाहिलं. खूप हॉर्न दिले. पण हॉर्न ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. तो स्वतःही नव्हता. रुळावर फक्त त्याचं शरीर उभं होतं. विचार शून्य झालेलं फक्त शरीर. गाडी थांबू शकली नाही, त्याचा प्रवास थांबला. लोकांनी म्हटलं गाडीने त्याला उडवलं म्हणून तो गेला, परंतु खरं तर तो दोन महिन्यापूर्वीच गेलेला होता, हे कोणालाच कळलं नाही. नंतर लोक त्याच्यावर अमुक दडपण होतं वगैरे चर्चा करत राहिले.*

    *भावनिक आणि स्वाभिमानी माणसं धाडसी असतात. त्यांच्या निर्णयांनी ती कधी इतरांच्या दहा पावले पुढे जातात आणि खूप प्रगती करतात, तर कधी दहा पावले मागे फेकली जातात, प्रचंड अपयशाची धनी होतात. जिंकली तर कौतुक; हारली तर ‘छी! थू!’ त्यांच्या वाट्याला येते. ही माणसं जगावेगळी असतात खरी, परंतु यांची एक अडचण असते. ती अपमान सहन करू शकत नाहीत. दडपण व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. पडीच्या काळात कोणाला सांगतही नाहीत. चार चौघात हसतात, आतल्या आत झुरत राहतात. लोक काय म्हणतील? आणि ते काय करतील? हे प्रश्न त्यांना छळू लागतात. बदनामीची त्यांना भीती वाटते. मग एखादया हळव्या क्षणाला त्यांचं मन खचू लागतं. मन खचलं की शेवटाकडे सुरुवात झालीच म्हणून समजा. मृत्यू हा त्यांना सगळ्या कटकटीतून सुटण्याचा सोपा मार्ग वाटतो. जे इतरांना जमत नाही, असं मरण्याचंही धाडस ते करतात. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना अडचण होते हे त्यांना जिवंतपणी आवडत नाही, पण आपण असे केल्यावर त्यांना आयुष्यभर अडचणी राहतील, हे त्यांना टोकाचा निर्णय घेताना समजत नाही ही खरी शोकांतिका आहे. अशा वेळी माणूस आपल्या हातून निसटू लागला आहे हे कोणालातरी कळणं फार महत्वाचं. खचू पाहणाऱ्या माणसानेही 'मी आता खचू लागलो आहे' हे कोणालातरी सांगणं महत्त्वाचं आहे. कारण प्रयत्नांचे शंभर दगड मारल्यावर एखादा तरी दगड लागतोच. प्रयत्न थांबता कामा नयेत.*

     *सरतेशेवटी जेव्हा कुठूनही मदत मिळणार नाही तेव्हा 'ध्यान, ज्ञान आणि गान' म्हणजे संगीत हे माणसाला कोणत्याही संकटातून शंभर टक्के वाचवू शकणारे मार्ग आहेत हे प्रत्येकाला कळावं. तीनपैकी एकाला अशा वेळी बिनशर्त शरण जावं. कारण माणूस वाचला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. सोबत माणुसकीही जगली पाहिजे. हे जग माणसांनी त्यांच्या प्रयत्नांनी सुंदर केलं आहे. माणसंच खचून हे जग सोडून जाऊ लागली, तर या जगाच्या इतक्या सुंदर असण्याचा फायदा तरी काय?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, February 26, 2025

खरा उपवास

*खरा उपवास!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 फेब्रुवारी 2025, बुधवार_

▪️

*‘उपवास धरणे’ ही आपल्या संस्कृतीमधील एक सुंदर गोष्ट आहे. आणि ‘धरलेला उपवास पुन्हा सोडणे’ ही त्याची त्याहून सुंदर उत्तरपूजा आहे. काहीजण उपवास धरतात, काही ठेवतात, काही करतात, काहींना तो घडतो, तर काहींना तो चक्क पावतो!*

      *सदा नि कदा चर चर चरणाऱ्या देहाला व त्याच्या यंत्रणेला थोडी सक्तीची विश्रांती मिळावी हा उपवासामागचा निर्मळ हेतू आहे. 'हाताची घडी तोंडावर बोट!' ही म्हण उपवासासाठीच जन्माला आलेली असावी, पण खादाड लोकांनी ती लहान मुलांवर चिटकवली! उपवासाला 'कमी खावं' किंवा 'खाऊच नये' इथपर्यंत ठीक आहे. मात्र “हेच खावं, ते खाऊ नये” हा फतवा कोणी काढला कुणास ठाऊक? शिवाय त्याचे पहारेकरी खूप. एखाद्याने चुकून चॉकलेटचा किंवा बिस्कीटचा एक तुकडा जरी तोंडात टाकला तरी त्याच्यावर तुटून पडायला हे पहारेकरी टपूनच असतात. “उपास सुटला! उपास सुटला!” असं ‘चोर! चोर!’ च्या पट्टीत जाहीर करतात. बिचाऱ्या उपासकऱ्याचा चेहरा पहिल्याच बॉलवर विकेट पडल्यासारखा होतो!*

     *आजकालचा आपला उपवास म्हणजे निव्वळ ‘खाण्यात बदल’ असा झालेला आहे. आठवडाभर न खाल्लेली, वाटीभर टाकली तर कढईभर होणारी, आणि नुसताच बिनकामाचा पोटाचा फुगा वाढवणारी साबुदाण्याची खिचडी किंवा भगर उपवासाला कशी चालते कळत नाही. शिवाय उपवासाला बाकी काही चालू न देणाऱ्या लोकांना तंबाखू वगैरे खाल्लेलं मात्र बरोबर चालतं. ती 'वल्ली' असल्याचं शेपूट तिथे माणसं शिताफीने जोडतात! मग चतकोर भाकरीनेच काय घोडं मारलं आहे? 'काहीही खा, पण अत्यल्प, अगदी थोडसंच खा.' अशी उपासाची नवी व्याख्या केली तर? इतर दिवशी जेवणाला दोन भाकरी खाणाऱ्या माणसाने उपवासाच्या दिवशी फक्त चतकोर भाकर खाल्ली, तरी त्याचा उपवास चालू रहायला काय हरकत आहे? पण मग माणसांना 'चेंज' कसा मिळणार!?*

      *सणाच्या दिवशी एका दिवसाचा उपवास करणं सोपं आहे. आयुष्यभर तो नित्यनेमाने निभावणं ही साधना आहे. प्रख्यात तत्त्वचिंतक श्री श्री रविशंकर यांनी उपवासाची खूप सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. परमेश्वराचीच रूपे असलेल्या चांगल्या गुणांच्या व्यक्ती,वस्तू, विचारांच्या सानिध्यात राहणे म्हणजे खरा उपवास. उपवासाच्या निमित्ताने खाण्यावर नियंत्रण तर येतंच; बोलण्यावरही ते यावं. थोडं चिंतन मनन व्हावं. ज्ञानार्जन व्हावं. शुभ, नेमकं आणि सकारात्मक बोलावं. छोटं का होईना एखादं चांगलं काम करावं. आणि महत्वाचं म्हणजे चिडचिड न होता चेहऱ्यावर मस्त स्मित असावं की उपवास पावलाच म्हणून समजा!*

    *असा उपवास आपल्यापैकी किती जण करतात?*
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...